माणसं; इथली आणि तिथली
आपल्याकडे झेंडा दिन किंवा सैनिक दिन असतो, तसा क्रॅनडात रिमेंबरन्स डे साजरा करतात. पहिल्या-दुसऱ्या महायुद्धात वीरगती मिळालेल्या सैनिकांच्या स्मृती जागवून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी. पण दुर्दैवानं इथंही बहुतेक सगळे `ज्येष्ठ नागरिक'च त्यात सहभागी होत असावेत. त्या दिवशी स्टेशनवर जेव्हा एक बाई (त्याही `ज्येष्ठ'च) ते झेंडे विकत होत्या तेव्हा बहुतेक सगळे ज्येष्ठ नागरिकच ते आवर्जून घेत होते. मी विचारलेल्या कुणाच तरुणाला ते काय आणि कशासाठी याची कल्पना नव्हती. रात्री टीव्हीवर जेव्हा `देशभरात विविध ठिकाणी रिमेंबरन्स डे उत्साहात साजरा झाल्याचे `आजच्या ठळक बातम्या'त सांगितले तेव्हा मला उलगडा झाला.
दोष फक्त तरुण पिढीलाच देता येणार नाही...निदान आपल्याकडे तरी! एकदा केवळ राष्ट्नीय कर्तव्य म्हणून मी माझ्या पुतण्याबरोबर झेंडावंदनासाठी त्याच्या बालवाडीत गेलो, आणि तिथे त्या लहानग्यांना उन्हात उभं करून मोठ्यांनाही वैताग आणणारी मूर्ख बडबड ऐकून तासाभरानं परत आलो होतो. `पुढच्या झेंडावंदनासाठी गेलंच पाहिजे' अशी सक्ती त्याच्यावर कोणत्या तोंडानं करणार?
इथं एका शाळेतल्या इतिहासाच्या शिक्षकानं एक अभिनव कल्पना राबविलेली टीव्हीवरून दाखविली. शाळेच्या माळावर मुलांकडून एक खंदक खोदून त्यात रात्री मुलांनी झोपायचं. सैनिकांप्रमाणंच काही हालचाल न करता. पाळया बदलताना तसंच गुडघे आणि कोपरांवरून रांगत सरकायचं. सैनिक देशासाठी काय यातना सहन करत असतात याची कल्पना यावी म्हणून. सकाळी त्या मुलांना महायुद्धावरचे माहितीपट दाखवले. मुलांनी कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त पटीनं प्रतिसाद दिल्याचं ते शिक्षक खूश होऊन सांगत होते. भाग घेतलेली मुलं तर भारावून गेली होती. आजवर पाहिलेल्या युद्धपटांपेक्षा आजचा सिनेमा मनाला भिडल्याचं आवर्जून सांगत होती. पुढच्या वर्षी वेगवेगळया शाळांतून हा प्रयोग करण्याचं या मुलांनी तेव्हाच जाहीर केलं. - निदान पुढच्या वर्षीपासून तिथं ते झेंडे विकत घेणाऱ्यांमध्ये शंभर तरुणांची भर नक्कीच पडेल.
असंच एकदा रस्त्यावरून जाताना काही शाळकरी मुलांचा घोळका येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून पैसे गोळा करत होता. मुलं तशी चांगल्या घरातली वाटत होती. थोडं पुढं गेलो तर आणि सहा-सात मुलं दिसली. जवळजवळ पन्नासेक मुलं तरी त्या रस्त्यावर शाळेचा गणवेश घालून पैसे गोळा करत होती. कसलीतरी मॅच असल्याचं त्यांनी मला सांगितलं आणि मी जवळची चिल्लर त्यात टाकून पुढं निघालो. इतका वेळ शांतपणे चार पावलांवर उभ्या असणाऱ्या त्यांच्या शिक्षिका मला थांबवून म्हणाल्या, `माझ्या मुलांना खूश केलंत त्याबद्दल मी आभारी आहे' कोणत्या तरी शालेय स्पर्धेसाठी मुलं जायची होती आणि शाळेच्या बजेटमध्ये ती स्पर्धा नव्हती. आईवडिलांकडून पैसे मागण्यापेक्षा मुलांना चांगल्या कामासाठी काही मागण्याची लाज वाटू नये, त्यांना समाजापुढं जाता यावं म्हणून बाइंर्नी अशी वर्गणी गोळा करायला सांगितली. एवढंच नव्हे तर मुलांबरोबर त्या स्वत: उभ्या होत्या. मुलं कोणाला सतावत नाहीयेत ना.. भिकारीपणा करत नाहीयेत ना ते पाहात होत्या आणि वर्गणी देणाऱ्या प्रत्येकाचे त्या स्वत: आभार मानत होत्या.
तुरळकच का होईना, पण अशी काही उदाहरणं बघून सूर्याची आणि पणतीची गोष्ट आठवते!
- चारुदत्त आपटे, टोरंटो (क्रॅनडा)
Comments
Post a Comment