तुझे आहे तुजपाशी
सहकार ही संकल्पना आपल्याकडे अलीकडच्या - म्हणजे गेल्या शतकभराच्या काळात रुजली असा एक समज आपल्याकडे आहे. आज `सहकार क्षेत्र' असे म्हटले की प्रामुख्याने बँका-सोसायट्या किंवा साखर-सूत गिरण्या एवढ्यांचा विचार प्रामुख्याने मनात येतो. सध्या तिथे जे काही चालले आहे ते पाहून `सहकार धोक्यात आहे' किंवा `सहकार चळवळ संपली' असे सरसकट म्हटले जाते. एखाद्या व्यवसायिक संस्थेच्या व्यवस्थापनात किंवा तिच्या मालकीच्या स्वरूपात, त्यातील हितसंबंध पाहून बदल केले जाऊ शकतात; त्यातील सहकार बदलतो. परंतु त्याव्यतिरिक्त साऱ्या मानवी समाजात सहकार ही एक जीवनपद्धती म्हणूनच राहील हे लक्षात घ्यावे लागते. सहकाराशिवाय मानवी समाज विकसित होऊ शकणार नाही, विनासहकार त्याचा उद्धार होऊच शकत नाही. बँका नि गिरण्या कशाला; आपल्या घरातसुद्धा सहकाराची तत्त्वे लागू करावी लागतात. कुटुंबातील वयस्कर आजोबा-आजी हे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांवर असावे, आणि कर्ता पुरुष (किंवा महिला) कार्यकारी संचालक असावे. वयाची गुंतवणूक न पाहता बालकापासून सर्वांना एकच सममूल्य मत असावे. सर्वांनी निर्णय प्रक्रियेत भाग घ्यावा, त्यानुसार आजोबा-आजीनी धोरण ठरवावे आणि कर्त्या व्यक्तीने (म्हणजे एमडी ने) ते अंमलात आणावे. कुटुंबात आर्थिक पारदर्शकता, हिशेब तपासणी, साप्ताहिक व मासिक बैठका हीच कार्यपद्धत हवी. निधीचा विनियोग शिक्षण-गंगाजळी-इमारतनिधी-यात्राजत्रा, लग्न असे उत्सवनिधी वगैरे शीर्षकांनी व्हावा आणि पुढल्या वर्षीचे अंदाजपत्रकही करावे. इतकेच काय, वार्षिक अहवाल-ताळेबंद-साध्य व संकल्प प्रकट करणारी `जनरल सभा'सुद्धा व्हावी.
कुटुंबाच्या पातळीवर ही सारी कल्पना अतिरंजित किंवा मौजेची वाटेल, परंतु असा प्रयोग करून पाहिला तर बाहेरची सहकार चळवळ संकटात का आली आहे त्याचे नेमके उत्तर सापडेल. वरील पद्धतीने आपल्याच परिवाराचे व्यवहार आणि वृत्तांत तपासून आपण त्यास `अ' वर्ग देऊ शकू काय ते स्वत:शी ठरवावे. पै-पाहुणे, आप्तस्वकीय, मित्र गोतावळा अशा बाहेरच्या जगाला आपण आपल्या कुटुंबाचा `अ' वर्ग दारावरच्या पाटीपासून मिरवून दाखवू. एखाद्या सहकारी संस्थेला सरकारी कायदा व ऑडीटर चांगले म्हणतो, प्रशस्तीपत्र देतो; परंतु ती संस्था तशी चांगली असल्याचे समाज मानत नाही. तिथे गुंतवणूक किंवा सभासद होताना सामान्य माणूस विचारच करतो. त्याचप्रमाणे कोणत्याही कुटुंबाकडे छानपैकी घर-गाडी-नोकरी दिसली तरी तिथे सोयरीक करताना तो `अ' वर्ग बाह्यात्कारी ठरतो व त्यासंबंधी `अंतर्गत तपासणी' करून ठरवावे लागते. याला `सोशल ऑडिट' म्हणता येईल. पण त्याहीपेक्षा त्याच कुटुंबाचे सदस्य त्याबद्दल खरे काय ते जाणत असतात.
त्या कौटुंबिक जाणिवेत जर सहकार कसोटीला उतरला तर अशा लोकांनी चालविलेली कोणतीही संस्था धोक्यात येणार नाही. लोकशाही हे सहकाराचे अविभाज्य अंग आहे. आजची लोकशाही निवडणूक ही जशी चेष्टेच्या पातळीवर उतरली आहे, तीच कथा आपल्या कुटुंबाच्या संदर्भात घडत नाही ना, हे ज्याचे त्याने पाहावे. परिवाराचे सदस्य आपले मत देत नाहीत, हिशेब देत नाहीत, कर्ता माणूस पैसे कुठून आणतो ठाऊक नाही, थकित देणे समजत नाही... अशी रीत अनुसरली तर जो तो आपल्या हितसंबंधापायी परिवाराचाच आधार घेत बाहेर `खाजगीकरण' सुरू करतो. आपल्या कुटुंबसंस्थेलासुद्धा हे फुटीर खाजगीकरणाचे वारे लागले असल्याचे स्पष्ट जाणवू लागले असले तरी `समाज' म्हणून टिकण्यासाठी आपली कुटुंबसंस्था बळकट राहायलाच हवी हे निर्विवाद सत्य आहे. आणि त्यासाठी खऱ्या सहकाराला कुटुंबातसुद्धा पर्याय नाही.
सामुदायिक नळावर, रस्त्यात असो, प्रवासात असो, बाजारात असो.... आपले जीवन परस्पर सहकारावरच अवलंबून असते. ती मानवी जीवनपद्धती आहे. आपल्या दैनंदिन जीवनातच `सहकार धोक्यात' आल्याचे भासते आहे. तो मन:पूर्वक जोपासला तर सहकारी व्यवसाय, सहकारी संस्था आणि एकंदर मानवी जीवन समृद्ध होईल. `समृद्धीचा मार्ग सहकार' हे त्यासाठीच म्हणायचे. सहकार परस्परावलंबी असतो. त्याचा विसर पडला म्हणून आपली कुटुंबव्यवस्था, शेजार, समाज व त्यापुढे जाऊन सहकार चळवळ धोक्यात आहे असे म्हणू लागतो. त्याचे मर्मस्थान आपल्याजवळच आहे हे समजून घ्यावे लागेल.
***
Comments
Post a Comment