आम्ही स्वदेशी व बाकी परदेशी
पूर्वी घरातील वयस्क व्यक्तीस मान होता. त्या व्यक्तीशी विचारविनिमय करून कौटुंबिक प्रश्नांतून मार्ग काढला जात असे. ती परिस्थिती बदलत चालली. शहरात कुटुंबातील कर्ते पती-पत्नी दिवसभर बाहेर, मुले शाळा-कॉलेजात व्यस्त व वयस्क व्यक्ती दिवसभर घरात बसून असतात. दुखणे/खुपणे व व्यथा याबाबत विचारपूस करण्याचे भान विसरले. ज्या वृद्ध/ज्येष्ठ व्यक्तीकडे संपन्नता आहे त्या व्यक्तीच्या अडचणी थोड्या फार लक्षात घेतल्या जातात. असाहाय्य व्यक्तींचे जिणे खडतर बनते. एकाकी व्यक्तीची प्रतारणा होते. तोंड बंद करून जगण्याशिवाय मार्ग असत नाही.
वृद्ध पालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी उदरनिर्वाहाची तरतूद करणारा कायदा मध्यवर्ती सरकारने केला. त्याची अंमलबजावणी राज्य शासन निष्ठेने करत नाही. त्या तरतुदीबाबत जागरूकता नाही. लिगल एड कक्ष काहीच करत नाहीत. कायदा २००७ साली झाला, त्याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचत नाही.
उच्च शिक्षण घेणारी मुले परदेशी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. बऱ्याच व्यक्तींनी देशात आलिशान घरे/फ्लॅटस् बांधले आहेत. मुले मात्र देश सोडतात. आई वडील यांना कधीतरी परदेशात घेऊन जाणेचे कर्तव्य असल्याचे ते मानतात. परदेशात राहणाऱ्या मुलांना भारतात राहणाऱ्या पालकांची मानसिक कोंडी लक्षात येत नाही. आजी-आजोबांसंबंधी आपुलकी असत नाही. नातवंडांपासून मानसिक समाधान अपेक्षित असते ते मिळत नाही. मुलांच्या बायका परदेशी असल्यास कौटुंबिक स्वास्थ्य मिळत नाही.
या सर्व स्थितीचा सौ.निलिमा बोरवणकर यांनी अभ्यास करून परदेशी राहणाऱ्या भारतीयांच्या पालकांची होणारी कोंडी याविषयी `आम्ही भारतीय व बाकी परदेशी' या पुस्तकाचे लिखाण केले. त्यामुळे ज्येष्ठांना आपले जीवन सुखमय करण्याचा मार्ग सापडेल.
पुणे परिसरात सुमारे ३५ वृद्धाश्रम आहेत व मुंबई परिसरात २५-३० वृद्धाश्रम आहेत. आजारी वृद्धांना तसेच प्रौढ मतीमंद वृद्धांसाठी वृद्धाश्रम आहेत. हे वृद्धाश्रम शासनाने उभे केलेले नाहीत. सेवाभावी संस्थांनी जनतेसाठी उपलब्ध केले आहेत. त्यातील व्यवस्था अपुरी आहे.
बारामती ज्येष्ठ नागरिक निवास हा वृद्धाश्रम सौ.बोरावके ट्न्स्टतर्फे आहे. रमणीय, मोकळया वातावरणात संस्थेची तीन एकर जागा आहे. देणगीतून विविध कामे झाली आहेत. रुग्णालय व निवासी डॉक्टर्स तत्पर सेवा देतात. ५० ज्येष्ठांची सोय होईल अशी छोटी छोटी घरे, अतिथीगृह, शाकाहारी घरगुती जेवण, ध्यानमंदिर, ज्ञानमंदिर, करमणुक, रोग निदान, निसर्गोपचाराची सोय आहे.
मा.शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प उभा आहे. तसेच वृद्धाश्रम प्रत्येक तालुक्यात निर्माण करण्यासाठी काहीतरी करावे. मोठेपणा व निरर्थक गोष्टींसाठी पैसे खर्च करणाऱ्यांनी यांना प्राधान्य देऊन वृद्धाश्रम उभे करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
- श्रीधर मोडक,
३९९/२, मोडक कॉम्प्लेक्स,
जयसिंगपूर (कोल्हापूर) ४१६१०१
फोन : ०२३२२ - २२६१७२ मोबा.७५८८२६६४४०
पिनकोडसंबंधी
आमचा पत्ता लिहिताना तुम्ही तो ४०००६३ असा लिहिता. पोस्टाच्या नियमाप्रमाणे तो ४०००६३ असा असायला हवा.भारताच्या घटनेप्रमाणे राजव्यवहाराची प्राधिकृत भाषा देवनागरी लिपीतली हिंदी व आकडे आंतरराष्ट्नीय पद्धतीने लिहायचे आहे. मराठीतून आकडे लिहिल्यास पोस्ट खाते ते पत्र नाकारू शकते. कारण पिनकोड हा प्राधिकृत भाषेत असणे बंधनकारक आहे. जिथे सॉर्टींग मशिनचा वापर होतो तिथे ही अडचण येऊ शकते.
लोक ती गोष्ट मनावर घेत नाहीत. हे लिहिण्याचे कारण असे की आमच्या राजापूरच्या शाळेचे पूर्व विद्यार्थी डॉ.वेलणकर जेव्हा पोस्टमास्तर जनरल होते तेव्हा १९७२ साली इंदिरा गांधींच्या खास सूचनेवरून त्यांनी ही एक सार्वदेशिक उपयोगाची सगळयात सोपी पिनकोड प्रणाली सुरू केली व इंदिराजींची शाबासकी मिळवली होती.
भारतात पत्त्याचा भाग म्हणून पिनकोड लिहिलेले पत्र कुठल्याही गावी, कुठल्याही भाषेत लिहिलेले असले तरी बिनचूक इष्टस्थळी पोचते. समान प्रणाली अमेरिकेतही आहे, पण तिथे राज्याचे नाव अक्षरी लिहावे लागते. भारतातल्या सर्व प्रांतातल्या सॉर्टरना १ ते ० एवढे अंकज्ञान पुरेसे ठरते. पिनकोड हा देशाला जोडणारा दुवा आहे.
तुमच्या अग्रलेखात तुम्ही ज्या बाष्कळ सेक्युलऱ्यांची वार्ता केली आहे ती चिडवाचिडवी मुळातल्या संघ व सेवादल या दोन चित्पावनांच्या संघटनांच्या - काँग्रेसच्या धाकट्या पातीच्या - नेत्यांनी सुरू केली व ती पार बिहारपर्यंत एका चित्पावनाने (मधू लिमयेंनी) पोचवली. नितीश, लालू व शरद यादव चिडवाचिडवीसाठी ती अजूनही वापरात एवढेच. शरद यादवांनी तर `सेक्युलरपणाबद्दलची चर्चा हिंदू लोकांची आपसातल्या शिवीगाळीसाठी वापरायची भाषा आहे' असे लोकसभेत १९९६ साली सांगितले होते.
- डॉ.ल.ना.गोडबोले,
गोरेगाव पूर्व, मुंबई ४०००६३
`आपले जग' जुलै २०१२ मधील `शब्दालय'मधील मजकुराच्या निमित्ताने सुचलेले विचार -
१) भाषेतील शब्द व त्यांचे अर्थ, अर्थच्छटा व त्यांचे लेखन -
मराठीच नव्हे तर कोणत्याही भाषेतील शब्द गरजेनुसार निर्माण होतात, वाढतात, राहतात, बदलतात आणि नाहीसेही होतात.
२) लेखन शुद्ध-अशुद्ध असे काही नसते. लौकिक व्यवहारासाठी एकवाक्यता राहावी याकरिता लेखनाचे नियम बनविले जातात, ते महत्त्वाचे असतातच पण काळाच्या ओघात तेही बदलावे लागतात, बदलले जातात. (जसे पूर्वी ब्रिटिश पद्धतीने फूट, पौंड असे मापन केले जाई, पुढे दशमान पद्धती आली - मीटर, लिटर इत्यादी.
३) कोटि/कोटी : प्रचलित लेखन-नियमांनुसार `कोटी' असेच लिहावे लागते, अर्थ कोणताही असो.
४) शास्त्रापेक्षा रूढी श्रेष्ठ असते, त्यामुळे कित्येक शब्द रूढीने प्रचलित झाले. `कोट्यावधी',`उपहार',`चातुर्मास' या शब्दांचे तेच झाले आहे. त्यामुळे घोटाळा होण्याचे कारण नाही.
गंमत म्हणून कटू (कटु) शब्दाचा उल्लेख करतो. `कटु' म्हणजे तिखट हा मूळ अर्थ लोप पावला असून त्या शब्दाला कडवटपणा प्राप्त झाला आहे, तर `तिक्त' म्हणजे कडू असा मूळ अर्थ असताना तो शब्द तिखट म्हणून प्रतिष्ठा पावला आहे.
५) `शब्दालय' वरून आठवले - शब्दाला `लय' असते, शब्द `लय'ही पावतात.
- विद्याधर पुरुषोत्तम गोखले,
६७५ (जुना ४३६), सोमवार पेठ,
कऱ्हाड - ४१५ ११०
फोन: (०२१६४) २२१४१५
मोबा. ९८५०८८४४३४
Comments
Post a Comment