Skip to main content

8 Dec.2014

माणुसकीनं वागणारा माणूस
- विश्वास दांडेकर
    मी सौराष्ट्नत अनेक वर्षे होतो. टाटा केमिकल्स ही सोडा अॅश बनवणारी भारतातली त्या वेळची सर्वात मोठी कंपनी. त्या कंपनीशी आमचे व्यवहार होते, अधून-मधून जावे लागे. तिथले एक कर्मचारी कामानिमित्त ओळखीचे झाले. त्यांना आम्ही पंडितजी म्हणायचो. मध्यम वय, उमदे-हसरे व्यक्तिमत्त्व. त्यांना फार मोठे, जबाबदारीचे, किचकट काम नसावे. भेटायला गेलो, कार्यालयीन काम संपले की - ते सहजपणे दोन-तीन तास आमच्यासोबत काढत. एकदा त्यांना छेडले, तेव्हा त्यांनी खुलासा केला : नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप वा दुष्काळ अशा वेळी टाटा व्यवस्थापनाकडून त्यांना मदतकार्यासाठी पाठवले जाते. अशा वेळी सूचना येताच काही तासांत निघावे लागते. प्रसंग संपल्यावरच परतायचे. त्यामुळे इथल्या कामाची रचना अशी केली आहे की - काम भरपूर असते, पण ते त्या त्या दिवशी संपेल असे. अशी माणसे टाटांच्या सर्व आस्थापनांमध्ये पेरलेली आहेत.
काही वर्षांनी `नेमेचि येतो' म्हणणारा दुष्काळ आलाच. टाटा ग्रुपचे मदतकार्य गुजरात, मध्यप्रदेश सीमेवरच्या पंचमहाल जिल्ह्यात सुरू होते. सध्या `गाजत' असलेले गोध्रा गाव हे जिल्ह्याचे ठिकाण. जवळच दाहोद हे गाव-औरंगजेबाचे जन्मस्थान. संपूर्ण जिल्हा आदिवासी भिल्लांचा-तसा कायम दुष्काळाच्या छायेतला, पण यंदा तडाखा मोठा. या मदतकार्यात पंडितजी सहकाऱ्यांसोबत दिवसरात्र राबत होते. एके ठिकाणी अपघातात जीप सापडली, ते बाहेर फेकले गेले, जागीच मृत्यू झाला. आगे-मागे असलेल्या दुसऱ्या जीपने त्यांना तातडीने बडोद्याला (वट उदरा-वडोदरा) आणले. मृत घोषित झाले. सहकाऱ्यांनी `बाँबे हाऊस' - टाटांचे मुख्यालय- इथे बातमी दिली.
उलट सूचना - सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून दुपारी चारच्या आत मृतदेह बडोदा विमानतळावर नीट आणा. लागेल तो खर्च करा. ठीक चार वाजता टाटांचे विमान बडोदा इथे उतरले, मृतदेह घेऊन मिठापूर. तिथे कंपनीचा खासगी विमानतळ आहे. मुंबईतच असलेले पंडितजींचे आई-वडीलही त्याच विमानात आणले गेले होते.
मिठापूर द्वारकेपासून काही मैलांवर. अंत्यसंस्काराची तयारी, वाहने हे सर्व आणले गेले होते. अंत्यसंस्कार झाल्यावर आलेल्या विमानाच्या पायलटने पंडितजींच्या पत्नीची सांत्वन भेट घेतली. जेआरडींच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांना दिले. `तुमच्या श्रद्धेप्रमाणे दिवस-पाणी वगैरे करा, तुमचे व मुलांचे पुढील आयुष्य? त्याची काळजी करू नका-ती आमची जबाबदारी नव्हे, कर्तव्य आहे.'
पंडितजींच्या पत्नीला त्याच कंपनीत नोकरी दिली गेली. मुलांचे शालेय शिक्षण, महाविद्यालय-विद्यापीठीय प्रवास ही सर्व जबाबदारी टाटांच्या ट्न्स्टकडून घेण्यात आली.
इतर कुणासाठी सोडा-सीमेवर जीव पणाला लावणाऱ्या सेनादलांच्या जवान, अधिकाऱ्यांना हा विश्वास स्वातंत्र्योत्तर भारतात आपण देऊ शकलो का? जेआरडी व हाऊस ऑफ टाटा-थेट जमशेटजी टाटांपासून रुजवलेली परंपरा.
जेआरडी टाटांच्या `माणूस' रुळवण्यातल्या हातोटीचा आणखी एक प्रसंग मिठापूर कारखान्यातलाच आहे. मिठापूरला एक उत्तम शाळा कारखाना चालवत असे; ज्यात कारखान्यात काम करणाऱ्या अधिकारी-कामगारांच्या मुलामुलींना शिक्षणासाठी पैसे मोजावे लागत नसत. एका कामगाराने दुसऱ्याच कुणाचा तरी मुलगा आपलाच आहे असे दाखवून त्याला शाळेत दाखल केले. असूया, चहाडी हे माणसांच्या स्वभावाचेच भाग आहेत. कुणीतरी तक्रार केली. प्राथमिक चौकशीत कामगार दोषी आहे, असे आढळल्याने त्याला सस्पेंड करण्यात आले; मात्र त्या बालकाची शाळा सुरू राहिली. आता कामगार कायद्याप्रमाणे चार्जशीट, खातेअंतर्गत चौकशी, शिक्षा हे पुढचे टप्पे. तिथल्या टाटा टाऊनशिपला लागून इतरही नागरी वस्ती आहे. तिथल्या एका गृहस्थांनी त्या कामगाराला समजावले की-चूक झाली आहेच; पण याचा अंतिम निर्णय जर कायद्यात ठरलेल्या पद्धतीने लागला, तर तुला शिक्षा होणार. शक्य आहे की, नोकरीही जाईल. तेव्हा मुंबई गाठायला हवी. ते गृहस्थ व तो कामगार मुंबईला पोचले. तेव्हाच्या व्हीटी स्टेशनजवळ कॉटबेसिसवर दोन-तीन दिवस राहण्यासाठी जागा घेतली व बाँबे हाऊसला फोन केला. मागणे : जेआरडींची भेट हवी. स्वीय सहायक म्हणाले, `कामाचे स्वरूप सांगा.' तर उत्तर : ते आम्ही जेआरडींनाच सांगू. त्याने समजावले, `जेआरडी इथेच आहेत, तुमची भेट होईलच. पण वेळ वाचवण्यासाठी त्यांना समोरची माणसे काय कामासाठी आली आहेत याची प्राथमिक कल्पना द्यावी लागते.'' तेव्हा काम काय ते सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजताची वेळ मिळाली. स्थळ : बाँबे हाऊस. टाटांच्या सर्व कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या `टाटा सन्स' या संस्थेचे केंद्रीय कार्यालय.
वेळेचा घोटाळा नको म्हणून साडेदहालाच दोघेही पोचले. तिथल्या प्रथेप्रमाणे चहा दिला गेला. ठीक अकरा वाजता जेआरडींच्या दालनात प्रवेश. `या, बसा' झाल्यावर कामगारासोबत गेलेल्या गृहस्थांनी  कहाणी सांगायला सुरुवात करताच जेआरडींनी हातानेच इशारा करत त्यांना थांबवले आणि म्हणाले, ``तुमच्या दोघांपैकी आमचा कामगार कोण; तो बोलेल.''
कामगार म्हणाला, ``सर, मला एक बहीण आहे. हा तिचा मुलगा. बहीण तिकडे उत्तरेत असते. माझे मेव्हणे अकाली गेले. बहिणीला आणखी एक मूल आहे. मला कारखाना चांगला पगार देतो, पण दरमहा कुणाला उचलून पैसे पाठवणे शक्य होत नाही. त्यामुळे मी या मुलाची जबाबदारी माझी, असे ठरवून त्याला इकडे आणले. नंतर मला मोह झाला की आपला मुलगा म्हटले म्हणजे फी-पुस्तके वगैरेंचा खर्च लागणार नाही. सर, माझी फार मोठी चूक झाली.... मला क्षमा करा...'' त्याचा बांध फुटून रडू येणे स्वाभाविक होते.
तो कढ जाईपर्यंत जेआरडी शांत होते. मग त्याला म्हणाले, ``अरे, अशी चूक करायची नसते. अशी काही अडचण आली, तर आपल्या कारखान्याच्या मुख्याला भेटावे; ते मार्ग काढायला मदत करतील. त्यांना भेटला असतास तर त्यांनी आपल्या ट्न्स्टकडून योग्य ती मदत मिळवून दिली असती. ठीक आहे, असो. आता लक्षात ठेव. यापुढे काहीही अडचण आली तर सरळ मुख्य अधिकाऱ्याची भेट घ्यायची. पुन्हा अशी चूक करू नकोस. परत जा आणि कामावर हजर हो. मी इथून त्यांना कळवतो.''
जेआरडींच्या पायाला हात लावायला कामगार वाकला, पण त्यांनी तसे करू दिले नाही. त्याच्या पाठीवर हात ठेवत त्याला निरोप दिला. दोघेही मिठापूरकर आनंदाने बाहेर पडू लागले. तेवढ्यात एकाने त्यांना `निघू नका, जरा थांबा' असे सांगितले. दोघांच्या नाडीचे ठोके पुन्हा जलद झाले. आता काय? थोड्या वेळाने एकजण आला. एका व्हाऊचरवर कामगाराची सही घेतली आणि काही पैसे असलेले पाकीट त्याच्या हाती दिले. ``हे काय? कशासाठी?'' जेआरडींनी सांगितले - कामगार सस्पेंड झालेला आहे. गावातून कुणाला तरी सोबत घेऊन आला आहे. दोन माणसांचे मिठापूर-मुंबई-मिठापूर रेल्वेभाडे, त्यांचे राहणे, जेवणखाण यासाठी अंदाजे काही रक्कम देण्यात यावी.
मला ही कथा कळली, तेव्हा प्रसंग उलटून तीन-चार वर्षे झाली होती. त्या कामगाराला मुद्दाम भेटलो. `साब, मैं अपने संस्था के लिये, जेआरडी साहब के लिये जान देनेको हमेशा तय्यार हूँ ।' त्या मुलाच्या शिक्षणखर्चाची व्यवस्था ट्न्स्टमार्फत झाली, हे निराळे लिहायला हवे का?
(विश्वास दांडेकर यांच्या
`माणसं माणसांसारखीच वागतात' या पुस्तकातून साभार)
लेखक पत्ता - `मालवती',१७-कांगा कॉलनी,सातारा.
फोन (०२१६२) २३५२५४

वृद्धाश्रम - गरज आणि पर्याय
मुलगा, सून नेत्रदीपक प्रगती करत आहेत. नातवंडे निश्चिंत अभ्यास, मित्र, खेळ यामध्ये मग्न आहेत. आजी-आजोबा घराकडे, नातवंडांकडे वत्सलतेने लक्ष देत आहेत. हे भारतीय आदर्श घराचे चित्र आहे. जग झपाट्याने बदलते आहे. जगाबरोबरच भारतही बदलतो आहे. परंपरा, संस्कार, कुटुंबव्यवस्था यात उलथापालथ करत येणारे हे वादळ आता थांबविता येणारे नाही.
पुढची पिढी परराज्यात-परदेशात कर्तृत्व गाजवू लागली आहे. आपल्या सोयीसाठी त्यांना गावीच डांबून ठेवण्याचा संकुचित विचार आईवडीलही करत नाहीत. मात्र या बदलांमुळे कुटुंबव्यवस्थेची हानी झाली आहे. या बदलांमुळे फक्त वृद्धांचीच गैरसोय होते एवढेच वरवर दिसते. पण प्रत्यक्षात वृद्धसेवा न केल्याने, त्यांचा वत्सल, अनुभवी, समंजस सहवास न लाभल्याने पुढच्या पिढीतील तरुण व बाल हे स्वभावाने कृतघ्न, उर्मट, स्वार्थी, रुक्ष व्यवहारी व बेताल होतात. हा बदल लक्षातही येत नाही.
येणारी परिस्थिती बदलताच येणार नसेल तर तिचे दुष्परिणाम टाळण्याचा उपाय शोधला पाहिजे.ढोबळमानाने एक प्रातिनिधिक चित्र आपण पाहूया.
मुले दूर गेली तरी आईवडील सुदृढ, कार्यक्षम असतात तोवर समस्या उभी राहात नाही. आयुर्मान वाढले आहे. लोकसंख्येमध्ये वृद्धांचे प्रमाणही वाढते आहे. या मोठ्या घटकाची व्यवस्था विचारपूर्वक, काळजीपूर्वक करायला हवी. वृद्धाश्रम हा आदर्श नाही. पण काळानुरूप तो पर्याय व पुढील काळात ती गरज ठरणार असे दिसते आहेे.
मुलांना आईवडीलांसाठी वृद्धाश्रमाची गरज वाटावी अशी कारणे कोणती?
* नोकरी व्यवसायासाठी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर मागे राहिलेल्या आई-वडीलांची काळजी मुलांच्या, मुलींच्याही मनात असतेच. त्यांची उत्तम व्यवस्था वृद्धाश्रमात होत आहे असे दिसल्यावर ते निश्चिंत मनाने आपले काम करू शकतील.
* कुटुंबात दोन किंवा एकच मूल असणारी पिढी आता मोठी झाली आहे. अशा दोन एकुलत्यांच्या लग्नानंतर त्यांच्यावर दोघांच्याही आईवडीलांची जबाबदारी असते. काही दिवसांनी या जबाबदारीचे ओझे वाटू लागते. थोडीही विश्रांती, बदल हवासा वाटला तरी तो मिळत नाही. अशाने नात्यांमध्येच कटुता येते.
* वृद्धांच्या आजारपणात नर्सिंग करणे, आया मिळणे, रजा मिळणे, घरी येऊन डॉक्टरांनी येऊन उपचार करणे हे आता दुरापास्त झालं आहे. अशा वेळी एकत्र सोय करणे कमी खर्चाचे व सोयीचे असते.
* जागेची समस्या असते.
* वृद्धत्वामुळे, आजारपणामुळे स्वभाव चिडचिडा, उतावळा, त्रस्त होतो. परत परत तीच गोष्ट सांगणे, जुन्या आठवणी उगाळणे, स्वच्छतेचा-शिस्तीचा अतिरेक करणे अशासारख्या गोष्टी वृद्धांकडून नकळत घडत असतात.
वृद्धांनासुध्दा काही कारणांमुळे वृद्धाश्रम गरजेचा वाटतो.
* घरात राहूनही कित्येकदा वृद्ध व्यक्तीला एकटेपणा वाटतो. मुला-नातवंडांना त्यांच्या व्यग्र जीवनक्रमात वृद्धांना द्यायला वेळ नसतो. जनरेशन गॅपमुळे संवादातही गॅप पडते.
वृद्धाश्रमात समवयस्क, समान आवडी व संवाद होतो. सहवास, संवाद, सहभाग यासुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
* स्वतंत्रपणे घर चालविताना मेंटेनन्स, वस्तूंची दुरुस्ती, देखभाल, सामान आणणे, बिले-टॅक्स भरणे इ.कामे करणे दुरापास्त होते. अशी लहान-सहान कामे करणारी विश्वासू माणसे मिळत नाहीत.
* आपण घरात निरुपयोगी, अडचण आहोत, नकोसे आहोत या जाणीवेने येणारे नैराश्य असह्य असते. अशा वेळी वृद्धाश्रमाचा आधार वाटतो. `मी कुणाचा मिंधा नाही. बचत करून साठविलेल्या पैशांनी मी इथे राहू शकतो' ही भावना आत्मविश्वास बळकट करणारी आहे.
* घरात तरुणांच्या आवडीचे पदार्थ वृद्धांना पचत नाहीत व वृद्धांना चालणारे पदार्थ तरुणांना रुचत नाहीत.
* दोन पिढ्यांमध्ये वागण्यात, विचार करण्यात पराकोटीची तफावत असेल तर एकत्र राहणे सुखाचे होत नाही.
* एकट्या राहणाऱ्या वृद्धांना कुणाच्या तरी आधाराची, आजारी पडलं तर विचारपूस करणाऱ्याची गरज असते.
आता वृद्धाश्रम हा पर्याय किंवा गरज म्हणून स्वीकारल्यावर तो कसा असावा याचाही विचार करावा.
* व्यक्तीच्या सांपत्तिक स्थितीनुसार वेगवेगळे वृद्धाश्रम असावेत.
* वृद्धांचे वय, गरजा लक्षात घेऊन आश्रमात सर्व सोयी असाव्यात. उदा.वैद्यकीय सेवा, मेडिकल चेकअप, रिक्रिएशन हॉल, करमणुकीची साधने, सशुल्क वाहनांची सोय, लायब्ररी इ.
* वृद्धांची सर्वतोपरी काळजी घेणारा, मनापासून आस्थेने मदत करणारा सेवकवर्ग
* डे केअर सेंटर्स किंवा आठ-दहा दिवसांसाठी आश्रमात राहण्याची सोय असावी.
वृद्धाश्रमांजवळच पाळणाघर असावे. त्यामुळे मुले व आजी-आजोबा यांच्यामध्ये जवळीक निर्माण होईल. आपल्याकडे कुणीतरी आत्मीयतेने लक्ष देते आहे याची मुलांना गरज असते, व कुणावर तरी मायेचा वर्षाव करावा असे वृद्धांना वाटत असते. वृद्ध व मुले दोघांच्याही या मानसिक गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर दोघेही उदास व असंतुष्ट राहतात.
घरच्यांनी वृद्धांशी नेहमी संपर्क साधावा. त्यांना वृद्धाश्रमावर सोपविले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे समजू नये. जबाबदारी टाळणे हा वृद्धाश्रमाचा उद्देश नसावा. कुटुंबियांचे राहण्याचे स्थान सोयीनुसार कुठेही असो पण एकमेकांच्या मनातले स्थान मात्र अढळ असावे.
जुनी कुटुंबव्यवस्था जाणारच पण तिची जागा घेणारी नवी व्यवस्था विचारपूर्वक तयार करायला हवी. प्रत्येकाने आपली जबाबदारी, सामाजिक बांधिलकी समजून वृद्धाश्रमांना पैशाच्या, सेवेच्या रूपात यथाशक्ती जी जी मदत करता येईल ती करावी. प्रत्येकाला आपल्याच आईवडीलांची सेवा करता येईल असे आता शक्य नसेल, पण त्याच कृतज्ञ भावनेने दुसऱ्या वृद्धांची सेवा करता येईल. जी आपुलकी, माया आईवडील व मुलेे यांमध्ये असते, ती तिथेही उत्पन्न होईल. हे सर्व बघत, अनुभवत मोठी होणारी पुढची पिढी नम्र, सुसंस्कृत, सुस्वभावी बनेल.
तरुणांनी वृद्धांची म्हातारपणाची काठी व्हावे व वृद्धांनी त्यांना मायेने आशीर्वाद द्यावा अशी ही सुंदर, संतुलित नवी संस्कृती असावी.
- शारदा सखाराम केळकर
३०, आंबराई, भरतकुंज कॉलनी नं.२
एरंडवणे, पुणे ३८
फोन (०२०) २५४६९४६७ मोबा. ७५८८२८४५३०

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन