Skip to main content

21 August 2014

ओठापोटाचं जागतिकीकरण
प्राचीन संस्कृतींच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा आधार मानला जातो, तो म्हणजे स्वयंपाकाची साधने. त्या संस्कृतीच्या चालीरिती, प्रगती, भौगोलिक आणि सांपत्तिक परिस्थिती याविषयीचे अंदाज स्वयंपाकाच्या साधनांवरून बांधले जातात. कारण माणसाच्या खाण्याच्या सवयी आणि स्वयंपाकाची साधने ही शक्यतो बदलत नाहीत; आणि बदललीच तर त्यासाठी शेकडो वर्षे जावी लागतात असा पुरातत्त्व विद्वानांचा सिद्धांत आहे. विळीचं पातं स्थिर ठेवायचं आणि भाजी चिरणारा हात हालता ठेवायचा ही द्रविडी परंपरा आहे; तर भाजी हाताच्या मुठीत स्थिर धरून सुरीचे पाते हालते ठेवायचे ही म्हणे आर्यांची पद्धत आहे. सध्याच्या महाराष्ट्नचा विचार केला तर, कधी काळी हा महाराष्ट्न् भुईत गाडला गेल्यावर शेकडो वर्षांनी उत्खननात गावं, घरं सापडतील आणि त्यावेळी घरोघरी विळया पाहून `महाराष्ट्नत या काळात द्रविड संस्कृती होती' असा निष्कर्ष तेव्हाचे संशोधक काढतील. हे सारं एका भाषणात मी कधीतरी ऐकल्याचं आठवतं.
त्या त्या ठिकाणचं हवापाणी, त्यानुसार निघणारी पिकं, फळं-भाजी हेच त्या गावचं प्रमुख अन्न असणार हे एकेकाळी ठीक होतं. निसर्गनियमाने तेच अन्न पचन आणि पुष्टीसाठी योग्य असतं हेही बरोबर. कोकणात तांदूळ, देशावर ज्वारी, पंजाबात गहू, गुजरातेत डाळ आणि बाजरी हे भूगोलात वाचलं आहे. माझ्या लहानपणी ज्वारीची भाकरी हे घरचं मुख्य जेवण होतं. शाळा-ऑफीसं सुरू झाल्यावर मधल्या वेळच्या डब्यात पोळी-भाजी सुरू झाली. पावसाळयात पालेभाजी, हिवाळयात इतर भाज्या आणि उन्हाळयात उसळी. कर्नाटक जवळ असल्यामुळं इडली-डोसा-अप्पे यांची कधीतरी नावं ऐकलेली, ती पुढच्या काळात घरोघरी घुसली. कधीतरी एखादा पदार्थ घरी होऊ लागला. ती अपूर्वाई नंतर संपली आणि ते पदार्थ वारंवार होऊ लागले. घरी लागोपाठ इडली झाली तर `या इडलीनं पिडली बाई' अशी तक्रार माझी आजी करत असे. त्यामागे भाजी-भाकरीचं जेवण चांगलं हा संस्कार होता, की खरंच त्या लोकांना पुरातत्त्वाच्या सिद्धांतानुसार, वैविध्य रुचत नव्हतं कोणास ठाऊक? आमच्या गावातच काय पण जवळच्या शहरातसुद्धा हॉटेलवजा टपरीत च्या-पोहे-उपीट-मिसळ-भजी एवढीच काय ती व्हरायटी. शिवाय हॉटेलात जाणे फारसे प्रतिष्ठित मानले जात नसल्यामुळे आम्ही आत कधी डोकावलोच नव्हतो. पंजाबी डिश म्हणजे पोहे-उपमा असलीच काहीतरी वस्तू असावी अशी कॉलेजला जाईपर्यंत माझी समजूत होती. पिझ्झा-पास्ता ही नावं कोणाच्या गावीही नव्हती. शेजारणीबद्दल चहाड्या करताना `अगं ती म्हणे पोरांना दर बाजारी चाकलेटं आणून देते' असा सूर होता. कॉलेजसाठी शहरात गेल्यावर आम्हा मित्रकंपूची साधारण परिस्थिती तशीच होती. एकदा खानावळीला सुटी मिळाली आणि माझ्याबरोबर कोणीच मित्र नव्हता, त्यामुळं `एकट्यानंच हॉटेलात कसं जायचं' या संकोचातून मी जेवणाची गोळी घेतली होती. पुढं या मागासलेपणावर मात करण्यासाठी पंजाबी जेवणाची व्यवस्थित ऑर्डर देता यावी म्हणून आमच्या कंपूने अधूनमधून पंजाबी जेवण घ्यायला सुरुवात केली.
एव्हाना ग्लोबलायझेशनचे वारे वाहू लागले होते. चीज, बटर, पिझ्झा, बर्गर ही नावे नांदू लागली होती. एक चायनीज रेस्टॉरंट जवळपास सुरू झालं. पहिल्यांदा तिथं गेलो तेव्हा आजूबाजूला बोटे करून `ते तसलं आण' अशी ऑर्डर दिली. पदार्थ आवडला तर ते नाव घोकत बाहेर पडायचं. हळूहळू पंजाबीइतकंच चायनीज ओळखीचं झालं.
हॉलंडला पहिल्यांदा गेलो तेव्हा रात्रीची पोटपूजा करण्यासाठी एका रेस्तोराँमध्ये गेलो होतो. तिथलं मेनूकार्ड पाहिलं. `मला डच भाषा समजत नाही, इंग्लिश कार्ड दे' असं वेटरला म्हणालो. माझ्याकडे `हा कोण परग्रहावरून आलाय' असा कटाक्ष टाकून `हे इंग्लिशच कार्ड आहे' असं सांगून वेटर हात उडवत निघून गेला. पोटात कावळे ओरडत होते आणि त्या कार्डावरचा एकही पदार्थ किंवा त्याखाली दिलेला तपशील मला अगम्य होते. युरोपमध्ये बरेचदा खाद्यपदार्थांना फ्रेंच नावाने संबोधण्याची एक फॅशन आहे. आपल्याकडे हजामतीच्या दुकानाला केशकर्तनालय म्हणतात तसे!
अतिपूर्वेकडे वेगळीच पंचाईत होते. तिथे शाकाहारी जेवणातसुद्धा मासे असतातच. ज्यांना मासे आवडत नाहीत त्यांना शाकाहारीसुद्धा जेवता येत नाही. तिथल्या मॅकडोनाल्डवाल्या पोरानं `व्हेज म्हणजे काय' असं विचारलं होता. मग चिकन बर्गर मागवला आणि थाळी पुढे आल्यावर चिकनचा पिस बाजूला काढून ती शाकाहारी केली. `चिकन बर्गर विदाऊट चिकन' असे मागवावे लागले. आमच्या घरी मधल्या वेळी खाण्यास तिखटामिठाची पुरी करतात, ती इतकी हिमूळ असते की तिला `बिन तिखटामिठाची तिखटामिठाची पुरी' असे म्हणावे लागते.
हळूहळू जगाची `तोंड'ओळख झाली. पंजाबी आणि उडप्यांच्या बरोबर चायनीज आणि पिझ्झा टपऱ्याही गल्लीबोळात दिसू लागल्या आहेत. मेक्सिकन, थाई हीसुद्धा आता अपूर्वाई राहिली नाही. भारतातच नव्हे तर जगाची परिस्थिती थोड्या फार फरकाने अशीच झाली आहे. आपल्याकडे पिझ्झा जेवढ्या सहज मिळतो तेवढ्या सहज लंडन, अॅमस्टरडॅम, न्यूयॉर्क, टोरँटो येथे पंजाबी किंवा दक्षिणी पदार्थ मिळतात. टोरँटोत तर ही मंडळी इतकी आहेत की हे अमृतसर किंवा चेन्नई असेल असा भास व्हावा. या युगात वाट्टेल ते पदार्थ वाट्टेल त्या नावाने वाट्टेल तिथे मिळू लागले. बॉम्बे भेळ हा पदार्थ मुंबई सोडून साऱ्या भारतात आणि भारताबाहेरही मिळतो. बॉम्बे मील्स अशी ऑर्डर दिली तर मुंबईचा वेटर तोंडाकडे पाहात राहतो पण हैद्राबाद किंवा चेन्नईचा वेटर थाळी मांडू लागतो. इंडियन करी ही डिश भारताबाहेरच सगळीकडे मिळते. लंडनमध्ये तर ती सर्वात लाडकी परदेशी डिश म्हणून मिरवते. ऑथेंटिक इटालियन अल्फेडो सॉस हे प्रकरण इटलीत कुठेही मिळत नाही, त्यासाठी अमेरिकेत जावं लागतं. चायनीज डोसा, शेजवान राईस, सिंगापूर नूडल्स, फ्रेंच फ्राईज हे सगळे पदार्थ त्या त्या नावाच्या देशाबाहेर मिळतात.
एकदा दिल्लीत होतो. अस्सल पंजाबी जेवायचं असं ठरवून शोध सुरू केला. गरम पराठा, त्यावर लोणी आणि शेजारी थंड ताकाचा ग्लास  डोळयापुढं तरळू लागला. तिथल्या पोऱ्यानं विचारलं, `काय आणू साहेब, सॅन्डविच, पिझ्झा की चायनीज?' मी तिथून बाहेर पडलो. सब-वे सॅन्डविच आणि लोकर पिझ्झा शॉप दिसत होते. एक चायनीज रेस्टॉरंट, बरिस्ताँ कॉफी शॉप आणि तत्सम दोन तीन दुकानं... फारसं फिरायला पोट तयार नव्हतं. पंजाबी लस्सीची तहान सॉफ्ट डिं्न्कवर भागवून मी परतलो. पिझ्झा हट्, कोस्टा कॉफी, इटालियन रेस्टॉरंट, बर्गर किंग अशी मंडळी दिल्लीत जागोजागी आहेत. दिल्लीऐवजी न्यूयॉर्कला फिरतो की काय असं वाटावं! पुष्कळांना विचारून एक चांगलंसं पंजाबी रेस्टॉरंट शोधलं. राजम्याची चव आठवत पायऱ्या चढलो पण मेनूकार्डवरचे दर वाचून दिल्लीऐवजी आपण न्यूयॉर्कमध्ये असल्याची खात्रीच वाटू लागली. काही जरी मागवलं तरी एकट्यासाठी ८००-१००० ची चटणी होणार!
स्वस्त आणि अस्सल पंजाबी जेवायचं असेल तर दिल्लीऐवजी टोरँटोला जावं. पुरातत्त्व विद्वानांच्या सिद्धांतांना उभा छेद देणारा हा बदल गेल्या २०-२५ वर्षांतला आहे. कोणत्याही पदार्थाची कृती पेपरला किंवा टीव्हीवर पाहिली तर उपपदार्थांच्या यादीत कोथिंबीर, आले, जिरे यांची जागा पार्सेली, बासील, ब्लॅक पेपर यांनी घेतली आहे. फ्लॉवरचा रस्सा करताना फोडणीवर परतण्याऐवजी सॉस पॅनमध्ये शॅलोफ्राय करावे लागते.
खरंच सगळी पृथ्वी काळाच्या उदरात गडप झाल्यावर काही शतकांनी उत्खनन झालं तर तेव्हाचे संशोधक निष्कर्ष काढतील, `हा संपूर्ण ग्रह म्हणजे एक छोटं गाव असावं, कारण तिथे पळया आणि उलथणी एकसारखी दिसतात.'
- चारुदत्त आपटे, टोरँटो


मुळातच सगळा समाज सदासर्वकाळ चार वर्णात विभागलेला असतो. ही विभागणी स्थल-काल निरपेक्ष होत असते. वर्ण हे गुणकर्माने ठरावेत असा संकेत असतो, प्रत्यक्षात ते तसेच घडले व घडते असे नाही. ज्ञान-सत्ता-संपत्ती आणि कला संस्कृती अशा, जीवनाच्या चार अंगांची जबाबदारी त्या त्या वर्णावर दिली आहे. मुख्य म्हणजे हे चार घटक एकमेकांच्या विरोधी नव्हे, तर परस्पर पूरक असले तरच समाजजीवन फुलते, उंचावते. त्यातला एक घटक जरी उणावला किंवा मातला तर समाज कोसळतो ज्यांच्याकडे ज्ञानविषयक जबाबदारी आहे त्यांना सामान्यत: ब्राह्मण म्हटले. याउलट ब्राह्मण म्हटला की तो ज्ञानसंपन्नच असणार हा समज विपर्यस्त आहे. जन्माने ब्राह्मण कुळ लाभले तर पूर्वसंस्कारांमुळे त्यास अध्ययन-अध्यापन तुलनेने सोपे होईल. या रचनेमध्ये अगदी हवाबंद कप्पे असण्याचे कारण नाही. सुतार-कुंभार-लोहार असे कौशल्य ज्या मुलाने आपल्या घरी जन्मापासून अनुभवले आहे त्याने शाळेत टेक्नीकल विषय घेतला तर तो ब्राह्मण पोराला सहज मागे टाकतो, आणि संस्कृतची शिष्यवृत्ती साधारणत: ब्राह्मण पोराला मिळते यात श्रेष्ठ-कनिष्ठत्व कसले?

या प्रकारची वर्णव्यवस्था जगाच्या पाठीवर सर्वत्र असते. माशेलकर, भटकर, नारळीकर, कलाम हे संशोधक ज्ञानमार्गी ऋषी आहेत. त्यांची जन्म-जात कोणती याचा कोणी कधी उल्लेख तरी करते काय? अशांचे कार्य हेच ब्रह्मकर्म होय. आयुष्यभर त्यांनी ज्ञानयज्ञ चालविला आहे. विविध संस्थांमधून ते इतरांच्या ज्ञानयज्ञास मदत करीत आहेत. ब्राह्मण वर्णासाठी जी षट्कर्मे सांगून ठेवली आहेत त्यांपैकी यजन (यज्ञ करणे) - याजन (दुसऱ्याच्या यज्ञात पौरोहित्य करणे) याचा आजच्या काळातील हा अर्थ घ्यावा. अध्ययन-अध्यापन तसेच दान-परिग्रह ही अन्य चार कर्मे जे निष्ठेने करत असतील ते ज्ञानमार्गी आहेत. आजच्या परिभाषेत त्यांना हवे तर बुद्धिवादी म्हणावे. ही कर्मे जो वर्ग निष्ठेने करतो त्या वर्णास ब्राह्मण म्हणावे किंवा दुसरे काहीही म्हणावे.... त्याच्या कर्माची, वृत्तीची, जबाबदारीची समाजधारणेसाठी गरज असतेच असते. याच प्रकारे इतर कोणत्याही वर्णाची कर्मे समाजधारणेसाठी अत्यावश्यक असतात आणि ती परस्पर पूरकच असली पाहिजेत.

या सर्व जीवनक्रमाची सुरुवात कोणत्या कृतीने किंवा संस्काराने करायची हा प्रश्न मुंज या विधीशी निगडित असतो. ज्या काळामध्ये शेंडी राखणे, लंगोटी लावणे, मातृघास भरविणे अशा रुढींची चलती होती आणि त्या काळात ते अनुरूपही होते, त्या काळातील हे सर्व आचार आजच्या काळात जसेच्या तसे लागू होतात असे नाही. त्या काळी गुरूगृही जाऊन विद्या शिकायची असा प्रघात असल्यामुळे गुरुगृही जाण्याचा आणि जबाबदारीची जाणीव करून देण्याचा मुंज हा एक विधी होता. आज गुरुकुल पद्धती जवळजवळ नामशेष झाली आहे. अलीकडे पिचत कुठे त्याचे पुनरुज्जीवन होताना ऐकतो. परंतु साधारणत: सहा वर्षाचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जाताना त्याला नवे कपडे घालून शाळेच्या ताब्यात देणे म्हणजेच त्याचे नाव शाळेत घालणे हा आधुनिक मुंजीचाच एक प्रकार आहे. मुंज म्हटले की त्याची टवाळी करावी किंवा त्याचे अवडंबर करावे असे काही नाही. पण कोणे एके काळी ब्राह्मण समाजाने आपले श्रेष्ठत्व मिरविले असेल तर आज त्याला या एवढ्याशा कारणावरून दूषणेही दिली जातात, हा परिस्थितीने केलेला संस्कारांचा विपर्यास आहे.

मौंजीबंधन या शब्दात वेगळा अर्थ सामावला आहे. दर्भासारखे वाळलेले गवत थोडेसे वळून त्याचा करदोटा कमरेभोवती बांधायचा असा तो विधी आहे. त्याला मौंजीबंधन असे म्हटले. विद्याभ्यास करताना व्रतस्थ राहणे यात गैर काहीच नाही. उलट ते निकडीचे आहे. असे एखादे व्रत स्वीकारण्यासाठी व्रतबंध करणे यासाठी मुंजीचा विधी केला जातो. तो केवळ ब्राह्मण समाजाने किंवा पुरुषांनीच करावा असे मुळीच नाही. प्राचीन काळी स्त्रीची मुंज होत असे आणि स्त्री यज्ञोपवीत धारण करीत असे असेही कित्येक संशोधक म्हणतात. कौशल्यावर आधारित ज्यांचे व्यवसाय आहेत असे सोनार-सुतार या समाजातही मुंज असते आणि क्षत्रिय मराठ्यांत तर ती असतेच असते. इतकेच नव्हे तर मुस्लिम समाजात मुलाचा सुंता करण्याची जी पद्धत असते तिलासुद्धा त्यांच्या समाजात आपल्याकडे मुंज असेच म्हणतात. थोडक्यात असे की उगवत्या वयाच्या मुलाला त्याच्या आयुष्यक्रमाला उपयोगी पडतील अशी काही व्रते शिकवणे याला व्रतबंध किंवा मुंज असे म्हणावे आणि आजच्या काळात शोभेल अशा रितीने तो विधी प्रत्येकाने अवश्य करावा.

यातील दागदागिने, देणीघेणी, मेजवान्या, कपडेलत्ते, बॅन्ड-वरात हा सर्व अकारण हौसेचा भाग आहे. ज्यांना हौस सकारण वाटते त्यांनी ती कोणत्याही प्रसंगाने करावी. जन्माचा किंवा नामकरणाचा तितकाच मोठेपणा मिरवायला तरी कोणाची हरकत असणार? अलीकडे पुढाऱ्यांचे वाढदिवससुद्धा तशा प्रकारच्या हौसेने साजरे होत असतात. याचा अर्थ ते सर्व योग्यच आहे आणि धर्मात कुठेतरी सांगितले आहे असा काही भाग नाही. काळानुसार येणारा तो हौसेचा भाग आहे. त्याचा व्रतबंधाशी काही संबंध नाही.

काही मोठ्या कार्यालयात पदाधिकारी होण्यासाठी शपथवजा निवेदन करावे लागते. विधिमंडळात निवड झाल्यानंतर किंवा मंत्रीपद स्वीकारताना लोकप्रतिनिधीने शपथपूर्वक आपल्या कर्तव्यांचा उच्चार करायचा असतो. त्याच प्रकारे विद्याभ्यासाला प्रारंभ करताना किंवा कोणत्याही कौशल्याचे प्रशिक्षण सुरू करताना `मी हे कशासाठी करीत आहे' याची स्पष्ट जाणीव घेऊन ती शपथपूर्वक आचरणे हा विधी मनुष्य जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला मुंज असे नाव दिले की कोणाचा पोटशूळ उठण्याचे अजिबात कारण नाही.

स्वत:ची जात किंवा वर्ण विसरून या साऱ्या विधीकडे पाहिले तर त्यामागचे अर्थ, विज्ञान आणि कालानुरूपता सहज समजण्यासारखी असते. खेडोपाड्यांमध्ये अशा तऱ्हेचा समाज एकरसतेने राहात होता. आजकाल राजकारणाचा प्रसार सर्वत्र झाल्यामुळे जातींच्या फाटाफुटीवर आर्थिक कमाई आणि राजकीय प्रतिष्ठा येऊ लागली आहे. त्यासाठी समाजाशी नाते तोडून उच्च-नीचतेची, जातीय भेदभावाची, विषमतेची दरी रुंदावणे कित्येकांना आवश्यक असते. त्यासाठी कधी काही संशोधन निमित्त होते, कधी इतिहासाचा एखादा दाखला पुरेसा होतो, कधी एखादी क्षुल्लक घटना कारणीभूत होते, तर कधी आंतरजातीय विवाह, पाणवठा अशाही गोष्टी पुरेशा होतात. पण ही दरी वाढत जाणे समाजाला घातकच असते. तसा प्रयत्न सध्याच्या काळात योजून केला जात आहे. त्यामुळे उच्चवर्णीयांना, विशेषत: ब्राह्मण समाजाला किंवा हिंदू तत्त्वज्ञानाला शिव्याशाप देण्यात पुरोगामित्व मानावे असला काहीतरी समज करून दिला गेला आहे. मग कधी गणपतीवर संक्रांत येते, कधी पुजाऱ्यांवर येते तर कधी शंकराचार्यांवर येते. त्यातला अर्थ ज्यांना माहीत नाही त्यांचा उद्रेक जास्त होतो आणि खरे काय याबद्दल फार जोराने बोलता येत नाही अशी आजची स्थिती आहे. पण त्यामुळे काही बिघडत नाही. ज्या गोष्टी सत्य आणि दृढ आहेत त्या उच्चारत राहायलाच हव्यात असेही नाही. समाज त्यावर विचार करण्यास समर्थ असतो. ज्यांचे संस्कार झाले असे म्हणतात ते योगायोगाने ब्राह्मणही असतील, परंतु त्यांच्या जन्मजातीपेक्षा त्यांच्या संस्कारालाच अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे याचेही, मुंजीचे समर्थन करणाऱ्या ब्राह्मण समाजाने भान ठेवले पाहिजे.



आठवांचे साठव...!
आमचे `दिग्दर्शक'
तबला वाजवायला मी लहानपणी शिकलो. शाळकरी वयात बऱ्यापैकी सराव झाला होता. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी कऱ्हाडच्या सायन्स कॉलेजात असताना दिवाळीनंतरच्या सत्रात स्नेहसंमेलन होते. माझा तसल्या घडामोडींशी दूरान्वयानं सुतराम संबंध नव्हता. एकतर अशा कार्यक्रमांत भाग घेण्याचा माझा पिंड नव्हता, व नाही. मला सभाधीटपणा किंचितमात्र नव्हता. आणि स्नेहसंमेलन-सहल-क्रीडास्पर्धा वगैरे रंग खेळण्याजोगी परिस्थिती नव्हती.
दुपारनंतर प्रॅक्टिकल चालू असताना कॉलेजच्या शिपाई आला आणि मला बोलावून नेले. प्रा.उमर्जीकर हे भूगर्भशास्त्राला होते, त्या विषयाशी माझा संबंध नव्हता. मी त्यांना भेटलो. ते संमेलनाच्या मनोरंजन विभागाचे प्रमुख होते, हे तिथं मला कळलं. त्याच्याशी तर माझा त्याहून संबंध नव्हता. त्यांच्या सांगण्यानुसार, बरेच कार्यक्रम संगीत-गाणी वगैरे होत आहेत, आणि साथीला तबल्यासाठी कॉलेजात कोणीच नाही. पेंढरकर हा एक तबल्याचा विद्यार्थी होता, त्याला स्वतंत्र-सोलो-तबलावादनास वेगळा काही वेळ दिला होता. मी `साथ'सांभाळावी असे त्यांचे म्हणणे. मला हो म्हणण्याचा धीर झाला नाही. बऱ्याच सबबी सांगितल्या. पण काही प्राध्यापक, वर्गबंधू यांच्याकरवी दबाव आला. सोबती-मित्रांनी, `लेका, एवढा भाव का खातोस?' हेही म्हणून झालं. शेवटी बरं म्हणावं लागलं. मनात खूप भीती-दडपण होतं.
सायन्स कॉलेजच्या मनोऱ्यावर एक प्रशस्त खोली होती. तिथं दररोज दुपारनंतर तालमी सुरू झाल्या. तबलेवाला मिळाल्यावर एक वाद्यवृंद (ऑर्केस्ट्न) बसवायचं ठरलं. हार्मोनियमला एक मुलगी होती, ती आमच्यापुढं दोन वर्षं-पदवीच्या वर्गात. बहुधा तिचं आडनाव उमराणी. तिचा हात हार्मोनियमवर फार सफाईनं फिरायचा. ती प्रमुख वादक. बाकी काही वाद्यांची जुळणी झाली. हिंदी-मराठी लोकप्रिय गाण्यांचे मुखडे किंवा एखादं कडवं घेत, समान सुरावटीतून पुढचं गाणं `पकडायचं' असा तो कार्यक्रम. प्रा.उमर्जीकर यांनी खूप मेहनत घेतली आणि आम्हाला घ्यायला लावली. साथीला घुंगरू किंवा चाळ पाहिजेत, ते तबल्याशी नीट जमेनात. म्हणून माझ्या उजव्या मनगटाशी ते गुडाळावेत असं ठरलं. शिरसाच्या झाडाला रुंदमोठ्या शेंगा असतात, त्या पूर्ण वाळल्या की आतील बिया खळळ खळळ वाजतात. अशा चारपाच शेंगा एकत्र बांधून मस्त खुळखुळा बनवला.
प्रत्यक्ष कार्यक्रमाची वेळ जवळ आली. तयारी चांगली होती. त्या शेंगांच्या खुळखुळयावर क्रेप कागद मढवल्यावर ते `वाद्य' ओळखेना. स्टेजवर बरा दिसेल असा शर्ट माझ्याकडं नव्हता. इस्लामपूरचा शशिकांत जोशी हा `खोलीमित्र'; त्याचाही एकमेव फुलशर्ट, तो घेतला, कारण हाताशी बांधलेले घुंगरू दिसू नयेत! रामटेके नावाच्या विद्यार्थ्याचे `शूर आम्ही सरदार..', प्रा.डांगे यांचे `ओ मेरे शाहे..तुम मेरे पास होते हो..' इ.गीतांना केवळ ठेका धरायचा होता, विशेष कसरत नव्हती. पण त्यांमुळे माझी भीड चेपली. शेवटी शेवटी वाद्यमेळ हा आमचा मास्टरपीस होता.
त्या मुलीच्या (उमराणी?) पेटीतून एकेक गाणं उलगडत चाललं, तशी समोरच्या गर्दीतून टाळया-ठेका सुरू झालं. माझा तबलाही छान `लागला' होता. एकातून दुसरे असे गाणे होत शेवटी `लेके पहला पहला प्यार..'ची पहिली सुरावट आली तसं गर्दीनं आख्खं आवार डोक्यावर घेतलं. हा मेळ संपताच, शिट्या टाळया आणि `वन्स मो%%र' च्या आरोळया सुरू झाल्या. ती मागणी मान्य करावी लागली.
पंचेचाळीस वर्षांनंतर इथं जवळच्या एका दासबोध पारायणात प्रा.उमर्जीकर हे प्रवचनासाठी आले होते. मी ओळख दिल्यावर त्या घाईतच तीनचार मिनिटं माझ्या घरी येऊन गेले. माझ्या पत्नीची ओळख करून दिली. त्यांनी ती वाद्यमेळाची आठवण तिला सांगितल्यावर मलाच फार आश्चर्य आणि आनंद वाटला. लांब बाह्यांचा शर्ट मी दुसऱ्याचा मागून घेतल्याचा उल्लेख त्यांनी केल्यावर माझं मन भरून आलं.  
- वसंत आपटेे, `वाल्मिकी' किर्लोस्करवाडी ४१६३०८

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन