वाद - संवाद
आपले वृत्तपत्र डागाळू नये
मागच्या एका अंकात एका प्रतिष्ठित गृहस्थाचा परिचय छापला आहे. त्यास मटण आवडते व त्यावर माझी मर्जी आहे असेही त्याचे म्हणणे, आम्हास आवडलेले नाही. एखादा सुशिक्षित (सुसंस्कृत नव्हे) म्हणेल `गोमांस, मद्यपान, जुगार हे सर्व चांगले असून ते मी करतो' ती व्यक्ती चांगली प्रसिद्ध, श्रीमंत, महंत असली तरी असल्या लिखाणास प्रसिद्धी देऊ नये. त्यामुळे आपले पवित्र साप्ताहिक डागाळेल. असे आचरण करूच नये, ते लिहू तरी नये; निदान `आपले जग'ने छापू तरी नये. `आम्हास आवडेल तेच आम्ही करणार' असे असेल तर देवाला आवडेल ते देव करील!
- शंकर आ. आपटे, आदर्श कॉलनी, ठाणे (पूर्व)
संवाद
मांसाहार करावा की न करावा हा (चिरंतन) वादाचा मुद्दा आहे. पत्रलेखक म्हणतो त्याप्रमाणे ज्याला जे रुचेल-पटेल ते तो करतच असतो, देव त्याच्याकडे कसा पाहील तो त्याचा प्रश्न आहे! असो. एखाद्याचा परिचय देताना त्याच्या आवडीनिवडी उघड झाल्याने `शांतंपापम्' म्हणण्याचे काय कारण? त्याचे परिश्रम, प्रतिष्ठा, विचारदिशा या उत्तम बाजू पाहाव्यात. मुळात जगात असलेली कोणतीही गोष्ट निषिध्द नाही असेही एक तत्त्वज्ञान आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा तारतम्य भाव महत्त्वाचा. चित्पावन किंवा कोणतीही ब्राह्मण पोटशाखा अथवा जैन-बौद्ध हेही समाज आज तितके कर्मठ वा सोवळे राहिलेले नाहीत, तो कालक्रम आहे. शिवाय चातुर्वर्ण्य हे गुणकर्मानुसार येते असाही आपला सिध्दांत आहे. ब्रह्मकर्मांचे अनुसरण करणाऱ्यांनी मटणाला अभक्ष्य मानणे ठीक, पण क्षात्रधर्म (सैन्य, पोलिस, प्रशासन इ.) अथवा वैश्यधर्म (व्यापार, उद्योग, सेवा-व्यवसाय इ.) ज्यांचा आहे त्यांनीही तितके सोवळे पाळले नाही तर गैर का मानायचे? त्यांनीही सोवळे राहणे अथवा न राहणे हा त्यांचा स्वभावगत, वृत्तिगत, स्थितिगत प्रश्न राहणार. केवळ षट्कर्मांचे पालन करण्याची कर्तव्यकठोरता आज तथाकथित ब्राह्मण्यातही नाही.
लेह-लडाखमध्ये अधिकारी असणाऱ्या `ब्राह्मणा'ने रोज स्नान करावे, मद्य शिवू नये असे म्हणणे सयुक्तिक नाही. विमानदळातील एक क्रॅप्टन आहेत. (आनंद जयराम बोडस) त्यांनी ड्यूटीवर असताना पितृपक्षात केळीच्या पानावर नैवेद्य वाढून गच्चीवरती श्रद्धेने नेऊन ठेवल्याची हकिगत ऐकली. जसे ते स्वाभाविक तसेच आज कुणी ब्राह्मण-जैन वगैरेंनी मांसाहार केला तर त्याचा किती बाऊ करायचा असा प्रश्न आहे.
`आपले जग'ला इतपत उदारमतवाद गैर वाटत नाही. त्याची पवित्रता डागाळणे त्यावर अवलंबून नाही. आता हे जर देवालाच आवडले नाही तर त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करूया तेवढे तो ऐकेल; तो न्याय करेल. कारण देव पतितांनाही पावन करणारा आहे.
एखादे तत्त्व आणि मूल्य चिरंतन असते, सार्वकालीक सार्वदेशीय असते. पण आहारविहारादि आचरण स्थल-कालसापेक्ष असते. त्यानुसार व्यवहार होतच असतात. आणि जरी कुणी आपल्या स्वत:च्या समजुतीप्रमाणे वा अभ्यासाप्रमाणे धादान्त चूक असेल तरीही त्यास आपलेसे करून घेण्याची समावेशकता धर्माला मान्य आहे. कुणाला असंस्कृत, कलंकित म्हणणे प्रशस्त नाही.
- आपले जग
This comment has been removed by the author.
ReplyDeletepenin baraaha
ReplyDeletesaMpAdakiya uttara adhika yogya vaaTate. maaMsaahaara kShatriyaayaa niShIddha naahI . he tar sarvamaanyaca Ahe paNa je braahmaN deavakaarya dharmakaarya kritanaahIta tyaatmaaMsaahaara AcarNyaasa kaaMhI AdakaathI nasaavI . PaNa hYaa saamaanya AvaDIcI jaahIraata karNyaacyaa kalpanece AScarya vaatate .kadaacIt ritI rivaaja moDuna ApaNa kaMhI prakrama karat aahota ase . tho uthaLapaNaace vaaTte athavaa ----