संकट ही संधी
गेल्या जून जुलै महिन्यातील पावसाळी गारवा अल्पायुषी ठरला आणि पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच संपला. तात्पर्य असे की, आपल्या भागात चालू वर्षी दुष्काळ स्पष्ट दिसतो आहे.
पाऊस अवेळी, अति किंवा अपुरा पडण्याचा संबंध पर्यावरणाच्या असमतोलाशी, जागतिक तापमान-वाढीशी आणि रासायनिक अतिक्रमणाशी आहे ही गोष्ट तर आता जगजाहीर आहे. पूर्वकाळीही कधीतरी दुष्काळ पडत होते, पण एकाच वर्षी भूमीतील पाणीपातळी पाताळापर्यंत खोल गेली असे घडत नव्हते. पाऊस नियमित होणे हा नियम होता; दुष्काळ अपवाद होता. अवेळी पाऊस हा तर चमत्कारच म्हणत. गेल्या काही वर्षात कधीही कुठेही केव्हाही पाऊस पडतो. पूर्वी चार महिन्यात विखरून पडणारा जिरवणीचा पाऊस हल्ली कधीतरी आठवडाभरात एकदम कोसळतो. आपण मात्र `सरासरीइतका पाऊस यंदा पडला' अशी आपलीच समजूत काढतो. हे म्हणजे आठवड्याची बेगमी म्हणून एकाच जेवणात वीस भाकरी खाण्यासारखे झाले; यामुळे असमतोल घातक होणारच. एकंदरीत आपल्या सर्वांना निसर्गाचा अनैसर्गिक परिणाम जाणवू लागला आहे यात शंका नाही.
आज वैज्ञानिक साधने व दळणवळण वाढल्यामुळे धान्य वाहतूक वगैरे होईल, भूकबळीची शक्यता नाही पण इतर अनेक तऱ्हांनी दुष्काळाचे संकट आपला प्रताप दाखवेल. संकट हीसुद्धा शिकण्याची एक संधी आहे असे मानण्याची जिद्द आपल्या शाळांनी शिकविली पाहिजे. दुष्काळात धोंडा महिना सध्या चालू आहे. परंतु या `पुरुषोत्तम' महिन्यातच निसर्ग आणि ऋतुचक्राचा अभ्यास करून तो रुजविण्यासाठी माहिती उपयोगात आणली पाहिजे. निसर्ग बदलणे आपल्या हाती नाही परंतु निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी आपण स्वत: बदलणे आपल्या हाती असते. तेवढा संदेश जरी आपण सर्वत्र पोचवू शकलो तरी परिश्रम, धन आणि क्षण सार्थकी लागले असे होईल.
शिक्षकदिनाच्या या पर्वकाळासाठी आपल्यातील सर्व शिक्षकांना आदरपूर्वक प्रणाम करून, संकटकाळीही सामर्थ्य जोपासणारे शिक्षण आपण मुलांना देऊ. जेव्हा सर्वांना समान, निरपेक्ष आणि मन:पूर्वक असे काही आपण देतो तेव्हाच `नैसर्गिक न्याय' असे म्हटले जाते. शिक्षकांकडून तसे दिले जायला हवे. जे आपण मुलांना शिकवितो, सांगतो त्याचे प्रत्यक्ष उदाहरण हे आपणच स्वत: घालून द्यायचे असते.
एका शिक्षणसंस्थेत `गुणवत्ता सुधारणा' याविषयी कार्यशाळा होती. तिथे प्लॅस्टिक कपातून सर्वांसाठी चहा, परंतु पाहुण्यांसाठी वेगळे नक्षीदार कप होते. ही व्यवस्था अवाजवी प्रतिष्ठा वाढविणारी, आपापसात भेद दर्शविणारी ,प्लॅस्टिक वापरातून गुणवत्ता कमी करणारी होती. ते लोक गुणवत्तेत सुधारणा कशी करणार? अशा छोट्या छोट्या बाबींतून मुले शिक्षणातील खोली ओळखतात. अशा अनैसर्गिक संस्कारांतून शिक्षण वाचविले पाहिजे.
सध्याच्या दुष्काळातूनही बरेच काही शिकता-शिकविता यावे.
- एम. डी. देशपांडे, पुणे
Comments
Post a Comment