Skip to main content

Lok kaya boltat in sept.03


संकट ही संधी
गेल्या जून जुलै महिन्यातील पावसाळी गारवा अल्पायुषी ठरला आणि पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच संपला. तात्पर्य असे की, आपल्या भागात चालू वर्षी दुष्काळ स्पष्ट दिसतो आहे.
पाऊस अवेळी, अति किंवा अपुरा पडण्याचा संबंध पर्यावरणाच्या असमतोलाशी, जागतिक तापमान-वाढीशी आणि रासायनिक अतिक्रमणाशी  आहे ही गोष्ट तर आता जगजाहीर आहे. पूर्वकाळीही कधीतरी दुष्काळ पडत होते, पण एकाच वर्षी भूमीतील पाणीपातळी पाताळापर्यंत खोल गेली असे घडत नव्हते. पाऊस नियमित होणे हा नियम होता; दुष्काळ अपवाद होता. अवेळी पाऊस हा तर चमत्कारच म्हणत. गेल्या काही वर्षात कधीही कुठेही केव्हाही पाऊस पडतो. पूर्वी चार महिन्यात विखरून पडणारा जिरवणीचा पाऊस हल्ली कधीतरी आठवडाभरात एकदम कोसळतो. आपण मात्र `सरासरीइतका पाऊस यंदा पडला' अशी आपलीच समजूत काढतो. हे म्हणजे आठवड्याची बेगमी म्हणून एकाच जेवणात वीस भाकरी खाण्यासारखे झाले; यामुळे असमतोल घातक होणारच. एकंदरीत आपल्या सर्वांना निसर्गाचा अनैसर्गिक परिणाम जाणवू  लागला आहे यात शंका नाही.
आज वैज्ञानिक साधने व दळणवळण वाढल्यामुळे धान्य वाहतूक वगैरे होईल, भूकबळीची शक्यता नाही पण इतर अनेक तऱ्हांनी दुष्काळाचे संकट आपला प्रताप दाखवेल. संकट हीसुद्धा शिकण्याची एक संधी आहे असे मानण्याची जिद्द आपल्या शाळांनी शिकविली पाहिजे. दुष्काळात धोंडा महिना सध्या चालू आहे. परंतु या `पुरुषोत्तम' महिन्यातच निसर्ग आणि ऋतुचक्राचा अभ्यास करून तो रुजविण्यासाठी माहिती उपयोगात आणली पाहिजे. निसर्ग बदलणे आपल्या हाती नाही परंतु निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी आपण स्वत: बदलणे आपल्या हाती असते. तेवढा संदेश जरी आपण सर्वत्र पोचवू शकलो तरी परिश्रम, धन आणि क्षण सार्थकी लागले असे होईल.
शिक्षकदिनाच्या या पर्वकाळासाठी आपल्यातील सर्व शिक्षकांना आदरपूर्वक प्रणाम करून, संकटकाळीही सामर्थ्य जोपासणारे शिक्षण आपण मुलांना देऊ. जेव्हा सर्वांना समान, निरपेक्ष आणि मन:पूर्वक असे काही आपण देतो तेव्हाच `नैसर्गिक न्याय' असे म्हटले जाते. शिक्षकांकडून तसे दिले जायला हवे. जे आपण मुलांना शिकवितो, सांगतो त्याचे प्रत्यक्ष उदाहरण हे आपणच स्वत: घालून द्यायचे असते.
एका शिक्षणसंस्थेत `गुणवत्ता सुधारणा' याविषयी कार्यशाळा होती. तिथे प्लॅस्टिक कपातून सर्वांसाठी चहा, परंतु पाहुण्यांसाठी वेगळे नक्षीदार कप होते. ही व्यवस्था अवाजवी प्रतिष्ठा वाढविणारी, आपापसात भेद दर्शविणारी ,प्लॅस्टिक वापरातून गुणवत्ता कमी करणारी होती. ते लोक गुणवत्तेत सुधारणा कशी करणार? अशा छोट्या छोट्या बाबींतून मुले शिक्षणातील खोली ओळखतात. अशा अनैसर्गिक संस्कारांतून शिक्षण वाचविले पाहिजे.
सध्याच्या दुष्काळातूनही बरेच काही शिकता-शिकविता यावे.
- एम. डी. देशपांडे, पुणे

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...