Skip to main content

samvad

याला उत्तर काय? जपानचा भूकंप-त्सुनामी पाहतो, वाचतो आहोत. जपानी माणूस शांतताप्रिय, निसर्गप्रेमी, बौध्दभक्त, शिस्तप्रिय, कार्यमग्न, सेवातत्पर, स्वच्छताप्रेमी, प्रामाणिक, देशभक्त, मानवहितैषी इत्यादी सद्गुणांनी परिपूर्ण असूनही निसर्गाची-देवाची त्यावर अवकृपा का? हजारोंना दिलेली मृत्युदंडाची शिक्षा का? लाखोंच्या जीवनाची अशी परवड का? त्यासोबत पशु-पक्षी, वनस्पती या सर्वांचा विनाश का? देव खरंच इतका अन्यायी-निर्दयी आहे का? विज्ञानाकडून या आपत्तीस उत्तर आहे. हे का व कसे घडले हे विज्ञान सांगते, पण या सगळयाला `देवा'ची कारणमीमांसा काय आहे?
- रा.खु.भावसार  ई-७, अंबड एमआयडीसी, नाशिक

संवाद हा प्रश्नस्वरूपी विषय प्राचीन काळापासून अनेकांच्या संदर्भात चर्चिला जात असतो. पुष्कळ स्वयमासक्त लोकांना `मी इतका चांगला वागतो तरी माझ्याच नशीबी हे भोग का?' असा प्रश्न नेहमी पडतो. त्यास निर्विवाद उत्तर देण्याची पात्रता नाही, पण त्या संदर्भात मत मांडता येईल.
 भूकंप-त्सुनामी हे निसर्गखेळ एकूण ज्ञात विश्वाच्या पसाऱ्यातही `फार मोठे' नव्हेत, अज्ञाताचा वेध घेणाऱ्यांना तर ही क्षुल्लक हालचाल वाटेल. केवळ जपानच्या वाट्याला हे दुर्दैव आले असेही नव्हे. यापूर्वी अनेक देशांत ही निसर्गलीला दिसली, भारतातही अनुभव आला. परंतु भारतात भयंकर अवगुणी पापे आहेत, म्हणून तशी संकटे न्याय्यच ठरतील असे म्हणणे अतिरंजित होईल. भारताच्या तुलनेत जपान देश सद्गुणांची खाण आहे असे मानण्याचे कारण नाही. तिथेही `माणसेच' राहतात.
 जपानी गुणांच्या यादीत शिस्तप्रियता, कार्यमग्नता, तत्परता, स्वच्छताप्रेम, देशभक्ती असा एक समुच्चय मानता येईल; तो देशविकासात महत्त्वाचा आहे व ते गुण त्यांनी प्रयत्नपूर्वक अंगी बाणवले आहेत. तथापि शांतताप्रियता, भक्ती, प्रामाणिकपणा, मानवहित इत्यादींविषयी खात्रीने बोलावे असे काही नाही. दुसऱ्या महायुद्धात जपान उतरला तो शांतीच्या स्थापनेसाठी नव्हे. त्याला जर्मनी आणि इंग्लंड (दोस्त) यांच्या भांडणात स्वत:च्या साम्राज्यविस्ताराचा लाभ उठवायचा होता. त्याने पर्ल हार्बरच्या तळावर केलेला विमानहल्ला प्रामाणिक आणि मानवहितैषी नव्हता. भारतापुरताच विचार केल्यास सुभाषबाबूंच्या मोहिमेचा अंत जपानच्या सेवातत्परतेविषयी संशय निर्माण करतो हा इतिहास आहे. त्याचा अणुबॉम्बनी कणाच मोडला आणि त्यानंतरचा जपान जगात वेगळी ओळख घेऊन पुढे आला आहे. तथापि `आधीच्या संचिताचे ते फळ मिळाले ते बरे झाले-' असे कदापि म्हणू नये. कालानुसार काही पाप घडले तरी पापी माणसाचा द्वेष नको.
 हे सगळे वास्तव जपानवरच्या त्सुनामीचे समर्थन करण्यासाठी लिहिले नाही, पण त्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नसते गुण चिकटविण्याचा भाबडेपणा घडू नये. एक समर्थ व संपन्न राष्ट्न् म्हणून लोकांची मानसिकता घडविण्यात जपान नक्कीच आपल्यापुढे आहे. संकटावर पाय रोवून उभे राहण्याची जिद्द त्यांनी नागरिकांच्यात निर्माण केली आहे. संकटांचीच मालिका तसे मन घडण्यास कारण असू शकते. शिख-पंजाबी लोक काहीसे टर्रेबाज व निधडे असतात, गुरखे काटक असतात ही तशी उदाहरणे आपण देत असतो.
 आता मुद्दा देव दयाळू की निर्दयी? देव ही संकल्पनाच मानवाची आहे म्हटल्यावर तो दयाळू वा निर्दयी असण्याचा प्रश्न संपतो. परंतु आपण पुनर्जन्म-पूर्वसंचित याही कल्पना मान्य करीत असतो. `करावे तसे भरावे' हे छोट्या क्षेत्रात त्त्वरित सिद्ध होऊ शकेल पण दहा-वीस कोटी संख्या व लक्षावधी मैलांचा प्रदेश असे `राष्ट्न्' इतक्या झटपट निर्णायक दिसण्याएवढे जलद हालत नाही. प्रत्येक वेळी पाप-पुण्याचा झाडा द्यावा लागतो असे नाही. पुष्कळदा `वेळ आली नव्हती' असे म्हणत बाहेर सटकता येते.
 विज्ञानाकडे `कसे घडले' याला आज उत्तर आहे. कित्येक वर्षांपूर्वी तेही नव्हते, त्यावेळी त्यामागे `देवाची इच्छा' होती. आज `कसे' हे कळले पण `का घडले' याचे उत्तर विज्ञानाकडे नाही. जिथे विज्ञान कुंठते तेथे देव-अध्यात्म हे सुरू होते. ज्ञानेश्वर ज्ञानी होते तसे विज्ञानी होते. त्यांनी `स्वसंवेद्य आत्मरूपा'ला आवाहन केले. आजच्या वैज्ञानिकांचा पितामह अल्बर्ट आईन्स्टीन म्हणतो, आपल्याला अशी खात्री आहे? - की ज्याला आपण `भौतिक जग' म्हणतो, ते खरेच केवळ भौतिक जग आहे? आधुनिक विज्ञानाचा प्रबळ दृष्टिकोण असा आहे की तसे मुळीच नाही! `पदार्थ-मटेरियल' हा शब्दच फसवा आहे. हे जग आध्यात्मिक आहे आणि ते पदार्थाचा उपयोग स्वत:च्या आविष्कारासाठी - कार्यवाहीसाठी करून घेत आहे.)
- आपले जग
(याविषयी अधिकारी व्यक्ती व अभ्यासकांचे मत स्वागतार्ह)
- कार्यकारी संपादक

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...