गाभारा देवीचा राहो
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात यापुढे महिलांनाही प्रवेश राहील. यासाठी वास्तविक आंदोलन करावे लागावे हेच कालविसंगत आहे. परंतु शासन-प्रशासन क्षेत्रातील राजकीय मंडळींच्याच हाती प्रश्न गेल्यावर धडकमोर्चा, डांबरफासो, हल्लाबोल याशिवाय गत्यंतर नाही. दुसरे हेही खरे की, आंदोलनाचा नारा घुमेपर्यंत हा असा काही प्रश्न आहे असेही फार कुणाच्या गावी नव्हते. कोल्हापूरचे शाहू छत्रपती-फुले-आंबेडकर यांचा त्रिकाल जप करून स्वत:भोवतीच फट्कारी सोंगाचे पुरोगामित्त्व घुमवणारे पक्ष व संघटनांऐवजी अंबाईच्या गाभाऱ्यात घुसखोरी करणारे भाजप आणि मनसे हे तथाकथित जातीयवादी पक्ष, आणि पुष्कळशा `ब्राह्मण्यवादी' महिला हे पुढे होते. पुजारी, देवस्थान मंडळ, जिल्हाधिकारी हेही सर्व `ब्राह्मण्यवादी' असून त्यांनी सामोपचाराची भूमिका घेऊन फार न चिघळता योग्य बदल अनुसरला.
एकंदरीत जी गोष्ट झाली ती स्वागतार्ह आहे. पंढरपूरच्या सार्वजनिक मंदिरप्रवेशासाठी (पुन्हा `ब्राह्मण्य'च) साने गुरूजींनी उपोषण केले त्याला पाचसात दशके उलटली. त्या काळात मंदिरप्रवेश करीत असलेला अस्पृश्य कसा ओळखू येई असा एक प्रश्न राहतोच. पण ती काळस्थिती आज कल्पनेने जाणली तरी चार लढाऊ पुरोगामी नेते घेऊन घुसखोरी करण्याचे साने गुरुजींना सुचले नव्हते; त्यांनी प्राणान्तिक उपोषण आरंभिले. पुष्कळ धार्मिक ठिकाणी हा सामाजिक विसंवाद आजही चालू आहे. मुस्लिम प्रार्थनास्थळी नमाज पढायला महिला कधी दर्ग्यात नसतात; कुठलाच धर्म-पंथ असल्या अतार्किक रूढींमधून सुटलेला नाही. पूर्वास्पृश्यांना मंदिर प्रवेश सुकर झाला हे तर उत्तमच, परंतु गावोगावच्या जत्रांमधून त्या त्या देवदेवतांकडे त्यांच्याच जातीतील स्त्रियांना आजही प्रवेश नसतो. स्त्रियांकरवी पूजा संमत नसते, स्त्रियांनी नारळसुद्धा फोडायचा नसतो. समानतेच्या लाटेचे पाणी स्वत:च्या पायरीला लागू न देण्याचे कौशल्य दाखविणारी ही आंदोलने म्हणूनच क्रांतिकारी नव्हेत तर निव्वळ राजकारणी उचापतीची आहेत. अर्थात त्यायोगे देवीचा दरवाजा सर्वांसाठी उघडला हे बरे झाले.
देवत्त्व हे मुख्यत: पावित्र्य, मांगल्य आणि सद्भाव यांचे द्योतक असते. त्याचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्ताच्या अंगी निव्वळ साहचर्यातून ते गुण येऊ शकतात असे मनोविज्ञान सांगते. तथापि त्यासाठी भक्तही आपापल्या मनोभावानुसार आपल्या देवाचा स्वभाव व रूप ठरवीत असतो. तामसी भक्ताला जीभ बाहेर काढून डोळे वटारणारा देव पूजनीय वाटतो. सौम्यशीतल वृत्तीला कमलनेत्रही अर्धोन्मीलित असणारी आशीर्वचनाचा हात देणारी देवता प्रिय वाटते. देवतेलाही स्थलकालस्थिती-सापेक्षता असते. खरा देव केवळ भावाचा भुकेला असेलही पण भक्ताच्या सामर्थ्यानुसार त्याला समाजात भाव मिळतो. म्हणूनच भावखाऊ भक्तांना आपला भाव वाढविण्यासाठी अशी श्रेयदायी आंदोलने करावी लागतात.
पंढरीच्या पांडुरंगाचे पाय भक्तांचा माथा टेकून टेकून झिजू लागले. सततच्या पंचामृती अभिषेकाने रासायनिक परिणाम होऊ लागला. अशा कारणांनी तिथे भक्तांवर बंदीच घालावी लागली. कोल्हापूरचे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिरही रासायनिक थर (कोटिंग) देऊन घेण्यात गैर नव्हते. मुख्य म्हणजे शिखर असो, गाभारा असो किंवा पायीची पायरी असो....ते जितके पुरातन तितके श्रद्धापात्र असते. परंतु एक इमारत म्हणून ते चिरंजीव असू शकत नाही. त्याचप्रमाणे त्या त्या काळातील घटना, श्रद्धा, रूढी, परंपरा, समजुती याही चिरंतन असण्याचे कारण नाही. आक्रमकांनी मूर्ती आणि देवळे भग्न करायचा सपाटा लावल्यावर देव कुठे भुयारात - दरीत - डोंगरात नेऊन ठेवणे भाग पडले; तशा एखाद्या घटना-प्रसंगातून काहीतरी प्रथा पडतात. त्या मन:पूर्वक पाळल्या जात असतील तर कुणी हरकत घेण्याचे कारण नसावे. काळानुसार तितकी प्रगल्भता आल्याचे मान्य असेल तर त्या प्रथा कवटाळून बसण्याचेही कारण नाही. तथापि त्यासाठी जनजागरण, प्रबोधन, प्रयोगशीलता हे मार्ग आहेत. धडकमोर्चा हा मानवी रिवाज नाही, ती रीत वेगळया प्राण्याची आहे. असल्या धडकांनी श्रद्धा डळमळीत होत नाहीत, मग त्या डोळस असोत की अंध असोत. उलट समाजात सत्शील टिकविणाऱ्या अंधश्रद्धाही वैज्ञानिक दृष्टीने उदार मनाने सोसल्या पाहिजेत. शनी शिंगणापूरला चोरी करणाऱ्याला `भोगावे' लागते, त्यामुळे दाराला कुलूप नसते म्हणतात. ही अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी चोरी करून दाखविण्यात कसली आधुनिकता अन् कसली वैज्ञानिकता?
महिलांना समान अधिकार आणि हक्क देण्यापेक्षा त्यांच्या समानतेसाठी कर्तव्य आणि जबाबदारी घ्यायला हवी. समानता म्हणजे पुरुषी वागणे नव्हे. गाभाऱ्याची झीज होत असेल तर पुरुषांनाही प्रवेश बंद करावा, आणि एकदा शुचिर्भूत शरीराने पूजाभिषेक झाल्यानंतर पुजाऱ्यांनीही गाभाऱ्यात जाऊ नये. परंतु इतकी सार्वत्रिक समानता व वैज्ञानिकता पेलवणे कठीण आहे कारण हे प्रश्न केवळ शास्त्रार्थ, तर्क, विज्ञान व कालानुरूपता इतक्यावर तोलले न जाता त्यात राजकारण, चरितार्थ, प्रतिष्ठा, अहंता असे मानवी पैलूही असतात. आपल्या धर्मकथांतील देवादिकांस ते चुकले नाहीत मग हे आंदोलक तर मर्त्य मानव. त्यांना भक्तांच्या मुक्तीपेक्षा आणि देवीच्या भक्तीपेक्षा आपल्या कुरघोडी शक्तीचे जास्त महत्त्व!
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात यापुढे महिलांनाही प्रवेश राहील. यासाठी वास्तविक आंदोलन करावे लागावे हेच कालविसंगत आहे. परंतु शासन-प्रशासन क्षेत्रातील राजकीय मंडळींच्याच हाती प्रश्न गेल्यावर धडकमोर्चा, डांबरफासो, हल्लाबोल याशिवाय गत्यंतर नाही. दुसरे हेही खरे की, आंदोलनाचा नारा घुमेपर्यंत हा असा काही प्रश्न आहे असेही फार कुणाच्या गावी नव्हते. कोल्हापूरचे शाहू छत्रपती-फुले-आंबेडकर यांचा त्रिकाल जप करून स्वत:भोवतीच फट्कारी सोंगाचे पुरोगामित्त्व घुमवणारे पक्ष व संघटनांऐवजी अंबाईच्या गाभाऱ्यात घुसखोरी करणारे भाजप आणि मनसे हे तथाकथित जातीयवादी पक्ष, आणि पुष्कळशा `ब्राह्मण्यवादी' महिला हे पुढे होते. पुजारी, देवस्थान मंडळ, जिल्हाधिकारी हेही सर्व `ब्राह्मण्यवादी' असून त्यांनी सामोपचाराची भूमिका घेऊन फार न चिघळता योग्य बदल अनुसरला.
एकंदरीत जी गोष्ट झाली ती स्वागतार्ह आहे. पंढरपूरच्या सार्वजनिक मंदिरप्रवेशासाठी (पुन्हा `ब्राह्मण्य'च) साने गुरूजींनी उपोषण केले त्याला पाचसात दशके उलटली. त्या काळात मंदिरप्रवेश करीत असलेला अस्पृश्य कसा ओळखू येई असा एक प्रश्न राहतोच. पण ती काळस्थिती आज कल्पनेने जाणली तरी चार लढाऊ पुरोगामी नेते घेऊन घुसखोरी करण्याचे साने गुरुजींना सुचले नव्हते; त्यांनी प्राणान्तिक उपोषण आरंभिले. पुष्कळ धार्मिक ठिकाणी हा सामाजिक विसंवाद आजही चालू आहे. मुस्लिम प्रार्थनास्थळी नमाज पढायला महिला कधी दर्ग्यात नसतात; कुठलाच धर्म-पंथ असल्या अतार्किक रूढींमधून सुटलेला नाही. पूर्वास्पृश्यांना मंदिर प्रवेश सुकर झाला हे तर उत्तमच, परंतु गावोगावच्या जत्रांमधून त्या त्या देवदेवतांकडे त्यांच्याच जातीतील स्त्रियांना आजही प्रवेश नसतो. स्त्रियांकरवी पूजा संमत नसते, स्त्रियांनी नारळसुद्धा फोडायचा नसतो. समानतेच्या लाटेचे पाणी स्वत:च्या पायरीला लागू न देण्याचे कौशल्य दाखविणारी ही आंदोलने म्हणूनच क्रांतिकारी नव्हेत तर निव्वळ राजकारणी उचापतीची आहेत. अर्थात त्यायोगे देवीचा दरवाजा सर्वांसाठी उघडला हे बरे झाले.
देवत्त्व हे मुख्यत: पावित्र्य, मांगल्य आणि सद्भाव यांचे द्योतक असते. त्याचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्ताच्या अंगी निव्वळ साहचर्यातून ते गुण येऊ शकतात असे मनोविज्ञान सांगते. तथापि त्यासाठी भक्तही आपापल्या मनोभावानुसार आपल्या देवाचा स्वभाव व रूप ठरवीत असतो. तामसी भक्ताला जीभ बाहेर काढून डोळे वटारणारा देव पूजनीय वाटतो. सौम्यशीतल वृत्तीला कमलनेत्रही अर्धोन्मीलित असणारी आशीर्वचनाचा हात देणारी देवता प्रिय वाटते. देवतेलाही स्थलकालस्थिती-सापेक्षता असते. खरा देव केवळ भावाचा भुकेला असेलही पण भक्ताच्या सामर्थ्यानुसार त्याला समाजात भाव मिळतो. म्हणूनच भावखाऊ भक्तांना आपला भाव वाढविण्यासाठी अशी श्रेयदायी आंदोलने करावी लागतात.
पंढरीच्या पांडुरंगाचे पाय भक्तांचा माथा टेकून टेकून झिजू लागले. सततच्या पंचामृती अभिषेकाने रासायनिक परिणाम होऊ लागला. अशा कारणांनी तिथे भक्तांवर बंदीच घालावी लागली. कोल्हापूरचे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिरही रासायनिक थर (कोटिंग) देऊन घेण्यात गैर नव्हते. मुख्य म्हणजे शिखर असो, गाभारा असो किंवा पायीची पायरी असो....ते जितके पुरातन तितके श्रद्धापात्र असते. परंतु एक इमारत म्हणून ते चिरंजीव असू शकत नाही. त्याचप्रमाणे त्या त्या काळातील घटना, श्रद्धा, रूढी, परंपरा, समजुती याही चिरंतन असण्याचे कारण नाही. आक्रमकांनी मूर्ती आणि देवळे भग्न करायचा सपाटा लावल्यावर देव कुठे भुयारात - दरीत - डोंगरात नेऊन ठेवणे भाग पडले; तशा एखाद्या घटना-प्रसंगातून काहीतरी प्रथा पडतात. त्या मन:पूर्वक पाळल्या जात असतील तर कुणी हरकत घेण्याचे कारण नसावे. काळानुसार तितकी प्रगल्भता आल्याचे मान्य असेल तर त्या प्रथा कवटाळून बसण्याचेही कारण नाही. तथापि त्यासाठी जनजागरण, प्रबोधन, प्रयोगशीलता हे मार्ग आहेत. धडकमोर्चा हा मानवी रिवाज नाही, ती रीत वेगळया प्राण्याची आहे. असल्या धडकांनी श्रद्धा डळमळीत होत नाहीत, मग त्या डोळस असोत की अंध असोत. उलट समाजात सत्शील टिकविणाऱ्या अंधश्रद्धाही वैज्ञानिक दृष्टीने उदार मनाने सोसल्या पाहिजेत. शनी शिंगणापूरला चोरी करणाऱ्याला `भोगावे' लागते, त्यामुळे दाराला कुलूप नसते म्हणतात. ही अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी चोरी करून दाखविण्यात कसली आधुनिकता अन् कसली वैज्ञानिकता?
महिलांना समान अधिकार आणि हक्क देण्यापेक्षा त्यांच्या समानतेसाठी कर्तव्य आणि जबाबदारी घ्यायला हवी. समानता म्हणजे पुरुषी वागणे नव्हे. गाभाऱ्याची झीज होत असेल तर पुरुषांनाही प्रवेश बंद करावा, आणि एकदा शुचिर्भूत शरीराने पूजाभिषेक झाल्यानंतर पुजाऱ्यांनीही गाभाऱ्यात जाऊ नये. परंतु इतकी सार्वत्रिक समानता व वैज्ञानिकता पेलवणे कठीण आहे कारण हे प्रश्न केवळ शास्त्रार्थ, तर्क, विज्ञान व कालानुरूपता इतक्यावर तोलले न जाता त्यात राजकारण, चरितार्थ, प्रतिष्ठा, अहंता असे मानवी पैलूही असतात. आपल्या धर्मकथांतील देवादिकांस ते चुकले नाहीत मग हे आंदोलक तर मर्त्य मानव. त्यांना भक्तांच्या मुक्तीपेक्षा आणि देवीच्या भक्तीपेक्षा आपल्या कुरघोडी शक्तीचे जास्त महत्त्व!
Comments
Post a Comment