Skip to main content

PARASHURAM

...... भाष्यकार ......
 `भाष्यकार' म्हटले की जगद्गुरू आद्य शंकराचार्य डोळयापुढे येतात, इतका तो शब्द त्यांच्या नावाशी जोडला आहे. लोकमान्य म्हणजे लोकांनी मानलेला, मान्यता दिलेला. पण तो शब्द लोकमान्य झाला तो टिळकांमुळे.
 आजकाल शब्दांचे अर्थ लावताना कसेतरी शब्द वापरले जातात त्यामुळे शब्दाचे अवमूलन होते. काही शब्दांच्या वापराची काही काळ लाट येते. कार्यसम्राट, दिग्गज, महर्षी, आचार्य असे शब्द लंग्यासुंग्या व्यक्तींसाठी वापरून कोणी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो तेव्हा ती लाचारी चाणाक्षांच्या नजरेतून सुटत नाही.
 धर्माच्या अत्यंत प्रतिकूल काळात शंकराचार्यांनी वैदिक धर्माची पुन्हा प्रस्थापना केली. त्यासाठी ब्रह्मसूत्रे, उपनिषदे व भगवद्गीता यांच्यावर भाष्ये रचली. ती आपल्या शिष्यांना शिकविली. ज्ञानकांडाची प्रस्थापना केली व चौदिशांना चार मठ स्थापून धर्मव्यवस्था लावून दिली. हा सगळा विषय श्रीशंकर दिग्विजय या विद्यारण्यस्वामींच्या ग्रंथात आहे. तो आता मराठीत उपलब्ध आहे.
 गूढ अनाकलनीय अशा वाक्यांचा सुसूत्र अर्थ स्पष्ट करून सांगणे म्हणजे भाष्य. वेद हे अपौरुषेय असल्याने त्यावर भाष्य कुणीही करावे असे काम नाही. ते काम शंकराचार्यांनी तर्कशुद्ध केले, ते एकमेवाद्वितीय आहे. हे कार्य इसवी सनाच्या ८ व्या शतकात झाले असे मानले तरी १३ व्या शतकापर्यंत चार-पाचशे वर्षांचा काळ विद्वान स्वस्थ बसले नव्हते. तेवढ्या काळात अनेकांनी भाष्ये केली होती. मध्वाचार्य, रामनुजाचार्य यांनी आपल्या मतांच्या समर्थनासाठी द्वैत विचारांची भाष्ये लिहून आपले संप्रदाय रुढ केले होते. हे सगळे संस्कृत भाषेत होते. बुद्धाने आपला धर्म पाली या तत्कालीन बोलीभाषेत सांगितला होता.
 बारा-तेराव्या शतकात पुन्हा एकदा धर्मावर गंडांतर आले. परकी धर्मांनी आक्रमण केले. त्यांना तोंड देण्यासाठी पुन्हा एकदा धर्माचा अर्थ समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली, तेव्हा ज्ञानेश्वर उभे राहिले. त्यांनी फक्त गीतेवर टीका केली, म्हणजे अर्थ स्पष्ट करून सांगितला. वास्तविक ते मराठीतील गीताभाष्य, पण त्यांनी स्वत:च्या रचनेला `भाष्य' शब्द न वापरता `टीका' म्हटले. ती टीका कशी केली ते सांगितले `भाष्यकारांते वाट पुसतु' म्हणजे भाष्यकारांना वाट विचारत मी गीतार्थ स्पष्ट केला असे सांगितले. वास्तविक भाष्यकार म्हणजे शंकराचार्य हे वेगळे सांगायला नको पण पुढील ज्ञानेश्वरीच्या टीकाकारांनी `भाष्यकारांते' असे म्हणून फक्त एका अनुस्वाराने उरलेल्या भाष्यकारांना एकाच ओळीत आणले. पुढील सगळया संतांनी आचार्यांचाच मार्ग सोप्या शब्दात सांगितला. पण आज आचार्य फारसे कुणाला ठाऊक नाहीत. मराठीजनांना फक्त ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम व एकनाथ दिसतात, काहीजण समर्थांनासुद्धा संत म्हणत नाहीत. कालाय तस्मै नम: ।
 हे सगळे संत मागे पडून आज अनेक नवे संप्रदाय उभे रहात आहेत. त्याचे संस्थापक आहेत, त्यांची वचने आहेत. ती काही काळाने कळणे कठीण होईल. मग त्यांच्यावरही भाष्ये होतील. भाष्य ही काळाची गरज आहे. ती व्हावीच लागतील. सगळाच अर्थ सर्वकाळ सर्वांना समजत नाही. म्हणून स्वामी विज्ञानानंदांच्या वचनावरसुद्धा भाष्य करण्याची वेळ येईल.
 अशी ही भाष्यमीमांसा.
- ज. गो. मराठे
आगाशी (ता.वसई)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...