आग शमली, क्षोभ शमवा
मंत्रालयास आग लागली तो प्रकार दुर्दैवी आहेच. इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी एवढी भीषण आग लागणे हे अचंबित करणारे असले तरी आपल्या राष्ट्नीय व सार्वजनिक स्वभावाच्या दृष्टीने अशक्यही वाटत नाही. कारण तितकी बेफिकीरी व सामुदायिक गलथानपणा आपण अंगी बाणवलेले आहे. आपली आधुनिकता एका पायावर पळते आहे, आणि दुसऱ्या पायावर पिढीजात भोंगळपणा स्वस्थ आहे. त्यामुळे मुंबईत असो किंवा कोण्या ओसाड गावात असो, आधुनिकतेला जी एक शिस्त, काटेकोरपणा व सावधता असली पाहिजे ती कुठेही दिसत नाही. वाहनांची संख्या बेसुमार वाढली, पण तितकी संख्या सामावू शकणारे रस्ते मोठे करता येत नाहीत. गाड्या उभ्या करण्याला जागा उपलब्ध नाहीत, आणि कुठेही गाडी उभी केली तर ती सुरक्षित राहील अशी शाश्वती लोकांच्या प्रवृत्तीत नाही. या प्रकारच्या गजबजाटाचे आत्यंतिक भिकार उदाहरण म्हणून मंत्रालयाचेच द्यावे अशी स्थिती होती.
हल्लीच्या कोणत्याही व्यवहारांची पद्धत अशी की, सत्तेचे विकेंद्रीकरण फक्त नावापुरतेच असते; आणि सर्व शासकीय कामांची टोलवाटोलवी किंवा दरनिश्चिती मंत्रालयातच होते. नर्सची बदली, वाळूचा ठेका, ५ वी च्या तुकडीला परवानगी असली गावपातळीची सूत्रे मंत्र्याहाती एकवटली आहेत. पहिलीच्या पोराला शाळेत प्रवेश देण्यासाठी चिठी देणारे क्रॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे राज्यभरांतून असली फालतू कामे घेऊन मंत्रालयात गर्दी-गलबला वाढविणारी रयत राज्यकर्त्यांना भूषणावह वाटते. वास्तविक ते प्रशासकीय नाकर्तेपणाचे निदर्शक आहे. या जत्रास्वरूपी मंत्रालयाचे व्यवस्थापन आटोक्याबाहेर जाणे त्यातून घडलेले आहे. आधुनिक दळणवळण सोयीचे झाले, प्रवास सोपा झाला त्यामुळे गावगन्ना पब्लिकला मुंबई जवळ आली. मोबाईल - कॉम्प्युटर वापरून मंत्र्याची भेट ठरविता येत नाही; त्यासाठी मात्र मंत्रालयात घुसून दिवसचे दिवस ताटकळत राहावेच लागते. हे अजब मिश्रण प्रचलित आहे.
याशिवाय मंत्रालयीन कामकाज तर काय वर्णावे? शासकीय योजनांविषयीच्या रंगी-बहुरंगी प्रचारपत्रकांचे गठ्ठे सगळया इमारतभर पडून असतात. ते जनतेला वाटण्यासाठी छापतात, पण वाटले जात नाहीत. पुढच्या काळात मंत्री, मुख्यमंत्री किंवा सरकारच बदलते. त्या पत्रकांचा संदर्भ बदलतो आणि ढिगारे तिथेच राहतात. सगळया वऱ्हांड्यातून, पॅसेजमधून जुन्या फायली, मोडकी टेबल खुर्च्या, बाकडी, खोकडी या प्रकारचे पसारे आणि त्याच प्रकारची माणसं विखुरलेली असतात. कामांचा व्याप, लोकांच्या आकांक्षा, सभोवतीची कार्पोरेट गती यांच्याशी अनुरूप अशी ही परिस्थिती नाही. त्यामुळे आगीसारख्या संकटास असे भक्ष्य सहजी सापडू शकते याचे भान आणि त्यानुसार कारवाईची कठोरता कुणी दाखवलीच नाही. घोंघावणारी गर्दी म्हणजे लोकप्रियता, आणि भोंगळपणा म्हणजे लोकाभिमुखता असल्या समीकरणांमुळे असे प्रसंग `अपघात' म्हणून सोडून देता येत नाहीत.
या बाबतीत आणखी एक वस्तुस्थिती अधिक भीषण वाटते. मंत्रालयास आग लागल्याची वार्ता किंवा दृश्य सामान्य जनतेशी आल्यावर सहजी उमटलेल्या प्रतिक्रिया फार गंभीर आहेत. आपापल्या परीने सामान्य माणूस सामान्य प्रतिक्रिया देत असतो. अधिकृत म्हणून नोंदलेले ते ठाशीव निवेदन नसते, परंतु त्याची खदखद त्यातून व्यक्त होते. ती वाईट आहे. घोटाळेबाज मंत्र्यांचे अशुभ व्यक्त करणारी आहे. कुणा भ्रष्ट उच्चपदस्थाने सर्व पुरावे नष्ट करण्यासाठीच हे केले असणार. यापुढची काही वर्षे जनतेची कामे टोलविण्यास किंवा मुद्दाम चुकविण्यास निमित्त झाले... वगैरे!
या सगळया सामान्य प्रतिक्रिया सरकारची कार्यपद्धती आणि त्याविषयी चीड व्यक्त करणाऱ्या आहेत. स्वत:च्या सरकारवर इतक्या टोकाचा अविश्वास व घृणा हे लक्षण चांगले नव्हे. मंत्रालयाची आग विझेल, काही पर्याय निघेल, राज्यशकट पुढे चालू राहील. पण या प्रकारच्या लोक- भावनांतून कोणतेही सरकार पर्याय काढू शकेल असे वाटत नाही. लोकांच्या मनांतील ती आग विझवण्यासाठी केवळ पाण्याचे फवारे पुरे ठरत नाहीत. तेवढी नोंद घेऊनच नवे मंत्रालय कार्यरत व्हावे आणि ही अग्नीपरीक्षा दिव्यत्त्वाची प्रचिती देणारी ठरावी अशी भावी काळाची अपेक्षा आहे.
***
Comments
Post a Comment