सर्वधर्मी समानत्त्व
भारतीय जनता पक्षाने भावी निवडणूक जिंकली तर त्या पक्षाचा पंतप्रधान कोण होणार हा आजच्या वादाचा विषय झाला आहे. बिहारच्या नीतिशकुमारांनी त्यात धर्मनिरपेक्षतेचा बाष्कळ मुद्दा फेकून पुष्कळांना उचकून दिले आणि अस्थानी व अव्यवहार्य वाद झडू लागले. अर्थातच अशा वादाशी आणि त्यावेळच्या प्रधानपदाशी आज तरी काही घेणे नाही. त्यातील `धर्मनिरपेक्षता' या नावाचे खूळ कित्येक बुजुर्ग म्हणविणाऱ्या उच्चपदस्थांच्या डोक्यांतून अद्यापि का जात नाही एवढाच एक चिंताजनक प्रश्न शिल्लक राहतो.
राष्ट्नीय लोकशाही आघाडी नावाच्या कामापुरत्या एकत्र आलेल्या पक्षांचे एकत्रीकरण आज क्षीण स्थितीत आहे. बिहारमध्ये नीतिशकुमार मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे भाजपचे आहेत. बिहारमधल्या सत्तेपुरते ते दोन पक्ष एकत्र आले. ते राज्य रालोआ कडे आहे, असा कुणाचाही समज नाही. त्यामुळे उद्या खरीच मध्यवर्ती सत्ता या रालोआकडे आली तर, त्यातला फार मोठा पक्ष भाजप असेल तर, आणि त्या पक्षाने नरंेद्र मोदींना ते पद दिले तर... तो त्यांचा अधिकार म्हणून नीतिशकुमारांसह सर्वांनी मान्य करणे हा सरळ व्यवहार झाला; पण मग त्यास राजकारण कोण म्हणेल?
श्री.नरेंद्र मोदी यांना नीतिशकुमारांचा व्यक्तिगत विरोध कोणत्याही कारणांनी असेल, असायला हरकत नाही; पण मोदींना हिंदुत्त्ववादी ठरविणारे ते कोण? धर्माधर्माचा निर्णय करणारे हे निधर्मवादी म्हणावेत काय? डॉ.कलामांना राष्ट्न्पती करण्यात त्याच भाजपाचे पुण्य सरळसरळ मान्य करायचे की नाही? - की त्यावेळी हिंदुत्त्ववादी पक्षाने घेतलेला तो निर्णय म्हणजे स्वार्थी-धूर्त राजकारण म्हणायचे? यावेळी तर हिंदू प्रणव मुखर्जींना पाठिंबा देणे सयुक्तिक असताना िख्र्चाश्न संगमांना भाजपने राष्ट्न्पदीपदासाठी पाठिंबा दिला, यात राजकारण असेलही, पण धार्मिकता कुठे शिंकली? रा.स्व.संघानेही नीतिशकुमारांच्या धार्मिक फुसकुलीची दखल लगेचच घेतली, कारण तो दर्प त्यांना झोंबला. वास्तविक अशा वेळीसुद्धा थोडे सहन करणे सभ्यतेला धरून असते, त्याचा फार गवगवा करायचा नसतो.
हिंदू संकल्पनेतील धर्म ही मुळातच एक आचरणपद्धती असेल तर त्यामध्ये धर्मनिरपेक्षता अनुस्यूत आहे. हिंदू असणे याचाच अर्थ इतरांप्रति सद्भाव असणे. सद्भाव असण्याशी कुणाच्याही योग्यायोग्यतेचा प्रश्न नसतो. पात्रता ही धर्मानुकूल नसते. आज संगमा आणि मुखर्जी यांच्यातील अधिक पात्र उमेदवार कोण हे तर संगमाही जाणतात आणि गडकरीही जाणतात. पण संगमांना दिलेला पाठिंबा हासुद्धा `इतरांप्रती असलेल्या सद्भावनेपोटीच्या हिंदुत्त्वातून' आलेला नाही.
हिंदू नसणे किंवा हिंदुत्त्व नाकारणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असणे असा एक मूढ बाष्कळवाद रूढ केला गेला आहे. काँग्रेस किंवा साम्यवादी पक्षानेही राजकारण म्हणून जे भोचक स्वार्थकारण करायचे ते चालू ठेवले आहे. काँग्रेसी राष्ट्न्पती प्रतिभा पाटील यांच्या धर्मनिरपेक्षतेला वंदन करावे असे तरी नीतिशकुमार कंपूतील मंडळींना काय आढळले असेल असा प्रश्न पडतो. त्यांची पात्रता धर्मातीत मानावी असा काही थोर विचार त्यामागे असल्यास तेच जाणोत. रा.स्व.संघाने `भावी पंतप्रधान हिंदुत्त्ववादी का नको?' असा प्रश्न करून व्यक्त केलेली चीडही अनाठायी वाटते. `हिंदुत्त्ववादी नको' असे त्यांनीही म्हणायला हरकत नाही. त्यांना नरेंद्र मोदी हवे असतील तर असूद्यात, पण त्यांना हिंदुत्त्ववादी कशाला म्हणायचे; धर्मनिरपेक्षच म्हणावे! तसे पाहिले तर नरेंद्र मोदींनी गुजराथेत हिंदुराज्याची घोषणा केली, किंवा अहिंदूंना तुरुंगात घातले असे कधी ऐकले नाही. नीतिशवादी सोडले तर त्यांनी मुस्लिमांवर अत्याचार केले, असे तर न्यायालयानेही म्हटलेले नाही. मग कोण कुठले लालू-माया-नीतिश वगैरे म्हणतात म्हणून रा.स्व.संघानेही नरेंद्र मोदींना हिंदुत्त्ववादी म्हणवून घेण्याचे कारण नाही. नीतिशकुमारांच्या सूचनेला दुप्पट आवाजात, `होय, पुढचा पंतप्रधान कुणीही असो, तो धर्मनिरपेक्षच असला पाहिजे' हेच म्हणावे. तसेच करावे. कारण आपल्या घटनेप्रमाणे शपथ घेतानाच ते स्पष्ट जाहीर करावे लागते. शिवाय नीतिशवादी राजकारणी जर त्यावेळी मुस्लिम, शिख, बौद्ध वगैरे घटक रेटू लागले तर त्यांना त्यांच्याच धर्मनिरपेक्षतेची आठवण करून द्यावी.
तथाकथित पुरोगामी पद्धतीत, अहिंदूंना झुकते माप देण्याला निरपेक्षता म्हणतात. एका अर्थी ही तर हिंदू जीवनपद्धती आहे. अशी एक कथा ऐकिवात आहे की पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या टाइम्स वृत्तगटाच्या `धर्मयुग'पाक्षिकाने `माझ्या संघटनेचे तत्त्वज्ञान' या आशयाचे लेख मागवून प्रसिद्ध केले होते. त्यात पंडित नेहरू व गोळवलकर गुरुजी अशा मान्यवरांचाही समावेश होता; इतर पक्षीय होते. आपापल्या परीने कुणी पानभर लेख-मजकूर पुरविला, श्री.गोळवलकर गुरुजींनी तीन अक्षरांत आपले तत्त्वज्ञान मांडले, ``मैं ना,...तू.'' कथा खरी-खोटी असेल पण ती कुणाही मानवधर्मीयांनी मान्य करण्याजोगी आहे. तत्त्वापेक्षा प्रत्यक्ष व्यवहार वेगळा असल्याचा कुणाचा आक्षेप असेल तर त्यांनी आपल्या पायाखाली जरा पाहावे म्हणजे त्यांची धर्मनिरपेक्षता कोणकोणत्या सुप्त अपेक्षा बाळगून आहे ते कळेल. ज्यांच्या ठायी परिपूर्ण धर्मनिरपेक्षता असेल त्यांनीच तर स्वत:ला हिंदुत्त्वनिष्ठ म्हणवून घ्यायला हवे. कारण हिंदुत्त्वाची जीवनपद्धती स्वत:ला एकमेवाद्वितीय मानत नाही, तर दुसऱ्यांचा सन्मान ठेवायला शिकवते. तरीही ती जीवनपद्धती स्वत:कडे न्यूनता, दीनता कदापि सहन करीत नाही. `मी परमेश्वराचा अंश आहेच, पण दुसऱ्यासह मार्ग चालेन' याइतके स्पष्टत्त्व असूनही आमच्या राजकीय पक्षांच्या आघाड्या पंतप्रधान वा मंत्री कोणत्या धर्माचा निष्ठावान असावा हे ठरविण्याचा भोचकपणा करतात. हे हिंदुत्त्वही नव्हे आणि निरपेक्षता तर नव्हेच नव्हे!
***
Comments
Post a Comment