प्रजा आणि सत्ता
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व मुलांना सांगताना प्रजेची सत्ता, प्रजेसाठी सत्ता अशी काहीतरी शब्दाची फोड सांगितल्याचे स्मरते. आज मात्र प्रजा आणि सत्ता या दोन्ही गोष्टी संपूर्ण भिन्न झाल्या आहेत. किंबहुना प्रजा की सत्ता? यातील कोणातरी एकाचेच हित एकावेळी साधले जाऊ शकते असे सद्यस्थितीत दिसते.
सत्ता ही प्रजेतूनच वर गेलेली असते, त्यामुळे प्रजेची सुखदु:खे सोबत घेऊनच त्याची उत्तरे शोधण्यासाठी सत्ता अग्रक्रमाने काम करेल असा भ्रम गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून आहे. प्रजेतून उठून जो कोणी सत्तेत जातो तो तिथल्याच ओरपाओरपीत एवढा व्यग्र होतो की तो प्रजेला विसरूनच जातो. आणि पिढ्यान् पिढ्या सत्तेत असणाऱ्यांच्या नव्या पिढ्या जेव्हा सत्तेच्या क्षितिजावर उगवतात तेव्हा तर त्यांचा प्रजेशी संपर्क मागच्या पिढीपासून तुटलेला असतो. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रजा व सत्ता यातील दुवा म्हणून काम करणे अपेक्षित आहे. पण तिथेही बहुतांशी अपेक्षांचा भंगच होतो. प्रजा तर एका पाठोपाठ एक संकटांनी नाडली जात आहे. दुष्काळाची अस्मानी असो वा ऊसदराची सुलतानी, असाहाय्य महिलेच्या शरीराशी खेळ असो वा खुद्द लष्करी जवानांची हत्या... प्रजा अस्वस्थ होते आहे, रस्त्यावर येते आहे. प्रजेला सुचेल त्या मार्गाने आंदोलने सुरू आहेत.
हल्ली नव्याने फोफावलेल्या मेणबत्ती आंदोलनांवर विविध कारणांनी टीका होते आहे. पण स्वत:ला कल्याणकारी राज्याचे कर्तेधर्ते म्हणवणाऱ्या सत्ताधारी वा अन्यायग्रस्तांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना या दोघांनीही याचा गांभीर्याने विचार करायला हवा, की ही सगळी अस्वस्थ प्रजा समस्या-निवारणासाठी त्यांच्याकडे का नाही आली? आपले प्रश्न घेऊन थेट राज्यकर्त्यांना गाऱ्हाणे सांगावे किंवा आपापल्या क्षेत्रातील प्रस्थापित संघटनेकडे जावे, ते हा प्रश्न नक्की सोडवतील असा विश्वास यांच्यापैकी कुणीच निर्माण करू शकले नाही का? वास्तविक पाहता आपल्या देशात गल्ली ते दिल्ली लहानमोठ्या संघटनांचे प्रचंड जाळे आहे. तरीही सामान्य माणसाला आपला कुणीही वाली नाही असे का वाटते याचा विचार राजकारणी व समाजकारणी दोघांनीही करायला हवा.
दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष तळा-मुळाशी जाऊन काम करणारे, थेट समस्यांना भिडणारे कार्यकर्ते आहेत पण अशा सकारात्मक कामांना बातमीचे मोल (न्यूजव्हॅल्यू) मुळीच नसल्यामुळे चांगल्या गोष्टी लोकांपुढे येतच नाहीत. केवळ अन्याय, अत्याचार, अपघात यांचे भडक चित्रण करून लोकमानसात अस्वास्थ्य पसरविणाऱ्या प्रसारमाध्यमांंचे हे धोरण बदलायला हवे. बदलाला सुरुवात कुठूनतरी व्हावीच लागते. आणि ती सत्तेपासून करणे तर सामान्य प्रजेच्या हातात नाही. मग आपल्या हातात उरते ते आपल्यापासून सुरुवात करणे.
आपण जिथे काम करतो, मग ते अर्थार्जन असो, गृहव्यवस्थापन वा सामाजिक काम ते ते
आपण आपल्या पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे करतो आहोत ना याचे आत्मपरीक्षण गरजेचे आहे. बाहेरच्या जगात वेगाने रुजणारी चमकधमक दिखाऊ संस्कृती याला निदान जागरूक नागरिकांनी, कार्यकर्त्यानी बळी पडू नये. आर्थिक स्थिती उत्तम नसतानाही खोट्या प्रतिष्ठेसाठी ती उत्तम असल्याचे भासविणे यामुळे शेवटी ती पूर्णच ढासळायची वेळ येते. संस्था-संघटनांनीही प्रत्यक्ष काम करणे व काम केल्याचे दाखवणे यातला फरक समजून प्रत्यक्ष काम करण्यावर भर दिला नाही तर लोकांचा संघटनांवरचाही विश्वास उडेल. प्रजा व सत्ता यातील दुवा बनण्याचे काम एनजीओ करू शकतात, नव्हे त्यांनी त्यांची ती जबाबदारी समजायला हवी. ती उत्तम निभावण्यासाठी समस्यांची जाण, कामाचे उत्तम नियोजन व दुर्दम्य आंतरिक उत्साह यासह आपण हाती घेतलेले काम अधिकाधिक परिपूर्ण करण्याचा ध्यास बाळगायला हवा. या महाकाय प्रजासत्ताक देशाला विश्वातील महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना स्वामी विवेकानंदांचे अमृत शब्द आजही आवाहन करत आहेत - `उत्तिष्ठत जागृत प्राप्तवरान् निबोधत'
Comments
Post a Comment