Skip to main content

sampadkiya in 28 jan 2013


प्रजा आणि सत्ता
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व मुलांना सांगताना प्रजेची सत्ता, प्रजेसाठी सत्ता अशी काहीतरी शब्दाची फोड सांगितल्याचे स्मरते. आज मात्र प्रजा आणि सत्ता या दोन्ही गोष्टी संपूर्ण भिन्न झाल्या आहेत. किंबहुना प्रजा की सत्ता? यातील कोणातरी एकाचेच हित एकावेळी साधले जाऊ शकते असे सद्यस्थितीत दिसते.

सत्ता ही प्रजेतूनच वर गेलेली असते, त्यामुळे प्रजेची सुखदु:खे सोबत घेऊनच त्याची उत्तरे शोधण्यासाठी सत्ता अग्रक्रमाने काम करेल असा भ्रम गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून आहे. प्रजेतून उठून जो कोणी सत्तेत जातो तो तिथल्याच ओरपाओरपीत एवढा व्यग्र होतो की तो प्रजेला विसरूनच जातो. आणि पिढ्यान् पिढ्या सत्तेत असणाऱ्यांच्या नव्या पिढ्या जेव्हा सत्तेच्या क्षितिजावर उगवतात तेव्हा तर त्यांचा प्रजेशी संपर्क मागच्या पिढीपासून तुटलेला असतो. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रजा व सत्ता यातील दुवा म्हणून काम करणे अपेक्षित आहे. पण तिथेही बहुतांशी अपेक्षांचा भंगच होतो. प्रजा तर एका पाठोपाठ एक संकटांनी नाडली जात आहे. दुष्काळाची अस्मानी असो वा ऊसदराची सुलतानी, असाहाय्य महिलेच्या शरीराशी खेळ असो वा खुद्द लष्करी जवानांची हत्या... प्रजा अस्वस्थ होते आहे, रस्त्यावर येते आहे. प्रजेला सुचेल त्या मार्गाने आंदोलने सुरू आहेत.

हल्ली नव्याने फोफावलेल्या  मेणबत्ती आंदोलनांवर विविध कारणांनी टीका होते आहे. पण स्वत:ला कल्याणकारी राज्याचे कर्तेधर्ते म्हणवणाऱ्या सत्ताधारी वा अन्यायग्रस्तांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना या दोघांनीही याचा गांभीर्याने विचार करायला हवा, की ही सगळी अस्वस्थ प्रजा समस्या-निवारणासाठी त्यांच्याकडे का नाही आली? आपले प्रश्न घेऊन थेट राज्यकर्त्यांना गाऱ्हाणे सांगावे किंवा आपापल्या क्षेत्रातील प्रस्थापित संघटनेकडे जावे, ते हा प्रश्न नक्की सोडवतील असा विश्वास यांच्यापैकी कुणीच निर्माण करू शकले नाही का? वास्तविक पाहता आपल्या देशात गल्ली ते दिल्ली लहानमोठ्या संघटनांचे प्रचंड जाळे आहे. तरीही सामान्य माणसाला आपला कुणीही वाली नाही असे का वाटते याचा विचार राजकारणी व समाजकारणी दोघांनीही करायला हवा.

दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष तळा-मुळाशी जाऊन काम करणारे, थेट समस्यांना भिडणारे कार्यकर्ते आहेत पण अशा सकारात्मक कामांना बातमीचे मोल (न्यूजव्हॅल्यू) मुळीच नसल्यामुळे चांगल्या गोष्टी लोकांपुढे येतच नाहीत. केवळ अन्याय, अत्याचार, अपघात यांचे भडक चित्रण करून लोकमानसात अस्वास्थ्य पसरविणाऱ्या प्रसारमाध्यमांंचे हे धोरण बदलायला हवे. बदलाला सुरुवात कुठूनतरी व्हावीच लागते. आणि ती सत्तेपासून करणे तर सामान्य प्रजेच्या हातात नाही. मग आपल्या हातात उरते ते आपल्यापासून सुरुवात करणे.

आपण जिथे काम करतो, मग ते अर्थार्जन असो, गृहव्यवस्थापन वा सामाजिक काम ते ते
आपण आपल्या पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे करतो आहोत ना याचे आत्मपरीक्षण गरजेचे आहे. बाहेरच्या जगात वेगाने रुजणारी चमकधमक दिखाऊ संस्कृती याला निदान जागरूक नागरिकांनी, कार्यकर्त्यानी बळी पडू नये. आर्थिक स्थिती उत्तम नसतानाही खोट्या प्रतिष्ठेसाठी ती उत्तम असल्याचे भासविणे यामुळे शेवटी ती पूर्णच ढासळायची वेळ येते. संस्था-संघटनांनीही प्रत्यक्ष काम करणे व काम केल्याचे दाखवणे यातला फरक समजून प्रत्यक्ष काम करण्यावर भर दिला नाही तर लोकांचा संघटनांवरचाही विश्वास उडेल. प्रजा व सत्ता यातील दुवा बनण्याचे काम एनजीओ करू शकतात, नव्हे त्यांनी त्यांची ती जबाबदारी समजायला हवी. ती उत्तम निभावण्यासाठी समस्यांची जाण, कामाचे उत्तम नियोजन व दुर्दम्य आंतरिक उत्साह यासह आपण हाती घेतलेले काम अधिकाधिक परिपूर्ण करण्याचा ध्यास बाळगायला हवा. या महाकाय प्रजासत्ताक देशाला विश्वातील महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना स्वामी विवेकानंदांचे अमृत शब्द आजही आवाहन करत आहेत - `उत्तिष्ठत जागृत प्राप्तवरान् निबोधत'

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...