उत्पत्सते:स्ति मम कोपि समानधर्मा
कालोह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी ।
वैचारिक संघर्षाचीच गरज
चिपळूणला मराठी `संमेलन'नावाची साहित्यजत्रा पार पडली, संमेलनाच्या अध्यक्षपदावरून श्री.नागनाथ कोत्तापल्ले यांनी साहित्य आणि साहित्यिकांबद्दल योग्य विचार मांडले. ते जे म्हणाले त्याची मध्यवर्ती कल्पना (थीम) अशी जाणवते की, जे साहित्य प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष मांडते, तेच साहित्य-संस्कृती समृद्धीच्या दृष्टीने मोलाचे असते. कोणत्या तरी भूमिकेशिवाय साहित्य असूच शकत नाही, आपापल्या भूमिका मांडण्यासाठी साहित्यक्षेत्र हे एक रणांगणच असते.
अध्यक्षांच्या या प्रतिपादनात दुमत होण्याचे कारण नाही; मराठी साहित्यजगताचा सन्मान्य प्रतिनिधी म्हणून मांडलेले हे विचार आहेत. मात्र त्यातील `संघर्ष', `रणांगण' इत्यादी संज्ञा लाक्षणिक अर्थाने घ्यायच्या हे मात्र लक्षात ठेवण्याची गरज ठासून सांगायला हवी. त्या संज्ञा साहित्यक्षेत्राने तरी वैचारिक म्हणूनच जपल्या पाहिजेत. त्याऐवजी तथाकथित विद्रोहवाद्यांनी व ब्रिगेडियर्सनी संघर्षाची दुकानदारी मांडून शब्दश: रणांगण माजविण्याचा प्रघात निर्माण करू पाहिला आहे. त्यामुळे साहित्य, कला, इतिहास, संशोधन, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात वैचारिक कलहाऐवजी वर्गकलह माजण्याची भीती वाढली आहे. तसे साक्षात रणांगण टाळायचे तर साहित्यिक - संशोधक - प्रशासक इत्यादींना एकतर त्या भडक वास्तव संघर्षाच्या मागे खेचत जावे लागते, किंवा मूग गिळून छपून बसावे लागते, किंवा मग या रणांगणापासून दूर निघून जावे लागते. विचारस्वातंत्र्याला इतके संकुचितपण येणार असेल तर मग संघर्ष तरी कुणाशी करायचा? आणि पुढे जाऊन संघर्षवादच नसेल तर ती अपेक्षित समृद्धी तरी साहित्य-संस्कृतीला कशी द्यायची? ठाम भूमिका मांडू पाहणाऱ्यांना धोंडे खाण्याची दहशत वाटत राहिली तरी भूमिकेशी ठाम राहून रणांगणात गाडून राहायला आजचे साहित्यिक म्हणजे कुणी सॉक्रेटिस - ज्ञानेश्वर नव्हेत. कोकणभूमीची श्रद्धा असणारा परशुराम हटवून `सामोपचार' करावा लागला ते योग्य होते; - की तिथे संघर्ष करायचा होता? तथापि अस्तित्त्वात असणाऱ्या कातडीबचाऊ का असेना, अशा साहित्यिकांतून ते अजरामर साहित्यिक तत्वज्ञ महात्मे निर्माण होतीलही. तितकी अपेक्षाही न ठेवता हंस-मयूरांइतकेच विहरण्यात चिमण्या-फुलपाखरांसही मुक्तांगण असलेच पाहिजे, हेसुद्धा नमूद केले पाहिजे.
साहित्य संमेलनास अजूनी जी काही प्रतिष्ठा आहे ती तरी वैचारिक साहित्य वा साहित्यिकांनी आणि सामान्य कुवतीच्या लालित्यानेही त्यांच्या त्यांच्या लेखणीतून दिली आहे. शासकीय देणगी, आमदारनिधी वा स्वागताध्यक्षांच्या समितीचे `योगदान' यांतून शोभादायी भव्यता साकारणे शक्य होते. परंतु त्यामुळे वैचारिक भव्यता, समरसता, सामंजस्य, प्रगल्भता, सहिष्णुता या अपेक्षितांवरच आघात होत असतील तर रणांगण व संघर्षांचे मोठेच तांडव होईल पण साहित्य-संघर्षांचे मंथन होणार नाही. ते भान साहित्यचळवळीने ठेवलेच पाहिजे.
प्रत्यक्षात ते भान सांभाळणे परिस्थितीपायी अशक्यच होत चालले असेल तर त्या भव्यतेचा शंभरवेळा विचार करावा. अध्यक्षांना वैचारिक रणांगण गृहीत आहे हे तर उघड आहे. जर कुणी त्या रणांगणाचा वापर लेखणीऐवजी दगड-दंडुक्यांसाठी करत असेल तर खऱ्या साहित्यिकांनी कोणती भूमिका घ्यायची हा मोठाच प्रश्न आहे. अर्थात साहित्यिकांना दंडुकी रणांगण सोसत नसेल तरीही त्यांनी लेखणी म्यान करता कामा नये. त्यांनी त्यांचे विचार, नवरसपूर्ण ललित साहित्य आणि संशोधनात्मक प्रबंधलेखन श्रद्धेने करीत राहिले पाहिजे. कारण कधीकाळी ते साहित्यसंस्कृतीच्या उपासकांना आधारभूत ठरणार आहे. आजच्या संमेलनाध्यक्षांनी अशीच ग्वाही दिली आहे की, ``जे लेखक तसे भान ठेवतील, त्यांच्या गाथा इंद्रायणीमध्ये कितीही बुडविल्या तरी त्या तरूनच वर येतील आणि कितीही काळ गेला तरी त्या वाचकांना उन्नतच करत राहतील.''
तुकारामांची सहिष्णुता त्यांच्या विद्रोही वारसदारांना पेलवणार नाही. पण त्यांचे साहित्यिक थोरपण ज्यांना जाणता येईल अशा महाराष्ट्न् सारस्वतांनी त्यांचे अनुयायित्त्व शोभेल असाच साहित्य-प्रपंच परमार्थाने करावा. रात्रंदिन युद्धाचा प्रसंग मानणाऱ्यांना संघर्ष नवा नाही, रणांगण नवे नाही परंतु अस्थानी वावदूकपणे घडणारी दंडेली मात्र असह्य वाटत असेल.
Comments
Post a Comment