बुफे पद्धत गैरसोयीची
डिसेंबर अंकातील संपादकीय आवडले. `अन्नसेवन हे यज्ञकर्म आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ-वृद्ध यांना बुफे पद्धत असू नये. त्यांना एका हाती ताट-वाट्या धरता येत नाही. वृद्धांच्या एका हातात काठी-छत्री असते. ताट-वाटी सांभाळणे व एका हाताने अन्न वाढून घेणे एक संकटच असते. संयोजकांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. दहा बारा व्यक्तींनी त्यांना हवे त्या व तेवढ्या पदार्थांचे ताट वाढून दिले तर त्यांना सोपे जाईल. अन्नाची नासाडी वाचेल.
- दि. ज. डोंगरेे
`कृतार्थ' गव्हर्मेट कॉलनी, विश्रामबाग (सांगली)
कुणीतरी लक्षात घेत आहे
`यज्ञकर्म की मस्ती' या संपादकीय लेखातील प्रत्येक परिच्छेदाचा विचार अंतर्मुख होऊन करण्याची गरज आहे. मी नुकताच एका विवाहासाठी (मुलीची बाजू) जाऊन आले. आपल्या लेखातील बुफे पद्धतीचा वास्तव अनुभव घेऊन आलो. अलिकडे ऐकलेेले नितिन गडकरी पुत्राचे लग्न आणि पूर्वी ऐकलेले अकलूजच्या मोहिते-पाटलांकडचे लक्षभोजन. तिथे जेवणाऱ्यांचे अगत्यप्रेम मान्य केले तरी अन्नब्रह्माचा अनादर मनात राहतोच. `हे असंच चालायचं का?' असं वाटत होतं; पण नाही! - कुणीतरी लक्षात घेतो आहे.
- दि. भा. साठ्ये कर्वेनगर, पुणे - ५२
(याच आशयाच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या, त्यांनी अधिक स्पष्ट मतप्रदर्शन त्या त्या ठिकाणी करायला हवे. हा विषय लोकांच्या लक्षात यावा असे आचरणसुद्धा सभ्यतेने करावे.)
१ तप : संस्काराचे
सध्या सामाजिक, राजकीय वगैरे समस्यांचे काहूर उठले आहे. आपापल्या मती (व कल) प्रमाणे विविध विचार प्रकट होत असतात व दूरदर्शन माध्यमातील चर्चांमधून बराच खल घातला जातो. दुर्दैवाने यामधून सकारात्मक मांडणी होण्याऐवजी केवळ दोषारोपणातच जास्त वेळ जातो.
केवळ कायदे करून अथवा सर्वांनाच सल्ले देऊन काही घडेल असे वाटत नाही. कारण कायदे झाले तरी त्यांचे पालन करण्याकडे सर्वसामान्यांचा ओढा आढळत नाही. अंमलबजावणी करणारेदेखील याबाबतीत गंभीर नाहीत असेच दिसते. `खूप वर्षांपूर्वी केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी किती प्रमाणात सुरू झाली याची आकडेवारी `द वीक' मध्ये आली होती. कायदेमंडळे केवळ कायदे करण्यात वेळ काढत असतात. अंमलबजावणीकडे त्यांचे लक्ष नाही - कारण प्रशासन व्यवस्था, कायदेमंडळ आणि न्यायसंस्था यांनी `परस्परांच्या अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ करू नये' म्हणता म्हणता 'त्या त्या कार्यक्षेत्रात लक्षही घालू नये' अशीच मानसिकता आढळत आहे.
समाजप्रबोधन व्हावे असे वाटणाऱ्या मंडळींनी कंबर कसून पुढे यायला हवे. समाजधारणा होण्याचा मूळ पाया ज्या वयोगटात रचला जातो तिथेच गांभिर्य आढळत नाही. वय वर्षे ८ ते २० - एक तप - हा काळ वास्तविक बलसंपदा, संयम, त्याग आणि ज्ञान यांवर पूर्ण लक्ष केंद्रित झाले व तसे संस्कार त्या वयात नीटपणे घडवता आले तर परिस्थिती बरीच बदलू शकेल असे वाटते.
या वयोगटात बलसंवर्धन-शारीरिक तसेच मानसिक होणे - अगत्याचे आहे. बल जसजसे वाढत जाते, तसतसा अहंकार-गर्व-मद वाढत जाण्याचा धोका! म्हणून संयमाची आवश्यकता. संयम सुटला तर विनाशाकडे पावले पडण्याचा धोका. या वयोगटाच संयम पाळण्याचे व्रत, नीटपणे आचरणात येता येता ती सवय व्हावी असे प्रयत्न व्हायला हवेत.
संयमाचे आचरण जसजसे वाढेल तसा `भोग'सुद्धा संयम राखून घेता येईल. अतिरेक टाळून भोगवाद अनुसरण्यास हरकत नाही. परंतु संयमाची आणि आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक सर्वत्र बजबजपुरी माजते आणि आम्ही यावर आपापल्या मनात, कुटुंबात उपाय योजण्याची खबरदारी मनापासून न घेता दुसऱ्यांना दूषण देण्याची पळवाट शोधत राहातो.
८ ते २० या वयोगटात बलसंवर्धन व संयम व त्यामुळे त्याग यांची केवळ शिस्त नव्हे तर अंतरंगापासून वागणूक, आचरण राहायला हवे. `सरकार' केवळ धाक दाखवण्यापुरती मदत करू शकेल आणि सरकार चालवणारे स्वत: प्रामाणिक मनोबल असणारे, संयमी व मोहत्याग करणारे कर्मचारी, अधिकारी नसतील तर अस्त्र `धाक' तरी कसा बसणार? कारण वास्तविक हे कर्मचारी, अधिकारी (व लोकप्रतिनिधी व न्यायाधीशसुद्धा) आमच्या समाजातूनच पुढे यायचे असतात.
एकंदरीत वयोगट ८ ते २० या काळातील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम होण्यासारखे शिक्षण-ज्ञान मिळायला हवे. दुर्दैवाने तथाकथित शिक्षणपंडित अशा व्यवस्थेकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. केवळ `माहिती' जमा करून मेंदूत कशी भरता येईल याकडेच यांचा तोरा आहे. परंतु `माहितगार' म्हणजे `शहाणा' असेलच असे नाही. प्रत्यक्ष आचरणावर जोर द्यायला हवा. नाहीतर सर्वच केवळ हवेत इमले बांधण्यासारखे..!
- प. श्री. जोशी, चिंचवड, पुणे
Comments
Post a Comment