शोधिला पाहिजे विचार । यथातथ्य ।।
भारतातली एक प्रसिद्ध कामगार संघटना (ट्न्ेड युनियन) सिटू ने जालना येथे श्रमिक साहित्य संमेलन आयोजित केले होते, ते गेल्या १०-११ सप्टेंबरला पार पडले. त्या संमेलनाचे उद्घाटक नागनाथ कोत्तापल्ले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले,-``एकदा विवेक हरवला की माणूस स्वत: होऊनच गुलाम होतो. त्याचे स्वातंत्र्य गेले की नवा विचार करण्याची शक्तीच तो हरवून बसतो. त्यातही माणूस जातीसंस्थेचा गुलाम झाला की, त्या जातीच्या रिंगणातच तो गरगरत राहतो. त्याचे सारे अवकाशच मर्यादित होते. नंतर सर्वच जातींचे भ्रष्ट लोक -उद्योगपती, राजकारणी, धर्माभिमानी सगळेच -आपले हितसंबंध, स्वार्थ जपण्यासाठी जातव्यवस्थेची भलावण करतात. परिणामी कुठल्याही जातीत जे पीडित-शोषित-श्रमिक असतात, ते एकत्र येऊ शकत नाहीत. दुर्बलांच्या लढ्यातील एकतेचा सर्वांत मोठा अडथळा म्हणजे ही जातीय मानसिकता असते. भारतीय माणूस आज दुहेरी कात्रीत सापडला आहे. एका बाजूला जागतिकीकरणातून आलेल्या निर्दयी भांडवलदारांकडून होणारे शोषण; आणि दुसरीकडे या निर्दयी व्यवस्थेशी संघर्ष करू शकणाऱ्या एकतेचे जातींमध्ये विखुरलेपण.
``लेखक, कलावंत, विचारवंत, इतिहासकार, शिक्षक, शास्त्रज्ञ अशांनी काही नवा विचार करायचा, मांडायचा असेल तर त्या चाकोरीतून बाहेर यायला हवे आहे. कुणाचा जन्म कुठेही होवो, लेखक-विचारवंतांना आपापल्या जातीच्या धर्माच्या बाहेर पडावे लागेल. त्या कक्षा भेदण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करावे लागतील; तरच लेखकांच्या हाती काही चांगले लागेल, आणि ते लोकांपर्यंत पोचेल.''
संमेलनाध्यक्ष आ.ह.साळुंखे म्हणाले, -``शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम या दोन्ही गोष्टी एकमेकीच्या हातात हात घालून चालू शकतात; त्यांना एकमेकीपासून वेगळे काढण्याची आवश्यकता नाही. आपल्या संतांनी त्यांच्या जीवनातून तेच दाखवून दिले आहे. त्यांच्यापैकी कोणा एकाला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला कनिष्ठ समजणे गैर व निंदनीय आहे. श्रेष्ठता आणि कनिष्ठता जन्मासोबत जोडल्याने भारतीय समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता काळ बदलला आहे. समाजातील सर्वांनाच आपापल्या प्रयत्नांतून कष्टांतून आपापले व्यक्तिमत्व फुलविण्याची योग्य संधी मिळविण्यासाठी वातावरण आणि वास्तव तयार करणे हे आपले स्वप्न असायला हवे. ते साकार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.''
Comments
Post a Comment