Skip to main content

27April2015

भटक्या-विमुक्त जातीजमातींसाठीच्या राष्ट्नीय आयोगाचे (मंत्रीस्तरीय) अध्यक्ष मा.भिकूजी तथा दादा इदाते यांचा प्रवास सांगली-मिरजेस १८ एप्रिलला होता. `आपले जग'च्या वतीने वसंत आपटे यांनी त्यांच्याशी वार्तालाप केला, (त्यावेळी श्री.जयंतराव रानडेही होते.) त्या चर्चेचेे हे लेखरूपांतर.
भटक्या-विमुक्तांना प्रवाहात आणूया
- भिकूजी इदाते
युती शासनाच्या काळात मी महाराष्ट्नत याच प्रकारच्या समितीवर काम केले आहे. त्यामुळे आता नव्या केंद्रीय पदाचे काम स्वीकारताना परिस्थितीची पूर्वकल्पना मला होती. या मंडळींशी संपर्क कसा ठेवायचा? आज भीमेकाठी एखाद्या खेड्यात पाले टाकून थांबलेली ही मंडळी, काही दिवसांतच शेजारच्या कर्नाटकात किंवा आंध्र राज्यात स्थलांतरित होतात. त्यांना कुठे शोधायचे? मध्यंतरी पारधी समाजाच्या जाणकारांना ही अडचण सांगितली. त्यावर त्यांनी सांगितले की आमच्या पालांमध्ये रेडिओ असतो. शासनाला काही संदेश द्यायचा असेल तर रेडिओवर जाहीर करा! -तशी ही मंडळी कष्टाळू, पण दारिद्र्य व भूक यांमुळे काही वेळा चोऱ्यामाऱ्या होत असतात. त्यांच्या माथी `गुन्हेगार' जमात म्हणून जो शिक्का बसला तो कायमचाच. त्यामुळे आधीच बहिष्कृत असणारी ही मंडळी समाजापासून आणखीनच दूर गेली.
सरकार, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, भटक्या जमातीबद्दल फारसे संवेदनक्षम नव्हते. वरवरच्या मलमपट्ट्या लावल्या गेल्या, प्रचंड रकमा त्यांच्या विकासासाठी म्हणून खर्ची पडल्या. त्याचा फायदा घेऊन त्यांच्यात एखादा जाणकार उभा राहतो. समाजाचे नेतृत्त्व करू पाहतो. शासनाला पण असे माध्यम हवेच असते. असा स्वयंभू नेता आत्मप्रौढी आणि स्वत:चे महत्त्व वाढविण्याच्या मोहात पडतो. आर्थिक लाभ त्याच्या ध्यानात येतो. बरे, सगळा समाज अशिक्षित, अक्षरशत्रू. या परिस्थितीचा फायदा घेऊन शासकीय अनुदान सहजतेने हडप करता येते, हे अशा पुढाऱ्याच्या अल्पावधीतच ध्यानात येते आणि मग मूळ हेतू बाजूला पडतो. शासकीय योजना अपयशी ठरतात.
भटक्या आणि विमुक्त लोकांचं दु:ख लक्ष्मण मानेंच्या `उपरा' या पुस्तकातून प्रथम जगापुढे आले. त्याआधी दया पवारांचे `बलुतं' हे गावकुसातल्या दलिताचं चित्रण होतं. नंतर `उचल्या' प्रकाशित झाले. हे धगधगते वास्तव पाहून-ऐकून प्रस्थापित सुखवस्तू समाज हादरून गेला. अस्वस्थता पेरली गेली.
संघाच्या कामातून आमचे या समस्येवर खूप चिंतन झाले आहे. आमच्यातील सेवाभावी कार्यकर्त्यांनी या भटक्या समाजामध्ये मिसळावे, अनुभवावे, त्यांचा विश्वास संपादन करावा व त्या आधारे नेमका कार्यक्रम ठरवावा हे सुरू झाले. अक्कलकोट भागातील आमचे एक कार्यकर्ते श्री.शंकर घडके यांनी या कार्याला वाहून घेतले. भोसले नावाचे कार्यकर्ते १४ महिने १३ दिवस कारावासात डांबले गेले होते. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या या समाजातील पारधी गुन्हेगारीचा त्यांनी अभ्यास केला आणि तेथील दाहक अनुभव `१४ महिने १३ दिवस' या पुस्तकात शब्दबद्ध केले. नरसिंग झरे नावाच्या कार्यकर्त्याने `गोपाळ' समाजात काम केले. `गोपाळ' म्हणजे रस्त्यावर खेळ करणारे. गोपाळ समाज कधीच आंघोळ करीत नाही. त्यांच्या अंगाची दुर्गंधी येते. त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. आंघोळ करायची तर पाणी हवे, उसंत हवी! जेव्हा धो धो पाऊस पडतो तेव्हा गोपाळ समाज चिप्प भिजतो आणि अंगावरचे कपडे सुकवितो. हीच त्यांची आंघोळ! हीच परंपरा! हे सगळे धक्कादायक असून सध्याच्या सरकारला हे बदलायचे आहे. आव्हान मोठे आहे पण आम्ही ते स्वीकारले आहे. नेटाने त्याला भिडलो आहोत.
तुळजापूरपासून १५ मैलावर यमगरवाडी आहे. तेथे पारधी समाजातील काही कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. या भटक्या लोकांत उत्तम कला आहे. रानात लाकडी आेंडके असतात. त्यावरती कोरून उत्तम अशी काष्ठशिल्पे एकजण साकारतो. ज्ञानेश्वर काळे नावाचा एक कार्यकर्ता आहे. डॉ.हेगडेवार जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्याने जवळजवळ शंभर पथनाट्ये सादर केली. पारध्यांसाठी पहिली शाळा स्थापन केली.
या भटक्या विमुक्त जमातींसाठी काम करण्यात, सर्व देशांत महाराष्ट्न् अग्रेसर आहे. या समाजासाठी फक्त महाराष्ट्नत आरक्षण आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान ही राज्ये सध्या आरक्षणाबद्दल विचार करीत आहेत. गंमत अशी की, एका राज्यात या जमातींचा समावेश शेड्यूल जातीत, तर दुसऱ्या ठिकाणी `इतर मागास'मध्ये. एकवाक्यता नाही, सगळा गोंधळ आहे. महाराष्ट्नचे पहिले मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या कारकीर्दीमध्ये या लोकांसाठी काही करावे याचा विचार झाला. देशाच्या अन्य राज्यांतून भटक्या जमातीचे लोंढे महाराष्ट्नत येतात. केंद्रात अखिल भारतीय पातळीवर काम करण्यापूर्वी मी महाराष्ट्न् राज्य आयोगाचा अध्यक्ष होतो. अटलजी पंतप्रधान असताना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आडवाणीजींच्या उपस्थितीत पंढरपूर मुक्कामी केंद्रस्तरावर नॅशनल कमिशन फॉर नॉमेडिक डीनोटीफाईड ट्नइब्ज या आयोगाची अधिकृत घोषणा झाली. ही अधिकृत प्रशासकीय, घटनात्मक रचना असल्याने सरकार बदलले तरीही ती चालू राहिली.
१८५७ सालच्या, फसलेल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर इंग्रज सरकारच्या लक्षात आले की, हा समाज लढवय्या आहे, एकसंघ आहे, सशस्त्र आहे; दुर्गम भागात, कठीण परिस्थितीत राहतो, यांच्या वृत्ती कडव्या आहेत. हुशार इंग्रजांनी जाणले की, ही एकसंघ जमात ब्रिटिशांविरुद्ध जाण्यामुळे डोकेदुखी वाढेल. म्हणून १८७१ साली एक कायदा करून या जमातींना गुन्हेगार ठरवून त्यांना तुरुंगात डांबून ठेवणे, छळ करणे, त्यांच्यात फाटाफूट घडवून आणणे अशा गोष्टी इंग्रजांनी सुरू केल्या. त्यांना `नोटीफाईड क्रिेमनल्स' ठरविले. ब्रिटिश राजवटीत या समाजाने वनवास आणि छळ सोसला. स्वाभाविकच मुख्य प्रवाहापासून हा समाज आणखी दूर गेला. प्रस्थापितांविरुद्ध त्यांच्या मनांत आकस व द्वेष पद्धतशीर रुजविला गेला. पुढे स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या काळात त्यांना `नोटीफाईड क्रिमीनल्स' या व्याख्येतून मुक्त करण्यात आले. १९५२ साली हा समाज गुन्हेगारीच्या कलंकित शिक्क्यातून मुक्त झाला, त्यांना `विमुक्त' म्हणून ओळखले जाऊ लागले. पण त्यामुळे एक नवीनच समस्या उभी राहिली. कायद्यातून मुक्त झाले तरी निवाऱ्याचे छप्पर, पोटपाणी, कपडालत्ता आणि संरक्षण सगळेच कवच गळून पडले.
पदरी शिक्षण नाही, अनुभव नाही. भांडवल नाही, सामाजिक प्रतिष्ठा नाही. मुख्य म्हणजे समाजाची त्यांच्याकडे `गुन्हेगार' म्हणून पाहण्याची वर्षानुवर्षे रुजलेली वृत्ती. मग या लोकांनी जगायचे कसे? त्यातून या समाजाचा उद्रेक झाला. एक लाख पारध्यांनी जाहीर केले की, दुसरा काही मार्ग नसल्याने धर्मांतर करू! एकदा का `मुस्लीम' झालो की आपल्याला हात लावायची कोणाची हिंमत होणार नाही, हा विचार आणि प्रवाह भयानक वळणावर जाणारा होता. त्यात सामाजिक अनर्थ होता. काहीतरी सकारात्मक , रचनात्मक मूलगामी निर्णय घ्यायला हवा होता. त्यावेळी स्व.गोपीनाथजी मुंडे महाराष्ट्नचे गृहमंत्री होते. त्यांनी पुढाकार घेतला. आमचे कार्यकर्ते-विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांचे सेवाभावी कार्यकर्ते पालापालावर पोचले. प्रभावी प्रबोधन केले आणि ही वावटळ कशीबशी रोखली.
एखाद्या कार्यक्रमात मोठे मंत्री पोचतात. भावनाविवश होऊन काही घोषणा करतात. विश्वास ठेवायला हवा की, त्या घोषणा केवळ टाळया घेण्यासाठी नसतात, मनापासून केलेल्या असतात. तरीही शासकीय चाकोरीत त्या ठाकून ठोकून बसवायच्या तर दमछाक होते. उदाहरणार्थ या कामासाठी एक शिपाई हवा असतो. बाब तशी सोपी, पण त्याचा पगार कुठल्या हेडवर खर्ची टाकायचा? कोणत्या खात्यात? त्याला प्रशासकीय मंजुरी? त्याचे हेड पर्टर? त्याचा प्रमुख कोण? राजकीय नेता घोषणा करताना सगळया प्रशासकीय प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही, मग योजना ढेपाळून जाते. दिलीप कांबळे हे समरसता मंचाचे अभ्यासू कार्यकर्ते, ते आता समाजकल्याण मंत्री आहेत. त्यांनी व अन्य कार्यकर्त्यांनी या समाजातील ३२ हजार कुटुंबांपर्यंत दाखले पोच केले होेते. नोकरशाहीने मंत्र्यापुढे तांत्रिक अडचणी मांडून योजना कोड्यात टाकायची, चांगली योजना बासनात गुंडाळून टाकायची. केंद्रात सरकार वेगळे, राज्यात वेगळे; पण आता तशी परिस्थिती नाही. केंद्रात आणि राज्यांत समन्वय आहे, सामंजस्य, व अंडरस्टँडींग आहे.
प्रारंभी जे कठीण वाटते, ते नंतर अंगवळणी पडते. आपणास आठवत असेल अटलजींनी `युनो मध्ये हिंदी भाषेत बोलेन' असे म्हटल्यावर बरीच खळबळ माजली होती. पण अटलजी ठाम राहिले. आज पंतप्रधान मोदी जगभर हिंदीतून बोलतात, व ते स्वीकारले जाते. आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा आता जगभर प्रसृत होत आहे. आपली योगविद्या युनोमधील १५५ देशांनी स्वीकारली आहे. अमेरिकेत रुद्र म्हटला गेला. मोदीजींनी आपल्या कृतीतून खूप विधायक गोष्टी दाखवून दिल्या, तसाच फरक सर्व बाबतीत नक्की दिसून येईल.!
वेगवेगळया राज्यांत या भटक्या व विमुक्त जमाती असल्या तरी त्या हिंदू धर्मीय आहेत. त्यामुळे स्वाभाविकच हा प्रश्न संघाच्या संस्थांनी अभ्यासपूर्वक हाती घेतला. या लोकांस प्रलोभने दाखवून `आपल्यात' ओढण्याचे उद्योग चालतात. गरिबी आणि सध्याची अप्रतिष्ठा यांमुळे त्या लोकांना काही भौतिक गोष्टींचे आकर्षण वाटू शकते, पण विषय फार पुढे निघाला तर मूळ श्रद्धा व परंपरा प्रभावी ठरतात. जेवढ्या म्हणून भटक्या जमाती आहेत, त्यांचा देव शंकर असतो. शंकराच्या त्या त्या ठिकाणच्या वैशिष्ट्याप्रमाणे तो `ईश्वर' म्हणतात. सोमेश्वर, लिंगेश्वर, व्याघ्रेश्वर इ. आम्ही या भटक्या लोकांसाठी देवालय उभारले, त्यास `भटकेश्वर' म्हणतो. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींतून त्यांना अस्मिता द्यायची. या सर्व मंडळींना एकत्र जमविण्यासाठी शिवरात्री दिवशी आम्ही पंढरपूरला मेळावा घेतला. हा समाज स्त्रीला अत्यंत हलके मानतो. स्त्रियांना त्यांच्या लेखी काडीची किंमत नाही. ही अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी आम्ही सत्यनारायण पूजा आयोजित केली. पूजेसाठी दांपत्याने बसायचे ही कल्पना पारध्यांना काही पटेना. त्यांच्या मते हे पाप झाले. त्यांच्या प्रमुखाने पूजेला बसलेल्या दांपत्याला, `प्रथा मोडली' म्हणून पाच हजाराचा दंड केला. आमचे कार्यकर्ते पुढे झाले. त्यांनी जातप्रमुखाला भेटून सांगितले की, आमच्या आग्रहाखातर त्यांनी पूजा केली आहे, तेव्हा अपराध आमचा आहे, आम्ही दंड भरतो. या आमच्या भूमिकेने त्यांच्यामध्ये चलबिचल झाली. दंडाची रक्कम जाहीर समारंभात पाहुण्यांच्या हस्ते भरली. ती त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या हस्ते परत केली. परिवर्तन हे असे हळूहळू घडते. त्याला संयम, शांतपणा, सोशिकपणा लागतो. संघाच्या स्वयंसेवकांत तो आलेला असतो. हळूहळू का असेना त्या फिरत्या जमातीत सकारात्मक फरक पडत आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशा प्रकारे कामाची अपेक्षा नसते. पदाचा अहंकार असतो, त्यांना विश्वास वाटत नाही. मी महाराष्ट्न् राज्याचा या मंडळाचा पूर्वी अध्यक्ष होतो. त्यावेळी बंजारा समाजाचे एक अधिकारी होते. त्यांनी मला विचारले, ``दौऱ्यावर आपल्या समवेत मी येऊ का?' मी नको कशाला म्हणू? म्हटले `जरूर या. मात्र मी सर्कीट हाऊस शासकीय विश्रामधाम अशा ठिकाणी राहात नाही. मी संघाच्या कार्यालयात किंवा एखाद्या कार्यकर्त्याच्या ओसरीवर राहतो. तुम्हाला जमेल का?' एक वेगळा प्रयोग म्हणून ते अधिकारी माझ्यासोबत चार दिवस होते. संघाच्या संस्कारित, शिस्तबद्ध व समरस वर्तनातून ते एवढे प्रभावित झाले की, `आता मी बहुधा संघ स्वयंसेवकच होईन' असे गंमतीने म्हणाले.
एकात्म मानव दर्शन कार्यक्रमांतर्गत बरेच विधायक कार्य मागास भागात झाले आहे. सन २०२२ हा आम्ही एक टप्पा म्हणून स्वीकारला आहे. त्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे होतात. त्यादृष्टीने खूप चिंतन झाले आहे. एकूण २१ मुद्दे निश्चित केले आहेत. त्यामुळे बरेच परिवर्तन होईल असे वाटते.
माणूस आता चंद्रावर जाण्यासाठी रांगा लावून उभा आहे असे आपण ऐकतो. मात्र त्याचवेळी समाजातील या उपेक्षित वर्गाच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरणार असेल तर हा विकास काय कामाचा? या लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे, शिक्षणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करणे, त्यांचे आरोग्य, त्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे, माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण करणे, वर्षानुवर्षे असलेला त्यांच्यावरील गुन्हेगारीचा छाप पुसून काढणे यासाठी खूप कार्यकर्ते जीवापाड मेहनत घेतात, आम्ही त्यांना शासकीय आधार व बळ पुरवितो. कोणत्याही सामाजिक चळवळीच्या मागे शासनाचा आधारहस्त असायला हवा, हेच उचित नाही काय?
( शब्दांकन : मोहन आळतेकर)
दादा इदाते यांचा निवासी पत्ता -
पो.जालगाव (ता.दापोली, जि.रत्नागिरी)

किती काळ लागेल?
केंद्रात मोदी सरकार आले, त्यास वर्ष झाले, आणि महाराष्ट्नत देवेंद्रांचे राज्य आले त्यासही सहा महिने झाले. सत्ताधाऱ्यांच्या बाजूनेच बोलायचे तर देशापुढे किंवा राज्यापुढे असलेल्या समस्यांचे विक्राळ स्वरूप पाहता, हा अवधी काहीतरी परिणाम दाखविण्यासाठी पुरेसा नाही. पण मग प्रश्न असा येतो की, तसा परिणाम सामान्य जिज्ञासूला कधी दिसणार आहे? त्यास किती काळ लागेल? राज्यकर्त्यांनी तसे काहीतरी नियोजन केेलेले असेल तर त्यातले किती साध्य झाले, हे कसे आणि कुठे तपासायचे? आजवरची रीत एवढीच ठरून गेली आहे की, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा जैतापूर-एन्रॉन वगैरे वाजवत राहायचे; आणि सत्ताधाऱ्यांनी अवकाळी गारपीट किंवा आधीच्या सरकारने तिजोरी मोकळी ठेवल्याचे कारण रेकत राहायचे. फारतर फार अधिवेशन गाजविण्यासाठी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घालावा आणि सत्ताधाऱ्यांनी शंभर दिवस, नंतर चार महिने, मग दीडशे दिवस, पुढे तब्बल अर्धे वर्ष पार पडल्याबद्दल जाहिराती फडकवाव्यात. या असल्या कारभाराचा परिणाम काय दिसणार?

समस्या विक्राळ आहेत, हे खरेच आहे. पण त्या सोडविण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत हे सामान्य जनतेला कळणार नाही. मराठा-मुस्लीम आरक्षणासारख्या विषयात सरकार वेळ आणि पैसा खर्च करत बसले तर त्यातही आता फारसे कुणाला स्वारस्य नाही. मुळातच सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण एकूणात २ टक्के आहे. त्यासाठी ७३ टक्के आरक्षणाची हवा तयार करण्याने काय साधेल? बाहेरच्या क्षेत्रात काम देताना कोणी तसले विचार करीत नाही. वैधानिक मंडळे - त्यातही `उर्वरित महाराष्ट्न्' असली काहीतरी भंकस यंत्रणा असेल, त्याचे कोणीतरी लागेबांधेकरी सुभेदार, अध्यक्ष नेमले असतील.... हेच जर सरकारचे `प्रयत्न' म्हणायचे तर प्रश्नच मिटला. पण सरकारी कार्यालये, कर्मचारी, पोलीस, नियम-न्याय या सगळया मांदियाळीत काहीतरी फरक एव्हाना जाणवायला हवा होता.

शिवसेना हा तर आता राज्यकर्ता पक्ष आहे. सरकार स्थापनेवेळी त्यांचे व्याही कौतुक झाले, ते दिसलेच. पण त्यानंतर त्यांची सत्ताधारी, राज्यकर्ता पक्ष म्हणून भरीव कामगिरी कोणती दिसते?-तर नारायण राणेंचा पराभव! अर्थात ही कामगिरीसुद्धा फारफार महत्त्वाचीच मानावी लागेल असा राणे यांचा करिष्मा आहे ही बाब वेगळी! पण कालच्या शिवजयंतीचा एकूण माहोल अनुभवल्यानंतर राज्यकर्ता पक्षही राज्यातले साधे सोपे नियम-पथ्ये झुगारून देतो आणि शिवछत्रपतीच्या नावावर धुडगूस घालणाऱ्या बहाद्दरांमागे पोलिसफौज उभा करतो हे लक्षात आले. मग अनुकूल परिणामांची अपेक्षा करावी कशी?

शिक्षण-उद्योग-उर्जा इत्यादी विषयांतील धोरणात्मक निर्णय होण्यास वेळ तर लागणारच. सगळया कल्याणकारी योजनांसाठी पैसा लागणार, त्याची टंचाई आहे हेही मान्य. पाऊस वा गारपीट ही अस्मानी संकटे आहेत हे कोणी नाकारत नाही. दाभोलकर आधीच्या सरकारी कारकीर्दीत गेले, तसे पानसरे नव्या कालावधीत गेले. प्रश्न सोपा नाही. पण शहरांतील रहदारी सिग्नल तोडून धावते, लोक थुंकतात, सरकारी कार्यालयात तोच तो ढिसाळपणा आहे, सार्वजनिक नळांची आणि शेतांतील पाटांची गळती आहे, लोक रस्त्याकडं बसतात... असले प्रश्न राज्य सरकारला सहा महिन्यांत सुटण्याजोगे नाहीत काय? आणि या कालावधीत ते कमीसुद्धा झालेले नसतील तर ते कृतिशील शासन म्हणावे काय? मागचे सरकारसुद्धा `स्वत:ला कृतिशील' म्हणवतच होते!

घर गरीब असले तरी टापटीप ठेवता येते; कृतिशील, गतिशील, सुसंस्कृत राखता येते. पण नवऱ्याच्या पगाराचा किंवा आजवर सासूने केलेल्या कारभाराचा सतत उद्धार करण्यामुळे मोरीतल्या खरकट्या भांड्यांवर माशा घोंघावणे थांबत नाही किंवा उंडारती पोरं आटोक्यात राहात नाहीत. त्याकरिता कारभारीण खमकी असावी लागते. घरात पैसा उतू जात असला तरी `घरपण' वेगळे असते. तिथे या सरकारचा साध्या साध्या बाबतीत कोणताही प्रभाव दिसत नाही. आणीबाणीचे पहिले पर्व किंवा टी एन शेषन यांची कारकीर्द पन्नाशी उलटलेल्या लोकांना आठवत असेल. केवळ महिन्याभरात त्यांनी दरारा उत्पन्न केला होता. तो अजूनी जाणवतो. आज एखादा अधिकारी तशी चमक दाखवतो, त्याची बदली करण्यात सरकार तत्पर आहे. हे असेच चालू राहिले तर यांची चार-साडेचार वर्षे कधीच निघून जातील. भोग तसेच राहतील.

महाराष्ट्न् राज्य स्थापनेस ५५ वर्षे होत आहेत. आजवरच्या राजवटी पाहूनच बहुधा सुरेश भट म्हणाले होते -
हेही असेच होते तेही तसेच होते.
केले न बंड त्यांनी त्या घोषणाच होत्या
सारे उगाळलेले ते कोळसेच होते
गेल्या वर्षभरात जनतेने राज्य नव्या लोकांच्या हाती मोठ्या आशेने दिले. किमान सुधारणा, त्यासाठी थोडी जरब, थोडी संवेदनशीलता दिसायला हवी. जनता इतकी भाजून निघाली आहे की, तिला एअरकूलरचा थंडावा कधी मिळेल अशी अपेक्षाच नाही. पण पेटत्या आगीचे लोळ विझविण्यासाठी कुणीतरी त्यावर झोडपते आहे एवढे तरी दिसूद्या. तेवढी सुरुवात तरी एव्हाना व्हायला हवी होती. शिवजयंती-आंबेडकर जयंती-उद्या लगीनसराई-मग गणेशोत्सव यातच हरवून चाललेली जनता; आणि शासकीय पूजा बांधणारे मंत्री एवढेच चित्र आज तरी बदलले नाही. उद्या कुणी मंत्री एखाद्या महापुरुषाच्या जयंतीला पाळणा म्हणताना दिसू नये, अन्यथा तीही `सुधारणा' झाली म्हणून, आपल्याला दरवर्षीच्या जन्मोत्सवाचा सुंठवडा दरवर्षीच वाटत बसावे लागेल.


मुलांकडून आपली परीक्षा
`थिरुवल्लुवर' ही पाच हजार वर्षांपूर्वी लिहिली गेलेली तामीळ संहिता आहे. मानवी वर्तणुकीवरचे हे एवढे जुने शास्त्र, पण त्यातील तत्वे आजच्या युगातही जशास तशी लागू होतात.
ं तुमचे मूल तुमच्याशी नेहमी खोटे बोलते, याचा अर्थ त्याच्या प्रत्येक चुकीच्या वागण्यावरची तुमची प्रतिक्रिया अतिशय कठेार असते.
ं तुमच्याशी मनातले सर्व बोलायला, मन मोकळे करायला तुमच्या मुलाला तुम्ही नाही शिकवू शकलात तर तुमचे मूल तुमच्या हातातून गेले असे समजा.
ं आपले योग्य असूनसुद्धा जग आपल्याला कधी कधी चूक ठरवते. अशा वेळी ठाम राहून स्वत:च्या भूमिकेचे समर्थन करता आले पाहिजे. तुमचे मूल इथे कमी पडते, याचा अर्थ तुम्ही त्याला सर्वांदेखत शिस्त लावायचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
ं तुमचे मूल दुसऱ्यांच्या वस्तू घेते, याचा अर्थ त्याच्यासाठी वस्तू घेताना त्याला वस्तू निवडण्याचे स्वातंत्र्य तुम्ही देत नाही.
ं तुमचे मूल भित्रे आहे, कारण तुम्ही जास्तच तत्परतेने त्याच्या मदतीला धावून जाता.
ं तुमचे मूल इतरांच्या भावनांचा अनादर करते याचा अर्थ तुम्ही त्याच्याशी संवाद साधण्याऐवजी सतत सूचना करत राहता आणि त्याच्या वागण्याबोलण्याचे नियंत्रण कायम स्वत:कडे ठेवता.
ं तुमच्या मुलाला पटकन राग येतो, याचा अर्थ त्याच्या चुकीच्या वागण्याकडे तुमचे प्रचंड लक्ष असते, पण त्या मानाने त्याच्या चांगल्या वागण्याची तुम्ही दखल घेत नाही.
ं तुमचे मूल तुम्हाला मुळी जुमानतच नाही, अगदी उघडपणे तुम्हाला धुडकावून लावते. याचा अर्थ तुम्ही बऱ्याचदा नुसत्या पोकळ धमक्या देता, पण त्याप्रमाणे कृती कधीच करत नाही.
ं तुमचे मूल तुम्हाला उलटे बोलते, दुरुत्तरे करते कारण तुम्हाला त्याने इतरांशी असेच करताना अनेकदा पाहिले आहे.
ं तुमचे मूल बंडखोरी करते कारण त्याने हे पक्के ओळखले आहे की काय योग्य आहे यापेक्षाही लोक काय म्हणतील हे तुमच्या लेखी जास्त महत्त्वाचे आहे.


कराड येथील `गोखले बॅकेलाईटस्'चे जुने जाणते, प्रसिद्ध लघु उद्योजक श्री.रमेश गोखले यांचा `आपले जग'शी झालेला वार्तालाप.
जोखीम पत्करून धंद्यात उडी घ्या...
मी पदवीधर झाल्यानंतर, कोणत्याही मध्यमवर्गी कुटुंबाप्रमाणे आमच्या घरच्यांची स्वाभाविक अपेक्षा होती की मी चांगल्या नोकरीत दाखल व्हावे. सर्वसाधारण मराठी तरुणाप्रमाणे आखीवरेखीव, बाळबोध जीवन जगावे. पण माझा पिंड नोकरीत रमणारा नव्हे. आपण स्वतंत्र व्यवसाय करायचा; त्यासाठी कितीही कठोर परिश्रम करावे लागले तर ते करायचे, हा माझा निश्चय होता.बालपणापासूनच मला यंत्रविद्येची आवड होती. विद्यार्थीदशेत मी उपलब्ध साहित्यामधून वॉशिंग मशीन बनवले होते.
मला सगळयात मोठी अडचण जाणवली ती ही की, ज्या मोठ्या उद्योगसंस्थेसाठी आमच्यासारखे लघुउद्योजक `सब कॉन्ट्न्ॅक्टींग' करतो, त्यांच्याकडून वेळेत पैसे मिळत नाहीत. आमची बिले जर वेळेत मिळत गेली व पैशाचा प्रवाह वाहता राहिला तर आम्ही अधिक जोमाने उत्पादन करू शकू. बऱ्याचदा पैसे अडकून पडतात आणि खेळत्या भांडवलाअभावी उत्पादनावर विपरित परिणाम होतो. शिवाय एक प्रकारची अस्वस्थता सगळया बाबतीत जाणवत असते.
मला मराठी नवयुवकांच्या कार्यक्षमतेबाबत आणि कुशलतेबाबत तिळमात्र शंका नाही. त्यांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता स्वतंत्र उद्योग-व्यवसायात स्वत:ला झोकून द्यायला हवे. स्वत:च्या धंद्यात जोखीम जरूर आहे, ती मी नाकारत नाही. नोकरीपेक्षा व्यवसायात कष्टही खूप आहेत. विश्रांती, सुखासीन जीवन मिळत नाही.आज इतकी वर्षे मी धडाडीने कारखाना चालवितो. प्राप्ती पण बरी होते. नोकरीपेक्षा मी निश्चितच आर्थिकदृष्ट्या अधिक संपन्न आहे. पण मनात अधूनमधून खंत असते की, मी माझ्या कुटुंबीयांना फार कमी वेळ देऊ शकलो. दारात चारचाकी गाड्या आहेत पण गाडी घेऊन बायकोमुलांना छान सहल घडवून आणली, असे घडले नाही. पण ही खंत कामाच्या ध्यासात विरघळून जाते. सतत कामाचा ध्यास. एक काम पूर्ण केले की त्या आधीच आणखी आव्हानात्मक नवे काम उभे राहाते. ते पूर्ण करावे तर तिसरे. अंथरुणावर पडलो तरी मनात कारखान्याचेच विचार असतात. त्यात मला तरी आनंद वाटतो.
कामाच्या दर्जा(पलिटी)बद्दल मी कधी तडजोड केली नाही, व करणार नाही. कामाची `पलिटी' राखणे हे कोणत्याही व्यवसायाचे बलस्थान असते...भले आमच्या कामाचा दर इतर ठिकाणपेक्षा काही अंशी जादा असू शकेल. पण आमच्या कारखान्यातून पुरविला गेलेला माल हा उत्कृष्ट व निर्दोष असणार, अशी आम्ही आमची प्रतिमा उभी केली आहे. म्हणून आम्हाला काम शोधत फिरायची कधी वेळ आली नाही, काम कधी कमी पडले नाही.
वेळेत मालाची डिलीव्हरी करणे हा पण व्यवसायात महत्त्वाचा मुद्दा आहे. भले चारदोन दिवसाची मुदत आम्ही प्रारंभीच मागून घेऊ, पण एकदा का वेळापत्रक ठरले, की ते आम्ही कटाक्षाने व निर्धाराने पाळतो. त्यासाठी प्रसंगी दिवसरात्र, वेळी-अवेळी काम करावे लागते.
नव्याने उद्योगात येणाऱ्या नवयुवकांना मी माझ्या अनुभवाने सांगेन की, धंदा नेकीने करा आणि नेकीने धंदाच करा! विश्वास संपादन करा. प्रतिष्ठा व लौकिक मिळवायला फार वेळ लागतो, तपश्चर्या करावी लागते. एखादी लहानशी चूक किंवा हयगय विश्वसनीयतेला तडा जाण्यासाठी पुरेशी ठरते आणि त्यामुळे होणारे नुकसान फार मोठे असते.
तत्त्वनिष्ठेचा फारसा बाऊ करू नये. एखादे काम चिमूटभर चिरमिरी देऊन पुढे सरकणार असेल, तर ती देऊन मोकळे व्हा. सगळी पोखरलेली, किडलेली यंत्रणा बदलणे हे एकट्यादुकट्याचे काम नव्हे. तेव्हा जगात जे चालले आहे त्या प्रवाहाबरोबर बुद्धीला पटले नाही तरी चालत रहा. हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण हा व्यवहारी सल्ला अनुभवातून आला आहे. याचा अर्थ सगळीकडे पैसे चारत सुटा असा नाही. तथापि काही अधाशी लोक उगीच अडवणूक करतात, तिथे आपली तत्वनिष्ठा व्यवसायाच्या मुळावर येऊ नये इतपत पाहावे.
एके काळी जी प्रॉडक्टस् परदेशातून आयात होत होती, ती आम्ही येथे कराडमध्ये यशस्वीरित्या करतो आहोत व त्याचा मला अभिमान आहे. सध्या कुशल कामगार मिळणे व त्याला सांभाळणे जिकीरीचे झाले आहे. म्हणून मी स्वयंचलित यंत्रसामग्रीवर भर दिला आहे. जी कामे वीस-पंचवीस कामगारांनी करायची ती आज आठ-दहा कामगारांकडून करून घेणे स्वयंचलित यंत्रांमुळे शक्य झाले आहे.
योग्य आहार, निरायम जीवनपद्धती, नियमित व्यायाम याद्वारे प्रथम तब्येत चांगली ठेवणे हे मी व्यवसायिकासाठी फार महत्त्वाचे मानतो. रात्रभर जागरण व प्रवास करून घरी आलो असलो तरी मी पहाटे उठून गावाजवळचा वसंतगड चढायचा व्यायाम घ्यायचो. कित्येक वर्षे मी असले उपक्रम चालू ठेवले आहेत. आपली तब्येत ठीक असेल तरच तुम्ही हा कामाचा गाडा यशस्वीपणे ओढूू शकाल. त्या व्यायामाला मार्गदर्शन नव्हते, त्यामुळे ते प्रयोग हल्ली झुकत्या वयात गुडघ्यातून काही वेळा `बोलू' लागलेत.
उगवत्या मराठी तरुणापुढे माझे ठाम मत मी पुन्हा एकदा अधोरेखित करेन की, नोकरी व त्या माध्यमातून येणाऱ्या सुखासीन जीवनाचा मोह टाळा व आव्हानात्मक उद्योगव्यवसायात या. कारखाना जमला नाही तर व्यापारात जम बसवा. तसे झाले नाही, तर ती पोकळी परप्रांतीय भरून काढतील व आपण मराठी माणसे केवळ पोटभरू कारकून म्हणून जगत राहू. म्हणून जोखीम पत्करा व धंद्यात उडी घ्या.
रमेश गोखले (मोबा.९४२२०२९५९१)
(शब्दांकन : मोहन आळतेकर)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन