Skip to main content

11May 2015

पत्त्यांचा दरबार
उन्हाळयाच्या सुटीतील बैठ्या खेळांमध्ये पत्त्यांचा खेळ सर्वत्र असतो. पण त्या `क्रॅट' मधल्या पानांविषयी बरीच माहिती मला अमेरिकेच्या प्रवासात मिळाली. तिथेही त्यावेळी खूप उन्हाळा, रणरणीत ऊन. बाहेर खेळणे अशक्य झाले. मग घरातल्या घरात मुलांना पत्त्याच्या बाबतीत अनेक प्रश्न पडत, उत्तरे देता देता आमच्या ज्ञानात भर पडत गेली.... पत्ते ५२ च का? त्यात बदाम, किलवर, चौकट, इस्पिक असे चारच प्रकार का?... असे कितीतरी प्रश्न!
आपल्या क्रॅलेंडरशी मिळतीजुळती अशीच पत्त्यांची रचना व मांडणी असते. पत्त्याच्या क्रॅटमधील ५२ पाने म्हणजे वर्षाचे ५२ आठवडे. पत्त्याचे बदाम, किलवर, चौकट, इस्पिक म्हणजे आपल्या चार दिशा. एकाच रंगाची १३ पाने म्हणजे आपले १ वर्ष. प्रत्येक पत्त्याची बेरीज केली तर ती ३६४ येते. त्यात जोकरची १.२५ किंमत मिळवली तर ती ३६५.२५ येते, म्हणजे आपल्या एक वर्षातील दिवस. पत्त्याची ही आखणी पृथ्वीग्रहाशी मिळतीजुळती आहे.
नवव्या शतकात चीनमध्ये पत्त्यांची सुरुवात झाली. अकराव्या शतकात पूर्ण आशियात पत्त्याचा प्रसार झाला. चौदाव्या शतकात युरोपमध्ये पत्ते खेळायला सुरुवात झाली. १४८० मध्ये फ्रान्समध्ये इस्पिक, बदाम, किलवर, चौकट  या आकाराचे पत्ते वापरायला सुरुवात झाली. अमेरिकेने जोकरची ओळख करून दिली.
पत्त्यातील राजांची गंमत असते. ठराविक राजकुळातील प्रतिनिधी म्हणून हे पत्त्यातील राजे आहेत. बदाम राजा- फ्रेंच राजा चार्लस्.
किलवर राजा - ग्रेट अलेक्झांडर.
चौकट राजा - ज्युलिअस सिझर.
इस्पिक राजा - राजा डेव्हीड.
बदाम राजाच्या हातात डोक्याच्या मागच्या बाजूला तलवार असते. हा एकमेव राजा असा आहे की, त्याला मिशा नाहीत. चौकट  राजाच्या हातात कुऱ्हाड असते. चौकट राजाची नेहमी एकच बाजू दिसते. हा राजा आँडीन देव जसा आहे, तसाच आहे. चेहऱ्याची एक बाजू प्रजेची बाजू दाखवते, दुसरी बाजू विचारस्वातंत्र्य, तसेच मनमानी हुकूमशाहीविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा दाखवते. या दोन्ही राजांना `स्यूसाईड किंग' म्हणतात. इस्पिक व किलवर राजांच्या हातात तलवार असते. बदाम, इस्पिक, किलवर, चौकट हे प्रकार समाजातील चार वर्गांची प्रतिके आहेत
इस्पिक - खानदानीपणा, कुलीनता
चौकट - व्यापारी व उद्योग-सेवा
बदाम - पुरोहित वर्ग
किलवर - शेतकऱ्याचे प्रतिक
चौदाव्या शतकात पत्ते खेळणे म्हणजे संस्कृतीचा एक भाग होता. कपट, खेळी, जुगार, जाहिरात कला, भविष्य कथन यांसाठी शतकानुशतके पत्ते वापरत. पत्त्यांच्या उपयोग कधी राजकीय संदेश देण्यासाठी करत.
आपण पत्त्यांचे डाव शिकताना कितीतरी गोष्टी शिकतो. किती छान आहे हा क्रीडाप्रकार! रंग ओळखा, अंक ओळखा, चित्रे ओळखा, बेरीज करा, वजाबाकी करा.... असे शिकतो. मुख्य म्हणजे दुसऱ्याच्या हातातील पाने व विचार ओळखून कोणता पत्ता टाकायचा हा तर्कविचार शिकता येतो. जीवनात पुढे, समोरच्या व्यक्तीचे मन वाचायला शिकण्याची महत्त्वाची खुबी हा खेळ शिकवतो. पत्त्याचा डाव लावण्यात एकट्याचेही मन रमते किंवा अनेकांना सामावून घेऊन मनोरंजन करणारा हा बैठा खेळ घरातल्या घरात खेळला जातो. पत्त्यांची जादू हा तर निराळाच रंजक प्रकार आहे.
पत्त्यांचे कौतुक मनात असताना धोक्याची घंटा मनात किणकिणली. ह्या आवडीचे पर्यवसान व्यसनात व्हायला वेळ लागत नाही! पत्त्यांचा खेळ हा एक प्रकारचा जुगारच आहे; जो बुद्धी भ्रष्ट करतो! अविचाराला निमंत्रण देतो! मग संकटांची मालिकाच सुरू होते. व्यसनाच्या विळख्यात व्यक्ती कधी अडकते हे समजत नाही. लखनौमध्ये तर दिवाळीत लक्ष्मीपूजनाला घरातील सर्वजण मुद्दाम पैसे लावून जुगार खेळतात.जिंकलेले पैसे घरातील व्यक्तींसाठीच खर्च करतात. हिंदू धर्मात पत्त्यांना धार्मिक अधिष्ठान लाभलेले आहे. याची प्रचिती मृणालिनी जोशी यांच्या `शंकरलीला' या पुस्तकातून येते.
शंकरमहाराज हे एक उग्र तपश्चर्येचे गुरू. त्यांनाही पत्त्यांचा नाद होता. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला ते पत्ते खेळायला बसवत. महाराजांनी रघू नावाचा एक मुलगा सांभाळला होता. तो मठातील लहानसहान कामे करत असे. त्याच्या मनात येई की पत्ते खेळणे फारसे चांगले नाही; मग गुरुजी का बरं पत्ते खेळतात? महाराजांनी त्याचं मन जाणलं. ते म्हणाले, ``पत्ते खेळणे वाईट नाही, पण खेळाचा जुगार मांडणं वाईट आहे.'' महाराजांनी रघूला जो अर्थ सांगितला, त्याचे विवेचन मृणालिनी जोशी यांनी त्यांच्या पुस्तकात केले आहे.
दुर्री -  पृथ्वी आणि आकाश
तिर्री - ब्रह्मा विष्णू महेश
चौकी - चार वेद
पंजी-पंचप्राण-प्राण अपान समान उदान व्यान
छकी-विकार- क्राम क्रोध लोभ मद मोह मत्सर
सत्ती - सात समुद्र
अठ्ठी -  आठ सिद्धी : १.अणिमा(शरीर सूक्ष्म  करणे), २.महिमा(शरीर मोठे करणे),  ३.लघिमा(शरीर हलके करणे),  ४.प्राप्ती(प्राप्त करणे-सर्व प्राण्यांच्या  कर्मेद्रियांशी त्या त्या इंद्रियांच्या  अधिष्ठात्री देवतेला प्राप्त करणे)  ५.प्राकाश(परलोकातील अदृश्य  विषयांचे ज्ञान होणे), ६.इशिता(शक्तीची  मायेची इशाच्या ठिकाणी असणारी  प्रेरणा), ७.वशिता(त्या त्या गोष्टी वश  करून घेणे इंद्रियांना वश करून घेणे),  ८.प्राकाम्य(मनातील इच्छा सुख  मिळवणे)
नव्वी - नवग्रह
दश्शी - पाच कर्मेद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये
गुलाम - आपल्या मनातील वासना; माणूस  त्याचाच गुलाम होऊन राहतो.
राणी - मूर्तिमंत माया
राजा - सर्वांवर स्वार होऊन त्यांना चालवणारा

दश्शीवर दबाव असतो गुलामाचा. वासना इंद्रियांना नाचवते. वासना निर्माण होते मायेमुळे. तिच्या नादात वाहवत जाते ते माणसाचे मन, माणूस तो राजा. तो समाजाला मुठीत ठेवू शकतो. अंंकुश लावू शकतो तो विवेक. हुकुमाचा एक्का म्हणजे सद्गुरू. समोरचा आपला भिडू म्हणजे प्रारब्ध. त्याच्या हातातले पत्ते माहीत नसतात, पण त्याच्या मदतीने आपण डाव जिंकण्याचा प्रयत्न करतो; जीवन जगतो. आयुष्यात विरोध करणाऱ्यांंना आपण विवेकाच्या जोरावर जिंकू शकतो, आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. तसा हा पत्त्यांचा सोपान!
- वैशाली फडणीस (शशीकला स.आपटे)
बेलबाग, लक्ष्मी रोड, पुणे २
मोबा. ९८८१६९५५६२


मराठीचा दांभिक कळवळा
मराठी भाषा टिकेल का, टिकली तर ती वापरली जाईल का, वापरली नाही तर गंजून नष्ट होईल का, आणि नष्ट झाली तर काय नुकसान होईल, किंवा वाचली तर कोणते लाभ मिळतील या अर्थाच्या चर्चा गेली कित्येक वर्षे-कदाचित् श्रवणबेळगोळ येथे शिलालेख खोदल्यापासून सुरू आहेत. ज्ञात मराठीच्या त्या सातव्या शतकातील मजकुरात `श्रीचावुंडराये करवियले गंगराजसुत्ताले करवियले..' ही भाषा वापरली, ती मराठीच आहे असे आजच्या बी.ए.वयाच्या पिढीला सांगण्यासाठी विनवण्याच कराव्या लागतील. तात्पर्य असे की, जी मराठी भाषा वाचविण्यासाठी म्हणून बरीच तज्ज्ञ मंडळी अनेक पर्याय-उपाय सुचवीत असतात, ती वाचविण्यासाठी उरलेली मराठी भाषा कोणती हे आधी ठरवावे लागेल. ज्ञानेश्वरांची अमृताते पैजेसी जिंकणारी मराठी एकनाथांना समजू शकली, म्हणून त्यांनी `गीता ज्ञानेश्वरी प्रती शुद्ध केली.' पण आज ती आपल्यासारख्यांना कळत नाही. तसेच शिवछत्रपतींच्या पत्राची भाषा चाचपडत कळते, नाना फडणीसाची बरीच समजते, चिपळूणकर हे मराठीचे शिवाजी म्हणत असले तरी त्यांची भाषा वेगळी. टिळकांना भाषेचे सोपेपण महत्त्वाचे वाटत असे. मंडालेहून ते परत आल्यावर `केसरी'तील संपादकीय विभागातून `लोकमान्यांची बंधमुक्तता' या शीर्षकाच्या अग्रलेखाचे प्रुफ त्यांच्यापुढे आले. त्या शीर्षकावर काट मारून त्यांनी `टिळक सुटले' अशी दुरुस्ती केली. अशी सोपी भाषा सावरकर-गडकरींनी पुन्हा जडजंबाल करून दाखवली. मुद्दा असा की, यांपैकी कोणतीही भाषा आपण मराठी म्हणतो, ती अभिजात मानतो, ती टिकलीच पाहिजे असे गर्जून सांगतो.... पण ती सारखी बदलत ठेवतो. आपण वेगळे काहीच न करता ती बदलते. गोतावळा कादंबरी, बहिणाबाईच्या ओव्या, स्वामी कादंबरी, सुरेश भटांची गजल यांपैकी कोणती भाषा; कोणते साहित्य अभिजात म्हणायचे? `टाटायन', `एम आणि हुम राव', `पहिला गिरमिटिया', `किकिनाक' ही अलीकडे प्रकाशित झालेल्या काही पुस्तकांची नावे अभिजात मराठी समजायची की नाही?

या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे नसतात. हट्टाने उत्तरे देऊ गेल्यास ती पटणारी नसतात. भाषा-वेशभूषा-खाद्यपदार्थ-व्यवहारसाधने वगैरे सगळयांची मिळून संस्कृती बनते; आणि संस्कृती सतत बदलतच असते. धोतर किंवा लुगडे हेच अभिजात म्हणत बसलो तर आजचे सगळे मराठीजन उडाणटप्पू म्हणावे लागेल. आज एखाद्या वरातीत अक्कडबाज फेटा किंवा गिर्रेबाज वारू दिसतो पण ती अभिजातता नव्हे तर हौसेचे सोंग काढण्याचा प्रकार असतो.

आजकाल मराठी भाषेची प्रतिष्ठा व उपयोगिता टिकली पाहिजे म्हणून आकांत करण्याची एक चळवळ चालते. इथे समाजवादाच्या गप्पा मारत मुला-नातवंडांस विदेशी नोकरीला पाठविणे; किंवा मॅक्डोनाल्डमध्ये केकखरेदीच्या रांगेत उभारून स्वदेशीचा डिंडिम वाजवत ठेवणे, किंवा दूरदर्शनचे अतिक्रमण सांगत साडेसात-आठ वाजले की सूनबाई वा मल्हारीपुढे बसणे ही जशी वेळ घालविणारी एक विधायक अभिजातता असते; तशीच बुडत्या मराठी भाषेसाठी विविध उपाय सुचविण्याची अभिजनांची अभिजात चळवळ चालत असते. संस्कृतमध्ये ज्ञानाचे महाभांडार आहे म्हणून ती शिकावी, तर तो अभिजात चळवळीसाठी मागासलेपणा ठरतो; आणि इंग्रजी शाळा जोमात चालल्या की ही अभिजात भाषिक दर्जाची चळवळ आकान्त सुरू करते.

आजघडीला सिंधी भाषा संपत चालली आहे. एकेकाळी ग्रंथसंपदा व शास्त्रे निर्मिणारी ही भाषा व लिपी, गेल्या केवळ साठ वर्षांत संपली. कारण फाळणीच्या तडाख्यात सिंधी लोक सापडले. त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईत त्यांची भाषा कशी टिकणार? मराठी मुलखावर आक्रमणे झाली तेव्हा छत्रपतीना त्यांच्या आसनाची शाश्वती नव्हती. ज्ञानदेवांची ती मधुर रसपूर्ण भाषा खाविंदचरणी रजामंद न होती, तर तिचा कोण मुलाहिजा ठेवणार होते?

मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता सध्या वाढली आहे. कानडी-तमीळ-बंगाली या भाषांना तो दर्जा आजवर मिळून गेला, पण मराठीला नाही. याचा अर्थ मराठी भाषा त्या इतरांपेक्षा कुठे कमी ठरलेली नाही, पण मराठी शासक-प्रशासक कमी ठरले आहेत. त्याचप्रमाणे आज कोण्या प्रयत्नांतून आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर काय फरकफायदा लाभेल, हे सांगून पटण्याजोगे काही नाही. तो दर्जा मिळायला हवा हे ठीकच, पण दर्जा मिळण्याने काय मिळेल हे संदिग्धच आहे. भाषाविकासासाठी केंद्रसरकारकडून भरघोस अनुदान मिळेल, त्यांतून आणखी काही पदे-पुरस्कार-समित्या-परिषदा वगैरे! त्यांतून भाषेचा विकास होईल असे समजणे म्हणजे `उर्वरित महाराष्ट्न् वैधानिक मंडळा'चे अध्यक्षपद छगनराव (अथवा तत्सम कुणीही) याना देण्याने उर्वरित महाराष्ट्नचा विकास होईल, म्हणण्यासारखेच आहे. `अभिजात'चा आपल्या समजुतीतील अर्थ कुलीन, प्रतिष्ठित, विशिष्ट उंचीचा, दर्जेदार असा काहीतरी असतो; पण ही सगळी गुणवैशिष्ट्ये कायद्याने ठरविता येत नाहीत. ती मूल्यस्वरूपी असल्याने त्याची कायदेशीर किंमत होत नसते. एखादे उत्तम विचाराचे पुस्तक वाचकांवर संस्कार करते त्याचे मूल्य पानाला दहा रुपये रॉयल्टीच्या दराने ठरत नाही. अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशी काही योजना कुठे तयार असल्याचे ऐकिवात नाही, की जी केवळ पैशाअभावी खोळंबून राहिली आहे. भाषा संवर्धन सरकारच्या `अभिजात प्रमाणपत्रा'ने होणार नाही पण तरीही ते प्रमाणपत्र मिळावे असे वाटते. एखादी वस्तू `टाटा'ची आहे म्हटले की त्यावर `आयएसआय'चा शिक्का कुणी पाहात नाही. तरीही टाटा मात्र तशी मान्यता घेतात, घेतली पाहिजे.

मराठी टिकेल की बुडेल हा फार महत्त्वाचा प्रश्नच नाही. ती बदलेल हे नक्की. ती बदलणे हे प्रवाहीपणाचे लक्षण आहे. माणसाला भाषा आवश्यक असते कारण त्याला संवाद करायचा असतो. मराठी भाषेचा देवनागरी लिपीऐवजी उद्या चिन्हे व आकृत्या येतील, शॉर्टहॅन्ड किंवा रोमन लिपी येईल. यावी असे नव्हे, पण ते कुणी रोखतो म्हणून थांबणार नाही. शंभर वर्षांपूर्वी ग्वालेर-इंदूर-बडोद्यात शाळांमध्ये मराठी हा सक्तीचा विषय होता, त्याचा प्रभाव काही वर्षे टिकला. आता तसा प्रभाव पुणे-कोल्हापूर-नाशकातही नाही. हा सांस्कृतिक प्रवाह सतत वाहता-खळाळता असतो, तो खळाळत राहण्यानेच टिकतो. रोखू पाहिला तर काही काळ आनंद-समाधानात रमलेपण जाणवेल पण बांध फुटले तर लोंढा वाहून जाईल, त्यातही एक मौज अनुभवता यायला हवी. उगीच `टिकले पाहिजे', `जपले पाहिजे' हे भेकत राहणे जपत राहण्याची चूक अनाठायी वाटते.

आठवांचे साठव
प्राथमिक शाळा
माझी सर्वात मोठी बहीण अनुसया आणि तिच्या पाठीची आम्ही पाचसहा भावंडे किर्लोस्करवाडीतल्या शाळेत शिकली, अर्थातच मी त्या शाळेत पहिलीच्या वर्गात दाखल झालो. त्याआधी बिगरी, माँटेसरी, पूर्वप्राथमिक वगैरे भानगडी आमच्या घरच्या परंपरेत नव्हत्या. अगदीच झाडाखाली वर्ग भरणे किंवा शाळा झाडणे-सारवणे असले दीनपण माझ्या शाळेत नव्हते. पण पोरांना बसायला अजूनी बाकडी आलेली नव्हती, लांबलचक फळयांचे पाट होते. एकेका पाटावर चार चार मुलं-मुली बसायची. एकाच वर्षात पण चारदोन महिने मागं-पुढं जन्मलेली आम्ही चिल्लीपिल्ली, पण शाळेत आलो की थोडं प्रौढ व्हायला होतंच की काय जाणं!
त्यात आमच्या इंदिराबाई कुलकर्णी म्हणजे पोरांत पोर होऊन मोठे डोळे करून प्रेमानं बोलायच्या. `राजा, सोन्या, बबे...' अशी संबोधनं वापरायच्या. त्यांचे यजमान त्याच शाळेत शिक्षक, बा.रा.कुलकर्णी म्हणून ते `बारामास्तर' आणि या `बाराबाई'. शाळेच्या छपरावर बुचाच्या झाडांनी कायमची सावली धरलेली असे.
आमच्या वर्गात एक मुलगी गोरटेली, मिचमिच्या डोळयाची, वेंधळी अशी होती. ती दफ्तराचे ओझे सावरत यायची, धांदरटपणे वावरायची. आणखी वाईट म्हणजे काही वेळा बाइंर्ना सांगून, कसनुसं तोंड करून, वाकडी पावलं टाकत घाईत घरी जायची. बाई मोठ्ठ्यानं म्हणायच्या, `अरे लेको, सगळं नीट आवरून शाळेत यायचं रे%%' पण कधीतरी त्या `बिचारी'ला तितकीही सवड मिळायची नाही. ती केविलवाणी उभी राहून जागेवरच चुळबु ळायची. जवळपासची पोरं हातातल्या पाटीपेन्सीली फेकत, ``बाई, बाई अर्रर्र'' असं ओरडत उठायची. मग बाईही, `अऱ्या अऱ्या, काय ऱ्ये ह्ये!' असं म्हणून सगळया पोरांना पाटीपुस्तकासह बाहेर काढायच्या. शाळेचा शिपाई हरी काळे भरी थोरली लोखंडी माठघागर खांद्यावरून आणायचा, आणि भडाडा ओतून वर्ग धुवायचा. तो वाळेपर्यंत आम्ही बाहेर बुचाची फुलं वेचत किंवा शेजारपाजारी काळ काढत असू.
१ली ते ४थी आमची क तुकडी असे. शाळेत प्रवेश होतील तसतशी तुकडी व्हायची, त्याचा हुशारीशी संबंध नसे. मी माझ्या वर्गात पहिला होतोच. २री-३री ला सरला कशाळीकर बाई होत्या. त्या मारकुट्या होत्या पण लाडानं पोरांच्या पाठीवर हात फिरवत बोलायच्या. एकदा एक प्रश्न त्यांनी विचारला, ओळीनं एक एक जण उत्तरं देत गेला, त्या सगळया पाचसहा पोरांची उत्तरं चुकलेलीच! मग प्रत्येकाच्या पाठीत एकेक रट्टा देत त्या पुढं पुढं आल्या. त्या भरात शेवटी कुंदा नावाच्या मुलीच्या पाठीतही रट्टा बसला... आणि पट्कन त्यांच्या लक्षात आलं की, या कुंदीला उत्तर विचारलंच नव्हतं. रट्टा खाल्यावर ती उभी राहिली. तिला बाई `अरेच्च्या! सांग बरं तू?' असं म्हणाल्या. या मुलीनं उत्तर दिलं ते नेमकं बरोबर आलं! कशाळीकर बाई तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या, `शाब्बास, तुझा धपाटा पुसून टाकला हं!' सगळीजण पाठ चोळतच होती. फक्त कुंदीच्या ओठावर हसू, आणि बाकीची रडवेली होती.
४थी क च्या वर्गाला ग्रामोपाध्ये मास्तर होते. अ आणि ब तुकडीला बा.रा.मास्तर आणि दीक्षित बाई असायच्या. या तिन्ही वर्गांची दारे एकमेकाकडे तोंड करून असल्यामुळं पोरांना वाचायला किंवा गणित सांगून हे तिघं शिक्षक गॅलरीच्या कट्ट्याशी गप्पा मारत थोडा वेळ जमायचे. आमच्या पहिल्या बाकावरून ते दिसलं की, आम्ही पोरं त्यास `मंडळ भरलं' असं म्हणायचो. एकदा ग्रामोपाध्ये मास्तरनी माझ्या शेजारच्या बाळू तळवलकरला काहीतरी विचारलं. उत्तर द्यायसाठी तो उभारला. तोवर मी डाव्या चिमटीत माझी टोकदार शिसपेन त्याच्या बसत्या जागी उभी धरून ठेवली होती. बाळू खाली बसताना त्याच्या चड्डीच्या जाड कापडातूनही त्याला इतकी टोचली की, `आ%%' म्हणत त्याच्या डोळयात पाणी आले. मास्तरनी जवळ येऊन विचारल्यावर त्यांना हा प्रकार कळला. त्यांनी माझे मानगूट डाव्या हाताने वाकवले, आणि पाठीत कम्म्कन गुद्दा घातला. त्याही स्थितीत मला आणि बाळूला फिस्कन हसू फुटले. तोवर घंटा होऊन तास सुटला. मास्तर वर्गाबाहेर गेले, आम्ही दोघे खेकाळू लागलो. इतर पोरांना काहीच कळेना.
- वसंत आपटे, `वाल्मिकी' किर्लोस्करवाडी ४१६३०८

Comments

  1. आपापल्या जगात जगणाऱ्या प्रत्येकात इतिहासाची जाण आणि वास्तवाचे भान 'आपले जग'चा प्रत्येक अंक करून देत आहे. या अंकात पत्त्यांचा दरबार या लेखातून नवीन माहिती मिळाली. आठवांचे साठव ही लेखमालिका जुन्या काळाची ओळख करून देते. या आठवणी एका व्यक्तिचे प्रतिनिधित्व न करता त्या कालखंडातील गरिबीशी, प्रारब्धाशी झगडणाऱ्या प्रत्येक होतकरूचे प्रतिनिधित्व करतात. आजच्या बालकांनी आणि पालकांनीही ही लेखमाला अवश्य वाचावी. आपली लेखनशैली सहजसुंदर आहे. 'आपले जग'चा प्रत्येक अंक मैत्रीचा आपुलकीने पुढे केलेला हात असतो. ही मैत्री कायम अशीच राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन