उत्तरांतून प्रश्न
एका वृद्धाश्रमात नुकताच गेलो होतो. अजूनी तरी माझ्यावर `तशी' वेळ आलेली नाही; तर नेहमीच्या भटकंतीपैकी ती एक सदीच्छा भेट होती. एरवी कोणत्याही ठिकाणी मी कधी `पाहायला' म्हणून जात नाही. देऊळ, जंगल, समुद्रकाठ किंवा संग्रहालय यांत पाहण्यासारखं मला तरी काही वेगळं दिसत नाही; यात माझा दृष्टिदोष असेल. पण काही कामासाठी किंवा त्या निमित्ताच्या मुक्कामी धामासाठी हिंडायला मी सहसा तयारच असतो. तशा एका फिरतीत वृद्धाश्रमात गेलो. अपंगालय, रुग्णालय, अनाथालय, मतिमंद गृह वगैरे सगळे प्रकार मी कित्येकदा अनुभवले आहेत. या वृद्धाश्रमातही तसं काही नवीन नव्हतं.
इथं म्हाताऱ्यांची व्यवस्था तशी छान होती. पोटपाणी, विरंगुळा, औषधपाणी यांची सोय होती. संडास-मोरी, अंथरुणं हेही योग्य होतं. खर्चाची चौकशी सहज व्यवस्थापकाकडे केली तर दरमहा माणशी तीन हजार म्हणाले. त्यात रोजचं साधारण राहणीमान असतं. यातल्या बहुतेकांची मुलं-मुली-सुना अधून मधून भेटायला येतात. एकमेकांशी उत्तम संबंध आहेत.... वगैरे! एकूण इथं सगळे वृद्ध अगदी मजेत आहेत असं व्यवस्थापकाचं म्हणणं होतं. पण तिथं राहणारी माणसं आतून पुष्कळशी हलली होती. तशी ती वृद्ध मंडळी साऱ्या व्यवस्थेवर खूश, पैसे तर गाठीला होतेच.
असं जर सगळं आहे तर मग वृद्धाश्रमात राहण्याचं नेमकं कारण काय? हेच माणशी तीन हजार आपल्या मुलाला किंवा जावयाला दरमहा दिले; किंवा तोच जर इथं देत असेल तर त्याचे वाचले तरी चालेल ना! प्रश्न जागेचा असेल तर मुलांच्या फ्लॅटला लागून एक खोली सहज मिळू शकेल. एका सोसायटीत अगर गावातल्या गल्लीत पाचसात वृद्धांसाठी एकत्र सोय करता येईल. तिथं `माणसात' राहायला मिळेल.
कुठंतरी शेपन्नास मैलांवर हे आश्रम शोधत जायचे; आणि तिथं पुन्हा या वृद्धांनी `माणसं भेटावीत' म्हणून टिपं गाळायची, असं का? ज्यांचं पटत नाही, त्यांच्या बाबतीतसुद्धा समुपदेशनाचे काही प्रयोग करून पाहायला हवेत. तेही जर अयशस्वी झाले तर शेवटचा पर्याय म्हणून वृद्धाश्रम असायला हरकत नाही. वृद्धाश्रम घराशी आले तर पाळणाघरंही दूर होतील.
वृद्ध माणसं ही गंगाजळी आहे, तरूण पिढी हे खेळतं भांडवल आहे, आणि बालकं ही भविष्यासाठी गुंतवणूक आहे. या सगळयांचा समतोल हवाच, पण इष्ट वेळेस हे निधी हाताशी असले पाहिजेत.... ही `पैशाची' भाषा तरी सध्याच्या युगात प्रत्येकाला समजायला हवी. समस्येवर उत्तर काढायचे, त्यातून अधिक गंभीर समस्याच तयार होत असेल तर मूळची समस्या सोसण्याचा पर्याय अधिक श्रेयस्कर ठरतो. ते सोसण्याचे बळ निर्माण करण्याची इलम प्रत्येकाजवळ हवी.
Only because of Bhavanik-halkallol - which all are (1)Not wishing, (2)brought-up in v.selfish manner (3)SANSKAR-cha tase so are unable to control and get life&death troubles - so we have to accept this as situation and try to- take a way out per our own capacity. i have thought over, going thru this all type of phases, thoughts and available information etc. To transport Human- is v.difficult though it's between 5 to 150 kg.
ReplyDelete