Skip to main content

2 July 2018

अरुणा असफअली
१९४२च्या ९ ऑगस्टला गोवालिया टँक मैदानावर (आताचे क्रांतिमैदान) `भारत छोडो' या ऐतिहासिक आंदोलनाचा प्रारंभ झाला. अश्रूधुराचा मारा सतत चालू होता, अशा वेळी एका तरुण महिलेच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
काही योगायोग मजेदार असतात. १९८९ साली त्याच मैदानावर ९ ऑगस्टला त्या महिलेचा ८०वा वाढदिवस साजरा झाला. `महाराष्ट्नचे नेहरू' म्हणून एकेकाळी ज्याची गणना केली जात होती असे श्री.अच्युतराव पटवर्धन आणि श्रीमती अरुणाजी बराच काळ भूमिगत होऊन क्रांतिकार्यात मग्न झालेले होते. त्या काळातील क्रांतिकारकांच्या प्रभावळीत अरुणा असफअली हे नाव अग्रभागी विराजमान झालेले होते.
भूमिगत असताना श्रीमती अरुणाजी सतत चौफेर संचार करीत राहिल्या. प्रकृतीनेही त्या बऱ्याच खंगल्या असून आजारी असल्याचे वर्तमान महात्मा गांधींच्या कानी गेले. त्यांनी अरुणाजींना निरोप धाडला की, ``तुझी धिटाई आणि वीरबाणा गौरवास्पद असला तरी भूमिगत असतानाच मरून जाणे इष्ट नाही.'' या गौरवार्थ निरोपाबरोबरच गांधीजींच्या शैलीनुसार असाही निरोप त्यांनी अरुणाजींना धाडला होती की, ``इंग्रज सरकारने तुला पकडण्यासाठी जे पारितेषिक घोषित केले आहे, ते तू स्वत:च त्यांच्या हवाली होऊन मिळव आणि पारितोषिकाची ती रक्कम हरिजनसेवेच्या कार्यार्थ अर्पण करून नवा आदर्श प्रस्थापित कर.''
आणखी एक योगायोग मला तितकाच सुखद वाटतो. भारताची राजधानी दिल्ली ही महानगरपालिका झाल्यानंतर सर्वप्रथम महापौर पदावर श्रीमती अरुणाजींची सलग दोन वेळा (१९५८ व १९५९) निवड झाली होती. त्यांच्यानंतर त्याच महनीय पदावर सलग पाच वेळा लाला हंसराज गुप्त यांची निवड होत गेली. कै.लाला हंसराज गुप्त हे रा.स्व.संघाचे प्रांतस्तरीय संघचालक होते. या दोन्ही महापौरांचा एकमेकांशी समन्वय अप्रतिम होता. पूर्वकाळी भूमिगत असताना श्रीमती अरुणाजींनी कै.लाला हंसराजजींच्या निवासाचा (२० बाराखंबा रोड) आश्रय घेऊन आपले `भारत छोडो' आंदोलनातील क्रांतिकार्य चालू ठेवलेले होते. त्या कालखंडात दोघेही तसे कोणीच नव्हते. पण कै.लाला हंसराजजींचे नाव मात्र तेव्हाच्या संपूर्ण अखंडित उत्तर भारतात झालेले होते. रा.स्व. संघाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून ते सर्वश्रुत होते.
त्या सहकार्ययुगातील एक प्रसंग तितकाच मनोज्ञ आहे. इंग्रज सरकारच्या गुप्तचर विभागाने आंदोलनकारी भूमिगत पुढाऱ्यांचा पाठलाग चालू ठेवला होता. त्यांची धरपकड सुरू झाल्यावर लाला हंसराजजींच्या निवासस्थानावरही नजर असे. एके दिवशी अचानक या निवासस्थानामधून एक `बारात' निघून वधूसह वाजत-गाजत हमरस्त्यावरून गेली. या मिरवणूकीतूनच श्रीमती अरुणाजींना सुखरूप दुसऱ्या स्थळी हलविण्यात आले होते. परस्पर सहकार्याचे ते सुवर्णयुग होते. राजकीय अस्पृश्यता त्यावेळी प्रवेश करू शकलेली नव्हती. नंतरच्या काळात श्रीमती अरुणा असफअली कट्टर वामपंथी म्हणून गणल्या जाऊ लागल्या असतानाही त्या कै.लालाजींच्या परिवाराशी संपर्क ठेवून असत.
१९४२च्या ९ ऑगस्टला गोवालिया टँक मैदानावर जे ध्वजारोहण झाले त्या रोमहर्षक प्रसंगाच्या संदर्भात श्रीमती अरुणाजी नंतर अनेक वर्षे असे सांगत असत की, ``ज्यावेळी तो अनुभव मी घेतला आहे, त्याचवेळी असा निश्चय केला की, सत्याग्रह करून शेळपटासारखा कारागृहात मी प्रवेश करणार नाही.''
१९४२ चे आंदोलन थंड झाल्यानंतरही १९४६ पर्यंत इंग्रज सरकारने भूमिगत अरुणाजींच्या अटकेचा आदेश (वॉरंट) रद्द केला नव्हता. त्या कालखंडातील अरुणाजींच्या कार्याचा गौरव करताना पंडित जवाहरलालजींनी उद्गार काढले होते की, अरुणाजींनी मोठ्या धिटाईने जे कार्य केले आहे ते कधीही व्यर्थ ठरू शकणार नाही, ते निश्चितच फलप्रद होईल. श्रीमती अरुणाजीही पंडित नेहरूंकडे अतीव आदराने पाहात असत. १९५०च्या सुमारास काँग्रेसमधील समाजवाद्यांनी अखिल भारतीय काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय केला. अरुणाजींची त्यावेळी इच्छा होती की, `दुहेरी सदस्यता' हा मुद्दा पुढे करून समाजवाद्यांना हकालपट्टी झाल्यासारखे जावे लागू नये. १९४८मध्ये नाशिकला काँग्रेसी समाजवाद्यांचे संमेलन झाले त्यावेळी ही अशी स्थिती होती.
हे सर्व लक्षात घेतल्यानंतर १९७९च्या समाजवादी भूमिकेची आठवणही झाल्याविना राहात नाही. जनता सरकार आणि जनता पक्ष या दोन्हींपासून पूर्वीच्या जनसंघीय मंडळींना समाजवाद्यांनी दुहेरी सदस्यता वा दुहेरी निष्ठा यावर भर देऊन अस्पृश्य ठरविले होते आणि त्यांना दूर करण्याचा हट्ट केला होता. त्यामुळेच तर १९८०च्या प्रारंभी भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला. १९४८ साली समाजवाद्यांनी जे धोरण अंगिकारले त्यामुळे पंडित नेहरूंचे आणि समाजवाद्यांचेही नुकसान झाले असा स्पष्ट अभिप्राय श्रीमती अरुणाजींनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे.
१९८९च्या सुमारास श्रीमती अरुणाजींचे कार्यक्षेत्र म्हणजे `लिंक हाऊस' एवढेच मानले जात असे. या वास्तूमधूनच `पेटि्न्यट' हे इंग्रजी दैनिक आणि `लिंक' हे इंग्रजी साप्ताहिक सर्व प्रकारच्या अडचणींतून मार्ग काढीत नियमितरीत्या प्रकाशित होत असे आणि त्याचे बहुतांशी श्रेय अरुणाजींनाच होते. या नियतकालिकांचा प्रारंभ झाला त्यावेळी तत्कालीन संरक्षणमंत्री सर्वश्री कृष्ण मेनन, केंद्रीय मंत्री के.डी.मालवीय, मुंबईतील प्रख्यात सर्जन डॉ.ए.व्ही. बालिगा आणि खुद्द पंतप्रधान पंडित नेहरू अशा दिग्गजांचा पाठिंबा असल्याचा प्रवाद उघडपणे प्रचलित होता. आपोआपच सरकारदरबारी या वृत्तपत्राचा प्रवेश व प्रचार सुकर होत गेला. मुंबईतील एका जमान्यात मातब्बर व संपूर्ण राष्ट्न्वादी इंग्रजी दैनिक म्हणून `फ्री प्रेस जर्नल'चे नाव होते. त्याचे संस्थापक संपादक श्री.एस सदानंद यांच्या पठडीत पटाईत झालेले पत्रकार श्री.एडत्रा नारायणन् यांचे सहकार्य श्रीमती अरुणाजींना लाभले होते. त्यामुळे या नियतकालिकांची पायाभरणी पक्की झालेली आहे. `लिंक' या साप्ताहिकाने तर वामपंथी नियतकालिक म्हणूनही आपला दर्जा निरंतर टिकवून धरलेला असे. श्रीमती अरुणाजींची दैनंदिन देखरेख त्या नियतकालिकांना लाभलेली होती.
व्यक्तिगत जीवनात श्रीमती अरुणाजींनी फार मोठे आघात सहन केले. ज्या पिढीच्या त्या प्रतिनिधी होत्या, त्या पिढीचा प्रमुख गुण म्हणून असेल, पण त्यांची राहणी इतकी साधी असे की सार्वजनिक स्थळी जर या कृषकाय शुभ्रवस्त्राच्छादित महिलेला अन्य कोणी पाहील तर सामान्य भारतीय नारी म्हणून त्यांची गणना केली जाईल. या कृषकायेत क्रांतिकारी व जिद्दी ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्व आहे, याचा आभासही कोणाला होण्यासारखा नव्हता. पूर्वाश्रमीच्या त्या बंगाली होत्या. त्यामुळेच बहुधा हा क्रांतिकारी गुण त्यांच्याकडे वारसारूपाने आलेला असावा. अवघ्या एकविसाव्या वर्षी इंग्रज सरकारने राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांची पाठवणी कारागृहात केलेली होती. महात्मा गांधींजींच्या जमान्यापासून इंदिरा गांधींच्या जमान्यापर्यंत सत्ताधिष्ठितांच्या समीप राहूनही त्या सत्तेपासून दूर राहिल्या. त्यामुळे जनमानसाच्या नाडीवरील त्यांची पकड कधी सैल झाली नाही. वामपंथी कल (झुकाव) हे त्यांचे वैशिष्ट्य मात्र कायम टिकून राहिले.
जनमानसाची नाडी त्यांना अचूक समजत असे याचे उदाहरण १९७७ साली दिसले. श्रीमती इंदिरा गांधी त्यावर्षी सत्तास्थानापासून बाजूला झाल्या होत्या. त्या विमनस्क वा निराश नव्हत्या; पण उदास अवस्थेत मात्र दिसत. त्या कालखंडात श्रीमती अरुणाजींनी भविष्यवाणी करून त्यांना सांगितले होते की, ``ही तात्पुरती अवस्था आहे. जनतेच्या मनात जो गैरसमज निर्माण झाला आहे तो दूर होऊन पूर्ववत् स्थिती येईलच.'' वरील भविष्यवाणीच्या संदर्भात स्वत: अरुणाजीच निकटवर्तीयांना सांगत असत की, ``माझे उद्गार ऐकून श्रीमती इंदिराजींचे डोळे अश्रूपूर्ण झाले व त्या चटकन म्हणून गेल्या की, `हे सारे माझ्या मृत्यूनंतर घडेल.'' त्यावर अरुणाजी स्पष्ट शब्दांत दिलासा देत की, `मुळीच नाही. हे लवकरच घडून येईल.' हा आत्मविश्वास आणि जनतेची अचूक जाणीव अरुणाजींकडे होती! नंतरचे पंतप्रधान श्री.राजीव गांधी यांना या गोष्टीची जाणीव असल्यामुळे तेही अरुणाजींकडे आदरयुक्त भावनेने पाहून त्यांच्याशी व्यवहार करीत असत.
आता हे सर्व इतिहासजमा झाले, पण अरुणाजींची शुभ्र वसनातील कृश मूर्ती केवढ्या तेजाने तळपत असे ते मात्र डोळयांसमोरून हलत नाही.
***
(पत्रमहर्षी ना.बा.(बापूराव) लेले यांचे `स्मरणगाठ' हे व्यक्तिेचत्रांचे पुस्तक `आपले जग'कडून संकलित केेले होते. त्यातून)

 संपादकीय
प्रत्येक धाड खरी मानायची?
बँक ऑफ महाराष्ट्न् च्या अध्यक्षांसह काही अधिकाऱ्यांना आणि लेखा परीक्षकालाही अटक केल्याचे अैकून वाचून मराठी माणसाला धक्का बसणे स्वाभाविक होेते. नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांची हजारो कोटींची कर्जे बुडण्याच्याच मार्गावर चालली आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्न्भरच्या जिल्हा सहकारी बँका `आज की अुद्या' अशा स्थितीत आहेत. ज्या प्रकारे त्यांचे कारभार चालत होते, त्यांचा अंदाज सामान्य समज असलेल्या कुणालाही आलेला असतोे. त्या संस्था चालविणाऱ्या माणसांचा, त्यांच्या कामगिरीचा आणि कार्यपध्दतींचा  ताळेबंद समाजात रुजू झालेला असतो. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती आणि महान कर्तृत्व समजून घेण्यासाठी साधारण कुवतीच्या सभ्यतेला त्या संस्थांचा ताळेबंद अभ्यासावा लागत नाही. त्यामुळे त्या संस्थांचे गोत्यात येणे आपल्याकडे फारसे धक्कादायक मानले गेले नाही. महाराष्ट्न् बँकेच्या तथाकथित घोटाळयात, किंवा त्याआधीच्या संबंधी डी अेस के यांच्याही बाबतीत तो धक्का अंमळ जास्तच होता. त्याचे कारण त्या व्यक्ती किंवा संस्था केवळ मराठी  म्हणून नव्हे, तर त्यांच्या व्यवहारांसंबंधी मराठी मनांत काही अेक प्रतिमा तयार झालेली होती, त्या समजुतींस तो धक्का आहे.

कोणत्याही काळात कोणत्याही गावात फिरणारी काही अुडाणटप्पू तरुण पोरे असतात, काही चवचाल मैनाही असतात; पण गावातल्या सर्वपरिचित कुण्या शिक्षकाची, भल्या वारकऱ्याची पुढची पिढी त्या गतीला गेली तर समाजाची प्रतिक्रिया जास्त कळवळती असते. तसाच प्रकार महाराष्ट्न् बँकेच्या लोकांबाबत झाल्याचे लक्षात येते आहे. तथापि लोकांच्या भावनेवर अर्थव्यवहार चालत नसतो; आणि मोठा खुनी त्याच्या बेफाम सामर्थ्यावर मोकाट सुटला म्हणून आमची पाकीटमारी माफ व्हावी असेही म्हणता येत नाही. मुळात महाराष्ट्न् बँकेच्या व्यवहारांत `गुन्हा घडला' असे म्हणण्याजोगे काय आणि किती हे महत्वाचे ठरेल, त्यासाठी काही काळ जावा लागणार.

महाराष्ट्न् बँकेच्या संस्थापनेत ज्यांचा महत्वाचा सहभाग होता, त्या शंतनुराव किर्लोस्कर यांच्यावर व्ही पी सिंग या अपरिपप् नेतृत्वाने असाच आळ घेअून त्यांना ढळत्या वयात त्रास देण्याचा अश्लाघ्य प्रकार केलेला होता, याची या निमित्ताने पुष्कळांना आठवण होआील. काळा बाजार आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांची कित्येक खरी वा खोटी प्रकरणे अुघड करून राजकीय लोेकानुनय करण्याची अेक फॅशन त्या काळात होती. त्याचाच फटका लागून शंतनुरावांना घायाळ करण्याचा तो प्रयत्न होता. शंतनुरावांनी सरकारच्या अुद्योगविरोधी धोरणांवर सातत्याने टीका केलेली होती त्याचा राग सरकारी आयकर खात्याने काढलेला होता, हे त्यावेळी शेंबडे पोरही सांगू शकत होते. त्यामुळे त्या धाडीतून काहीही साधणार नाही हे अुघड होते,आणि झालेही तसेच! त्या आरोपांमुळे सरकारची कुटीलता अुघडी पडली आणि शंतनुरावांची धाडसी प्रतिष्ठा वाढली.

सरकारला काहीही करायचा अधिकार असतो, आणि आर्थिक बाबी तपासण्याचा अधिकारही असतो. पण तो किती काळापूर्वीच्या प्रकरणांत राबवायचा याचे तारतम्य राखलेच पाहिजे. त्याविषयी कायदाही केला पाहिजे. ज्यावेळी अशी काही अनियमितता घडते, किंवा आर्थिक गुन्हा स्वरूपाचे प्रकरण घडते, त्यानंतर लगेचच त्याचा फडशा करून अन्याय दूर करायला हवा. आितकी तत्पर व्यवस्था होअू शकत नसेल तर सरकारही गुन्हेगारच ठरते. त्याविषयी न्याय सामान्य माणूस कुठे मागणार? परंतु त्यात अनियमितता दिसली तर केव्हाही कधीही कुणाचेही मानगूट पकडायला सरकार समर्थ असते, सामान्य माणूस ते करू शकत नाही. अेक अुदाहरण सामान्य ताकतीच्या याच वृत्तपत्राचे देता येआील. सरकारच्या वृत्तपत्र नोंदणी कार्यालयास परिपूर्ण वार्षिक अहवाल नियत तारखेच्या आत द्यावाच लागतो. तो दिला नाही तर प्रकाशन बंद होअू शकते. परंतु सरकारच्याच प्रसिद्धी खात्याने दिलेल्या जाहिरातींचे पैसे साठ दिवसांत दिले पाहिजेत असा नियम संबंधी सरकारी आदेशावर नमूद करूनही ती मुदत कोणतेही खाते पाळत नाही. सरकारला त्यासंबंधी कोण विचारणार? अशा व्यवस्थेने वृत्तपत्रांच्या तांत्रिक चुकांसाठी त्यांना पिंगवल्याची अुदाहरणे खूप आहेत. कोणत्याही शासकीय कामाच्या बाबतीत कुणाचाही तोच अनुभव असेल.

अशा मनमानी सरकारला लोकांच्यात चांगली प्रतिमा असणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांच्यावर कायदेशीर कारवाआी करण्यास भलतेच बळ येते. त्यांच्या त्या अगोचरपणामुळे सामाजिक विश्वस्त भावना क्षणात अुध्वस्त होते हे मोठेच नुकसान असते. शंतनुराव किर्लोस्कर यांची प्रतिमा त्यांच्यावरील त्या धाडीमुळे डागाळलीच नाही, पण तरीही समाजात कुठेतरी बाष्कळ मुखंडांस त्याचे निमित्त मिळाले. महाराष्ट्न् बँकेच्या लोकांचा गुन्हा असेल तर त्यास निदान महाराष्ट्नत तरी सामाजिक आधार मिळण्याची शक्यता नाही. गुन्ह्याला शिक्षा व्हावी, व्हायलाच हवी. पण त्या प्रकरणांची बऱ्याच वर्षांनंतर अुचकाअुचकी करण्यालाही काही बंधने घालण्याचे कायदे करण्याची गरज वाटू लागते.
आर्थिक क्षेत्रात असे गैरव्यवहार होअू नयेत म्हणून काही व्यवस्था आहेत. हिशेब तपासणी हा स्वतंत्र प्रतिष्ठित व्यवसाय आहे. त्यात संस्थेने नेमलेले तपासनीस असतात, तसे सरकारनियुक्तही असतात. त्यांच्या संघटना व सरकारी नियामक संस्था त्यांच्या कार्यपध्दतीवर लक्ष ठेवत असते. त्यांना दिलेले अधिकार ते नीट बजावत नाहीत असे जेव्हा केव्हा लक्षात येआील तेव्हा त्या नियामकांच्या रचनेत किंवा व्यवस्थेत बदल करायला सरकार समर्थ असते. पण म्हणून त्याने अेकदम त्या साऱ्यांना दूर ढकलून -किंवा अंधारात ठेवून, आपणच तरवार फिरवत मैदानात अुतरण्याचे काही कारण नाही. शाळेतल्या पोरांची परीक्षा नीट न घेता त्यांना पास करत जाण्याने बरीच प्रजा अकार न ओळखता पदवीधर झालेली दिसेल. पण म्हणून आता शिक्षणखात्याने त्या पोरांच्या शिकण्यात शिक्षकाची अनियमितता दाखवून त्यांच्या डिगऱ्या काढून घेणे कितपत शहाणपणाचे ठरते? करनिर्धारण पूर्ण होअून सरकारी अधिकाऱ्याने त्याचा आदेश पूर्ण केल्यावर करदात्याची जबाबदारी संपून जायला हवी, त्याअैवजी जर दहावीस वर्षांपूर्वीचे प्रकरण अुकरून काढण्याची टांगती भीती बाळगत जगायचे असेल तर काय अर्थ राहील?

अेक गोष्ट खरी आहे की लोकांचा भरोेसा असल्या यंत्रणा किंवा तपासनीसांपेक्षा सामाजिक विश्वासार्हतेवर अधिक असतो. कोणत्याही न्यायतत्वाच्या बाबतीत तसेच असते. कुणीतरी आरोपी खुनाच्याही आरोपातून निर्दोष सुटतो, आणि कुणीतरी सच्चा सभ्य माणूस सुनेला छळले म्हणून अकारण  कचाट्यात अडकतो. त्या दोनही बाबतीत सामाजिक न्याय वेगळा असतो. त्यावर सरकारी व्यवस्था चालत नाही, ती कागदी कायद्यावरच चालते. परंतु त्या चिटोरी न्यायाची ताकत सामाजिक न्यायापेक्षा वरचढ ठरू शकत नाही.  सभोवती बडे गुंडपुंड मातले आहेत, ते रीतसर पळून जातात, आणि तुलनेने कमी प्रमाणाचे अनर्थ, त्या मुर्दाडांच्याही पापांचे ओझे खांद्यांवर वाहू लागतात. लोकांना त्यांतून काय संदेश जाआील? महाराष्ट्न् बँकेच्या कर्मचारी संघटनेने त्या कृतीच्या विरोधात मत व्यक्त केले असून लेखा परीक्षकांची संघटनाही सरकारच्या कृतीशी सहमत नाही. ज्या ग्राहकांचे बँकेशी संबंध आहेत त्यांनीही बँकेतून ठेवी काढणे वगैरे आततायी प्रकार केले नाहीत आणि ज्यांच्या खाती पोलीसखाते आहे, त्या मुख्यमंत्र्यानी फेरचौकशी करण्याचे जाहीर केले आहे. याचा अर्थ सार्वत्रिक सामाजिक पाठिंबा बँकेच्या बाजूने दिसतोे. तरीही जर खरेच काही काळेबेरे घडले असेल तर ते माफ करावे असे निदान महाराष्ट्नत कोणी म्हणणार नाही. अशा समंजस सामाजिक संस्कृतीला अशी वादळे सहन करावी लागतात, त्यातून काय निष्पन्न होते यावर त्या संस्कृतीचे खरे खोटे महत्व समजून येआील.

निपा तापाची साथ
सावध राहावे, पण उगाचच घाबरून जाऊ नये,
विदेशी कंपन्या आता काही दिवसांनी त्याची लस बाजारात आणतील..
सगळेजण विकतची लस टोचून घेतील... नंतर त्याचे दुष्परिणाम सुरू होतील.

बर्ड फ्लू झाला..  कोंबड्या मारून झाल्या....
देवाच्या नावाने मारलेल्या कोंबड्या कुणाला दिसतील,
पण त्यापेक्षा कितीतरीपट झालेली ही जीवहत्या त्यांना दिसणार नाही..

स्वाईन फ्लू झाला...  डुकरांची कत्तल केली गेली...
गायी गुरे मारून झाली...  एकदा माकड-ताप आला...
हे सगळे रोग आता कुठे गेले?

विदेशी कंपन्यांनी हवा तो फायदा मिळवल्यावर आमच्या इथले रोग गायब....
आता नव्या रोगाच्या आणि त्यासाठी लसीच्या शोधात-!
दरवर्षी एका प्राण्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक नवीन व्हायरल फीवर..
यालाच `मिडीया जंतूने केलेला रोगप्रसार' असे म्हणूया..?
-वैद्य सुविनय दामले,  कुडाळ (सिंधुदुर्ग)

प्राण्यांच्या सोबतीने
माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या घरी कोणते ना कोणते प्राणी पाळलेले आहेत. माझ्या वडिलांनी शेतातच वसती केली आणि त्यानंतर माझा जन्म झाला. त्यामुळे जन्मत: गाय बैल म्हैस कुत्रा ही मंडळी निरंतर सहवासात आली. हे सगळे प्राणी तसे अुपयोगाचे, पण त्या काळापासून आजअखेरीस आमच्या घरात अेकही हौशी  प्राणी आलेला नाही. कधीतरी कुठूनतरी अेखादे मांजर डोकावत राहिले तर त्याला माझी आआी शिंपभर दूध घालत असेल, आणि तेही बिचारे तेवढ्या आशेनं तिच्या पायी घोटाळत असेल तर ते तितकेच! अेरवी ससा, कासव, पोपट असली रंगेल प्राणीसृष्टी आमच्या घराच्या वाऱ्याला कधीच आली नाही. काचेच्या पेटीतील रंगीत मासे वगैरे हौस आमच्यातल्या कुणाला जमण्यासारखी नव्हती आणि तशी सोयही नव्हती. मध्यरात्रीनंतर टिटवीची टिवटिव, पहिल्या प्रहराआधीच भारतद्वाजाचे हुत्कार, आणि अुगवतीच्या वेळी बुलबुलच्या हाकांनी रात्र सरायची. अंथरुणातून बाहेर येण्याआधी गोठ्यातल्या घंटांचे नाद निनादायचे, आणि दिवस चढायला लागला की कुणी गोसावी-वैदू आवाराशी आला तर कुत्रे पिसाटून भुंकायचे. ही सारी प्राण्यांची जाग आमची सोबत करण्याला पुरेशी असे.
कुत्रे घरात नाही असे तर कधी झालेच नाही. आजही त्यात खंड नाही. माझ्या आठवात तासगावच्या आत्याकडून आणलेले रोम्या नावाचे अर्ध्या वयाचे कुत्रे पुढेे बरीच वर्षे होते. मोठ्या विस्ताराचे आमचे शेत असले तरी कुत्र्याला त्याच्या चतु:सीमा लक्षात होत्या. कुणी धटिंगण अंगणापर्यंत घुसला तर हे कुत्रे त्याचा पिच्छा पुरवायचे. तो माणूस माघारी पिटाळताना आमच्या सीमेशी थांबायचे, त्याला त्यापल्याड हाकलूनच परत यायचे. बुटकेलेसे धट्ट तब्येतीचे होते. भुंक अशी की, परक्याची पाचावरच धारण बसे. भाकरी लपवून त्याला शेाधायला लावायची, अुंच अुड्या मारायला लावायच्या असल्या कलागती आम्ही भावंडं करायचो. ते दीर्घायुषी होते, पण शेवटी त्या बिचाऱ्याचे हाल झाले. त्याला जागचे अुठवेना. अेका फौजदाराला आणून त्याच्या शिपायाकरवी  गोेळी घालावी लागली, आणि त्याला दयेचे मरण द्यावे लागले.
कुत्र्याचे आयुष्य साधारण बारा-चौदा वर्षांचे असते असे म्हटले तर माझ्या आठवात चार पाच कुत्री होअून जाणे ठीक होते; पण तसे नाही. काही कुत्री लवकरच संपली. अगदी दोनचार महिन्यांपासून चार-सहा वर्षांत मेलेली कुत्री बरीच झाली. शिवाय काही काळ अेकदमच दोन तीन कुत्रीही दारात असत. त्यामुळे आमच्याकडे कुत्र्यांची संख्या वीसतीसही झाली असेल. माझा आतेभाअू बंडा जोगळेकर याने पामेरियन कुत्रे पाळले होते. काही काळ तो भाऊ -बहुतेक अयोध्येच्या बाबरी मोहिमेवर, प्रवासाला गेला होता. त्या काळात त्याने ते झिपरे कुत्रे आमच्याकडे आणून सोडले, आणि तेही `आपलेच घर' समजून मजेत राहिले. तो भाअू आल्यावर त्याच्या अंगावर टणाटण अुड्या मारून त्याला नकोसे केले, आणि नंतर त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले. त्या अवधीत माझ्या पाठकुळी बसणे, मागच्या दोन पायांवर चालणे असले खेळ ते पिन्या मनसोक्त करायचे.
अेक  कुत्रे घरात असताना दुसरे पिलू कुणी आणले किंवा आणून सोडले तर आधीचे कावरेबावरे होते. नव्या पिलाला ते चावत नाही, पण त्याच्यावर दाब ठेवू पाहतेे. दादागिरी करते. काही दिवसांनंतर दोघांचं जमायला लागतं. गट्टी होते. त्यातलं अेक `गेलं' तर चिप्प बसून अश्रू ढाळण्याआितकी भावना गुंतते. अेका वेळी तीन कुत्री असताना मजा होआी. अेका कुणाला तरी चाहूल लागून ते भुंकले तर तीन बाजूंनी तिन्ही भुंकत यायची. येणाऱ्याची तारांबळ. सुरुवातीचे `रोम्या' वगळता सगळया कुत्र्यांची नावं गावठी होती. वाघ्या, खंड्या, बारक्या, मोगऱ्या, टिप्या वगैरे. सध्या गंप्या आहे. सारी आपल्याच मुलखातली. कुत्र्याचे पिलू विकत आणतात हे मला फार उशीरा कळले. आशा-उषा-निशा ही नावं माझ्या बहिणीनं म्हशींना दिली होती; त्यावेळी एक रेडाही होता, त्याला `जैशा' म्हणत असू.
आमच्यातल्या साऱ्यांना कुत्रं चावलेलं आहे. पण घरचं कुत्रं चावलं की त्याला होणारा पश्चाताप त्याच्या डोळयांतून पाझरतो. मला तर बऱ्याचदा कुत्रं चावलं आहे. प्रत्येक वेळी आिंजेक्शनं घेतली असं नाही. अेकदा फारच जोरात चावून अुजव्या हाताचा पंजा फोडला, तेव्हा मात्र जरा घाबरलो होतो. घरातली सारी जणं परगावी होती. त्याचवेळी मुकुंदराव किर्लोस्कर घरी आले होते, त्यानी  आिंजेक्शन घेण्याला बजावलं.  परत गेल्यावर पत्रातून `तिसरं आिंजेक्शन घेतले का?' अशी त्यानी जरबही दिली. हल्ली माझा मुलगा क्रॅनडात आहे, त्याच्या घरचं कुत्रं परवाच त्याला चावलं; -म्हटलं चला, परंपरा टिकून आहे.
आमच्या कुणा कुत्र्याचे लाड झाले नाहीतच पण म्हणावीशी निगाही होत नसे. वेळेला अंघोळपाणी नाही, औषध आिंजेक्शन नाही, बसायला पोतं पटकूर दिलं तर दिलं! त्याला साखळीनं बांधणंसोडणं, फिरवून आणणं असलं काही नाही. पाअूस कोसळू लागला तर घरचं कुत्रं गोठ्यात कुठंतरी वैरणीच्या ढिगात मुरगळून बसायचं; कडाक्याच्या थंडीत बाहेरच्या चुलीशी राखोड्यात बसायचं; आणि अुन्हाळी तलखी सुरू झाली तर सांडपाण्याच्या ओलाव्यात बसायचं! बहुतांशी कुत्र्यांना गळपट्टा नसे. याआधीच्या कुत्र्याला तर गळपट्ट्याची अॅलर्जीच होती. चामड्याचा, रेक्झीनचा, साधा कापडी पट्टाही घातला तर त्याच्या गळयाशी जखमा होत. त्यामुळं ते मोकळंच ठेवत असू. आज माझ्या घरी असलेल्या कुत्र्यालाही पट्टा नाही. सणसमारंभाला जास्तीची माणसं यायची असतील तर त्याला दोरी लावून आवारात दूर नेअून कुठल्यातरी झुडपाला तेवढा वेळ बांधावं लागतं. आवार रिकामं झालं की ते ओरडायला लागतं, मग सोडायचं.
त्याला वेळेत भाकरी तुकडा घातला जातो, असं मी तरी म्हणणार नाही. ते बिचारं भूक लागली की कुठंतरी फिरून कुठंतरी खाअून येतं, मग आमचं आवार सोडत नाही. जाग चांगली देतं. राखणीला पुरेसं आहे. शिवाय खाअूपिअू घालण्याची तसदी नाही. त्याला चांगली गरम भाकरी दुधात कुस्करून दिली तर खाआील म्हणून भरंवसा नाही. त्या ताटलीला मुंग्या लागतात, नासाडी होते. मग त्याला खायला देणं बंदच केलं. अलीकडे घरातली माणसं पांगली, वर्दळ कमी झाली, त्याच्याकडं कोण कधी बघणार? ही अडचण त्या कुत्र्यानंही समजून घेतली आहे.


नदीची नांगरणी : पाणी पातळी सुधारली
शेत नांगरावे लागते ही गोष्ट सर्वांना माहीत आहे, पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेसेच वाटते! शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेड हे गाव. गोमाई मध्यप्रदेशातून वाहते. सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्नतल्या प्रकाशा या गावी येऊन तापीला मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा तीर्थक्षेत्र म्हणून ओखळले जाते.
२००० सालची गोष्ट आहे. डांबरखेड परिसरात लोकांच्या लक्षात आले की, परिसरातील बऱ्याच विहिरी आणि बोअरवेलना पाणी येत नव्हते. चार-सहा महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहीरी, बोअर मृत झालेल्या. पाचशे-सातशे फुटापर्यंत खोल गेले तरी पाण्याची खात्री नाही. लोक बोअरची खोली तेवढी वाढवत चालले होते; पण पाणी वरती येत नव्हते, असे का? शेतकरी हैराण. कुणाकडे नीट उत्तर नव्हते.
मोतीलाल पाटील(पटेल) तात्या. नांदरखेड हे त्यांचे गाव. शहाद्याला जायचे तर त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते. त्यामुळे डांबरखेड्याची पाणी समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली होती. तात्या पुणे विद्यापीठाचे १९७०चे एम.एस्सी(अॅग्री). डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक बनली होती. गावात नदी असून विहिरी, बोअर कोरड्या होत्या. सर्वजण विचारात पडले होते.
तात्यांनी एके दिवशी डांबरखेड गावाच्या सरपंचांना मनातल्या चार गोष्टी सांगितल्या. खूप दिवसांच्या आपल्या चिंतनाचा परिपाक लोकांपुढे  ठेवला. समस्येच्या मुळापर्यंत जाऊनच उत्तरे सापडतात; आणि ती चिरस्थायी असतात. तात्यांनी सांगितलेला उपाय अगदीच वेगळा होता; काहीसा वेडेपणाचा वाटेल असा; त्यामागे अभ्यास, संशोधन आणि चिंतन होते. लोकांनी तात्यांचे ऐकले.
डांबरेखेडच्या लोकांसाठी तात्यांनी स्वत: डिझेल पुरवले. ट्न्ॅक्टर, लाकडी नांगर, लोखंडी नांगर अशा साधनांनी गोमाई नदी उन्हाळयात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले. चार किमी. नदी आडवी नांगरायचा हा अजब प्रयोग काहीसा चेष्टेचा विषय झाला. गावकऱ्यांनी फक्त गावाशेजारी एक किलोमीटर इतकीच नदी नांगरली. जून कोरडा गेला, जुलैत पहिला पाऊस चांगला आला. मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही; नांगरलेल्या नदीने रात्रीत सर्व पूरपाणी पिऊन टाकले. अवघ्या चोवीस तासात सारे पाणी जिरून गेले. आणि शिवारातील बोर जिवंत झाले. पाचशे फूटावरचे पाणी नव्वद फुटावर आले. लोक आनंदले. सकाळी परिसरातील मोटारींनी जोर फवाऱ्यांनी पाणी फेकले.
तत्कालीन जिल्हाधिकारी असीमकुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांनी `वॉटर मॅन ऑफ शहादा' असे म्हणून तात्यांचे कौतुक केले होते. महाराष्ट्नचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळया प्रयोगाची पाहणी करून कौतुक केले.
नदी नांगरण्याची ही अभिनव कल्पना कशी सुचली? तात्या बोलले, `दरवर्षी येणाऱ्या गढूळ पूरपाण्यातले `फाईन पार्टीकल' वाळूत साचून साचून दोन-तीन फुटावर हे पार्टीकल सेटल होतात, थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत जाते. अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून जाते. अनेक वर्षांच्या अभ्यास आणि चिंतनातून समस्येचे हे कारण लक्षात आले.
खेतीया या मध्यप्रदेशातील शहरापर्यंतच्या अनेक गावातील लोकांनी नंतर सातत्याने गोमाई नदी नांगरली आहे, आणि वाहून जाणारे पाणी आपल्याच गावात जिरवले आहे. हे तात्यांच्या कल्पक प्रयोगाचे फेलत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर जिवंत करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतल्यास उत्तर नक्की सापडेल. मोतीलाल तात्या पटेल या वेड्या माणसासारखा परिपप् विचार शेतकऱ्याने करावा; बस!!
-सुहास खानवलकर, पुणे     फोन-९४०३९२८५२०

जयंत नारळीकर
कोल्हापुरातील महाद्वार रोड वांगी बोळासमोरील एका इमारतीवर `नारळीकर भवन' अशी अक्षरे दिसतात. याच इमारतीत (जुना वाडा) जयंत विष्णू नारळीकर यांचा १९ जुलै १९३८ला जन्म झाला. त्यांचे वडील रँग्लर होते, मामा डॉ.हुजुरबाजार (त्यांचा वाडा भेंडे गल्लीतील गणेश मंदिराजवळ आहे.) हे संख्याशास्त्रज्ञ होते. जयंत नारळीकर यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात, पुढील शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले. `टाटा' शिष्यवृत्ती मिळवून पुढील अभ्यासासाठी ते केंब्रिज येथे गेले. डॉ.फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली खगोल भौतिकशास्त्रात संशोधन करून त्यांनी डॉक्टरेट संपादन केली. या जोडीने `इलेक्ट्नेडायनामिक्स' या शाखेत संशोधन करून `हॉईल-नारळीकर' सिद्धांत प्रसिद्ध केला. त्यास जागतिक कीर्ती मिळाली.
भारतात परत आल्यावर त्यांनी टाटा संशोधन केंद्रात भरीव काम केले, प्राध्यापक म्हणूनही काम केले. भारतातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्यांनी कृष्णविवर, रेडिओ लहरी, गुरुत्वाकर्षण, अवकाश विज्ञान अशा विविध विषयांत मोलाचे संशोधन केले. पुणे येथील (आयुका)च्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
नारळीकर हे `विज्ञान लेखक' म्हणून परिचित आहेत. विज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून त्यांनी विपुल लेखन केले. खगोलशास्त्रावर आधारित `ललित' लेखनही केले. दूरदर्शनच्या माध्यमांतूनही त्यांनी विज्ञान प्रसाराचे काम केले. डॉ.शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, युनिस्कोचा कलिंग पुरस्कार, राष्ट्न्भूषण फाउंडेशन पुरस्कार या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. ब्रिटनच्या रॉयल सोसायटीचे ते सन्माननीय सदस्य आहेत.
-जयंत नारळीकर, `इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्नॅनॉमी अँड अॅस्ट्नॅफिेजक्स'(आयुका), पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड, पुणे-०७   फोन-०२०-२५६०४१०० 

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन