Skip to main content

06 July 2015

स्वार्थरहित कर्म हेच तत्व
- धनंजय कीर
८ जून १९१४ रोजी
लोकमान्य टिळक
मंडालेच्या तुरुंगातून सुटले.
त्याची कुठे वाच्यता होऊ न देता,
त्यांना थेट पुण्यात आणून
पोचविण्यात आले.
बंदिवासातील टिळकांचे महत्कार्य
म्हणजे `गीतारहस्य'.

या ग्रंथाचे हस्तलिखित तयार होते.
पण हा विषय
सर्वसामान्यांस कळावा
म्हणून त्यांनी
गणेशोत्सवात चार व्याख्याने दिली. त्यानंतर छपाई होऊन
जून १९१५ मध्ये
`गीतारहस्य' लोकांसमोर आले.
त्यास आता शंभर वर्षे झाली.

गीतारहस्याच्या शताब्दीनिमित्ताने
आणि २३ जुलै (१८५६) या
टिळकांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने
त्यांच्या कर्मयोगी भूमिकेविषयी...
जीवन, नीती आणि धर्म यांचे हिंदू तत्त्वज्ञान सांगणाऱ्या `गीतारहस्य' या ग्रंथाचे मुद्रण सुरू झाले होते. हे काम योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही ते पाहण्यास टिळक रोज सकाळी छापखान्यात जात. या ग्रंथासाठी स्वदेशी कागद वापरला जाईल यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. त्या लेखनाला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टीचा मागोवा घेत ते म्हणाले, ``माझ्या लहानपणी मोठी माणसे नेहमी सांगत की, पूर्णत: धार्मिक आणि खरे तत्त्वाधिष्ठित जीवन हे दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यापासून निराळे असते. ऐहिक जग आणि ईश्वर या दोन्हींचा विचार एकाच वेळी करता येणार नाही. हिंदू धर्माच्या सर्व मूलतत्त्वांचा `भगवद्गीता' या ग्रंथामध्ये समावेश आहे असेही मला लहानपणी सांगण्यात आले. असे असेल तर आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात शोधता येतील, असा विचार मी केला.''
आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, ``ज्ञान अथवा भक्तीच्या मार्गाने परमात्म्याशी तादात्म्य पावल्यानंतरही या नश्वर जगात प्रत्यक्ष कार्य करीत राहिले पाहिजे असे प्रतिपादन गीता करते, या निष्कर्षाप्रत मी आलो. ज्ञानयोग आणि भक्तियोग हे दोन्ही, गीतेने शिकवण दिलेल्या कर्मयोगाला साह्यभूत ठरतात. गीता जर हतवीर्य अर्जुनाला युद्धाला सज्ज होण्याची-कृतीची-शिकवण देण्यासाठी सांगितली असेल तर, या महान ग्रंथातील अंतिम पाठ केवळ भक्ती अथवा ज्ञानाचीच शिकवण कशी देईल? खरे पाहता, हवा म्हणजे प्राणवायू वा हायड्नेजन नव्हे, अथवा दुसरा कोणता एकटाच वायू नसून ते त्या सर्वांचे विशिष्ट प्रमाणात असलेले मिश्रण आहे, त्याप्रमाणे भगवद्गीता हे या सर्व योगांचे एकजीव असे मिश्रण आहे.''
गीतेने दिलेल्या संदेशाबद्दल बोलताना त्यांनी मत नोंदविले की, अज्ञात काळापासून कर्मबंधन हे भारतात एक पवित्र परंपरा मानले गेले आहे आणि केवळ साधना ही जीवनोद्देश असता कामा नये. `हाताची घडी घालून बसणाऱ्याचे आणि आपला भार दुसऱ्यावर टाकणाऱ्याचे परमेश्वर रक्षण करील अशी कोणीही अपेक्षा करू शकत नाही.' टिळकांची खात्री होती, `आळशाला देव साहाय्य करीत नाही. स्वत:च्या उन्नतीकरिता तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असाल तरच सर्वशक्तीनिशीच्या मदतीवर तुम्ही विसंबू शकता. तथापि तुमच्या परिश्रमाचे फळ तुम्हालाच मिळेल असे मानता येणार नाही. नेहमीच तसे होणार नाही. तेव्हा आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करूया आणि पुढील पिढ्यांना त्यांची फळे चाखू द्या! ज्यांची फळे तुम्ही खात आहात त्या आम्रवृक्षांची लागवड तुम्ही केली नव्हती हे ध्यानात घ्या! आपली मुले आणि त्यांच्या वंशजांना आता लाभ मिळेल. आपल्या हाती आहे तो फक्त प्रयत्न आणि कार्य! म्हणूनच आपण प्रयत्नांत कुचराई करता कामा नये, न जाणो कुचराईचा शाप आपण ओढवून तर घेणार नाही ना! फक्त कृती हेच आपले मार्गदर्शक तत्त्व असू द्या, स्वार्थरहित आणि पूर्ण विचारांनी केेेलेली कृती!
`स्वार्थपरायण हेतूने ऐहिक जीवनाचा उपभोग घेऊन थकलेल्या व्यक्तींचा वेळ जावा, याकरिता गीता सांगण्यात आली नव्हती. अथवा असे ऐहिक जीवन जगण्याची तयारी करण्याचे प्राथमिक धडे म्हणूनही सांगण्यात आली नव्हती.' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत टिळकांनी लिहिले, `तर मोक्षप्राप्तीकडे दृष्टी ठेवून ऐहिक जीवनातील मनुष्याची खरी कर्तव्ये पार पाडण्यासाठी जीवन कसे जगता येईल याचा तत्त्वज्ञानधिष्ठित उपदेश करण्यासाठी ती सांगण्यात आली आहे.'
थोडक्यात संन्यस्त जीवन नव्हे तर योग्य आत्मप्रत्यय आल्यावर कृतिशील जीवन जगणे हेच मानवी अस्तित्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे आणि गीतेने संन्यस्त नव्हे तर कृतिशील जीवनाचा उपदेश केला हे प्रतिपादन या महान ग्रंथाने केले. मनुष्यप्राणी आणि विश्व यांच्या परस्पर संबंधांची योग्य जाणीव हा गीतेचा आधार आहे, असेही प्रतिपादन या ग्रंथाने केले.
हा ग्रंथ मराठीत लिहिला होता. पहिली आवृत्ती एका महिन्यात संपली. सप्टेंबर १९१५ मध्ये दुसरी निघाली. भारतातील प्राचीन धर्मग्रंथावरील या भाष्याने टिळकांना शंकराचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य आणि रामानुजाचार्य यांच्या प्रभावळीत नेऊन बसविले. टिळकांच्या या महत्कार्याचे मूल्यमापन करताना डॉ.राधाकृष्णन यांनी उचित अभिप्राय दिला. `विद्वान टीकाकारांनी स्वत:च्या तात्त्विक आणि धार्मिक विचारांच्या पुष्ट्यर्थ भगवद्गीतेचा उपयोग केला आणि गीतेच्या खऱ्या शिकवणुकीला तसे वळण दिले. भगवद्गीतेतून सहज निघणारा अर्थ सांगून कर्मयोग हेच तिचे मध्यवर्ती सूत्र आहे हे पुन:प्रस्थापित करण्याचा टिळकांनी प्रयत्न केला आहे.'
या ग्रंथाने मराठीला समृद्ध बनविले. अनेकदा दोन दिवस घालवून नवीन शब्द तयार करीत टिळकांनी मराठी भाषेला पारिभाषिक शब्दसंपदा मिळवून दिली. हा ग्रंथ म्हणजे तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, कला आणि शैली यांचे मिश्रण होय. उत्तम पुस्तकातून लेखकाचे व्यक्तिमत्त्व प्रकटते. या ग्रंथात टिळकांचे व्यक्तित्त्व सर्वत्र उमटले. नीतितत्त्वे आणि महाभारतातील राजकारणविषयक निवडक कथासारांची त्यात  केलेली सुरेख गुंफण हे या पुस्तकाचे आणखी एक आकर्षण ठरले. अर्थशून्य सिद्धान्तानी पोसलेल्या शतकानुशतकांच्या निजधामवादाला कवटाळून बसलेल्या लोकश्रद्धेला त्यांना सुरुंग लावायचा होता.
आपला स्वत:चा असा काही सिद्धांत नसल्यामुळे आपण गीता या ग्रंथाचा आधार घेण्याचे; आपल्या मतानुसार त्यातील प्रतिपादन वळवून घेण्याचे काही कारण नव्हते, असे टिळकांनी सांगितले असले तरी `जशास तसे'ची शिकवण देणाऱ्या आपल्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या समर्थनार्थ त्यांनी तो ग्रंथ लिहिला अशी त्यांच्या काही टीकाकारांची समजूत होती. एकदा अनवधानाने, आपल्या ग्रंथलेखनामागे आपल्या राजकीय विचारांचा प्रसार हा एक उद्देश असल्याचे त्यांनी मान्य केले होते. गीतेच्या प्रत्येक भाष्यकाराने आपल्या स्वत:च्या तत्त्वज्ञानाशी जुळते असेच भाष्य केले आहे असे मत खरोखरच त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या कर्मयोगाच्या सिद्धांताबद्दल सर्वात मोठा आक्षेप घेण्यात आला तो म्हणजे, शंकराचार्यांच्या निखळ अद्वैताचा सिद्धांत टिळकांनी मान्य केला आणि विभिन्न आणि स्वभावविसंगत अशा कर्मसिद्धांताचे त्यावर कलम केले. अद्वैताचे तर्कपरिणत रूप म्हणजे संन्यास, निखळ निवृत्ती.
व्हाल्टेअरने म्हटले आहे, तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक पंथाचा स्वत:चा एक लहानसा का होईना स्वर असतो. राजकारणी टिळकांप्रमाणेच तत्त्वज्ञ टिळकांची अशा टीकेपासून सुटका झाली नाही. या पुस्तकाशी संबंधित आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. महाभारतातील युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी भीष्माला प्रणिपात करणाऱ्या युधिष्ठिराप्रमाणे टिळक शंकराचार्यांपुढे नतमस्तक झाले आणि मग त्यांनी त्यांच्याशी बौद्धिक लढाई केली. शंकराचार्यांच्या दृष्टिकोणाला असणारा त्यांचा विरोध १८९३ पासून आकारास येत होता असे दिसते.
टीकाकार काहीही म्हणोत, भगवद्गीतेवरील विविध टीकांमध्ये टिळकांच्या ग्रंथाने शंकराचार्यांच्या भाष्यापाठोपाठचे स्थान प्राप्त केले आहे.
(`लोकमान्य टिळक : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक' या ग्रंथातून)

विज्ञान-विश्वासाला विवेक हवा
परदेशी विज्ञान-समजांतून अनेक बदल जगभरात झाले. प्राचीन काळापासून रोमन-ग्रीक-सुमेरियन संस्कृतींच्या आधारे पृथ्वीतलावर मानवी समाज नांदत होता. भारतीयांचे ज्ञान, संशोधन, अनुभव आणि त्या सर्वांच्या आधारे व्यवहारांतील उपयोजन यांचा दबदबाच होता. पण गेल्या दोनपाचशे वर्षांच्या इतिहासाने त्याला कलाटणीच दिली. पाश्चात्य देशांनी जग व्यापले, त्यात त्यांचे कर्तृत्व तर आहेच; परंतु त्यांची ती जागतिक व्याप्ती जगत्कल्याणासाठी नव्हती, तर त्यांच्या स्वार्थासाठी होती. अलीकडच्या भारतात रेल्वे-पोस्ट-महसूल वगैरे सुधारणा इंग्रजांमुळे झाल्या हे जितके खरे, तितकेच हेही खरे की, त्या सुधारणा त्यांनी भारतीयांसाठी म्हणून नव्हे; तर स्वत:च्या श्रेष्ठत्वाने, वसाहतीतील गुलाम जनतेसाठी केल्या. त्या सुधारणांपैकीच एक म्हणजे भारतीय हवामानखाते.

दरवर्षी मोसमी पावसाच्या तोंडावर हवामान खात्याची हवा वाहात असते. भारतातील बहुसंख्य लोक शेतीशी संबंधित आहेत, व बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे जलविद्युत् प्रकल्प, उद्योगधंदे, घरबांधणी इत्यादी सर्वच घटक कमी-जास्ती प्रमाणात मोसमी पावसावरच आधारित आहेत. त्यामुळे देशाचे एकूण स्वास्थ्य येत्या चार महिन्यातील पावसावर प्रामुख्याने अवलंबून आहे. त्या दृष्टीने पावसाचा अंदाज भारतीय लोकांसाठी फार महत्त्वाचा असतो.

कितीही महत्त्वाचा असला तरी शेवटी तो `अंदाज' आहे. तो जास्तीत जास्त बरोबर येऊ शकेल, अथवा चुकूही शकेल. त्या अंदाजावर किती आणि कसा विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हवामान खात्याने, खूप पाऊस पडेल असे म्हटले तर लोक छत्री घेत नाहीत, याचा अर्थ त्यंनी नकारात्मक विश्वासच ठेवलेला असतो! हवामान खात्याच्या व एकूणच या विज्ञानविषयक संशोधनांच्या मर्यादा असतात, तो त्यांचा दोष नव्हे. अंदाज म्हणजे करार किंवा वचन नव्हे त्यामुळे पावसाची भाकिते, आडाखे, ठोकताळे या स्वरूपात कोणी काही सांगतो, मांडतो त्याचे अवडंबर माजविण्यात काही अर्थ नाही. तो निसर्ग आहे. कधीतरी तो अनैसर्गिक वागणार!

या प्रकारच्या आधुनिक विज्ञानावरती तसे अनाठायी विसंबून परंपरागत जुन्या शास्त्राना तुच्छ लेखण्याचीही एक परंपरा दिसू लागली आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गुढीतोरण उभारण्याबरोबरच पंचांगाची पूजा करून त्यातील वर्षफल वाचण्याची प्रथा पूर्वकालापासून आपल्याकडे आहे. पाऊसकाळ, पीकपाणी, व त्यासंबंधाने लढाया, भूकंप-वादळ, ग्रहमान, नक्षत्रांवरून त्यांच्या स्वभावगत असणारी निरीक्षणे हे सर्व, वर्षारंभास सर्वांसमोर मांडले जात असे. आजही काही गावांत पंचांगवाचनाची ती सामुदायिक प्रथा आहे. झडझडून पडणाऱ्या पावसाला `तरणं (पुनर्वसू) नक्षत्र', पिरपिरत रेंगाळणारा `म्हाताऱ्या'चा (पुष्य : पुक) पाऊस, सरसरसर वर्षून निघून जाणाऱ्या `सुने'चं (आश्लेषा:आसाळका) लवलवतं नक्षत्र.... इत्यादी बोलीभाषेत साऱ्या जानपदास ते हवामान समजून दिले जात असे. त्या पावसाच्या नक्षत्राला देवतारूप मानून एखादे वाहन दिल्याची कल्पना केली जाई. बेडूक-म्हैस-घोडा-मोर या प्राण्यांच्या प्रवृत्तींप्रमाणे त्या त्या नक्षत्रातील पाऊसमान होईल अशी भाकिते असत.

यालाही अंदाज असेच म्हणत, तसेच म्हणायला हवे! त्या अंदाजांसही वर्षानुवर्षांची निरीक्षणे व अभ्यास यांचा आधार होता. तेही अंदाज चुकत होते; पण त्यावर लोकांची श्रद्धा आणि विश्वास होता. त्यावर जनजीवन अवलंबूनच राहात होते अशातला भाग नाही. दुष्काळ-पूर-रोगराई वगैरे येत असत. पीकपरिस्थिती `बंदा रुपाया' म्हणजे सोळा आणे कधीच नव्हती, परंतु दहा-बारा आणे पिकावर माणसे समाधानी असावीत. वाया गेलेल्या चारसहा आण्यांसाठी कुणी भरपाई, माफी, पॅकेज देण्या-मागण्याची पद्धत नव्हती. कमी दाबाचा पट्टा, अल् निनो प्रवाह अशा संज्ञा, अर्धसाक्षर व बालबुद्धीची माणसे उच्चारत नव्हती.

मुद्दा असा की ग्रामजोशाचे पंचांग किंवा आजच्या वेधशाळांचे हवामान खाते जे काही बोलतात-सांगतात ते निसर्गाबद्दल अंदाजच असतात हे समजून घ्यायला हवे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात साधारणत: कोकणात मान्सूनचा पाऊस येतो. मुंबई शहर आजवरच्या कोकणातच जमा होते. तरीसुद्धा देवगड-वेंगुर्ल्यास पाऊस ओतू लागल्यानंतर मुंबईत तो दर्शन देत असे. त्यानंतर आठवड्याभराने पश्चिम महाराष्ट्नत पहिल्या सरी येऊ लागत. सोलापूर-मराठवाडा या भागात मान्सूनचा पाऊस फारसा नाही. दिवाळीच्या आसपास तो पडतो. गुजरातमार्गे उत्तर भारतात मान्सून यथावकाश पोचतो.

हा सर्व मोसमी निसर्ग आहे. त्याचा मोसम महाप्रचंड भारत देशावर वेगवेगळा असतो. अलीकडे वैज्ञानिक साधनांमुळे आणि टीव्हीवरच्या धबडग्यामुळे, अंदमानात ढग जमू लागले की `पाऊस आला' अशी हाकाटी सुरू होते. एकीकडे मुंबईतील नालेसफाईवर झोड उठवायची, तर दुसरीकडे पूर परिस्थितीसाठी शासनयंत्रणा तयार असल्याची ग्वाही द्यायची. या दोन्हीलाही `माध्यमांचा दंगा' एवढेच नाव पुरेसे आहे. पाऊस पडायचा तेव्हाच पडतो आणि तो जे काही भलेबुरे करायचे तेच करतो. जून तिसऱ्या आठवड्यात पावसाची दोनतीन दिवस झड बसली तेव्हा `मोदी सरकारचे नशीब' मोठे म्हणून झाले. आता पावसाने ओढ दिल्यानंतर मोदी सरकारपेक्षाही या माध्यमवीरांना भलतीच काळजी वाटू लागली आहे. धान्याची कोठारे भरलेली असून संभाव्य दुष्काळाची चिंता नको, असे अर्थमंत्र्यांपासून सर्वांनी सांगितले तरीही त्यांचा विश्वास बसत नाही. उलट लोकांमध्ये घबराट उडवून देणे एवढाच तो उद्देश असतो. याला विज्ञानाधारित समाज म्हणायचे, की बाष्कळ उल्लूगिरी म्हणायची एवढाच प्रश्न आहे. विज्ञान कमी चूक असते, विवेक महत्त्वाचा असतो.    ***

कार्यकारण भाव आवश्यक
मे अंकात प्रा.सुनीलकुमार लवटे यांचा `आपण मागे का?' हा व्याख्यानवृत्तांत मननीय आहे. आपण अजूनही पुराणकाळातील भूतकाळातच वावरतो आहोत. ऋषीमुनींना अख्ख्या विश्वाचं ज्ञान होतं, सध्या उडत असलेल्या जम्बो विमानांपेक्षाही मोठी विमानं भारताच्या आकाशात उडत होती, महाभारतीय युद्धात अश्वत्थाम्यानं अणुबाँब फोडले, क्लोनिंग, आयव्हीअेफ वगैरे तंत्रज्ञान पुराणकालीन पूर्वजांना होतं, आजच्या युगात शास्त्रज्ञांनी लावलेले शोध हे भारतात पूर्वीच लागलेले होते पण त्याचे श्रेय मात्र पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी घेतलं वगैरे वगैरे समज पुष्कळजण बाळगून असतात.
खरं म्हणजे आपल्या पुराणकालीन विचारवंतांनी, त्यांनी सांगितलेल्या विचारांचे किंवा संकल्पनांचे कार्यकारणभाव दिले नाहीत किंवा ते सांकेतिक भाषेत लिहून ठेवले ते आपल्याला कळलेच नाहीत. आम्ही सांगतो ते मुकाट्यानं ऐका, प्रश्न विचारू नका, शंका घेऊ नका.... असं धोरण ठेवलं. या पृथ्वीवर, लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचे विज्ञानीय पुरावे सापडतात. पण आपल्या पुराणकालाचे, पोथ्यांशिवाय कोणतेही पुरावे सापडले नाहीत. खरा प्रश्न हा आहे की, त्या पुराणकालच्या ज्ञानाचा आपण आज काही वापर करू शकतो का? त्या मोठमोठ्या विमानातून आपण प्रवास करू शकतो का? केवळ मंत्र पुटपुटून आपण अणूबॉम्ब फोडू शकतो का? पुराणकालीन वैद्यकीय उपकरणं वापरून बायपास शल्यक्रिया करू शकतो का?
आपण भूतकाळातून वर्तमानात आलो नाही, हे ही आपण मागे पडण्याचं एक कारण असू शकतं.
- गजानन वामनाचार्य, मुंबई
मोबा. ९२२३५८९७६०


वारीला काही पर्याय
जूनमधल्या अंकात पंढरीच्या वारीविषयी संपादकीय खूप चांगले आहे. ही समस्या व शासकीय मर्यादा त्यात स्पष्ट केल्या आहेत, त्याचबरोबर त्यावर बंदी घालणेही चूक ठरेल असे म्हटले आहे. या प्रश्नावर काही पर्याय मला सुचतात.
गावोगावांतून ज्या मुख्य अथवा अन्य दिंड्या व पालख्या निघतात त्यासोबत मोजकेच वारकरी असावेत, ते शेवटपर्यंत जावेत. इतर सर्वांनी आपापल्या गावापासून साधारण दोनच टप्प्यांवर थांबावे. उदाहरणार्थ पुण्याच्या वारकऱ्यांनी शिरवळपर्यंत, फलटणच्या लोकांनी नातेपुत्यापर्यंत, कोल्हापूरवाल्यांनी सांगलीपर्यंत, व सांगलीकरांनी सोनी-भोसेपर्यंत जाऊन तिथे परत फिरावे. पालखीसोबत ५-१०-२० एवढीच संख्या निश्चित राहील व बाकीचे सगळे एकदोन टप्प्यांवर थांबून परत येतील. तिथून पुढे एकदोन टप्पे, दुसरे वारकरी जातील. यामुळे वारीत चालण्याचा अनुभव वा आनंद सर्वांना मिळेल, पण संख्या फुगणार नाही.
दुसरा एक पर्याय म्हणजे एसटी बस वगळता अन्य खाजगी वाहने बंद करावीत. सामान्य वारकरी सामान्य सोयीने जाईल. कार, फटफट्या व इतर भपकेबाज वाहने रोखता येतील. त्यामुळे इव्हेंटगिरी बंद होईल.
वर्षात एकूण २४ एकादशा असतात. अधिक मास असेल तर २ जास्तच. आषाढी व कार्तिकी तसेच चैत्री, माघी, श्रावणी यांचेही महत्त्व असते. वास्तविक सगळया एकादशा सारख्याच हे समजून घ्यावे आणि साधारणत: २ जिल्ह्यांना एक एकादशी, याप्रमाणे वाटून द्यावी. फारतर तूर्तास शुक्ल पक्षातील ११ एकादशा विभागून घ्याव्यात. महाराष्ट्नचे ३४ जिल्हे व जवळच्या राज्यांतील १४ जिल्हे धरून ४८ जिल्ह्यांना वर्षभर विभागून दिल्यास गर्दी विभागली जाईल; व्यवस्थेला सोयीचे होईल. या विभागणीचे निकष तारतम्याने ठरवावेत.
शासकीय पूजा व मंत्र्यांचे समारंभ हे प्रकार बंद करावेत. मंत्री वा मुख्यमंत्री, त्यांच्या पदाचा सरंजाम वगळून सामान्य भक्त म्हणून येऊ शकतील; पण ते देवळात येऊन गेलेले कुणालाही समजू नये अशी काळजी घ्यावी.
अर्थात कोणताही पर्याय अंमलात आणायचा तर त्याचे काही फायदे-तोटे होणार. ओरडही होणार. पण प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन वारकरी मंडळे व सरकार यांनी समंजसपणा दाखवायला हवा.
- मुकुंद करमरकर,  वानलेसवाडी (सांगली) फोन :०२३३-२६०१९७४

हा; हाच तो क्षण!
डॉ. अभय बंग यांच्या `साक्षात्कारी' पुस्तकात एक चित्र आहे. एका मठात दोन भिक्षू ध्यानस्थ बसलेत. एक वयोवृद्ध-अनुभवी, दुसरा नुकता `ती वाट' चालू लागलेला-तरुण. त्या तरुणाच्या मनात खूप उत्सुकता आहे, ध्यानासंबंधी काही स्वप्नाळू कल्पना असाव्यात. तो ध्यानस्थ व्हायचा प्रयत्न करतोय; पण काय घडेल,-कधी?-कसं वाटेल?.... उत्सुकतेने तो त्रासलाय! वृद्ध भिक्षूला तो विचारतो, `काय होणार? कधी?' वृद्ध शांतपणे उत्तरतो, `धिस इज इट! बस् हेच `ते'! साध्यही, साधनाही. याच क्षणाशी एकरूप होणं. तादात्म्य, पावणं, थांबणं, `क्षणस्थ' होणं, हेच तर साधायचं!'
- तेच सर्वात अवघड आहे! हल्ली कुठलाच क्षण आपल्याला त्याच्याशी थांबू देत नाही. नोकरी-उद्योग-घर याच जबाबदाऱ्या नव्हे तर, मीटिंग्ज, नेटवर्किंग, शॉपिंग... आणि पुन्हा या सगळयापासून `लांब' कुठंतरी पर्यटन! पुन्हा तिथे ओरबाडलेले क्षण जगाला कधी दाखवतोय याची घाई! असं वाटतंय, काळालाच घाई झालीय. व्हायरस लागलाय. एक क्षण काही भलं बुरं घेऊन समोर उभा ठाकतो;-तोच पुढचा क्षण त्याला ढकलून देत स्वत: येतो... आम्हाला तर क्षण न् क्षण `वसूल' करायचाय. मग दोन्ही हातांनी सगळं गोळा करायचा प्रयत्न सुरू राहातो.
पूर्वीचे दिवस आठवू.... तेव्हाही करिअर होतं, घाई होती, स्वप्नं होती, - पण अनुभव ग्रहण करण्याची साधनं होती पंचेंद्रियं!-फोन नव्हे!! तेव्हाही सूर्यास्त पाहायला झुंबड असायची, काही फोटोही पाहायला मिळत पण साक्षात् अनुभव घेण्यासाठी वेळ देत होतो! निसर्गाची उधळण, काजळणाऱ्या दऱ्या, हलकेच येणारा गारवा, निश:ब्दपणे एकमेकांशेजारी बसून किंचित् हुरहुर आतल्या आत साठविण्यासाठी जात होतो... पावसाची पहिली सर, गंध, गारवा आजही असतो. पण सर्वांच्या आधी मोबाईलवर फोटो टाकायच्या नादात ती `अनुभूती' मनात झिरपत नाही! लग्नात फोटो, शूटिंग हे ठीक, पण आता वधूवर स्वत: तयार होण्यात आणि नंतर `सेल्फी' काढण्यात इतके गुंग असतात, की आयुष्य नव्या वळणावर नेणारा, एकात्मतेची जाणीव देणारा तो सुंदर सोहळा अनुभवला का? हे क्षण फोटोत साठवणं अस्वाभाविक नाही, पण सारं काही त्याच क्षणी जगापुढं `टाकणं'; याचं महत्त्व अती वाढलंय.
मुळात तो क्षण, प्रसंग समग्रपणे अनुभवलाच नसेल तर, नंतर त्याचे फोटो पाहताना `आत' काहीच हलणार नाही! ती घटना `अनुभवण्या'त आनंद असतो. पत्रकाराच्या त्रयस्थपणे आणि घाईने तो प्रसंग कव्हर करून पुढच्या प्रसंगासाठी धावण्यात नसतो. प्रत्येक क्षण, प्रसंग, भावना, मूड `शेअर' करायला हरकत नाही, पण करायलाच हवा का? काही गोष्टी फक्त स्वत:शी शेअर करायच्या असतात.
परवा एकांकीका स्पर्धेच्या एका नाटकातलं वाक्य अक्षरश: आत जाऊन रुतलं. एक तरुण आपल्या मित्राला म्हणतोय, ``आपण आपलं आयुष्य नुसतं सादर करतोय यार, साजरं करतच नाही आहोत!'' ते वाक्य मागंच लागलंय! नेते-पुढारी-कार्यकर्ते स्वत:ला वर्तमानपत्रातून `सादर' करतायत.... फलकांवरून सादर होतायत, वॉटस्पवरच्या सादरीकरणाचा वर्षाव आहे. बाळ जन्मलं-टाक फोटो, अपघात-मृत्यू-हत्या-आत्महत्त्याही `सादर' केल्या जातात. सादरीकरणाचा मोह काही सुटत नाही!
खरं तर `साजरे' करावेत असे कितीतरी छोटे, सुंदर क्षण दर दिवशी आपली वाट पाहात असतात... कवितेची सुंदर ओळ, सुंदर फूल, मंद झुळूक... पण त्या क्षणापाशी थबकायलाच वेळ नसतो. असे सुंदर क्षण दाखवणारे `मेसेज'ही असतात! ते चांगलेच असतात, पण ते गारपिटीसारखे अतोनात, आणि अवकाळी. मन शांतवायचं सोडून कातावायला लागतं. काहीतरी निसटल्याची, गमावण्याची हुरहूर आहे. आयुष्य साजरं न करता सादर करत सुटल्यामुळे ती आहे. मुलं तासन् तास कार्टुन पाहतायत, पण ती खळखळून हसत नाहीत. कपडे, चपला, खेळणी, वस्तू यांचा ढीग लावला तरी त्यांच्या चेहऱ्यावर तृप्ती दिसत नाही. अजून किती लाड केल्याने `हवी तशी' वागतील? घरातल्या सर्वांकडेच स्मार्ट फोन आहेत, कनेक्टेड असूनही आऊट ऑफ रीच! वॉटस्अपवर उपदेशांची अमृतवाणीही स्रवत असते, पण ती `इनवर्ड' होत नाही, फक्त `फॉर्वर्ड' होते. आजची अनंत अवधानं सांभाळताना त्या क्षणाचं मागणं, म्हणणं काय आहे, याचं अवधान राहात नाही. रोज सेल्फीज्चा रतीब; पण `सेल्फ'कडे पाहायला वेळच नसतो. चांगला विचार शेअर करण्यासाठी असतो, रुजवायसाठी वेळच नाही. आम्हालाही बदलायचंय, पण तो बदलही `कुणीतरी घडवेल' याची आपण वाट पाहात आहोत. त्या भिक्षूसारखंच आम्हीही `स्व'स्थ होऊन स्वत:च्या आत न डोकावता काहीतरी `घडेल' आणि सगळं बदलेल याची वाट पाहतोय. पण हा स्वत:तला बदल आत उमलून यावा लागतो आणि त्याची बीजं रुजवण्याचा `योग्य' क्षण हाच, आत्ताचाच तर असतो!
आपण फिरायला गेलेलो असू, काम करत असू, व्यायाम करत असू वा समारंभात असू, त्या क्षणी तिथे पूर्ण जागृत संवेदनांनिशी हजर असणं हेच `ते' सुख असतं! त्याची इतर कशाशी भेसळ वा तुलना करायला गेलं की ते नासतं. घरातले सगळे निखळ गप्पांमध्ये रमलेले. एकत्र बसून हसत खेळत जेवणं चालली आहेत, साध्या कामातही तन्मय झालं, रंगून गेलं तरी त्यात आनंद आहे. या साध्यासुध्या आनंदांची चव कधीतरी चाखवायला हवी ना! गाणं शिकतोस, तुला ते आवडतं, कळतं, म्हणताना आनंद वाटतो, छान म्हणतोस..... बस्! धीस इज इट. पुरेसं आहे. कुणातरीपेक्षा छान, कुठली तरी ट्नॅफी आणलीस तर छान, त्याच्या आधी ते लाभलं तर छान, असं कशाला? आपण करतो त्या गोष्टीत आनंद मिळतो? तो खरा, निर्भेळ, पण दुर्मीळ आनंद!
केवळ आनंदच का? कधीतरी दु:ख, निराशा, अपमान, अपयश हेही भेटीला येईल. त्याही क्षणांना कवेत घेण्याची जिंदादिली हवी. तो क्षण घाईघाईनं परतवायचा, नाकारायचा कशासाठी? येणाऱ्या प्रत्येक क्षणाची माळ गुंफत पुढे जायला हवं; तरच पुढच्या चांगल्या क्षणाची चव कळणार! सुख-दु:ख यांच्या अनिश्चिततेविषयी `हा क्षणही जाईल' हे तत्वज्ञानही सांगितलं जातं. पण `धिस ईज इट' हे जास्त सकारात्मक वाटतं.
मागच्या उन्हाळयात नैनितालमध्ये एका आध्यात्मिक शिबीरासाठी गेलो होतो. तिथल्या प्रमुख मार्गदर्शकांनी पहिल्याच सत्रात सांगितलं, `आठवड्यात एकदम `तयार' बनून जायचं, म्हणून खोलीत बंद होऊन तासन् तास ध्यानाशी झोंबी घेत बसू नका. बाहेर जा. सुंदर, आश्वासक, चैतन्यमय निसर्ग बोलावतोय, त्याला भेटा. आपला एक मित्र निवडा. एखादं झाड, बागेचा कोपरा, डोंगर, फूल..कुणीही. त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करा. हळूहळू तुम्हाला असं जाणवेल की निसर्गही तुम्हाला काही सांगतोय ते ऐका, बस्स! धीस इज इट!, दोन दिवसांतच सप्तपर्णीचा एक विशाल वृक्ष मित्र बनला. त्याच्या पायाशी असलेल्या कट्ट्यावर बसलं की समोर देवदारांनी रोमांचित झालेला पर्वत दिसायचा. त्या झाडानं सांगितलं की, हे सगळं आज आहे उद्या नसेल असा विचार कशासाठी करायचा? आत्ता तू आहेस, मी आहे, हा पर्वत, ही शांतता, प्रसन्नता आहे, आणि आपणही आहोत. हा विचार त्या झाडानं दिला आणि इतकं हलकं, छान वाटलं! मी कशात तरी असेनच की! `या सगळया सुंदरतेचा मी एक भाग आहे, आणि असेन' या विचारानं मला आश्वासित केलं, उमेद दिली. अर्थात् संपूर्णपणे बदलून  टाकेल असा निर्णायक, परिपूर्ण क्षण मलाही गवसलेला नाही. पण पुढच्या क्षणाची काळजी न करता, आल्या क्षणापाशी थबकून, त्याचा आस्वाद घेण्याचा धीर त्यानं दिला. ही जाणीव दिली की धिस ईज इट! हाच क्षण जगण्याचा आहे. त्या त्या क्षणात जगायला शिकायची सुरुवात झाली; म्हणजेच आत्ताशी आपल्या जगण्याची सुरुवात झाली!!
- विनिता तेलंग, सांगली

काशीयात्रा
प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकदा काशीयात्रा घडावी अशी इच्छा असते. `काशीस जावे नित्य वदावे' कधीतरी काशीयात्रा घडेल!
इ.स.१७८०च्या काळात उत्तरेत सतत दंगेधोपे चालू असत. ठग, चोर, लुटारूंची भीती असे. काशीस जाण्याचे बेत करणे धाडसाचेच होते. जाताना सर्व निरवानिरव करूनच माणसे जात. जगलो वाचलो तर परत येऊ ही मनाशी खूणगाठ असे. अशा त्या काळात गोपाळराव गोविंद पटवर्धन (पेशवे सरदार)यांच्या पत्नी सरस्वतीबाइंर्नी काशीयात्रा केली, त्याची ही हकीगत.
सरस्वतीबाइंर्नी काशीला जायचे ठरवले ही वर्दी चोहोकडे पोहोचली. सांगली, कुरुंदवाड, गणेशवाडी, हरीपूर, तासगाव, इचलकरंजी, जमखंडी इत्यादी ठिकाणाहून यात्रेकरू त्यांच्याबरोबर जाण्यास पटवर्धनांच्या मिरजेत गोळा झाले. बाइंर्नी सर्व आखणी केली व १७८३च्या ऑक्टोबरमध्ये ही चारपाचशे यात्रेकरू मंडळी निघाली. वाटेत आणखी यात्रेकरू मिळत गेले. बाइंर्च्या दिराने म्हणजे  गंगाधरपंत पटवर्धन यांनी बरोबर उंट, घोडे, डोल्या, स्वारशिपाई, शागीर्द वगैरे दिले होते. मार्गात त्यांस मदत व्हावी म्हणून व त्यांना सर्व सामग्री मिळावी म्हणून परशुरामभाऊंनी खालेरीच्या शिंदे यांस पत्रे लिहिली होती. पुणे दरबारातून खुद्द पेशव्यांची पत्रे शिंदे, होळकर, कमाविसदार यांस गेली होती. ही मोठी यात्रा एका स्त्रीने जबाबदारीने पार पाडली म्हणून कौतुक.
वाटेत यात्रेकरू सामील होत होत हा जथा दहा हजारांच्या वर झाला. नातेवाईक, गरीब, श्रीमंत अठरापगड जात या यात्रेत सामील होती. वाटेत संकटे होतीच पण बाइंर्नी हिमतीवर यात्रा पूर्ण केली. महेश्वरास असताना बातम्या आल्या की, उत्तरेत दुष्काळ पडला आहे त्यामुळे दरोडेखोरांच्या टोळयांचा उपद्रव आहे. बाइंर्नी सर्वांना धीर देत यात्रा पुढे काढली. वाटेत अहल्याबाइंर्नी, शिंदे यांनी मदत केली. यात्रा सागरपर्यंत गेली. तिथे बाळाजी गोविंद बुंदेले (मूळचे खरे) यांनी पर्ण्याच्या राजास पत्रे दिली. यात्रा पर्ण्यास गेली. वाटेत पाऊस लागला. पटकी उद्भवली. यात्रेतील चारपाच माणसे रोज मरू लागली. पुढे पाऊस कमी झाला व पटकी ओसरली.
प्रयाग, काशी, गया इंग्रजांच्या अंमलाखाली होती. प्रयागास अर्धा अंमल सुजाउदौला याचाही होता. पेशव्यांचे पत्र इंग्रज अंमलदारास होते. त्याने साहाय्य केले. `रहदारीचे दस्तक व तेलंगे टोपीकर असामी तीन व हरकारे जोडी यात्रा आणावयास पाठविली.' इंग्रजांचा यात्राकर होता तो त्यांनी माफ केला. प्रयाग व काशी करात सूट मिळवून दिली. महादजी शिंदे यांचे दिवाण भाऊ बक्षी यांच्या मातोश्री, मुधोजी भोसले नागपूरकर यांची कन्या बाळाबाई व गणपतराव दीक्षित नाशिककर यांचे जथे यात्रेसोबत होते.
प्रयाग करून यात्रा काशी क्षेत्रात इ.स.१७८४ फेब्रुवारी १६ रोजी पोहोचली. पुढे गया यात्रा झाली. तिथेही बाइंर्नी कर सवलत मिळवली. गयेत पटकी सुरू झाली म्हणून यात्रा परत काशीस आली. बाइंर्नी यात्रेबरोबर शेदोनशे दुकाने घेतली होती. महागाई धारणा वाढत होती. चातुर्मास संपेपर्यंत यात्रा काशीत होती. मग यात्रा फुटली. कोणी अयोध्येकडे, कोणी हरिद्वारकडे तर काहींनी मथुरा-गोकुळ-वृंदावनची वाट धरली. अशा प्रकारे विधवा सरस्वतीबाइंर्नी या यात्रेचे नेतृत्व पत्करून नाव मिळवले.
संदर्भ - मराठी राज्याचा उत्तरार्ध, खंड २रा, सन १९५२
(वासुदेवशास्त्री खरे)
संकलन-चंद्रकांत वेलणकर, मालाड, मुंबई
मोबा. ९८७००३२९९१

..... शब्दधन .....
डोळयात नेहमी अश्रूंनीच राहू नये
स्वप्नांनाही त्यात सामावून घ्यावं
स्वप्नांनी मात्र आयुष्याशी
तडजोड करूनच राहावं.

सुख सुख म्हणजे
असतं तरी काय,
दु:खाच्या शिंपल्यात बसतं
मुडपून आपले पाय

विश्वास दिसत नाही
अनुभवावा लागतो,
अनुभव सत्य आहे
विश्वास मिळवावा लागतो
जी सौंदर्याला सजीव करते, व भीषणतेला निर्जीव बनवते ती खरी कला. चित्रकला म्हणजे मूक काव्य, आणि काव्य म्हणजे वाचा असलेली चित्रकला.
माणसे जन्माला येतात, माणुसकी निर्माण करावी लागते.
काळ बदलूद्यात, माणसे बदलूद्यात, आवडीनिवडी बदलूद्यात, पण आई हे नातं व हाच एक शब्द सगळया बदलांना, स्थित्यंतरांना, लाटांना, वादळांनादेखील तोंड देऊन जसाच्या तसा राहिलाय. त्यावर बारीकसा ओरखडा उठला नाही.
- सौ.विजया म. जालिहाळ
गेंडामाळ, शाहुपुरी, सातारा
मोबा.९४०५७४६५२६

वृक्षारोपण करताय?
वड आणि पिंपळ ही झाडे सरळ मातीत कुठेही उगवत नाहीत-रुजत नाहीत. वडाच्या - पिंपळाच्या झाडाखाली टेंबरांचा सडा पडलेला असतो. पण त्या परिसरात एकही बीज रुजत नाही असे का? कावळयाच्या विष्ठेतून या झाडांचे बी पडले तरच प्रक्रिया झालेले बी रुजते असे म्हणतात.
काँक्रीटच्या अभेद्य भिंतीला फट पाडून, त्यात आपली मुळे घुसवून ही झाडे आपले ठाणे मजबूत करतात किंवा बुलंद कड्याला मुळांचे विळखे घालून त्याला कैद करतात. हे सामर्थ्य, ही किमया या झाडांना कशी साधते?
या वृक्षांना मातीची, मातीतून येणाऱ्या पाण्याची व पावसाची गरज नसते का? हवेतले बाष्प आणि सूर्यप्रकाश यांच्यावरच ते
आपला अफाट संसार थाटतात का?
रोगराई, प्रदूषण यांना ही झाडे
बिनतोडपणे तोंड देतात, हे कसे घडते?
पिंपळाची झाडे पुष्कळदा बाण्डगुळांचा संभार आपल्या अंगाखांद्यावर माजू देतात.
ही शरणागती का?
या वृक्षद्वयीला पाच-सातशे वर्षांचे आयुष्य सहजपणे लाभते हे खरे का?
अश्वत्थ या नावाची व्युत्पत्ती शास्त्रज्ञांना आव्हान देणारी आहे. (अ=नाही, श्व=उद्या त्थ=सद्यस्थिती) हे वृक्ष विशेषत: पिंपळ म्हणजे दिवसरात्र प्राणवायूची निर्मिती करणारी जबरदस्त फॅक्टरी आहे. या दोन दिव्य वृक्षांमध्ये दीर्घायुष्य, प्रतिकारक्षमता, मन:शांती इ.देणारी मूलतत्त्वे सामावली असण्याची शक्यता वाटते.
- म.वि.कोल्हटकर, सातारा
फोन (०२१६२) २३२५०४
मोबा.९८९०९२८४११

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन