Skip to main content

30 may 2016

नव्या मतांचा आग्रह हवा, हट्ट नको...  हट्टाग्रह चुकीचाच
-सुविनय दामले
आमच्या सिंधुदुर्ग भागात नुकताच एक कार्यक्रम झाला. विधवा बायकांसाठी हळदीकुंकवाचा तो कार्यक्रम होता. रूढी परंपरांच्या चौकटी मोडून केलेला हा अुपक्रम थोडा धाडसाचाच म्हणावा लागेल. आपल्याकडे धर्माने किंवा शास्त्राने स्त्रियांना दुय्यम स्थान दिले आहे असे काही मंडळींचे म्हणणे आहे. त्यावर वाद घालायला हवा असे नाही. प्रत्येकाची विचार करण्याची पध्दत वेगळी असेल.

काळाला धरून आपल्या धार्मिक रूढी व सामाजिक आचरण बदलायला हवेच! त्या सुधारणा कोणी कराव्यात?  का कराव्यात? कशा पध्दतीने कराव्यात? बदलाचे अधिकार कोणाकडे आहेत? असे काही प्रश्न माझ्या मनात रुंजी घालू लागले. अलीकडच्या काळात लोेकांंच्या भावना डिवचणारे किंवा चेतविणारेे प्रकार मुद्दाम केले जातात, पण त्यांतून पळवाट आधीच शोधून ठेवलेली असते.  बाजीरावांचा आितिहास काय असेल तो असो, पण तो विषय काही लोकांच्या अभिमानाचा आहे हे तर खरे! त्यांच्यावर सिनेमा काढताना निर्मात्याने वा दिग्दर्शकाने खोडसाळपणा करायचा, पण सिनेमाच्या सुरुवातीलाच `यातील काही प्रसंग काल्पनिक असून... कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास...' असा अेक माफीनामा दाखविण्याचा सोपस्कार असतो. पुढचे चित्रण कसेही केले तरी नियमांत आडकाठी येत नाही. विरोध बारगळतो, आपले घोडे दामटता येते. प्रसार-प्रचार माध्यमांना हे ठाअूक झाले आहे, त्या संधीचा फायदा घेण्याला काही करता येत नाही. अर्थात ही काही मंडळींची जुनी खोड आहे, असे वाटते. अशा प्रकारच्या अभिनव अुपक्रमांतून आजवरच्या ऐतिहासिक शोधांची, अस्मितांची, त्याचप्रमाणे धर्मातील काही प्रथा संकल्पना समजुती व श्रध्दा यांची चेष्टा किंवा अवहेलना केली जात आहे.

विधवांची प्रतिष्ठा जपली पाहिजे यात तर वाद होण्याचे कारण नाही, आजच्या काळात त्यांंच्याविषयी आचरण पुष्कळच बदलले आहे. पण ते बदल खोडसाळ प्रचारकांमुळे झालेले नाहीत, तर ते थोर  सामाजिक नेतृत्वाने केलेल्या दीर्घ प्रयत्नांतून झालेले आहेत. विधवांच्या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या सादरीकरणात आजच्या सुधारक मंडळींचा रोख नेमका कशासाठी आणि कोणावर होता? काही गोष्टी सार्वजनिक का केल्या जातात? काही शक्यतांचा अंदाज घेअून  त्याचा विचार करायला हवा.
१. अशा सुधारकांनाही, हिंदू महिलांनी हळदीकुंकू लावणे हा एक अत्यंत आवश्यक असलेला, सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे असे वाटते.
२. हा कार्यक्रम त्यांना अतिशय स्तुत्य वाटतो.
३. हिंदू पद्धतीचा हा अुपक्रम  सर्वत्र प्रसार प्रचार करण्यासाठी राबवला जावा असे त्या  सुधारक महिलांना मनापासून वाटते.
४. हळदीकुंकू लावल्यामुळे स्त्रियांना सांस्कृतिक सुधारणा वाटते, आणि त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळते हे त्या सुधारकांना मान्य आहे.
५. फक्त महिलांनी हळदीकुंकू लावावे ही पध्दत मान्य असून त्यांना काळाच्या ओघात विधवांनाही त्या मुख्य प्रवाहात सामील करून घ्यायचे आहे.
६. महिलांनी स्वत:ला किंवा एकमेकीला हळदीकुंकू लावणे हे केवळ दिखाअू कर्मकांड असेल, पण त्यावर या लोकांचा विश्वास आहे.
७. हळदीकुंकू लावण्यामागे काहीतरी आध्यात्मिक कारणही असले तर त्याचा शोध घेण्यासाठी प्रयोग  म्हणूून हा अुपक्रम सार्र्वजनिक रीत्या राबविला गेला असेल.

केवळ हिंदू धर्मातच असणाऱ्या या कर्मकांडावर सुधारक महिलांचा जर विश्वास असेल तर अन्य धर्मांतील अशी कर्मकांडे त्यांनी शोधून काढावीत; आणि धर्मांतील सुधारणा, महिलांचे सबलीकरण, स्त्री-पुरुष  समानता, सर्वधर्म समभाव... अशा कोणत्याही नावाने बाजारांत आणण्याची हिंमत दाखवावी. धर्मांतील अनिष्ट प्रथांना विरोध करायचा असेल तर अुत्तमच, पण केवळ काही प्रथांना मूर्ख ठरवून त्यांचा अशा काही कार्यक्रमांतून तात्पुरता गहजब करण्यात खरा अुद्देश कोणता? या प्रथा ज्यांनी कोणी, कोणे काळी  निर्माण केल्या असतील त्यांनाही आपण मूर्ख ठरवीत आहोत, असे होत नाही का? त्यांच्यापेक्षा धर्मातील  किंवा समाजातील सुधारणा आम्हाला जास्त कळतात हे सांगण्याचा हा अट्टाहास आहे का? हे अुपक्रम तात्पुरते का होआीना चालतात, ते चालवून घेतले जातात, त्यांना किरकोळ विरोधही होत नाही ही हिंदू धर्मातील सहिष्णुता नव्हे काय?

अशा रूढी व परंपरांबद्दल विविध मते व प्रतिपादने असतात. कुंकू लावण्याबद्दल असे म्हणतात की, आपण जिथे कुंकू, बुक्का, अष्टगंध लावतो तिथे, योग किंवा अध्यात्मशास्त्रानुसार आज्ञाचक्राचे स्थान असते. वातावरणातील काही सात्विक वा असात्विक लहरींचे (पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वेव्ह्ज) नियंत्रण त्या आज्ञाचक्राद्वारे केले जाते. ते स्थान जेव्हा आलेपित केले जाते, त्यामुळे अशा लहरी सहन करण्याची क्षमता (एखाद्या फिल्टरप्रमाणे) वाढते; शांतीची अनुभूती येते. वेगवेगळया प्रवृत्तींवर ताबा ठेवता यावा म्हणून वेगवेगळया व्यक्तींसाठी वेगवेगळे आलेपन सांगितले आहे. त्यात विधवांनी भडक कुंकू किंवा भडक वस्त्र वापरू नये असा संकेत घालून दिलेला असेल. त्यात त्यांंचा अवमान करणे वा त्यांना दुय्यम लेखणे हाच एक हेतू होता, असे कशासाठी म्हणावे? आजपर्यंत विधवांनी कुंकू लावले नाही, किंवा आता लाल भडक कूंकू लावले म्हणून काही विशेष फरक पडणार आहे का?

 हिंदू धर्मातील प्रथा आजच्या सामाजिक स्थितीनुसार व विचारांनुसार सुधारायच्या असतील तर अवतीभोवतीचा अभ्यास करून सुधारणांचा प्राधान्यक्रम ठरविला पाहिजे. तो अधिकार कुणीतरी हातात घेअून सामाजिक चळवळींचा आभास निर्माण करू नये. सामाजिक विचारच करायचा तर अन्य धर्मीय असणारा, अुघड्याबोेडक्यांनी फिरणारा भगिनीवर्ग का दिसू नये? हळदीकुंकू कार्यक्रमासाठी कॉलेजकन्यांना का बोलावू नये? त्या कुंकू राहोच पण टिकलीही लावत नाहीत, मग विधवांना कुंकू लावण्याचा कार्यक्रम करून त्यांनाच वेगळे पाडले नाही का?  कॉलेजच्या मुली त्यांचे अैकून विधवांप्रमाणे कुंंकू लावू लागतील काय? कुंकूच न लावण्याची प्रथा सुरू झाली आहे, तिथे विधवांनी ते लावावे असा कार्यक्रम कसा? अेक तर तरुण पोरींना ते लावा, किंवा कुणी नाही लावले तर काही बिघडत किंवा सुधारत नाही असे म्हणा!

आजच्या समाजातही विधवांच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्यांकडे या नवमतवादी भगिनी फारसे लक्ष देत नाहीत. तसेच निराधार, अपंग, गरीब महिला आहेत. काही आश्रम सोडले तर त्यांना आधार देणारे विश्वासार्र्ह कोणी मिळत नाही. त्यांची दखल कुणी घेत नाही. अशा भगिनींच्या प्रश्नांना प्राधान्य हवे. पण काही तरी `वेगळे' करून समाजाचे लक्ष विचलित करायचे, आणि सहिष्णू समाजाला वृथा झोडपून काढायचे; असा काही अेक कलमी कार्यक्रम आयोजकांच्या मनात असेल तर त्यात धोका संभवतो. समाजाला समजून घेत शहाणे करणे, शिकवण देणे आवश्यक असते; त्याअैवजी अुगीच आकांडतांडवी आंदोलनांंनी कुणाचे प्रसिध्दी-स्टंट  साधतील, पण समाज विस्कळीत होआील. हल्लीच्या नव्या शिक्षणपध्दतीत मुलांच्या कलाने त्यांना समजून देत घेत शिकवावे असा सिध्दांत मांडला जातो; तीच पद्धत ज्याला शिकवायचे त्या सर्व घटकांबाबत लागू होते. समाजसुधारणा ही शांतपणे, अभ्यासाने, करण्याची निरंतर प्रक्रिया आहे. त्याबाबत धसमुसळेपणा करण्याचे काय कारण?
-(वैद्य) सुविनय दामले, माठे वाडा, कुडाळ (०२३६२) २२१८२१,     mob- (९४२११४७४२०)

                                
                             संपादकीय
                          जाळ गळयामधिं माळ कशाला व्याळ-काम कोपला । 
                                आतुनि,  बाहेर म्हणविशि भला ।
                                                   -शाहीर राम जोशी
       सहकाराचा बाजार

     कृषि अुत्पन्न बाजार समित्यांच्या संदर्भात महाराष्ट्न् शासनाने घेतलेला निर्णय अैकून कित्येक हितसंबंधियांच्या नाकाला मिरच्या झोंबणार आहेत. तालुका जिल्हा व राज्य स्तरीच्या बाजार समित्या जेव्हा कधी स्थापन झाल्या तेव्हा त्यांचे अुद्देश चांगलेच होते; तसे ते कोणत्याही संस्थेचे व यंत्रणेचे असतात. महाराष्ट्नत एके काळी आपटे, आगाशे, लोहिया, वालचंद अशा खाजगी अुद्योजकांचे साखर कारखाने होते, आणि ते त्यांच्या परीने अुत्तम चालले होते. सहकारी चळवळ आल्यानंतर ती वाढविण्यासाठी त्यांच्याशी स्पर्धा झाली असती तर ती अेकवेळ समजली असती; पण आिथे तर त्यांची सरसहा गळचेपी करून त्यांचे कारखाने बंद पाडण्यात आले किंवा त्यांचेच सहकारीकरण करण्यात आले. त्या रांगेतील शिरगावकरांचा अेकमेव कारखाना वाचला, कारण तो कर्नाटकात  -बेळगाव जिल्ह्यात गेला होता. या कारखानदारांनी महाराष्ट्नत तरी निदान शेतकऱ्यांचे काही अकल्याण केले असे म्हणता यायचे नाही. पण कालाच्या ओघात सहकारी चळवळ आली, आणि शेतकऱ्यांच्या मालकीचे (?) म्हणून जे कारखाने किंवा दूधसंघ, बँका आित्यादी अुभ्या राहिल्या त्यांतून सहकार रुजण्याअैवजी स्वाहाकार फोफावला. नवे लुटारू नेते अुदयाला आले. आपापल्या पूर्वजांची नांवेसुध्दा त्यांनी आपल्या अंकित संस्थांना दिली. शेतकरी हिताचा  व सहकारातील अमूल्य तत्वांचा जप करीत त्यांनी शोषक भांडवलदारीच्या वरताण केली.

सहकाराचे सामर्थ्य वादातीत आहे.  खऱ्या अर्थाने सहकार जर सामान्य माणसाच्या हितासाठी राबविला गेला असता तर तो नामशेष झालाच नसता. सहकाराची तत्वे शेतकऱ्यांच्याच काय पण कोणाही घटकाच्या हिताचीच असतात. पण केवळ त्यांचा जप करीत राहून लोण्याचे गोळे मटकावण्याचे तंत्र लोकांच्या लक्षात येत गेले, आणि सहकारी  अुद्योग मोडीत निघाले. त्याचबरोबर गेल्या पंचवीस वर्षांत खुल्या बाजाराची लाट आली, तिच्याशी स्पर्धेत टिकायचे तर कुठल्यातरी तत्वांचा जप पुरेसा ठरत नाही; तिथे खुले, निखळ अर्थकारण चालते.
 
आम्ही अपंग, आम्ही दुर्बळ, गरीब, मागास असे म्हणत राहण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. आपल्याकडे ती रडगाणी म्हणत राहण्याची सवय मुद्दाम रुजवली आहे. त्यायोगे पुष्कळ सोयी सवलती मिळतात; पण त्या नेमक्या गरजूला न मिळता आपल्या ताटात ओढण्याची चलाखी करावी लागते. शेतकऱ्यांच्या किंवा अन्य कोणा शेाषिताच्या नावाने गळे काढले की, आपले स्वार्थ साधता येतात अशी आजवर अर्थनीती चालली. दुर्बल वर्ग तर समाजात चिरंतन असतोच, त्याचे घटक बदलतात. काल जो दुर्बळ असतो, त्याला आज कुणीतरी मदत करतात, कुणी सवलती देतात, त्याचे स्वत:चे प्रयत्न कामाला येतात; त्यांतून उद्या त्याची स्थिती बदलते व तो सबळ होतो. त्याच्या जागी दुसरा कुणी दुर्बळ होतो. जो कुणी दुर्बळ असेल त्याला सोयी सवलती दिल्याच पाहिजेत, हा मानवी व्यवहार आहे. पण त्या दुर्बळाची स्थिती पुढे करून आपला स्वार्थ साधणारे सबळ कमी नाहीत.

बाजार समित्यांच्या बाबतीत आंदोलनांचा संभव जास्त आहे. बाजार समितीत आपला शेतीमाल घालणे शेतकऱ्याला फायद्याचे वाटत असेल तर तो कशाला खुल्या बाजाराकडे जाआील? अूस कारखान्यांच्या बाबतीत तशीच सक्ती शेतकऱ्यांनी सोसली आहे. सहकारी कारखाना देआील तो भाव शेतकऱ्यांनी घ्यावा, आणि मुकाट्याने त्याच कारखान्याला आपला अूस घालावा अशी प्रथा `शेतकरी हिता'चा जप करतच अनुसरली गेली आहे. कारखान्यांचे भागधारक या अर्थाने मालकच असणारे शेतकरी अलीकडे त्यांच्याच कारखान्यांविरुध्द आंदोलने करीत आहेत, ते त्यांचे हित डावलले जात आहे म्हणून! सक्ती काढल्यावर त्यांचा अूस `आपल्या' कारखान्याला न देता खाजगीसह आितर कुठल्याही कारखान्याला ते आता घालत आहेत.

काही द्राक्ष बागायतदारांनी आपली बाजारपेठ आपण शेाधली, आणि आज त्यांचा माल अनेक देशा विदेशांत जात असतो. ते या सहकारी बाजार समित्यांकडे फिरकत नाहीत. सहकारी बाजार शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी स्थापन झाले हे खरे, पण आज त्यांच्यावर तिथले व्यापारी दलाल आणि राजकीय पुढारी यांचे नियंत्रण आहे. शेतकऱ्यांच्या नावावर ही सत्ताकेंद्रे आणि आर्थिक नाड्या आपल्याकडे ठेवता आल्या, त्या हातातून जातील अशी त्यांस भीती आहे. पण त्यांस आिलाज नाही. सत्ता आणि पैसा कायम अेकाच हाती राहात नाही. स्थलांतर हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्यांची सद्दी संपणार म्हणून काही आंदोलने होतील, अशा आंदोलनांतून काही अडवणूक, काही विस्कळीतपणा येआील. पण लोकमानसांतून त्यास कोणताही पाठिंबा मिळण्याची सुतराम अपेक्षा नाही. आजकाल कोणत्याच संप बंद वगैरे छापाच्या आंदोलनांस तसा पाठिंबा मिळत नाही हेही त्यांच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे.

एकीकडे विकास हवा असे म्हणायचे आणि विकासाच्या संबंधाने काही योजना केली की त्यांस आडवे पडायचे असा अेक नवा फंडा सुरू झाला आहे. सहकार किंवा ग्रामोदय ही जीवनपध्दती अत्यंत आदर्श ठरू शकते, पण आजकालच्या युगात त्याचे परिणाम पाहाण्याची वाट कोणी पाहणार नाही. आजच्या काळातील विकास झटपट असेल तरच स्पर्धेत टिकू. त्यासाठी कोणत्याही अुत्पादकाला खुली बाजार व्यवस्था अुपलब्ध असली पाहिजे. कधी काळच्या तत्वांवर विसंबून त्यांंच्या नावावर आपल्या पोळया भाजण्याचे कंत्राट आता फारसे चालणार नाही, हे प्रत्येकानेच समजून घेण्याची गरज आहे.

आठवांचे साठव
जळणातला फायदा
    १९६८ सालच्या दरम्यान मी धंद्यात फार चाचपडत होतो. दोनच वर्षांपूर्वी स्वत:शी काहीतरी मेळ घालून धंदाच करायचा हे ठरवून घेतलं होतं. गिन्नीचं भांडवल नाही, बापजाद्यांनी कधी धंदा केलेला नाही. कुठल्याही क्षेत्राचा कसलाही अनुभव नाही. पण केवळ खुमखुमी आणि नाइलाज एवढी कारणंं होती. कारण कॉलेजातलं फालतू शिक्षण घेण्यात वेळ घालवून कुठंतरी पाट्याटाकू नोकरी करण्यात मला किंचितमात्र स्वारस्य नव्हतं. शिवाय माझं कुटुंब आणि स्थान सोडून उगीच पोटामागं फिरत राहाण्याचं काही कारण वाटत नव्हतं. त्यामुळं हाती होता तेवढा आधार मानून कष्ट करण्यात मला उत्साह वाटत होता. हाती होतं ते केवळ सभोवारच्या जगात आईवडिलांचं चांगुलपणाचं स्थान, आणि त्या काळच्या लोकांत त्यांना असलेला बराचसा जिव्हाळा.
     धंद्याच्या सुरुवातीच्या त्या काळात मी जळाऊ लाकूड विक्रीसाठी आणायचं ठरवलं. जवळपास तशी वखार नव्हती, आणि बहुतांशी लोक कामगारांपैकी असल्यानं चुलीसाठी फोडीव लाकडाचा वापर करायचे. इतर ठिकाणी कोणी हा धंदा करीत होते, त्यांच्याकडं जाऊन चौकशी केली. बेळगावच्या पुढं लोंढा, अळणावर, क्रॅसलरॉक असा जंगलभागाचा माग काढला. त्याभागात जंगल तोडीचे कॉंट्न्ॅक्टर असत, त्यांपैकी काहींचे पत्ते घेतले. त्यातले एकजण प्रभाकर श्रीपाद पंडित या नावाचे लोंढ्याचे व्यापारी पुढच्या चारच दिवसांत काही ऑर्डर वगैरे घेण्यासाठी या भागात फिरत आले होते. ज्या इथल्या एकाकडे मी चौकशी केली होती, त्यांनीच या पंडितांना माझे नाव सांगून पाठविले, आणि काही ऑर्डर मिळू शकेल असे सुचविले. त्यामुळे ते मला शेाधत आमच्या झोपडी-ऑफीसात आले, पण मी नेमका त्यावेळी नव्हतो. ते आपला पत्ता वगैरे देऊन गेले. लाकूड कशाशी खातात याची मला काहीही माहिती नव्हती. पण आता त्या लोंढ्याला धडकून यायचे ठरवले.
     आमच्या लाकूड धंद्याची मुळापासून तयारी! लोंढ्याला जाण्यासाठी माझ्याकडे एक बऱ्यापैकी पायजमा होता, पण त्याच्याशी जुळेेल असा झब्बा नव्हता. माझ्या मोठ्या भावाचा नेहरू शर्ट जरा इकडून तिकडून कापा-शिवी करून  त्याला घरगुती इस्त्री करून घेतली. तो शर्ट पिशवीत घेतला, जाताना प्रवासात नेहमीचा शर्ट घातला. सकाळच्या प्रहरी रेल्वे पकडली आणि माझी पहिली `बिझिनेस टूर' सुरू झाली. घरातून बांधून घेतलेली भाकरी भाजी निवांतवाणी खाल्ली, दुपारी १२च्या सुमाराला बेळगाव ओलांडले. मग जरा तोंडबिंड धुतले, पिशवीतला तो इस्त्रीचा नेहरू शर्ट घातला. तो माझ्या `इमारती'च्या मानाने बराच ढिसाळ होता हे पटले, पण इलाज नव्हता. तोही सदरा आता चुरगळू नये म्हणून बाकावर न बसता डब्याच्या दारात ऐटीत उभारलो.
      तासाभरात लोंढा जंक्शनला उतरलो. बाहेर येऊन चौकशी करत पत्ता गाठला. हे पंडित जंगल काँट्न्ॅक्टर वाटत नव्हते, आमच्या लहानपणी ग.भा.कुलकर्णी म्हणून मास्तर होते, त्यांचा मला भास झाला. त्यांनी अगत्य केले.त्यांचा तो महाभयंकर विस्ताराचा टिंबर डेपो पाहून मी दबकलो होतो. वास्तविक ते आमच्या येथे नुकतेच येऊन गेलेले होते, त्यावरून त्यांना माझ्या `ताकती'चा अंदाज आलेला असणार, पण तसे त्यांनी काही न मानता मला लाकूड पाठविण्याचे मान्य केले.त्या मार्केटात तसे बरेच डेपो दिसत होते. मी जरा इकडे तिकडे करून त्यांचा अंदाज घेतला. सुरुवातीच्याच दणक्यात, भले जळण का असेना पण रेल्वेची वॅगन लोड माल मी उधारीवर खरेदी केला. आणि परतीच्या वाटेवर येताना पैशाची जुळणी, करू काहीतरी; अशा ताठ्यात निवांत झालो.
     ठरल्याप्रमाणे आमची लाकूड वॅगन आली, ती उतरून घेतली. मजूर लावून फोड  सुरू झाली. मागामागी करून काटा-पारड्याचे तिकाटणे आणून उभे केले. ती पारडी-वजने अजूनी माझ्याकडं आहेत! बराच माल विकला, पंडितांचे पैसे पाठवून नवी ऑॅर्डर दिली. पण या व्यवहारात फायदा किती होणार हे काही केल्या कळेना. खरेदी आणि मजूरी यांंची बेरीज विक्रीच्या रकमेपेक्षा जास्त दिसत होती. आता शिल्लक राहिलेल्या मालावर सारा भरोसा! पण त्याचा तर काही अंदाज नव्हता. किती माल शिल्लक असेल? त्यातही पुन्हा कुऱ्हाडींनी  न फुटलेल्या गाठी बऱ्याच होत्या, त्या कशा विकल्या जाणार? सगळं मोजून पाहाणं सोपं नव्हतं. पण या अस्वस्थतेवर दुसरा मार्गही नव्हता.
     एका संध्याकाळी लांडी चड्डी आणि फाटका सदरा घालून उरलेली जळाऊ लाकडं वजन करू लागलो. ५०-५० किलोचं वजन करायचं आणि ते पारडं रिकामं करून लाकडं दूर टाकायची. रात्रीचं धप्प चांदणं होतं, त्यात माझं हे `स्टॉक टेकिंग' चाललं होतं. १०-११ वाजता कधीतरी ते काम संपलं. निष्कर्ष असा की, त्या गाठी म्हणजे नफा उरतो आहे. त्या खपल्या तरच चार पैसे सुटतील. पण त्या तर फोडता येत नाहीत, त्यांंच्याकडं नुसतं पाहात बसायचं. पुढची ऑर्डर रद्द करावी काय? -की आणखी एक चान्स घेऊन पाहायचा? तोटा तर नाही. एक दिवस असा चिंतेत गेला.
     मी रात्री त्याच आवारात झोपत असे. दुसऱ्या रात्री काही लोक आल्याची चाहूूल लागली. उठून पाहिलं, तर पलीकडच्या गल्लीतले लोक लाकूड न्यायला आले होते. त्यांच्यातलं कुणीतरी `संपलं' होतं, त्यासाठी त्यांना दहा मण लाकूड हवं होतंं. मला मोठं गिऱ्हाईक आलं, आणि ती वेळ तर कुणाला थांबवायची नव्हतीच. मी दरवाजा उघडला, वजन टाकू लागलो. ती चारसहा माणसं मदतीला होतीच. त्यांच्यातल्या एकानं सर्वांना ताकीद दिली, ``अरे, उगीच बारीक चिरफाळया घेऊ नका. चांगल्या आडदांड गाठी आणि टोमके घाला...''
     ग्राहकाचा संतोष तर करायचाच, पण त्या मागणीनं  मीच मनातल्या मनात हरकून गेलो!! `त्या' कामला अशीच लाकडे लागतात हे समजलं!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन