Skip to main content

25 april 2016

भारतीय चित्रपटाचा युगारंभ
                            -बापू वाटवे
      १८८९ हे चलत् चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अतिशय महत्वाचे वर्ष आहे. मुंबईचे हरहुन्नरी इंजिनियर मदनराव माधवराव पितळे हे श्रीकृष्णाच्या जीवनातील काही भाग स्लाईड्वर चितारून हौस मौज म्हणून मॅजिक लँटर्नच्या साहाय्याने दाखवीत. त्याने चलचित्रपट पाहात असल्याचा भास होत असे. हा व्यवसाय होऊ शकेल ही कल्पना कल्याणच्या महादेव गोपाळ पटवर्धन यांना सुचली. त्यांनी एक जुनाट मॅजिक लँटर्न मिळविला, त्यांचा ज्येष्ठ पुत्र विनायक याने चित्रे रेखाटण्याची व अशा चित्रांतून मॅजिक लँटर्नच्या साहाय्याने चलत् चित्राचा आभास निर्माण करण्याची अशा दोन्ही कला आत्मसात  केल्या.
हस्तगत झालेली कला रसिकांसमोर सादर करण्याची संधी पटवर्धन पितापुत्रांना लवकरच मिळाली. आपल्या खेळाला त्यांनी `शांबरिक खरोलिका' असे नाव दिले. `शांबरिक' म्हणजे मॅजिक, `खरोलिका' म्हणजे लँटर्न. मॅजी म्हणजे शांबरासुर त्यावरून शांबरिक असा सुटसुटीत शब्द बनविला.लँटर्नला आपण दीप, दिवा असं म्हणतो. पण हा शब्द सगळेच वापरतात. म्हणून अमरकोशातून त्याला खरोलिका हा प्रतिशब्द काढला व मॅजिक लँटर्न ऐवजी `शांबरिक खरोलिका' हा शब्द प्रचलित केला.`आपल्याला इंग्रजी शब्द हवाच कशाला?' असं ते म्हणत.
विनायकरावांच्या जोडीला त्यांचे धाकटे बंधू रामचंद्रही या कामात तरबेज झाले. बड्या बड्या मंडळींनी मुंबईत आपल्या घरी त्यांचा शांबरिक खरोलिकाचा कार्यक्रम केला. बाहेरून कार्यक्रमाची निमंत्रणे येऊ लागली. ठिकठिकाणचा प्रतिसाद पाहून पटवर्धन पिता पुत्रांचा उत्साह, उमेद शतगुणित झाली आणि थिएटरमध्ये तिकिट लावून शांबरिक खरोलिकाचे खेळ सुरू झाले.या खेळासाठी तिकिटाचे दर एक आण्यापासून ते चार आण्यापर्यंत असायचे. हा व्यवसाय करण्याचे निश्चित झाल्यावर पटवर्धन पिता पुत्रांची धडपड सुरू झाली. दोेघेही बंधू मॅटि्न्कच्या वर्गात उत्तीर्ण झाले होते. रामभाऊंचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. एक ाने रेल्वेतील नोकरी चालू ठेवायची व दुसऱ्याने सारे लक्ष शांबरिक खरोलिकावर केंद्रित करायचे ठरले. विनायकरावांनी सर्कशीच्या पार्श्वभूमीवर एक रंगीत चित्रपट स्लाईडस्वर चितारला. आपल्यासारखी सर्कस पटवर्धनांनी पडद्यावर दाखविली म्हणून संतुष्ट झालेल्या काशीनाथपंत व विष्णूपंत छत्रे या छत्रे ग्रँड सर्कसच्या मालकद्वयींनी आर्थिक साहाय्य देऊन या स्वदेशी कलेचं चीज केलं.पडद्यावरील हालचाली व आविर्भाव अधिक परिणामकारक होण्यासाठी एकाऐवजी तीन मॅजिक लँटर्नचा उपयोग करण्याची कल्पना पटवर्धनांना सुचली. हालचाली, हावभाव यासाठी दोन मॅजिक लँटर्न व तिसरा जंगल, उद्यान रस्ता, नदी, महाल, ढग, पर्वत यांसारख्या देखाव्यांची पार्श्वभूमी दाखविण्यासाठी वापरण्यात येऊ लागला. ही त्यांची शक्कल पूर्णत: यशस्वी झाली. हवा तो परिणाम पडद्यावर दिसू लागला. दहा बाय दहा फूट या आकाराचा भिजविलेला पडदा लावण्यात येई. प्रेक्षकांची संख्या वाढली की पडद्याच्या मागील बाजूसही प्रेक्षक बसविण्यात येत.
खेळाच्या प्रारंभी `सुस्वागतम् पटवर्धन ब्रदर्स, शांबरिक खरोलिका' अशी नक्षीदार पाटी येई. नंतर पाठोपाठ त्या काळातील प्रथेनुसार पडद्यावर सूत्रधार व दोन्ही बाजूला तंबोरे घेतलेले गायक प्रवेश करीत. मॅजिक लँटर्नना जोडलेल्या खटक्याची पटवर्धन बंधू अशा सफाईने हाताळणी करीत की त्यामुळे तंबोऱ्यावरील गायकांची बोटे तारांवरून फिरण,ं सूत्रधाराने अभिवादन करणं, हे आविर्भाव हुबेहुब वाटत. ओठांच्या, बोटांच्या हालचाली योग्य ठिकाणी त्या त्या जागी चपखल दाखविणं यात खरं कौशल्य होतं.
सूत्रधाराचे ईशस्तवन झालं की गायक मंडळी जात व सूत्रधार नटीस आवाहन करीत आहे असे दृश्य समोर येई. त्यात नटीच्या हालचाली नृत्यसदृश होत. त्या चलत् चित्राप्रमाणे हुबेहुब वाटत, इतके प्रभुत्व पटवर्धन बंधूंनी मॅजिक लँटर्न हाताळण्यात संपादन केले होते. व्यवसायात जम मनासारखा बसतो आहे हे पाहून पटवर्धनांनी महाराष्ट्न् व गुजरातचा धावता दौरा काढला. २७ डिसेंबर १८९५ रोजी पुण्यात भरलेल्या राष्ट्नीय काँग्रेसचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना शांबरिक खरोलिकाचा खेळ दाखवून त्यांची शाबासकी मिळवली. नंतर पुण्याच्या बुधवार चौकातील आनंदोद्भवन या थिएटरमध्ये तिकिट लावून खेळ केले. त्यांचे प्रेक्षकांनी मनसोक्त कौतुक केले. उत्पन्नही भरपूर झाले. १९०२ साली महादेव गोपाळ पटवर्धनांचे निधन झाले. त्याच काळात पटवर्धन बंधूंनी `सीता स्वयंवर', `राजा हरिश्चंंद्र' व `रामराज्य अभिषेक' असे तीन नवे चलत् चित्रपट चितारले होते.चार इंच लांबीच्या काचेवर हालचाली दाखविण्यासाठी तीन छोटी चित्रे रंगवीत. एकेक चित्र रेखाटायला तीन-चार दिवस लागत. अशा तऱ्हेच्या हस्त-चित्रांच्या पुरेशा काचा  रंगवून एखादी चित्रमालिका गुंफली जाई. चित्र चितारण्याच्या किचकट कामात पटवर्धन बंधू इतके मग्न होऊन जात की त्यांना तहान भुकेचेही भान राहात नसे.
आपले चित्रपट अधिक परिणामकारक, मनोरंजक व्हावेत म्हणून आपल्या संग्रहालयातील सर्व चलत् चित्रपटांना योग्य  अशी धावती वर्णने मान्यवर लेखकांकडून लिहून घेतली. इतकेच नव्हे तर त्यांनी खेळाला संगीताचीही जोड दिली. विशेष म्हणजे पटवर्धन बंधू संगीताचेही जाणकार असल्यानं ते तबला पेटीही वाजवत. त्यांनी काही ठिकाणी संवाद व गाणीही लिहून घेतली. या कामी पेशाने शिक्षक असलेले कीर्तनकार जोशी यांची पटवर्धन बंधूना बरीच मदत झाली. गाण्यातून प्रवेशासंबंधीचे वर्णन असे. गाणी म्हणायला सुरेल व गोड आवाजाची मुलं या संचात होती. पडद्याच्या बाजूला बसून ती गाणी म्हणत.
श्रीकृष्ण चरित्रातील एका चलत् चित्रात वसुदेव कृष्णाला डोक्यावर घेऊन जात असता नदी दुभंगते, पुढे पाणी वाढत वाढत जाते. पण बालकृष्णाचा पदस्पर्श झाल्यावर पाणी झपाट्याने उतरू लागते. याचा यथायोग्य  परिणाम साधून प्रेक्षकांना थक्क केले होते आणि अचंबित करणारे दृश्य त्यांनी स्लाईडस्च्या साहाय्याने साधले होते. १९०९ मे च्या दुसऱ्या आठवड्यात नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या झाली. आदल्याच दिवशी तो शांबरिक खरोलिकाचा कार्यक्रम पाहून गेला होता. त्याचेही शिफारसपत्र  आहे. पौराणिक कथानकात देखील राष्ट्नीय भावना ठेवून ती सूचकतेने घातली जाई.
ए. पी. करंदीकर आणि व्ही. पी. दिवेकर या तंत्रज्ञांनी, त्यातही बापूराव करंदीकरांनी दादासाहेब फाळक्यांच्या प्रमाणे बडोद्याच्या कलाभवनमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला होता. तंत्रज्ञ एस. एन. पाटकरही त्यांचे भागीदार झाले. त्यानंतर या तीघांनी मिळून चित्रपट काढण्याचे निश्चित केले. ही घटना१९१२ सालातील. चित्रपटासाठी त्यांनी `सावित्री' हा पौराणिक विषय निवडला. परंतु बऱ्याच तांत्रिक चुका राहिल्या. हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. झालेला खर्च वाया गेला. या त्रिवर्गाने धडपड चालूच ठेवली. एका धनिकाने त्यांना १५ हजार भांडवल देऊ केले. भागवत ग्रंथातील व्यास जैमिनी यांचा प्रसंग निवडून पॅशन व्हर्सेस लर्निंग! (इंद्रिय श्रेष्ठ की विद्वत्ता) हा लघुपट तयार केला. दिवेकरांनी यात व्यासांची भूमिका केली होती. तर रंगभूमीवरील प्रसिद्ध नट केशवराव गोखले जैमिनी होते. नायिकेसाठी अहमदाबादची सुस्वरूप तरुणी नर्मदा मांडे मिळाली होती, हा लघुपट दाखवून त्यांनी आणखी भांडवल मिळविले.१९१५ साली या त्रयींनी `नारायणराव पेशवे यांचा मृत्यू' हा मूकपट निर्माण केला. भोरच्या अधिपतींंच्या कृपेने (श्रीमंत शंकर चिमणाजी पंतसचिव) त्यांचा राजवाडा चित्रीकरणासाठी वापरायला मिळाला व सैन्यासाठी त्यांच्या सेवेतील शिपाईही मिळाले. सिनेव्यवसायाला हातभार लावणारे पंतसचिव हे पहिलेच संस्थानिक!
करंदीकर दिवेकरांची अनमोल कामगिरी म्हणजे लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेचे त्यांनी केलेले छायाचित्रण! लोकमान्यांच्या मृत्यूमुळे सर्व मुंबईवर अतीव शोककळा पसरली होती. सर्व व्यवहार बंद म्हणून करंदीकर दिवेकरांनी क्रॅमेरासह चित्रीकरणाचे अन्य साहित्य स्वत: पायी वाहून नेले. सर्व चित्रण केले. हे सर्व चित्रपट दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट निर्मिती नंतर प्रदर्शित झाले.
धुंडीराज गोविंद तथा दादासाहेब फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७०, त्र्यंबकेश्वर या क्षेत्री झाला. वडील गोविंद सदाशिव तथा दाजीशास्त्री व मातोश्रींचे नाव द्वारकाबाई. वेदशास्त्रसंपन्न दाजीशास्त्री भिक्षुकीचा व्यवसाय करीत. याज्ञिकी, वैदिकी, हव्यकव्यादी बरोबर महाभारत, रामायण, भागवत, वेद, उपनिषद दादासाहेबांना मुखोद्गत होती. दाजीशास्त्री संस्कृत भाषेचे गाढे पंडित असल्याने त्यांची मुंबईच्या विल्सन  केॅालेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली व फाळके कुटुंब मुंबईत राहावयास गेले.
                               -(`नॅशनल बुक ट्न्स्ट' प्रकाशित `दादासाहेब फाळके' या पुस्तकातून संकलित)                  
SAMPADKIY

दिसेना जनीं तेचि शोधूनि पाहें । बरे पाहतां गूज तेथेचि आहे ।
करें घडे जातां कदा आडळेना । जनीं सर्व कोंदाटले तें कळेना ।।
-रामदास
शनीशिंगणापूरच्या विजयानंतर आता आपल्या पुरोगामीत्वाच्या कैफात,आक्रमक महिला आंदोलकांनी त्र्यंबकेश्वर, केाल्हापूर या मोहिमा हाती घेतल्या आहेत. काही ठिकाणी असलेल्या प्रथा तेथील आंदेालनांच्या भीतीने आधीच निकाली निघाल्याच्या बातम्या आल्या, त्यामुळे त्या आंदोलक महिलंाचा विरस झाला असेल. कारण अशी शरणागती सगळयांनी आधीच पत्करली तर मग त्यांच्या आंदोलकी पुरागामीत्वाचे दुकान कसे चालायचे? त्याहूनही मौजेची गोष्ट अशी की, कोल्हापूरच्या देवीच्या गाभाऱ्यात महिलांना जायला मिळाल्यानंतर तो आपल्या धर्मनिष्ठ राजकीय पक्षांचा घात समजण्यात येऊन त्याविरोधात राजकीय ष्टाईलचे शहरबंद घोषित करण्यात आले, पण काही महत्वाची कामेधामे असल्यामुळे तो बंद नंतर सोयीनुसार जाहीर करण्याचे ठरले.  आजवर आपल्यासारख्या धर्मनिष्ठ, जहाल धर्मश्रध्द लोकांची अशी एक समजूत होेती की, देवाधर्मावर अन्याय झाला तर त्याच्या रक्षणासाठी प्राण हाती घेऊन त्या सणकेतच बंद-रास्तारोको,तोडफोड, गनिमांवर किंवा काफरांवर हल्ले, किंवा निदान शुध्दीकरणासाठी मूर्तींचा मस्तकाभिषेक वगैरे करायचा असतो; पण आता ते प्रकार जरा वेळ-वखत, सोय-सवड पाहून करायचे असतात हे समजले.तेजीच्या धंद्याचे दिवस असल्याने सुवर्णकारांनी तूर्त आंदोलन स्थगित केले, तसाच हा प्रकार म्हणावा का?

त्यावरून हेही समजले की, `देव मस्तकी धरावा-अवघा कल्लोळ करावा'  या समर्थ शिकवणुकीचा हा खरा अर्थ आहे. क ल्लोळ तर सतत चालू ठेवलेलाच आहे, पण या निमित्ताने मस्तकी धरण्यासाठी यांना साक्षात परमेश्वरच घावला, त्यामुळे अनायासे साक्षात् देवाचेच अधिष्ठान मिळाले. त्यात बिचाऱ्या पुजारी-पुरोहित या मंडळींनी  काही म्हणण्याजोगे नाही, कारण गाभाऱ्यात गर्दी वाढल्यामुळे त्यांच्याकडे तर तेजी येणार. त्यामुळे त्यांनी परंपरेला चिकटून राहण्यातून अलगद  सुटकाच करून घेतली असावी. त्यांच्या दृष्टीने या `नव्या परंपरांना' विरोध करण्याजोगे काही  नाही.

आपल्याकडे कित्येक  देवस्थाने अशी आहेत की, तिथे पूर्वी कोणी फिरकत नसे. कुठेतरी आडमाळावर एकांड्या रुक्ष रानचाफ्याच्या झाडाखाली दत्ताचे देऊळ दिसायचे, तिथे त्या दत्ताचे कुत्रेही फिरकायचे नाही. गावाबाहेर वसत्या वाढल्या, तसे त्या देवळांनी रूप बदलले. तिथे प्राप्ती वाढली, तिथले पुजारी किंवा गुरव यांना  `दर' आले. मग त्यांंनीही आपल्या काही परंपरा - धर्मशास्त्रे तयार केली. अमूक काहीतरी चालते, तमूक काहीतरी चालत नाही हे सुरू झाले. ते ज्यांंना मान्य असते त्यांनी   तिथे जावे, ज्यांना मान्य नसेल त्यांनी तिथेच कडमडण्याचे कारण नाही हा साधा सोपा देवाघरचा न्याय झाला. पण तो इथे माणसांना कसा चालणार? कारण  या वेळेपावेतो त्या बिचाऱ्या सामान्य माणसांचे  `महान भक्त' बनलेले असतात. त्यांचा `भाव' वाढतो.

वाढेना का, त्यांची शास्त्रे आणि त्यांचा धर्र्म , ज्यांंचे ते पाहून घेतील. त्याच त्यांच्या धर्मशास्त्रावर विसंबून त्यांचे व्यवहार चालत आलेले असतात, त्यांच्या सोयीने बदलतही असतात. पण त्या व्यवहारांस अंधश्रध्दा म्हणून ठोकून काढल्याशिवाय तथाकथित बुध्दिवाद्यांना चैन पडत नाही. जेे स्वत:ला निरीश्वरवादी म्हणवतात, त्यांच्यातलेच कुणीतरी समानतेच्या ढोंगाने पछाडून शनीदेवाच्या चौथऱ्यावर चढायचा हक्क मिळवू पाहतात. ज्या बायकांनी त्या चौथऱ्यावर चढून साऱ्या महिलांना समानतेचा न्याय मिळवून दिला, त्याने साधले काय? -तर तिथे तेल घालण्यासाठी बायकांच्या रांगा लागल्या. तिथले शनीचे अस्तित्व हाच अंधश्रध्देचा भाग होता, तर ती अंधश्रध्दा केवळ पुरुषांची चालू देणार नाही, असला तो चक्रमवाद होता. तेच आता त्र्यंबकेश्वर, कोल्हापूर किंवा अन्य कोठेही सुरू होईल. धर्माच्या म्हणून ज्या श्रध्दा असतील त्या उखडून टाकण्यात अर्थ नाही, कारण त्याऐवजी त्याजागी कुठल्यातरी तसल्याच अधार्मिक श्रध्दा निर्माण होणाारच आहेत. अंधश्रध्दांचा  अंधार असा फोडून उपसून संपत नसतो, तिथे सतत ज्ञानविज्ञानाची ज्योत पेटती ठेवावी लागते.

भक्तांना त्या  मूर्तीत देव नाही हे कळत नसेल काय? पण त्यात रमत राहण्यात ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ती मूर्ती म्हणजेच देव आहेे असे म्हणायला काहीही हरकत नाही. त्याला देवभोळेपण म्हणतात. त्याचेही या समाजात काही स्थान असते, असलेच पाहिजे. जसा स्त्रियांचा समान अधिकार मान्य करायचा, तसाच त्या देवभोळया भक्तांचाही अधिकार मान्य केलाच पाहिजे. मोठमोठे तत्वज्ञ असेच म्हणतात की, या जगात देव नाही, पण तो मानावा लागतो. कुसुमाग्रज म्हणतात की, जे देव मानतात त्यांच्यासाठी तो आहे; आणि जे त्याला मानत नाहीत त्यांच्यासाठी तो नाही. तुकाराम सांगून गेले की,   आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा । -म्हणजे देव आहे देव आहे असे तोंडाने म्हणत राहावे, पण मनात समजून असावे की देव नाही, जे काही करायचे ते आपल्यालाच करायचे आहे!  या थोर लोकांना देवाधर्माची नेमकी स्थिती कळत नव्हती काय? -की त्यांच्यापेक्षा त्या आक्रस्ताळी महिला किंवा परंपरावादी धर्ममार्तंडांना जास्तच कळते?

स्थिती अशी आहे की, समाज चेतवून देत आपला ठेका व मक्तेदारी त्या दोन्ही बाजूंना शाबूत ठेवायची आहे. अंधश्रध्दांच्या विरोधात तुकाराम त्यांच्या परीने लढले, पण ते देवधर्माच्या कल्पना उध्वस्त करू गेले नाहीत. कारण त्या कल्पना जरी चुकीच्या असल्या तरी त्यांवरच समाजधारणा झालेली असते, हे त्यांना माहीत होते. त्याच धारणा शाबूत ठेवून -किंबहुना त्यांच्याच आधाराने माणुसकीची मूल्ये रुजविण्याचे त्यांचे प्रयत्न होते हे तरी मान्य केले पाहिजेच. समता - बंधुता - अभेद ही तर धर्माची गंतव्य स्थाने असतात; धर्माचरणाचे हेतू असतात. ती गाठण्यासाठी या अशास्त्रीय परंपरांचा आधार घ्यावा लागतो. आक्रमक होऊन समानतेच्या नावाखाली स्टंट आंदोलने करणाऱ्यांनी व त्यांच्या विरोधात आडवे पडणाऱ्यांनी ते समजून घ्यायला हवे.

ते त्यांनीच समजून घ्यायला हवे, तिथे न्यायालय - सरकार - प्रशासन - मुख्यमंत्री इत्यादींची काहीही पत्रास चालणार नाही. कारण त्या प्रणाली काहीतरी तर्कांच्या आधारावर बेतलेल्या असतात; आणि इथे या पुरोेगामीत्वाला किंवा प्रतिगामी परंपरांना तर्काशी फारकत घेऊन आपली भोंदू दुकानदारी चालवावी लागते, ही त्यांचीही मर्यादाच आहे.

मानव जात अभियान
   
    आपल्या गेल्या महिन्यातील अंकात `एक पात्र योजना' सुचविली आहे. मी सध्या या परिस्थितीतून जात आहे. अनेक गोष्टी करायची इच्छा असते पण शारीरिक दुर्बलता आड येते. तसेच मानसिक दौर्बल्य आणि काही अंशी स्वभावही नडतो. वृध्दाश्रमापेक्षा आपण सुचविलेली योजना स्वागतार्ह आहे. प्राायोगिक तत्वावर सुरू करायला हरकत नाही. एकमेकां साहाय्य करू... असे होऊ शकेल.माझ्याकडे कोणी येऊ शकले तर स्वागत आहे, विधायक घडले तर त्यात आनंद आहे.
      गेल्या पंधरवड्यात आंबेडकरांचा जन्मदिवस सर्वत्र साजरा झाला. मात्र काही जातीयवादी संघटना त्यात भाग घेताना दिसल्या नाहीत. सर्वच जाती अद्यापि लहान- मोठेपणासाठी झगडत आहेत. दलित समाजाला उत्थान  मिळत असले तरीही त्यांच्यासंबंधी काही मुक्ताफळे कानांवर येत असतात. त्या पार्श्वभूमीवर एक ा अभिनव अभियानाचा प्रयोग मला सुचतो. या अभियानाला `मानव जात अभियान' असे नाव द्यावे. नावावरूनच त्याचा बोध होऊ शकेल. प्रत्येकानेच आपली जी काही उच्चनीच जात असेल ती त्यागून मानव जात हेच अभिधान लावावे. त्यामुळे उच्चनीच हा भेद संपेल. आर्थिक दुर्बलांना मदत हे त्याचे उद्दिष्ट राहील.मानवता हा धर्म  असेल व धार्मिक विधी ऐच्छिक राहतील. त्यासाठी समिती स्थापन करून त्या अभियानाचा मसुदा तयार करता येईल. या प्रयेागातून जातीव्यवस्थेचा पगडा संपेल. व सामाजिक दृष्ट्या तोे एक मैलाचा दगड ठरेल. चारही वर्णांनी आपापल्या पाारंपरिक जातींचा त्याग करून मानव जातीत मुक्त  प्रवेश  करावा. त्यामुळे धर्मांतराचा प्रश्नही सुटू शकेल. आज समाजात सर्व जातींचे अभिसरण सुरू आहे, त्यास अधिकृत मान्यता  मिळेल.त्यासाठी विचारवंतांचा सहभाग आवश्यक आहेच.
                - विद्या दिवेकर वाटेगांव (ता. वाळवा)
                          फोन : ९९६० ४५२ ८४१

वस्तू विनिमय
   
     गेल्या महिन्यातील एका अंकात वैद्य सुविनय दामले यांचा लेख फार चांगला आहे. त्या संदर्भात माझी एक आठवण आहे. माझे वडील शाळामास्तर होते आणि वैद्यकीही करीत. आरे (ता.देवगड) या गावातील एक बाई गंभीर आजाराने ग्रस्त होती. वडिलांनी तिला आमच्या घरी चार महिने ठेवून घेऊन उपचार केले. माझ्या आईने तिची मनोभावे शुश्रूषा केली. ती खडखडीत बरी झाली, पण तिच्याकडे ऐपत नाही त्यामुळे काही घेण्याचा प्रश्नच नव्हता. तिचा नवरा आचारी काम करायचा.
   त्याच वर्षी माझी मुंज झाली, त्यावेळी आठवडाभर हा गृहस्थ स्वैपाकासाठी आमच्याकडे राबला.त्याबद्दलचे पैसे माझ्या वडिलांनी देऊ केले, तर डोळयंात पाणी आणून त्याने ते घेतले नाहीत. ही कृतज्ञतेची भावना आजच्या काळात लोप पावत चालली आहे.
    मी १९५६ साली देवगड येथे शल्यक्रियागार सुरू केले.त्या काळात लोकांच्या हातात फारसा पैसा नव्हता. अॅपेंंडिक्स करिता ५०-६० रु. आणि मोतीबिंदूला ३०-३५ रु. असे माझे दर होते. तेवढेही देण्यास पुष्कळ लोक असमर्थ होते. मग  ते जळाऊ लाकूड, गुरांसाठी गवत, शेणी इत्यादी देऊ करीत. मला त्याचा काहीच उपयोग नव्हता, म्हणून मी ते घेतले नाही. उपचारांचे पैसे शक्य असतील तर द्या नाहीतर राहूद्यात, असे त्यांना म्हणावे लागत असे. पण त्याची फेड  कधीतरी करण्याची त्यांची मनस्वी इच्छा असे.
     आजच्या काळात या गोष्टी सांगून खऱ्या वाटायच्या नाहीत, पण ही माणसे पैशाने गरीब असली तरी समजुतीने सुसंस्कृत होती असे म्हणावे लागेल.
              - भा. वा. आठवले, देवगड (जि. सिंधुदूर्ग)
                                     मो. नं. ९४२२४३५३३८


केवलं  ज्ञानमूर्तिम्
      भगवद्गीतेत वर्णन केल्याप्रमाणे ज्ञानी, भक्त, आणि स्थितप्रज्ञ असा कोणी मनुष्य प्रत्यक्षात असू शकतो का? रत्नागिरीच्या पं. पुरुषोत्तमशास्त्री तथा अप्पा फडके यांना ज्यांनी पाहिले, त्याना तसा मनुष्य असू शकतो हे कळले असेल. आपल्या उत्तम आचरणाने कुटुंबाचे आणि समाजाचे हित करणारे शंभर वर्षांचे आयुष्य जगणारे आणि ब्रह्मप्राप्तीचा मार्ग अनुसरणारे अप्पा फडके यांचे जीवन त्या आदर्शांप्रत जाणारे होते. वयाच्या ८०व्या वर्षी ते शालीय विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवीत, तर वैद्य मंडळींस चरकसंहिता, प्रैाढांना उपनिषदे समजून सांगत. जिज्ञासूंना ब्रह्मसूत्रे, ज्ञानेश्वरी, योगवाशिष्ठ, एकनाथी भागवत यंाबद्दल तपशीलवाार माहिती देत. त्यांचे हे अध्यापन सकाळपासून संध्याकाळपर्यंत न कंटाळता, न थकता, कोणतीही अपेक्षा न करता चालत असे.रत्नागिरीच्या पाच पिढ्यांना त्यांनी सुसंस्कृत केले. शिवाय पश्चिम महाराष्ट्नत हजारो प्रवचनांतून ज्ञानदान केले.
      ते जसे सांगत तसे स्वत: वागत त्यामुळे त्यांचा प्रभाव असे. त्यांच्या निगर्वी मोकळया सरळ स्वभावामुळे त्यांना कोणीही कधीही शंका विचारत असे. शंका व त्यांचे समाधान हीच पध्दत त्यांना या क्षेत्रात पसंत होती.शिकवण्यापूर्वी त्या विषयाचे चिंतन ते करीत, आणि कठीण विषय सोपा करून सांगण्याची तर त्यांची हातोटीच होती.पीएच् डी च्या उमेदवारंाना त्यांनी मार्गदर्शन केले, अनेक विद्वद्सभाही भूषवल्या. शंभर वर्षांचे जग त्यांनी पाहिले, पण नव्या जुन्यांची सांगडही उत्तम प्रकारे घातली.
     पुरुषोत्तमशास्त्री फडके यांचा जन्म १मे १९१५चा. आणि त्यांचा मृत्यू २४ एप्रिल २०१५चा. म्हणजे दोन्ही अर्थांनी त्यांचे पुण्यस्मरण आज करण्याजोगे आहे. कुर्धे येथे त्यांच्या  वडिलांची वेदपाठशाला होती.१० वर्षांनंतर त्यांनी रत्नागिरीला संस्कृत पाठशालेत दिगंबरशास्त्री जोशी यांच्याकडे राहून  व्याकरण, मीमांसा, वेदान्त यांचे शिक्षण घेतले. पुणे, बडोदे, काशी, म्हैसूर येथील कठीण परीक्षा देऊन ते नव्य व्याकरणाचार्य शाास्त्री झाले. रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलात त्यांनी अध्यापन केले; त्याचबरोबर संस्कृत पाठशाला, कुर्ध्याची पाठशाला, शिक्षक कल्याणनिधी, पतपेढी अशा अनेक संस्थांचे काम मागे लावून घेतले. त्या कामात त्यांची तडफ, विद्वत्ता, तळमळ, नेटकेपणा हे गुण दिसत.
     त्यांंना समर्थ साथ लाभली ती त्यांच्या पत्नी इंदिराबाइंर्ची! त्या कर्तबगार, गृहकर्तव्यदक्ष, पतिपरायण होत्या. अप्पांनी निवृत्तीनंतर लगेचच गाायत्री पुरश्चरण एक वर्ष केले. ते त्या काळात एम ए च्या मुलांना शिकवत, पण त्याव्यतिरिक्त मौन असे. सर्व वर्णाक्षरे $काररूप आहेत या भावनेने पाहिले तर बोलणेसुध्दा $काररूप होते असे ते म्हणत. उपनिषदांच्या चिंतनातून त्यांनी उपनिषद्सार हे पुस्तक निर्मिले, तर योगवाशिष्ठावरील प्रवचनांतून त्याचेही सार पुस्तकरूपाने आले.
 त्यांचे वर्णन  करण्यासाठी काही अपुरे शब्द म्हणजे - प्रेम, आदर, आस्था, जिव्हाळा, कृतज्ञता.....
                                                                                                                                   - शारदा केळकर
                                                    एरंडवणे, पुणे ४११०३८
                                                 फोन ०२०- २५४ ६९४६७,  ७५८८ २८४ ५३०

आठवांचे साठव-
दुष्काळाची मौज
     सध्या साऱ्या वातावरणात दुष्काळ भरून राहिलाय! `लातूर पॅटर्न'ची चर्चा साऱ्या देशभरात आहे. इतके लाख लिटर पाणी, तितके टँकर, तितका पैसा.... फोटोे, मदत सगळा हैवाक चालू आहे. दुष्काळ आहे याबद्दल वाद नाही पण त्याचा गर्गशा फार. लगेच वृक्षतोडीचं पाप, तेलाची मस्ती, पाण्याचा गैरवापर असा सगळा हंगामा सुरू ! राजकारणी पुढारी तर त्याच्याही पुढचे. दुष्काळ आणि पाण्याची बोंब तुमच्यामुळं की त्यांच्यामुळं याचा निर्णय पुढच्या शतकापर्यंत लागला तर त्या पक्षाला कार्यक्षम म्हणून निवडून द्यायला हरकत नाही! पूर्वी दुष्काळ पडत होते की नाही? पाण्याची बोंब होती की नाही? पुराण किंवा इतिहासातलं, अगदी स्वातंत्र्यापूर्वीचंही सोडा; पण अलीकडचे दुष्काळ प्रत्येकाच्या आयुष्यात आलेलेच असणार.
     १९७२ साली याहून भीषण पाणीटंचाई होती. मी त्यासाली २२-२३ वर्षांचा -म्हणजे अगदी पाणी भरण्याच्याच वयाचा होतो. आमच्या गावाची वसती फार विरळ होती. विहिरीचे पाणी पार आटले होते. काही थोडी बोअरिंग झाली होती पण त्यांतून पाण्याचा ठिपूसही येत नव्हता. रात्री साधारण दोन-अडीचला आम्ही उठून पाणी आणायला निघत असू. मी, माझा मोठा भाऊ, शेजारचे बिऱ्हाडकरू मधुकर कुलकर्णी असे तीनचारजण बाहेर पडायचे. सभोवती विजेचे दिवे वगैरे भानगडच नाही. अंधुक उजेडात साधारण  एक किलोमीटर अंतराच्या कदम वस्तीच्या एका विहिरीच्या तळाशी पाणी मिळायचे. त्यात उतरून एकेक घागर  वरती आणून सगळयांच्या घागरी-कावडी भरायचे. रॉकेलचे असतात तसले १६लिटरचे दोन डबे दोन्ही बाजूला लटकावेली माझी कावड होती. म्हणजे माझ्या एकाच खेपेत ३२ लिटर पाणी घरात येत असे.कावडीच्या कांबीच्या सांधीत खोबऱ्याचा वा कोळशाचा तुकडा ठेवायचा, म्हणजे प्रत्येक झोल्याबरोबर कर्रकर्र असा नाद यायचा; त्या नादाच्या ठेक्यात पावलं उचलावी लागायची.  मधु कुलकर्णीची लोखंडी काळी माठघागर २०-२२लिटरची असेल. आमच्या वहिनीसुध्दा कमरेला १२लिटरची कळशी घेऊन या अमृतयात्रेत सामील व्हायच्या.
     या  वहिनी आमच्या घरी आल्या त्याच मुळी पाण्याच्या भर टंचाईत. त्यांचे लग्न माझ्या भावाशी झाले १९६४ साली. आमची विहीर साधारण ७५फूट खोल आहे. त्यात त्याही  वर्षी पाण्याचा थेंब नव्हता.नळाचे पाणी वगैरे तर केवळ कल्पनेतल्या गोष्टी. पण त्यांचे लग्न आमच्या दारातच झाले. बैलगाडीत पाण्याचे चौकोनी हौद घालून दूरच्या जाधव मळयातून पाण्याच्या खेपा बापू जाधवानं केल्या. त्याचे भाडे बिडे घेण्याची पद्धत नव्हती. `घरच्या' लग्नात तसला विचार कुणाच्या मनांतही नसायचा. परवापासून दुष्काळी भागातल्या लग्नांच्या संदर्भात बरीच `कौतुकं' ऐकली. यापूर्वीच्या काळात अशी परीस्थिती येत होती आणि ती मजेत निभावून नेली जात होती. पहाटपाळीला पाण्याच्या खेपा केल्यानंतर आमच्या अंगणात न्याहरीची पंगत बसे. त्यात प्रामुख्याने सायीचे दही, शिळी भाकरी, दाण्याची चटणी अशी मेजवानी असायची. फारतर अधून मधून नाचणीची आंबील! त्यात हशा आणि हौस नांदायची. लग्नात बैलगाडीतून पाणी आणून लाडवाच्या पंगती उठायच्याच. ते पाणी ओतून घेण्यात पोरंठोरं धुडगूस घालायची . माझ्या भावाच्या त्या लग्नात मळेकरी गुळेकरी आणि पै पाव्हणे सारे जमलेले होते. जेवायचे ते पाचशे पान जेवलेच होते. पण त्यात `सरकार आमच्याकडं पाहातच नाही....' असला काही सूर  नव्हता.हल्ली घराघरी दोन-तीन माणसं आहेत. कृष्णा नदीचं पाणी नळाला येतं, या पंधरवड्यात ते एक दिवसाआड येतं, तरी सभोवारी ओरड इतकी की या माणसांनी कधी पाणी बघितलं होतं का, असं वाटावं!
     पावसात भिजण्याची मजा होती, थंडीत शेकोटीची मजा होती, आणि उन्हाळयात टंचाईचे चटकेही होते. ते सगळे तितक्याच सहजतेने झेलण्याची इलम त्या काळाला होती. तेवढं पाणी प्रत्येकाच्या अंगातही मुरत असावं. आताच्या अधीर पाण्याला उतावीळ अविवेकाचा खळखळाट जरा जास्तच जाणवतो!  
                                                                 -वसंत आपटे, किर्लोस्करवाडी   
     
 
 निवेदन

     पोस्टाची सेवा अविश्वासार्ह  मानली गेल्यामुळे काही वर्षांपूर्वी कुरीयरचे दिवस आले. आजकाल कुरीयर सेवाही कोलमडल्याचा अनुभव येत आहे. पोस्टातून साधे टपाल मिळणे पूर्वीपेक्षा सुधारलेले नाही, पण कुरीयरपेक्षा ते कमी वाईट म्हणावे लागते. बाहेरगावांहून आमच्याकडे कुरीयरने पाठविण्यात येणारे टपाल,  जवळच्या त्यांच्या सोयीच्या गावात ठेवून  `तुमचे टपाल येथून घेऊन जा, आमच्याकडे  माणूस नाही' असे सांगितले जातेे. ते टपाल आणण्यात वेळ व पैसे खर्च होतात कुरीयर टपाल देणारी काही पोरं `डिलीव्हरी चार्ज' म्हणून दहावीस रुपये मागून घेतात. साधे टपाल पोस्टाने ५रुपयात येते, ते रजिस्टर केले तर जादा १७रु. लागतात, तरीही ते कुरीयरच्या नेहमीच्या दरापेक्षा  स्वस्तच पडते, व भरोशाचे असते.इंटरनेट असेल तर  त्या टपालाचा आपल्या जागेवर बसून  माग काढता येतो. म्हणून  विनंती की,  आमच्याकडे टपाल पोस्टानेच पाठवावे. महत्वाचे वाटल्यास फार तर रजिस्टर करावे. कुरीयरने काही पत्रे दोनदोन महिन्यांनी आमच्या हाती आल्याचे अनुभव आहेत, म्हणून ही सूचना करणे योग्य वाटले.
          -व्यवस्थापक

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन