Skip to main content

Sampadkiya in Vishesh ank

पाऊलवाटेची चाल
सेवीं धैर्य, धनान्ध त्यांप्रति वृथा दावूं नको दीनता
कूपीं कीं जलधीत कुंभ जल घे जें मापिलें तत्वतां ।। - वामनपंडित

छत्तीसावे वर्ष संपले आणि `तीन तपांचा एक टप्पा ओलांडला' त्या मन:स्थितीत काही महिने गेले, तोवर आज सदतीसावेही वर्ष झाले. दरवर्षी भिंतीवरचे क्रॅलेण्डर बदलताना प्रत्येकाला तसा अनुभव येतो. दिवसाचे चोवीसच तास, आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तसेच असतात; पण दरवेळीच असे वाटते की, हे वर्ष आले आले म्हणेतो फारच लवकर संपले! गेल्या वर्षभरात शब्दश: असंख्य वाचकांनी या अंकातील विषयांना, व एकूण विचारदिशेला समरसून दाद दिली हे नमूद केलेच पाहिजे. ३७वर्षांचा टप्पा एखाद्या कार्याच्या वा संख्येच्या बाबतीत मोजण्यासारखा नाही, पण एखादे काम एकहाती करत राहण्याला वाचकांची ती दाद फार महत्त्वाची ठरते आहे.

हे `नियत'कालिक असले तरी त्याची काही निरंतर व्यवस्था असली पाहिजे अशी साधारण विचारसरणी असते. एखादे कार्य निरंतर चालू राहिले पाहिजे, राहावे -असे वाटणे स्वाभाविक आहे पण तसे तर कधीच कुठे घडत नाही. संत सज्जनांनीसुद्धा आपापले जीवितकार्य चिरंतन चालत राहण्यासाठी काही व्यवस्था केल्याचे दिसत नाही. आद्य शंकराचार्यांचे, बुद्धाचे, तसेच अलीकडच्या काळातील समर्थ रामदासांचे मठ ही त्यांच्या कार्यविस्तारासाठी म्हणून केेलेली व्यवस्था होती. पण त्या भक्कम व्यवस्थेतून त्यांचेच कार्य खूप विस्तारत गेले असे तर आपण ठामपणे म्हणूही शकत नाही. शेदोनशे वर्षांपूर्वी जे न्यास स्थापन झाले, ज्यांनी स्थावर उभी केली त्यांचे मोल आणि मूल्यही आजच्या किंमतीने फार कमी झाले; त्यांचे दैनंदिन खर्चही भागत नाहीत आणि इप्सित कार्याचा तर मागमूसही दिसत नाही.

एक काळ असाच होता की, सारे थोर नेते आपापल्या वैचारिक भूमिकेच्या प्रसार-प्रचारासाठी वृत्तपत्र चालू करीत असत. `त्या' काळातली जी वृत्तपत्रे आजही आर्थिक सामर्थ्यावर चालू आहेत, त्यांच्यामागे कुणी `थोर' राहिलेले नाही; व प्रसार-प्रचाराकरिता काही वैचारिक भूमिकाही त्यांच्याकडे शिल्लक राहिलेली नाही. टिळकांचा `मराठा' ब्रिटिश पार्लमेंटला उचकत असे; तर आचार्य अत्रेंच्या `मराठ्या'ने संयुक्त महाराष्ट्न् गाजवला आणि वरळी समुद्रकाठी प्रचंड स्थावर उभारली. आज `कोणताही' मराठा त्या क्षात्रतेजाचा दिसत नाही. त्या पूर्वसूरींच्या कार्याशी या अंकाची तुलना करण्याचा तर प्रश्नच येत नाही, पण त्या साऱ्या महाजनांनी चाललेल्या महापंथाचा विचार करून, आपल्या पाऊलवाटेची चाल ठरवावी इतक्यापुरतीच त्यांची आठवण केली.

आपल्या शक्तीबुद्धीने हा उपक्रम चालवावा, एवढे संकल्पनही या टप्प्यावर कमी नव्हे. एवढ्या कालावधीनंतर नव्हाळी असणार नाही, तसा यात काही उन्मेषही नाही; पण प्राप्त कामगिरीसाठी मन:पूर्वक प्रयत्न मात्र निश्चितच आहेत. वाचक आणि हितचिंतक त्या प्रयत्नांचे मोल जाणून त्यास योग्य ती शक्ती-बुद्धी देत राहतील. पूर्वीच म्हटल्याप्रमाणे ही तपश्चर्या नव्हे तर मर्यादित उद्दिष्टांची पुराणिकी आहे. काही घरांतून मूठ-पसा मिळत राहिला तरी भागते; आणि निर्वाह करून शिल्लक `टाकण्या'चा प्रश्नही संपतो.

सर्व ऋणाबंधीयांविषयी कृतज्ञता!

(वसंत आपटे )
   संपादक

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...