Skip to main content

Nov.3

`भाऊच्या धक्क्या'ची कहाणी
मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना देणारा `भाऊचा धक्का' १७५ वर्षांचा होईल.  बंदराशी संबंधित हा परिसर `भाऊचा धक्का' म्हणून समाजमनावर ठसला आहे. मुंबई बंदर उभारणारे प्रख्यात बांधकामतज्ज्ञ भाऊ लक्ष्मण अजिंक्य यांचे ते नाव.
पाठारे प्रभू ज्ञातीतील लक्ष्मण हरिश्चंद्रजी अजिंक्य उर्फ भाऊ रसूल यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण नजीकच्या करंजा या गावी १७८९साली झाला. भाऊ अजिंक्य यांनी मुंबईत कुलाबा येथील गनक्रॅरिएज कारखान्यात अव्वल कारकून म्हणून जम बसवला. या कंपनीत क्रॅप्टन रसेल या ब्रिटिश अधिकाऱ्याचा भाऊंच्या काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास होता. कारखान्यातील कामगारवर्गात भाऊंची वट-पत वधारली. कंपनीत त्यांना `भाऊ' नावाने ओळखायला लागले. क्रॅप्टन रसेलचा लोभ असल्याने त्यांना भाऊ रसूल म्हणूनही ओळख लाभली.
भाऊ अजिंक्य यांच्या नोकरीच्या काळात मुंबईला ग्रामीण बाज होता. माहीम, माटुंगा, वरळी, परळ, माजगाव, धाकटा कुलाबा आणि मोठा कुलाबा या सात बेटांत मुंबई विभागलेली होती. कारखान्यात सात बेटांवरून कामगार येत असल्याने त्यांच्या जेवणाखाण्याचे हाल होत. दुपारच्या भोजनाची व्यवस्था होण्यासाठी उपाहारगृह सुरू करून ते भाऊ अजिंक्यनीच चालवावे असे रसेलसाहेबांनी सुचवले. माफक दरात भोजन द्यायला भाऊंनी सुुरुवात केली. भाऊंच्या ठायी असलेली कल्पकता आणि परिश्रम घेण्याच्या तयारीमुळे क्रॅप्टन रसेलसाहेबांनी त्यांना नोकरीतील बढतीबरोबर वाढत्या व्यापारी क्षेत्राचं दालन उघडं करून दिलं.
मुंबईतील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न होताच. भाऊंनी त्याचा मक्ताच मिळवल्यावर नोकरीला रामराम ठोकला. आता ते व्यवसायिक झाले. शहरातील डबकी आणि सांडपाण्याच्या खोलगट जागांवर भराव टाकून ते बुजवण्याचं कंत्राटही मिळालं. उरण ते मुंबई सागरी प्रवास करून मुंबई बंदरावर उतरताना प्रवाशांचे हाल व्हायचे. चांगले रस्ते बांधण्यासाठी कलेक्टरकडे भाऊंनी अर्ज केला. मशीद बंदर ते क्रॉफर्ड मार्केट, डोंगरी ते समुद्रसपाटीपर्यंत जागेवर भराव टाकून रस्ताबांधणी करण्याचे कंत्राट भाऊ अजिंक्य यास मिळाले. कलेक्टर ब्रुस यानी अभिप्राय दिला की, लक्ष्मण हरिश्चद्रजींनी सादर केलेल्या सूचना सार्वजनिक हिताच्या असून सागरी मार्गे तस्करींनाही आळा बसेल.
भाऊ अजिंक्य यांना बांधकाम व्यवसायिक म्हणून मान्यता प्राप्त झाली. पडीक जमिनीवर कृषी उत्पादन आणि पशुसंवर्धनाचे व्यवसाय करण्यासाठी ओसाड गाव वहिवाटी देण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला. या ओसाड जमिनीवर लागवड करून विकास करणाऱ्यांना खोत म्हणत असत. गॉडफादर क्रॅप्टन रसेलनी शिफारस केल्यावर मुंबई उपनगरातील दिंडोशी(गोरेगाव), चिंचवली (मालाड), आकुर्ली (कांदिवली) या तीन गावांच्या खोतीचे कायदेशीर हक्क ईस्ट इंडिया कंपनीकडून भाऊंनी मिळवले. भाऊ `खोत' म्हणूनही ओळखले जाऊ लागले.
दीडशे वर्षांपूर्वी साऱ्या मुंबई बेटावर समुद्रामार्गे होणारी मालाची व प्रवाशांची वाहतूक लहान मोठे मचवे-गलबतांंद्वारे होत असे. मुंबईच्या अफाट सागरी किनाऱ्यावर प्रवाशांसह मालाची चढउतार करण्यासाठी सुरक्षित असा धक्का नव्हता. प्रवासी आगबोटी समुद्रात लांबवर उभ्या करून मचव्यातून किनाऱ्यावर येणाऱ्या प्रवाशांना अडचणी येत. सुरक्षित मालधक्का बांधण्याचा तत्वत: निर्णय घेण्यात आला, पण सरकारची तिजोरी भरलेली नव्हती. परिणामी मालकी हक्कांनी बंदर बांधकाम करण्यासाठी अर्ज मागवले गेले. भाऊंनी धाडस केलं. भाऊंच्या अर्जाला काही अटींवर मंजुरी देऊन त्यांच्याकडून नियोजित बंदर कामाचा आराखडा मागवला.
भाऊंनी भरती-ओहोटीसह एकूण पर्यावरणाचाही अभ्यास केला होता. मातीचा भराव टिकणार नाही म्हणून कचऱ्याचा भराव घालून नियोजित बांधकामासाठी जमिनीला आकार दिला. कचरा पाण्याने ओला झाल्यावर त्याचा लगदा जमिनीला पकड घेणार हे अनुभवी भाऊ जाणून होते. कचरा विल्हेवाटीचे कंत्राट भाऊंकडे होतेच. मर्यादित साधनसामुग्री, यंत्रसामुग्रीची कमतरता, अपुरा निधी, वेळेचे बंधन, लीज करारातील फेरबदल यामुळे भाऊंची कोंडी झाली. काही स्थानिकांनीही अडथळे निर्माण केले. गव्हर्नर रॉबर्ट ग्रांट यांनी ६% चक्रवाढ व्याजाने दीड लाख रुपयांचे कर्ज मंजूर केल्याने कामाला गती आली. भाऊंनी चार वर्षांत बंदराचं काम पूर्ण केलं. या बंदरावर येणाऱ्या जाणाऱ्या मालासाठी सुसज्ज वखारही उभारली. मुंबई हे पहिले वखारयुक्त बंदर गणले जाते.
बंदराला आवश्यक त्या शेडस्, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था, अॅप्रोच रोड, सुरक्षित तटबंदीची बांधणी केली गेली. भाऊंची तत्परता, कौशल्य आणि प्रामाणिकपणाची जाण ठेवून ईस्ट इंडिया कंपनीने जलवाहतुकीद्वारे मालाची चढउतार करण्यासाठी पुढील पन्नास वर्षांचा मक्ता भाऊंना बहाल केला. या प्रवासामुळे हे परिक्षेत्र `भाऊचा धक्का' म्हणून आजतागायत ओळखले जाते. याच सुमाराला गव्हर्नरपदी जेम्स कारनॅक यांची नेमणूक झाली. `मी बांधलेल्या या बंदर धक्क्याला कारनॅक साहेबांचे नाव द्यावे' ही भाऊंनी केलेली सूचना. त्यामुळे आज हे कारनॅक बंदर म्हणूनही ओळखले जाते.
- अरुण मळेकर (`विजयन्त' लेखातून संक्षेप)

लोकांना आपले हित कळते
बिहारची निवडणूक भारतीय जनता पक्ष सपशेल हरला, या घटनेला लालू-राहुलच्या विजयापेक्षा जास्त महत्त्व आले आहे. नीतिशकुमार यांचा कारभार आधीच्या राजवटीपेक्षा खूपच चांगला होता हे जनताही मान्य करत असते. तो आधीपेक्षा चांगला होता, कारण आधी फारच दुर्दशा होती. ती रोखण्यात तरी नीतिश यशस्वी झाले, तेवढी सुधारणाही खूप समाधान देणारी होती. नीतिशकुमारांच्या पाच वर्षांतील पहिल्या टप्प्यात भा.ज.प.त्यांच्यासमवेत होता. पण केवळ मोदींविषयी द्वेषातून नीतिशनी युती तोडली. त्यानंतर भा.ज.प.वाल्यांना मनगटे चावत बसण्याव्यतिरिक्त काही करता येण्याजोगे नव्हते.

भा.ज.प.चा पराभव हा नकारात्मक मतदानाचा स्पष्ट परिणाम दिसतो. गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत भा.ज.प.ला चांगले मतदान झाले, कारण आधीच्या दहापंधरा वर्षांत काँग्रेस व इतरांनी केलेल्या घाणेरड्या कारभारास जनतेचा ठाम विरोध होता. सत्ताविरोधी पक्षातच असल्याने नरेंद्र मोदी व अन्य भाजपवाल्यांना जनतेचाच विरोध प्रच्छन्नपणे मांडता आला, व ती सारी नकारात्मकता आपल्या बाजूला ओढता आली.

नंतरच्या दीड वर्षात मोदी सरकारने जे केले ते प्रयत्न पूर्णत: नव्हे पण पुष्कळसे चांगले आहेत. पण त्या मोजक्या चांगल्या प्रयत्नांतून जे मिळवले ते बिहारमधल्या वाड्या-वस्त्यांवर कर्कश्शपणे सांगण्याजोगे मुळीच नव्हते. लोकसभेच्या वेळी प्रचलित सरकारवर विरोधी झोड उठवणे वेगळे, आणि प्रधानमंत्री म्हणून बिहारच्या आडगावात स्थानिक राज्यकर्त्यांवर उखडणे वेगळे. ते भान त्या पक्षधुरिणांस नव्हते पण जनतेकडे होते, हे दिसून आले. कोणी आमदार हल्ली एसटीने प्रवास करतच नाहीत, पण केलाच तर त्याने एकदोन रुपयांच्या चिल्लरवरून कंडक्टरला कायदा शिकवावा, किंवा आरोग्यमंत्र्याने ओसाडगावच्या आरोग्यकेंद्रातील शिपायाच्या कामाबद्दल टीका करावी याला अर्थच नसतो. आमदाराचे कार्यक्षेत्र विधानसभेत असते. तिथे पूर्ण काल उपस्थित राहून, अभ्यासपूर्ण सभ्य चर्चेतून नियम-कायदे ठरवणे आणि त्याचाच आधार घेऊन प्रशासनावर वचक ठेवणे ही त्याची शैली असायला हवी. प्रधानमंत्र्यानी पायरी उतरून खाली यायला नको होते. बिहारसाठी १.६५लाख कोटीचे पॅकेज जाहीर करण्याची मोदींची प्रचारशैली प्रधानमंत्र्याची नव्हती. परदेशी संपन्न भारतीयांत भारतप्रेमाचा आवेश निर्माण करणारे भाषण प्रधानमंत्र्यानी करणे पुष्कळ अर्थांनी प्रभावी ठरते, पण बिहारच्या प्रचारगर्दीतील आक्रस्ताळी आवेश अस्थानी होता, तो झिडकारण्याइतका सुज्ञपणा तेथील मतदारांनी दाखविला.

या एकूण घडामोडींचा स्पष्ट अर्थ आपल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वेगळा लावता येतो. पॅकेजची लालूच दाखवणे, प्रचाराची धूमशान उठवणे, अवाच्यासवा बोलणे, असंबद्ध संबंध जोडणे, निरर्थक घाणेरडी - जशास तशीसुद्धा - भाषा वापरणे यांमुळे यश मिळते हा समज चुकलेला आहे. भारतात शिक्षणाचा प्रसार झाला, तरुण पिढी मतदार झाली, जागतिक परिस्थिती कळू लागली, असे एकीकडे मांडले जाते; ते खरेही आहे. त्यामुळे असल्या पारंपरिक क्लृप्त्यांनी मतदारांना भुलवता येते हा समज कशाला करून घ्यावा? भाजपच्या केंद्रीय व निदान महाराष्ट्नपुरत्या कारभाराचा लेखाजोखा जनतेच्या मनांत अगदी या क्षणीही तयार असतो. आधीच्या सरकारपेक्षा हे लोक बरे आहेत इतपत समज त्यांना पुन्हा अधिकारावर येण्यास पुरेसा नाही. जर याही स्थितीत लोकांनी यांस निवडून दिले तर त्याचे श्रेय यांच्या कारभाराला नव्हे, तर इतरांच्या दोषांना जाईल हे निश्चित.

एखाद्या समाजगटाचा अनुनय करणारे किंवा अस्मिता फुलविणारे राजकारण फसव्या यशाचे असते. लंडनमध्ये आंबेडकर स्मारक, इंदू मिलमध्ये आणखी एक स्मारक, ठाकरे यांचे महापौर बंगल्यात स्मारक हे शासनाचे निर्णय फार मोठ्या सर्वांगिण कर्तबगारीचे नव्हेत. कुणालातरी कधीतरी काहीतरी समाधान होईल इतकेच. उद्या कदाचित् औरंगाबादचे संभाजीनगर होईल, कुठल्यातरी महापालिकेत सभोवतीची खेडी घाल-काढ होईल, कुणाची कुठल्यातरी सांस्कृतिक मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती होईल, कुठेतरी भूषणे-दूषणे होतील, ग्रामपंचायतीत `युती की स्वतंत्र' याचे चर्वण होईल.... हे करायला एवढे मोठे सचिवालय, एवढी मोठी यंत्रणा फारच जास्त होते. राज्यकारभार याला म्हणण्यास आता जनता तयार नसावी. रस्त्यांची स्थिती-पाण्याचा प्रश्न-अतिक्रमणे-प्रदूषण हे प्रश्न वेळखाऊ व किचकट आहेत. पण त्या दिशेने पाऊल पुढे पडतच नाही. `मराठी पाऊल पडते पुढे....' असली गाणी म्हणत चार नटनट्यांची नाटकी दृष्ये पाहून, पाऊल पुढे न पडता ते अडखळते. शाळेचे सहज प्रवेश, वीजबिलांची वसूली करून विजेचा (पुरेसा राहूद्या, पण) नियमित पुरवठा, टोलचा प्रभावी निर्णय व अंमल, वाहतूक-स्वच्छता-नागरी जाण याबाबत जबर कार्यवाही, प्रामाणिक-सद्गृहस्थीला अभय व नम्र साहाय्य, उल्लू हपापल्या गणंगांना वचक या प्रकारच्या सुधारणा करण्याला केवळ इच्छाशक्ती व अंमल एवढ्यांचीच गरज आहे. त्याचेही अस्तित्व कुठे दिसत नाही. शासन बदलले हे सामान्य शहाण्या लोकांनी कशावरून ओळखायचे?

हे ओळखल्यामुळेच भाजपवालेही `त्यातले'च असे बिहारच्या लोकांना वाटले. त्यांनी नीतिशकुमार आहेत ते काय वाईट असा विचार केला. आण्णा हजारे यांच्या दिल्लीतील अल्पजीवी आंदोलनात उगीच पावशेर मारणाऱ्या बेदीबाइंर्ना दिल्लीकरांनी नाकारलेच होते. सारांश असा की, केवळ हा पक्ष की तो पक्ष, स्मारक ठाकरेंचे की मुंडेंचे, लाल रेशनकार्ड की पिवळे, एलबीटी की जकात हे प्रश्न जनतेला फार महत्त्वाचे नाहीत. तात्पुरते तात्कालिक उपाय आणि उत्तरे समाधानाची नाहीत एसटी स्टँड, गावातल्या पिचकाऱ्या, टोलनाक्याचे अनुभव, गावगन्ना वाळकुंद्र्यांचे फलक, रटाळ पोलिस, भटाळ धर्मक्षेत्रे ही सगळी दृश्ये कारभार सांगायला पुरेशी असतात. त्यात बदल नसेल तर नकारात्मक मतदान होते. बिहार निकालातून हा निष्कर्ष काढता येतो.

नद्याजोड प्रकल्प हवा
भारताच्या उत्तरेकडील नद्यांचे पाणी संथपणे बंगालच्या उपसागरास मिळते. रेल्वे मार्गाप्रमाणे जर सातपुडा फोडून एक जलवाहिनी काढून ती दक्षिणेतील तापी, नर्मदा, गोदा, कृष्ण, कावेरीला मिळवली तर? शासनाने भारतात सर्वत्र नद्याजोड कार्यक्रम हाती घेतला आहे. `गंगा-कावेरी' योजनेचा कार्यक्रम हाती घेतला तर संपूर्ण दक्षिण भारत बाराही महिने हिरवागार राहणार. उन्हाळयात बर्फ वितळल्याने हिमालयातील नद्यांना महापूर येतात त्याचाही दक्षिण भारताला फायदा मिळेल. `गंगा-कावेरी' योजनेमुळे दक्षिणेतील नद्यांच्या उपनद्या, नहर, नाले, पाणवठे, धरण, पाटबंधारे, तलाव, सागर भरून पाण्याचे योग्य वितरण होऊन ठिकठिकाणच्या महापुरांना आळा बसेल. जनमानसात या योजनेबाबत महत्त्व जितके वाढेल तसतसे ही योजना अंमलात आणण्यास सरकारला बाध्य ठरेल. जगातील अन्नाचे दुर्भिक्ष्य संपविण्याचा हाच एक उत्तम मार्ग होय.
- बळवंत भा. खोडे, सोमलवाडा, नागपूर

न्यायास विलंब हा अन्याय
आपल्याकडील न्यायव्यवस्था चांगली आहे असे म्हटले जाते परंतु आमदार-खासदार व अन्य सेलिब्रेटी यांच्यावरील निरनिराळे खटले वर्षानुवर्षे का चालतात ते  समजत नाही. लांबलांबच्या तारखा दिल्या जातात त्यामुळे ते दोषी ठरत नाहीत, निवडणुकीस पात्र ठरतात. निवडून येतात. मग माझे नाव अमक्या प्रकरणातून गाळा असे विनंतीअर्ज करतात. प्रकरणाचा निकाल लागतच नाही. अशी कोणाकोणाची प्रकरणे कधीपासून प्रलंबित आहेत याचा तपशील जाहीर करावा.
- वि.म.मराठे,विश्रामबाग, सांगली  मोबा.९४२०६७८९६५

`बालमजूर' नेमका कोण?
मध्यप्रदेशातील श्री.प्रकाश सत्यार्थी यांना बालमजूर सुटका कार्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. श्री.सत्यार्थी यांनी ८०हजार बालमजुरांची सुटका केल्याचे जाहीर झाले आहे. त्याचा आवश्यक तपशील श्री.सत्यार्थी यांनी नोबेल पारितोषिक समितीला पुरवला असणार.
बालमजूर म्हणजे धरपकड करून कैद केलेले आणि राबवले जाणारे जनावर नव्हे. बालमजूर स्वत: होऊन `कामधंदा द्या. पोट भरण्यासाठी चार पैसे हवे आहेत' अशी मागणी करीत मालकाकडे येत असतो. त्याच्या गरजूपणाचा, बालपणाचा फायदा घेऊन मालक त्याला अल्प वेतन देतो, छळतो, राबवतो. ते मूल शिक्षणापासून वंचित राहते. अशा बालमजुराला सोडवणे मुळीच अवघड नाही. मालक म्हणेल, `आत्ता ताबडतोब त्याला घेऊन जा; मी थोडेच त्याला बंदिवान केले आहे? घरात स्थिती आहे की अन्नाचे फाके पडत आहेत. त्यामुळे मूल बिचारे निमूटपणे मी सांगेन तेवढे काम करीत आहे.' अशा मुलाला मजुरीपासून हुसकले तर त्याच्या पोटाची आबाळ होणार. त्यामुळे ते मूल दुसरीकडे असाच कामधंदा करणार किंवा चोऱ्यामाऱ्या करणार.
बालमजुरांची सुटका करायची असेल तर, त्याला मजुरी करून मिळते तेवढे धन दान-मदत किंवा साहाय्य म्हणून द्यायला हवे. किंवा रोज दोन तास सोपे साधे काम उदा.दूध पिशव्या वाटप, वृत्तपत्रविक्री, साफसफाई अशी कामे मिळवून द्यायला हवीत. तेवढी प्राप्ती त्याला करून द्यायला हवी. शिवाय त्याच्या शिक्षणाची मोफत सोय करून द्यायला हवी. ही दोन्ही कार्ये एका `बालमजुरा'च्या बाबतीत एखाद्याने केली तर त्याने एका बालमजुराची सुटका केली असे होईल, अन्यथा ती सुटका नाही.
श्री.सत्यार्थी यांनी अशा ८०हजार सुटका केल्या आहेत काय? नेमके `बालमजुर-विमोचन' म्हणजे काय याचा मला तरी उलगडा झालेला नाही. कुणाला खात्रीशीर माहिती असेल तर कृपया स्पष्टीकरण व्हावे.
- म. वि. कोल्हटकर, सातारा
फोन : ०२१६२-२३२५०४

मागे वळून पाहताना...
मान्यवरांचे स्फूर्तिदर्शन
वयस्कर आजीबाई गप्पा मारायला लागल्या की गतकाळाच्या स्मृती उफाळून येतात. अर्धा अर्धा तास तोच विषय सांगत बसतात. एक-दीड तासापूर्वीचे आठवत नाही पण गतकाळाविषयी बोलायला आवडतं, हा सगळयांचा अनुभव असेल.
मी ज्या गावात जन्मले त्या रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानबद्ध करण्यात आले होते. ते घर सावरकर स्मारक आहे. त्याच गावात लोकमान्य टिळकांचा जन्म झाला.  `टिळक स्मारक' म्हणून ती वास्तू ओळखली जाते. सावरकरांनी दलितांसाठी बांधलेले पतितपावन मंदिर आहे. मी लहान असताना गणपती उत्सवात मेळयात भाग घेत असे. `तुम्ही आम्ही सकल हिंदु बंधु बंधु' हे गाणे सर्व प्रेक्षकांसह खड्या आवाजात म्हणून देवालय दुमदुमून सोडत. १९४७साली रत्नागिरीत साहित्य संमेलन झाले. ना.सी.फडके अध्यक्ष होते. आम्हाला त्यांना बघायचे होते. लहान मुलांना पुढे जाऊ देत नव्हते. मी व माझ्या मैत्रिणी एका भिंतीवर चढून त्यांना पाहिले.
१९४३-४४  साली साने गुरुजी गावात आले. बारा बैलगाड्यांतून मिरवणूक काढली गेली. मैदानावर त्यांचे व्याख्यान झाले. राष्ट्न्भाषा परीक्षा पास झालेल्यांना प्रशस्तीपत्रके दिली गेली. मलाही पहिल्या परीक्षेत पास झाल्याबद्दल त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक मिळाले. माझा भाऊ स्वयंसेवक असल्याने गांधीहत्येनंतर सत्याग्रहात गेला. तो सहा महिने तुरुंगात होता. त्या कारणावरून सहा महिने आम्ही शाळेची फी भरू शकलो नाही म्हणून आमचा वार्षिक रिझल्ट दिला नाही. मी हेडबाई जोशींना भेटले. `तुझा भाऊ काही गुन्हेगार म्हणून जेलमध्ये गेला नाही' असे म्हणून त्यांनी आमचा रिझल्ट दिला.
गावाला समुद्राची सुंदर साथ. एक पांढरा (म्हणजे वाळू पांढरी) व दुसरा काळा (काळी वाळू). पांढऱ्या समुद्रावर समुद्रफेस व तांदूळमणी मिळत. आम्ही पाच-सहा मैत्रिणी परकराच्या ओच्यात समुद्रफेस व तांदूळमणी घेऊन आलो. खूप उशीर झालेला. घरचे काळजी करत होते. कान धरून पाच-पाच उठाबशा काढाव्या लागल्या.
मालतीबाई जोशी व श्री.जोशी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शाळा चालवली होती. मालतीबाई म्हणजे कर्व्यांची शिष्या. आम्ही मुली दिवाळीच्या सुटीत भाऊबीज फंड गोळा करायचो. बाहेरगावाहून येऊन एका बाईने शाळा चालवली, याचे काहींना वैषम्य वाटायचे. १९५०साली शाळेचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम झाला. सर्व कार्यक्रमात माझा सहभाग होता. रत्नागिरीतील दानशूर भागोजीशेट कीर यांनी शाळेला इमारत बांधून दिली. सर्व कामगार शीख होते. इमारतीचे काम चालू असतानाच कीर स्वर्गवासी झाले. त्यावेळी सर्व शीख कामगार हमसाहमशी रडलेले मी पाहिले आहेत.
१९४०साली रत्नागिरीत राष्ट्न्सेविका समितीची शाखा निघाली. मुली हातात दंड घेऊन शाखेत निघाल्या की `चालल्या झाशीच्या राण्या' असे म्हणत. शाखेतील संस्कारांमुळे आमचे आत्मबळ नक्कीच वाढले. त्याचा पुढील आयुष्यातही खूप फायदा झाला. तरुण वयात आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यावेळी सरकारी ऑफीसरकडे रेडिओ असे. माझ्या काकांनी लिहिलेल्या एका गोष्टीचे `नभोनाट्य' झाले. ते ऐकण्यासाठी काकांना कलेक्टरच्या बंगल्यावर जावे लागले.
कोणी म्हणेल, `तुमच्यावेळी सर्व आदर्शच होते का?'-तसे नाही. तथापि ज्या समाजात राहतो त्याबद्दल आस्था, मातृभूमीबद्दल निर्व्याज प्रेम हे गुण आचरले तर देशाचा नक्कीच उद्धार होईल अशी माझ्या पिढीची श्रद्धा आहे.
- श्रीमती विद्या लेले आनंदनगर, नाशिक १३
(मोबा.(सौ.सुवर्णा - ९८२२८७३७४७)

ही जाण फार महत्त्वाची
२००९मध्ये `आपले जग'मध्ये निवेदन आले होते. अवधूत सुरेश कुलकर्णी, रा.पलूस हा दहावीमध्ये केंद्रात पहिला आला होता. तो आणि त्याच्या घरातील लोक आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण कसे करायचे या काळजीत होते. प्रयत्नवादी माणूस अशा संकटांवर स्वार होतोच. `आपले जग'मधून एक निवेदन दिले, `अवधूत हा केंद्रात प्रथम आला आहे. त्याला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत आवश्यक आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी पाठवावी. ही मदत एकत्र करून अवधूत यास देण्यात येईल.' `आपले जग'चा सुुरुवातीपासूनच मी वाचक, लेखक, हितचिंतक आहे. त्याचे कार्य मी जवळून पाहिले आहे. मी माझ्या शक्तीनुसार आर्थिक सहकार्य पाठवले. अवधूत याचे कृतज्ञतेचे व आपले जगचे आभाराचे पत्र आले आणि हा विषय स्मृतीतून बाजूला गेला. आपलं कर्तव्य संपलं असं वाटलं.
महिन्यापूर्वी मला अवधूत सुरेश कुलकर्णी यांचे पत्र आले. त्यांनी अगदी आपलेपणाने लिहिले होते, `मी २००९-१० साली दहावी बोर्ड परीक्षेत तालुक्यात पहिला आलो होतो. ही बातमी `आपले जग' अंकातून वाचून आपण मला मदत केली होती. आपले शुभाशीर्वाद आणि शुभेच्छेमुळे मी माझे इंजिनियरिंगचे शिक्षण ऋळीीीं उश्ररीी ुळींह ऊळीींळपलींळेप पूर्ण केले. आपले शुभाशीर्वाद असेच राहोत.'
पाच सहा वर्षांनी आलेले पत्र, सहकार्याची जाणीव आणि एवढं अगत्यानं लिहिणं! त्याला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आवर्जून पत्र लिहिलं असणार. ही जाणीव फार महत्त्वाची आहे. अशाच छोट्या छोट्या गोष्टींतून ही मुलं उंच भरारी घेतात. आपल्याला आलेल्या अडचणीची जाणीव त्यांना असल्यामुळे आपल्या उत्पन्नातील काही भाग ते गरजूंसाठी निश्चित बाजूला काढणार याची खात्री आहे.
- शाम रघुनाथ साखरे, ब्राह्मणपुरी, मिरज (मोबा.९८५०३८०५३८)


सर्वांनी वाचलाच पाहिजे असा ग्रंथ 
शाश्वत ऊर्जेची शोधयात्रा
विठ्ठल राजाराम जोगळेकर यांची वैज्ञानिक दृष्टीची शोधयात्रा ग्रंथरूपाने हाती आली आहे. ऊर्जेच्या अमर्याद वापराने जागतिक तापमानवाढ व जलप्रदूषण हे दोन महाराक्षस निर्माण झाले आहेत व ते आता जगाच्या मुळावरच उठले आहेत. दगडी कोळसा, खनिज तेल, जलशक्ती व अणुशक्ती या विनाशकारी ऊर्जास्रोतांना पर्याय म्हणून शाश्वत ऊर्जेच्या शोधातून शाश्वत विकासाचा मार्ग सापडेल. या विचारांना परिपुष्टी देणारे सुरेख विवेचन केले आहे याची प्रचिती येते. पुस्तकात उत्कृष्ट फोटो व मुखपृष्ठ अर्थपूर्ण आहे. या देशाचं काही भलं व्हावं अशी कळकळ असणाऱ्या सर्वांनीच हे पुस्तक वाचायला हवं, इतकं ते बहुमोलाचं आहे.
- डॉ.भा.वा.आठवले, देवगड (सिंधुदुर्ग)  मोबा. ९४२२४३५३३८
                                     किंमत                  सवलतीत
अलीकडेच प्रकाशित झालेले पुस्तक
`शाश्वत ऊर्जेची शोधयात्रा' (पृष्ठे २०८)
प्रस्तावना - नरंेंद्र चपळगावकर         ३००/-                २००/-

मूळ संस्कृत संहितांचा इंग्रजी अनुवाद राजगोपालाचारींनी केला
त्यांचे सुगम मराठीत रूपांतर
श्री रामायण (पृष्ठे ३५०)
प्रस्तावना - विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर २००/-               १५०/-
श्री महाभारत  (पृष्ठे ५४४)
प्रस्तावना - डॉ.विजय भटकर                 ५५०/-               २५०/-

रु. १०५०/- ची तीन पुस्तके एकत्रित फक्त ५००/- रुपयात.
`वि.रा.जोगळेकर' या नावचा चेक किंवा म.ऑ. मिळताच रजि.पोस्टाने पुस्तक रवाना होईल.
पत्ता - आपले जग, वाल्मिकी, किर्लोस्करवाडी (जि.सांगली) ४१६३०८
फोन (०२३४६) २२२०५८ / २२३५५८

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन