Skip to main content

13Jan2014

`जगातील सर्वात उंच पुतळा' अशी ज्याची ख्याती असेल तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा  पुतळा गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणापासून ३.२ किमी. वर नर्मदा नदीमध्ये साधू नावाच्या बेटावर साकारला जाणार आहे. त्यावरून गेल्या महिन्यात काही विवाद झाले. नेहरू-पटेल विचारांवर टिप्पणी झाली. त्या प्रकल्पाविषयी....
स्टॅच्यू ऑफ युनिटी
`स्टॅच्यू ऑफ युनिटी' ह्या प्रकल्पाचे जनक आर्किटेक्ट श्री.प्रभाकर महादेवराव कोल्हटकर सध्या पुण्यात स्थायिक आहेत. त्यांच्या मुलाखतीचे रूपांतर -

` हे काम माझ्या हातून होत आहे. आम्ही मूळ बडोद्याचे. माझे वडील श्री.महादेवराव कोल्हटकर हे उत्तम शिल्पकार होते. त्याकाळी शिल्पकलेचे शिक्षण कुठे मिळत नव्हते. सॅण्ड कास्टींग हा प्रकार औद्योगिक जगतात माहीत होता. लॉस वॅक्स कास्टींग हे ब्राँझ किंवा पंचधातूचे पुतळे करण्यासंबंधीचे ज्ञान माझ्या वडिलांनी परदेशी मासिकातून मिळवले आणि पुतळे करण्यामध्ये आपला खास ठसा उमटवला. त्यावेळी असे पुतळे कोणाला करता येत नव्हते. माझ्या वडिलांनी असे पुतळे तयार करण्यासाठी स्वत:ची फाऊंड्नीही सुरू केली होती. लहान-मोठे पुतळे करता करता एक काम वडिलांकडे चालून आले - लोकमान्य टिळकांचा मुंबईतील चौपाटीवरचा पुतळा करण्याचं! ते लोकमान्यांचे भक्त असल्यानेच - फक्त खर्च घेण्याचे, कामाचा मोबदला न घेण्याचे ठरवून तो पुतळा करून दिला.
साधारण १९२६ पासून माझ्या वडिलांचे सरदार पटेलांशी संबंध आले. बार्डोली येथे शेतकऱ्यांकडून जाचक शेतसारा माफ करण्यासाठी जे आंदोलन झालं, त्यावेळी पटेलांना `सरदार' ही पदवी दिली गेली. सरदार पटेल यांच्या देशकार्याने ते आमच्या मनात केव्हाच जाऊन बसले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते देशाचे उपपंतप्रधान बनले. ते केवळ २० महिनेच पदावर राहिले, परंतु त्या काळात त्यांनी देशासाठी जे काही केले त्यामुळे त्यांच्याविषयी आदर आणि अभिमानच वाटतो.
१९४९ च्या सुमारास त्यांचा पुतळा करण्याचे ठरले. सरदार पटेलांनी आपल्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढून माझ्या वडिलांनी ५ सिटिंग्ज दिली आणि पुतळा साकार झाला. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे महत्त्वाचे काम त्यांच्या नेृतृत्त्वाखाली झाल्याने त्यांचा पुतळा मंदिरासमोर उभारणे हेच सयुक्तिक होतं. हा पुतळा उभारण्याचे काम माझ्या थोरल्या बंधूंनी केले.
मी बडोद्यातच लहानाचा मोठा झालो. आर्किटेक्ट झालो. बडोदा हे संस्थान भारतात विलीन झाल्यामुळे त्यावेळी इमारती बांधायचं काम जणू ठप्पच झालं होतं. मग मी दिल्लीला गेलो. चक्क सरकारी खात्यात - टाऊन प्लॅनिंगमध्ये - रुजू झालो आणि ३३ वर्षे काम करून रितसर निवृत्तही झालो. माझं घर असल्यामुळे बडोद्याला परत आलो.
एकदा एका स्नेह्यांच्या ओळखीने विज्ञान परिषदेतर्फे सरदार सरोवर धरणावर आमची सहल गेली होती. ज्या सरदार पटेलांच्या नावाने हे भव्य धरण बांधण्यात येत आहे त्यांचा ६ फुटी पुतळा पाहून मनात खंत दाटून आली आणि त्याच क्षणी मनात लख्खकन् विचार आला, - रुजला - पक्का झाला की इथे सरदारांचे भव्य स्मारक झालेच पाहिजे. शांत नर्मदा नदी, तुडुंब जलाशय, नदीमध्येच स्मारक, पाण्यात पडलेले प्रतिबिंब हे सर्व माझ्या डोळयांसमोर दिसू लागले आणि वाटले की, सरदार पटेलांचे भव्य व्यक्तिमत्त्व, तसेच उत्तुंग कार्य, ज्वलंत देशभक्ती हे सर्व प्रतीत व्हायचे असेल तर स्मारकही भव्यदिव्य, सर्व जगाने तोंडात बोट घालावे असेच व्हायला हवे. माझ्या मनात विचारचक्र चालू झाले.
हे कुणीतरी माझ्याकडून करवून घेत होते. स्केचेस बनवली, त्यांचे फोटो काढले. माझ्या जावयांच्या - डॉ.विभास मोडक यांच्या मदतीने पॉवर पॉइंर्ट प्रेझेंटेशन बनवले आणि सरळ श्री.नरेंद्र मोदी यांना मेल पाठवून दिली. एका आठवड्यातच त्यांचे उत्तर आले आणि मला भेटीला अहमदाबाद येथे बोलावले गेले. श्री.मोदी अतिशय व्यग्र असल्यामुळे सर्वसाधारण लोकांना पाच मिनिटांचीच भेट देतात. परंतु आम्ही केलेले पीपीटी पाहताना साधारण आठव्या फ्रेमलाच त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प होणार आणि इथेच होणार! ही भेट चक्क ४३ मिनिटांची झाली!
नंतर सर्व चक्रे हलायला लागली आणि प्रकल्प फायनल स्टेजला आला. ३१ ऑक्टोबर २०१३ ला (सरदारांच्या १३८ व्या जयंतीला) भूमिपूजनही झाले. प्रत्यक्ष काम २६ जानेवारी २०१४ ला सुरू होईल. नेहमीप्रमाणे पुतळा (६०० फूट उंची) चौथऱ्यावर (२०० फूट उंची) स्थापन होईल. हा पुतळा जगातील सर्वोच्च उंचीचा आणि अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेच्या `स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'च्या (३०० फूट उंची) दुप्पट होईल. जगातील इतर सर्व पुतळे हे कोणाचे तरी स्मारक या स्वरूपात आहेत. हा पुतळा सरदार पटेलांचे स्मारकच असेल पण आगळेवेगळे असणार आहे. इथला पुतळा आणि चौथरा यांच्या आतील इमारतींमधील १.२६ लाख चौ.फूट जागा इतर कामासाठी (स्मारक, संग्रहालय, हॉटेल, बगीचा, करमणूक केंद्र, अधिवेशन केंद्र, संशोधन केंद्र इ.) वापरता येणार आहे. ह्या पुतळयाच्या केवळ चौथऱ्यामध्येच नव्हे तर पुतळयाच्या आतमध्येही अगदी वर जाता येणार आहे. अगदी वरच्या भागात तारांगण आणि बाहेरचे देखावे पाहण्यासाठी गॅलरी अशा अनेक सोयी असतील.
घरातील संस्कार (शिल्पकला), शिक्षण (आर्किटेक्ट) आणि माझा अनुभव (टाऊन प्लॅनिंग) यांचं एकत्रीकरण झाल्यामुळेच हे काम माझ्या हातून घडलं. एका ब्राह्ममुहूर्तावर मला `स्टॅच्यू ऑफ युनिटी' हे नाव सुचलं. श्री मोदी यांना ते आवडलं आणि आता ह्या प्रकल्पाला तेच नाव देणं पक्कं झालं आहे.'

श्री.कोल्हटकर यांच्या साधेपणाचं, निगर्वीपणाचं आणि देशभक्तीचं उदाहरण म्हणून या कामाकडे का पहावं? तर ह्या प्रकल्पासाठी, त्याच्या कन्स्ल्टेशनसाठी त्यांनी एक रुपयाही फी आकारलेली नाही. सरदार पटेलांसाठी म्हणून हे काम त्यांनी केलं आणि प्रकल्प संपेपर्यंत लागेल ते योगदान देण्यासाठी तत्पर आहेत. ह्या ८३ वर्षांच्या तरुणाने प्रकल्पासाठी जे केलं, ते अपूर्व आहे. हा प्रकल्प लवकर पूर्णत्वाला जावा आणि हे स्मारक पाहाताना श्री.प्रभाकर कोल्हटकरांची आठवण राहावी हीच अपेक्षा.
(श्री.प्रभाकर कोल्हटकर : फोन (०२०)२५४२५९०३)
(`ब्राह्मण पत्रिके'तून साभार)


झाडूचा  धडा
दिल्लीत केजरीवाल स्थानापन्न झाले, या घटनेला मीडियावाल्यांच्या दृष्टीने महिनाभराचे मोल लाभले. पुढे काय होईल यावर कितीही काथ्याकूट केला तरी तसा अंदाज कुणाच्या बापाला येत नाही. सोन्याचे भाव येत्या वर्षभरात किती वाढतील हे जर कोण्या पिढीजात सराफाला कळत असते, तर त्याने सगळी स्थावर इरेला घालून सोन्याचीच खरेदी केली असती. पण तिथेही निश्चिती नसते, म्हणूनच बाजार-व्यवहार चालतो. तसेच राजकीय उलथापालथीचे आहे. केजरीवालची राजवट कशी असेल ती असो, आणि ती तगो किंवा फसो; आपल्या दृष्टीने एक मुद्दा महत्त्वाचा असा की, सामान्य मतदाराने मनात आणले आणि अत्यल्प कृती केली तर भले भले बेगुमान राज्यकर्ते वठणीला येतात.  केवळ राजकारणच नव्हे तर सगळे समाजकारण, शिक्षण, संघटना, गल्लीतील मंडळे आणि सोसायट्या, इतकेच काय आपापली घरे-घराणी सरळ चालू लागण्याइतकी सुधारू शकतात.

स्वातंत्र्यानंतरच्या पन्नासेक वर्षांत ज्या चुका आणि घोटाळे झाले, त्यांतून पारतंत्र्याइतकाच अन्याय वाढत गेला. आधीच्या इतर आक्रमकांनी जी लूट केली असेल, तितकीच लूट इथल्या स्वकीय आक्रमकांनी केली. त्याचे कारण जाणते मध्यममार्गी नागरिक समाजापासून कमालीचे उदासीन व अलिप्त बनले. राजकीय व प्रशासकीय धोरणे, व त्यांची अंमलबजावणी हळूहळू अन्यायी होत गेली. शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक, कृषिविषयक.... कोणत्याही क्षेत्रात जी बजबजपुरी माजली ती एकाच दिवसातली नव्हे. आपल्या घरची पुढची पिढी ऐकत नाही, कधीच जुमानत नाही एवढ्याला फारतर स्वत:च्या समाधानासाठी कालगती म्हणता येते; पण सामाजिक व सामुदायिक जीवनात अशा अकारण, अतार्किक कारणांमागे लपता येत नाही. सार्वत्रिक बजबजपुरीला वा अराजकी प्रशासनव्यवस्थेला निश्चित कारण असते. त्या कारणाचा शोध केजरीवालच्या मर्यादित  यशातून निदान समंजस जाणत्या शहाण्यासुरत्या वर्गाने घ्यायला हवा. दिल्लीतच असा सुजाण वर्ग आहे, असे नाही. तर तो सदासर्वत्र अस्तित्त्वात असतोच. त्याला गदगदून हलवून जागे करणारा एक केजरीवाल भेटला, त्या उदासीन शहाण्या घटकाने जागृतीपूर्व एक जांभई दिली, तरीही
घाल सिंहासने दुष्ट ही पालथी
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती
याचा अनुभव आला.

इथे असंख्य समस्या आहेत, तर्कदुष्ट धोरणे आहेत, अन्याय्य अंमल आहे म्हणून पश्चिमेकडे तोंड करून इथल्या पाण्यावरच उदक सोडणाऱ्यांची संख्या अलीकडे बरीच वाढली आहे. देशातल्या कुठच्याही यंत्रणेतील अव्यवस्थेविरोधात साधे एक मतही देण्याची टाळाटाळ करणाऱ्या कृतिशून्य शहाण्यांना केजरीवाल यशातून पुष्कळ शिकता येईल. आपल्या सोसायटीच्या किंवा पतसंस्थेच्या वार्षिक सभेतील कामकाज न पाहता, शेवटच्या खाद्यान्नापुरता संंबंध ठेवणारे बुभुक्षित; एवढाच जर आपल्या सभासदत्त्वाचा अर्थ असेल तर ती संस्था आपल्यासाठी काय करू शकणार? केजरीवाल यांची अधांतरी टांगणी झाल्यावर त्यांनी सत्ता घ्यावी की नाही; असा खरोखर त्यांनाही पेच होता. त्यांनी सत्ता घेण्यास तर काँग्रेसचा पाठिंबा अटळ होता. मग त्यासह सत्ता घेतली तर `हेही तसलेच' म्हटले जाणार आणि न घेतली तर `आता हे पळपुटे' म्हटले जाणार! यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी अपूर्व मार्ग शोधला व पुन्हा जनमताचा कौल घेतला. त्यासही आक्षेप घेऊन, ``तुम्हाला निर्णय घेण्यासाठी निवडून दिले, तर पुन्हा प्रत्येक वेळी जनमत कशाला?'' हे वरती आहेच! हे चुकार, टीकाखोर, कृतिशून्य शहाणपण हा आपल्या तथाकथित सुशिक्षित मध्यमवर्गी वर्गात भिनलेला आजार आहे. हा आजार मुख्यत: बुद्धिजन्य असल्यामुळे तो ठरवून दूर करणे शक्य आहे आणि तो दूर करून अगदी थोडी कृती केली तर इथले बेमुर्वत अराजक दूर होऊ शकते हे केजरीवालने दाखवून दिले आहे.

कुटुंबातल्या गणपतीच्या आरतीसाठीही सहभागी न होण्यात ज्यांना उच्चभ्रू अलिप्तता राखता येते, त्यांच्यासाठी हा बदल केवळ चर्चाविषय ठरेल. कालपर्यंत सामान्य कार्यकर्ते असलेला केजरीवालांचा कंपू आज मंत्रीमंडळ बनला आहे. त्यांना राज्य करणे जमेल - न जमेल - हा पुढचा प्रश्न आहे. पण हे होऊ शकते एवढे तरी त्या मंडळींनी दाखवून दिले. आपल्याला सर्वत्र उत्तम व्यवस्थेचा उत्तम समाज हवा असेल तर किमान तसा प्रयत्न करू पाहणाऱ्यांना आपल्या अनुकूल मताच्या एका काडीचा आधार आपल्याला देता आला पाहिजे. आपल्या संबंधातील प्रत्येक संस्था-संघटना ही आपल्यापुरती संसद असते. तिथे आपण मत देण्यापुरतेही सक्रिय झालो तरी अप्रिय अव्यवस्थेला धडा देता येतो. एवढे लक्षात घेऊन योग्य त्यास बळ देण्याएवढी क्षुल्लक कृती करण्यासाठी प्रत्येकाला बुद्धी व्हावी. देशा-परदेशातूनही आज मत देता येते, कामकाजात भाग घेता येतो. ते तंत्रज्ञान केवळ बायको-पोरांच्या दर्शनापुरते वापरून भागणार नाही. केजरीवाल हे आपल्यासारख्या खदखदत्या मनांचे एक उदाहरण झाले. आपल्या उदासीनतेची जळमटे काढण्यास त्याचा झाडू वापरावाच लागेल!


मोडीतून जिऊचा शोध
स्त्रियांवरील अत्याचारासंदर्भात सांगायचे तर समाजाची मानसिकता बदलली पाहिजे, हा विचार प्रकर्षाने पुढे येऊ लागला आहे. कोणतीही अन्यायकारक गोष्ट कायदे करून सरकारला थांबवता येत नाही. त्यासाठी समाजानेच बदलले पाहिजे. हा विचार आणि तो बदल एखाद्या दुसऱ्याच्या मनात येऊन चालणार नाही. सर्व समाजाने एकत्र येऊनच त्याचा प्रतिबंध केला पाहिजे. हे सर्व चर्चेसाठी ठीक वाटते, प्रत्यक्ष ही गोष्ट कशी घडवून आणायची? त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. कायदा करून दारुबंदी होत नाही, बालविवाह थांबवता येत नाहीत.
पण अशा गोष्टी घडतात त्यावेळी आपली भूमिका काय असते? त्याच्या उलट एखादे उदाहरण डोळयापुढे येते, त्यावेळी त्याचे कौतुक करावे की आश्चर्य करावे? असा मला प्रश्न पडतो.
नाना फडणीसांची नववी पत्नी जिऊबाई नाना गेले त्यावेळी नऊ-दहा वर्षाची होती, फारसे शिक्षण नाही. पेशवाईच्या शेवटच्या काळात मराठी राज्याची आणि फडणीसांच्या कुटुंबाची वाताहत झाली. नाना कधी रणांगणावर युद्धासाठी गेले नाहीत, केवळ बुद्धिचातुर्यानेच ते लढले. त्यामुळे शिंदे, होळकर या सरदारांचा त्यांच्यावर आकस. पूर्वी जी राज्यातील आणि राज्य-कारभारातील प्रबळ व्यक्तिमत्त्वे होती त्यांनीच पुण्यात बेदिली निर्माण केली. पुण्यात दंगे धोपे सुरू झाले आणि या सगळयात नानावरील आकसाची भर पडली. नानांच्या कुटुंबियांचे फार हाल झाले. त्यांचे दफ्तर इतस्तत: विखुरले गेले. या सगळया विरोधात जिऊबाई ठामपणे उभ्या राहिल्या, सर्व संकटांना तिने तोंड दिले. काळ आणि पैसा याची तमा न बाळगता नानांच्या मिळकतीची सर्व कागदपत्रे, सनदा तिने जपून ठेवल्या आणि फडणीसांच्या वंशातील दत्तक मुलांकडे सर्व कारभार सोपवण्याचे काम केले.
सांगलीच्या आपटे घराण्यातील मी कु.शशिकला सदाशिव आपटे, मोहन फडणीस यांच्याशी विवाह करून फडणीसांच्या घरात आले आणि वैशाली मोहन फडणीस झाले. हुशारीचे वलय नव्हते, किंवा फडणीसांच्या परंपरेने आलेला वैभवाचा मानही नव्हता. लग्नानंतर सुरुवातीची पाच-सहा वर्षे परिस्थितीचा अंदाज घेण्यात गेली. सगळया व्यापात रमत असताना `घाशीराम कोतवाल' हे नाटक आले. नाटक पाहिल्यानंतर त्यात शंका कुशंका निर्माण झाल्यामुळे नानांच्या कागदपत्रांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली! नानांच्या दफ्तरांचा आणि त्यावेळच्या कागदपत्रांचा अभ्यास करायचा तर मोडीशिवाय गत्यंतर नाही, हेही जाणले. त्यासाठी मोडीचा अभ्यास केला. मोडीतील स्थित्यंतरे जाणून घेताना लक्षात आले की, वेगवेगळया कालखंडात वापरली गेलेली मोडी लिपी वेगवेगळी आहे. सगळयाचा अभ्यास हे खूप वेळ खाणारे आणि कष्टाचे काम आहे आणि खर्चिकही आहे. यासाठी मोडीच्याच अभ्यासातून सुचलेली कल्पना मी पुढे रेटली आणि वेगवेगळया लोकांची, वतनदारांची जुनी कागदपत्रे वाचून त्यांचे लिप्यंतर करून देण्याचा व्यवसाय सुरू झाला. अनेकांना आपली जुनी कागदपत्रे, बक्षिसपत्रे, वतनपत्रे, उतारे यांचे लिप्यंतर करून हवे असते. सरकारी कचेऱ्यात त्याची गरज असते. त्यासाठी ह्या लिप्यंतराला अधिकृतपणा यावा म्हणून सरकारी सही शिक्याची मान्यता आवश्यक असते. तीही  प्रयत्नाने मिळवली. त्यातून होणारी अर्थप्राप्ती, यासाठीच लागणाऱ्या खर्चासाठी वापरायला सुरुवात केली. वेळोवेळी करावा लागणारा प्रवास, स्टेशनरी इत्यादीसाठी लागणाऱ्या खर्चाची सोय झाली. हे सर्व करताना एकीकडे संसार चालूच होता. काळाप्रमाणे सांसारिक अडचणींना, सुख-दु:खांना तोंड देत सातत्याने मोडीचा अभ्यास चालू होता. ह्या सर्व अभ्यासामुळे नानांच्या पत्नी जिऊबाई यांच्यावर आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले. ते आता कॉन्टिनेंटल प्रकाशन प्रकाशित करीत आहे.
वैशाली मोहन फडणीस (शशी आपटे)
बेलबाग संस्थान,१७७/७८, बुधवार पेठ, लक्ष्मी रोड, पुणे ४११००२
फोन : ९८८१६९५५६२

संमेलने कोकणात व्हावीत
आमच्या फडके कुलाचे संमेलन जानेवारीत फडके स्नेहवर्धिनीच्या वतीने पुण्यात होत आहे. मी त्यात कित्येक वर्षे सहभागी होत आलो आहे, आता वय आणि प्रकृतीमान यांमुळे घडत नाही.
मला असे वाटते की, आपापल्या घराण्यातील मंडळी जिथे अधिक करून राहतात तिथे तिथे कौटुंबिक संमेलने व्हावीत. कोकणात सर्वत्र आपली कुलदैवते व उपास्यदेवता आहेत. अंबेजोगाईचे क्षेत्र ज्यांना दूर वाटते, अशा कोकणवासीयांसाठी साखळी (गोवा) येथे गुरुदास मोने यांनी योगेश्वरी मंदिर बांधले आहे. तिथे सभागृह व निवाससोयी आहेत. गुहागर येथे दुर्गामातेचे भव्य मंदिर आहे. रत्नागिरी येथे पं.पुरुषोत्तमशास्त्री फडके हे आज नव्वदीत पाठशाळेत शिकवतात. रत्नागिरीत इतर स्थळे आहेतच. शिवाय अलिबाग ते गोवा या पट्ट्यात कित्येक सुंदर स्थळे व देव-देवतांची मंदिरे आहेत.
दिवाळी ते फेब्रुवारीपर्यंत हवामान छान असते. रस्ता व रेल्वेच्या सोयी झाल्या आहेत. या सर्वांचा लाभ घेत आपल्या श्रद्धाभूमीत वार्षिक संमेलने होणे इष्ट वाटते. पुणे-मुंबई किंवा अन्य शहरांतून नियोजन करण्यासाठी तरुण व कर्तबगार पिढीने जबाबदारी घेतली तर हा योग साधेल. सोयीनुसार जास्त जवळीकीने एकत्र राहण्यातून बऱ्याच गोष्टी साधतील.
- श्री. शं. फडके, (०८३२-२७३२६७९)
किनारा (बोर्डा), मडगाव, गोवा

डिसेंबर अंकात 
कोणा जिज्ञासूने विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया...
महिलांनी तुळस का तोडायची नसते?
गौतमी तंत्रात तुलसीदळाचे वर्णन आहे. सर्व फुलांपेक्षा नील किंवा लाल कमल हजारपटीने श्रेष्ठ असते, त्याहीपेक्षा तुळस श्रेष्ठ. तुळशीची मंजिरी त्याहून श्रेष्ठ. श्रीकृष्ण व श्रीविष्णूच्या पूजेत तुळस महत्त्वाची. तुळस तोडताना चुकून मंजिरी तुटली तर तो, रुक्मिणी वा लक्ष्मीचा अपमान समजतात. पतीला आवडणाऱ्या वस्तूत कुणी ढवळाढवळ केली तर स्त्रियांना रुचत नसते, त्यावरून त्या देवी कोपतील. म्हणून स्त्रियांनी ती तोडूच नये असा प्रघात.
(`पण का?' या पुस्तकातून...)

जुन्या केरसुण्या व खराटे का जाळायचे नाहीत?
घरातील अस्वच्छ, अभद्र गोष्टी केरसुणी दूर करते, म्हणून दिवाळीत त्याची पूजा करतात. स्वच्छतादेवतेचे ते प्रतीक. त्या जीर्ण किंवा म्हाताऱ्या झाल्या म्हणून जाळायचे नाही. घरातील व्यक्ती म्हातारी झाली म्हणून त्यास जाळायचे काय? तेच खराट्याबाबत.
छशु लीेेा ीुशशि लश्रशरप,
र्इीीं, ेश्रव इीेेा ीुशशि?
- ह. शं. लेले, सांभारे रस्ता,
गावभाग, सांगली

या प्रकारे कित्येक प्रघात असतात. ते स्थल व कालानुसार बदलतही असतात. त्यांना फारसा शास्त्रार्थ नसतो. `शास्त्रात् रूढिर्बलीयसि ।' असे म्हणतात. कधीतरी कुणालातरी काहीतरी अनुभव येतो, त्यावरून ठोकताळा बसतो, आख्यायिका बनते, दृढ होते. संतोषी माता या चित्रपटास खूप यश मिळाले, ती आपल्याकडे स्थिर झाली. मार्गशीर्षातले गुरुवार अलीकडे सुरू झाले. त्यामागे कारणे शोधत बसलो तर काय हाती लागणार?
स्त्रियांनी नारळ `वाढवू' नये, कुणी सांगितलं? - कुणीही नाही. फोडला तर काय होईल? फुटेल! पण कुणाची घट्ट समजूत असेल तर असूदे. त्यास विज्ञान पढवायला गेलो तर तो नारळाऐवजी आपले डोके `वाढवेल'. ज्या गोष्टी अप्रिय, त्या अशुभ `मानल्या' जातात. ``तिन्हीसांजेला भांडू नये'' असं सांगतात. मग दिवसा भांडलं तर चालतं का? - पण आधीच तिन्हीसांजेची भयप्रद कातरवेळ, पूर्वी दिवे मिणमिणत. अशा वेळी भांडण्यातून आणखी काही अभद्र घडू नये, ही मानसिकता असते. तूप कढविणे, नवी घडी मोडणे, केस कापणे.... अशा अनंत समजुती, शास्त्राच्या आधारे बाष्कळच! पण मानसिक श्रद्धेच्या  आधाराने उपयुक्त!! `भांडू नये' हे सर्वकाळी सत्यच आहे, पण निदान तिन्हीसांजेची वेळ टाळली गेली तर तेवढा श्रद्धेचा उपयोगच म्हणायचा.
पुरुषांची बरोबरी म्हणून हल्ली स्त्रिया पुरुषी वागतातच, मग नारळ फोडू नये असे म्हणणे किती टिकणार? आता त्या अंत्यविधीही करू लागल्या. ते कालानुसार बदलणारच. रूढीचा प्रभाव असतोच, पण रूढी बदलते! जिजाबाई, झाशीवाली, ताराबाई, मादाम कामा वगैरे रणरागिणी म्हणतात. पण त्याच काळात स्त्रियांनी सोप्यावरही यायचं नाही, असं मानत. स्त्रियांनी नारळ वाढवायचा नाही? - यांनी तर शत्रूची डोकी `वाढवली' ना!!
हे असले प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांना अंत नसतो? `का' याला उत्तर समर्थ नसेल तर तो प्रश्न निरर्थक. रूढीच ती, - पाळली काय आणि न पाळली काय!
- वसंत आपटे

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन