Skip to main content

9Dec.2013

व्यक्तीऐवजी संघटनात्मक संघर्ष
स्त्रियांवरील अत्याचार ही गोष्ट सध्या फारच संवेदनशील मानली जात आहे. स्त्री-पुरुष असमानता जगाच्या प्रारंभापासून आहे. शारीरिक, स्वाभाविक आणि प्राकृतिक दृष्टीने पुरुष निसर्गत: सबल असतो म्हणून त्याने अरेरावी करावी हे आज कोणीच मान्य करणार नाही. त्या अरेरावीमुळे निम्मी मानवसंख्या पीडित होणे निखालस वाईट, पण त्याहीपेक्षा कौटुंबिक व सर्व सामाजिक असंतुलन होणे हे तर महाभीषण! ज्या आधारे कुटुंबसंस्था विकसित झाली आणि कुटुंबांच्या समन्वयातून समाज सुसंस्कृत सुदृढ व्हावा, तो आधार समानतेच्या भावनेवर भक्कम राहायलाच हवा; समानतेच्या आचरणावर नव्हे! बायकांनी पॅन्ट-शर्ट घालण्याने समानता येत नाही, उलट पुरुषांप्रमाणे वागण्याच्या इच्छेतून पुरुषांचे प्राबल्य स्वीकारल्याप्रमाणेच होते. त्यांनी निसर्गत: ज्या मर्यादा सांभाळायच्या असतात, त्यांचे उल्लंघन होण्यातूनही त्यांच्याविषयी अनादर वाढू शकतो आणि समस्याही वाढू शकतात.

सुसंस्कृतपणे, हळूवारपणे समाजमनावर हे सर्व बिंबवले पाहिजे, तसे योग्य वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घराघरांनी घ्यावी लागते. त्याऐवजी महिलांच्या बाजूने कायदे आणि कोर्टे आणि आंदोलने उभी करण्यातून मूळ प्रश्न किती सुटले आणि संशयित आरोपी किती सुटले हाच संशोधनाचा विषय ठरेल. त्याशिवाय महिलांनी कायद्याचा आधार घेऊन पुरुषांना व कुटुंबांना अकारण जेरीला आणणारी प्रकरणेही वाढू लागली आहेत. जातीयता निर्मूलनासाठी कडक कायद्यांमुळे कित्येक समरसतावादी, अभेदवादी लोकांना त्रासही होतो, त्याचप्रमाणे समाजात सभ्यतेने, प्रतिष्ठेने राहणाऱ्या काही कुटुंबांना महिला-कायद्यांनी जीव नकोसा केलेला असतो. प्रमाण भले कमी असेल, पण त्या कारणाने असमानता प्रबळ होते हे खरे आहे.

त्याच पृष्ठभूमीवर मग `पुरुष हक्क संरक्षण समिती' स्थापन होऊन त्याही समितीला वाढता पाठिंबा मिळतो आहे याकडे लक्ष वेधले पाहिजे. या संघटनेचे १६ वे अधिवेशन नाशिक येथे नुकतेच पार पडले. त्यामध्ये महिलाविषयक कायद्यांमुळे कुटुंबावर अत्याचार, कायद्यांचा दुरुपयोग, सरकारचे पक्षपाती धोरण इत्यादी विषयांवर तज्ज्ञ कायदेपंडितांनी मते मांडली. महाराष्ट्नसह इतर राज्यांत समितीच्या शाखा असून एक बाब विशेष आहे की, अनिवासी भारतीय आणि उच्च वर्गांतून या कामास उघड वा छुपा पाठिंबा आहे; त्यातले पुष्कळजण प्रत्यक्ष पीडित आहेत.

महिलांवरील अत्याचाराचे गांभीर्य यत्किंचित कमी नव्हे, पण केवळ महिला असल्याचा गैरफायदा घेऊन जी कुटुंबे अकारण अत्याचार सहन करत असतील त्याकडे लक्ष द्यावेच लागेल. महिलांवरच्या अत्याचारांविषयी खूपदा दांभिकपणे गळे काढणाऱ्यांनी महिलांकडून होणाऱ्या अत्याचारांबाबतही ठाम भूमिका घ्यायला हवी. इथे कुणी असे म्हणेल की, महिलांवर अत्याचार होतात त्या मानाने महिलांकडून होणाऱ्या कायद्याच्या दुरुपयोगाचे प्रमाण खूप कमी असते! ही प्रतारणा झाली. संख्येवरूनच इष्ट-अनिष्ट ठरवायचे, तर मग एकूण सुखाने नांदणाऱ्या महिलावर्गाच्या तुलनेत पीडितांचे प्रमाणही खूपच कमी असते, म्हणून कुणी त्या अन्यायांचे समर्थन करायचे नाही. पुरुष हक्क संरक्षण समितीची भूमिका अशी की, भारतीय दंड संहितेतील कलम ४९८ (अ) खाली नोंदलेली तक्रार दखलपात्र गुन्हा असतो; त्यावरून अजामीनपात्र विनासूचना अटक वॉरंट काढले जाते. त्यामुळे संबंधित `पुरुष'बाजूच्या लोकांना कितीही दिवस कोठडीत राहावे लागते, तर ही तक्रार जामीनपात्र ठरवावी आणि समजुतीच्या स्वरूपात ती मागे घेता यावी. त्याचप्रमाणे, मानसिक व शारीरिक छळाबद्दल पत्नी व तिच्या नातलगांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची तरतूद असावी. या मागणीत गैर अतार्किक काही नाही. पण ते सहजी मान्य करण्याची रीत आपल्या विधिन्यायाकडे नसल्यामुळे अधिवेशने, मागण्या, आंदोलने, संघर्ष याच वाटेने  पुरुषांनाही जावे लागते. आपोआपच स्त्री-पुरुष किंवा दलित-सवर्ण, किंवा कोणत्याही दोन बाजूंमध्ये समानतेचा संवाद व समन्वय होण्याऐवजी भेद आणि संघर्ष वाढत जातो.

हल्ली मोकाट तरुणाई व उल्लू प्रसारमाध्यमांमुळे समाजात अस्वस्थता आहे. ही कारणे आजच्या काळातील असली तरी मूळ प्रवृत्ती पुरातन काळापासून आहे. इंद्र आणि अहल्या `अफेअर'मुळे अहल्येची शिळा झाली पण इंद्राला शिक्षा फारशी नाही. उलट चारित्र्यवान नहुष इंद्राच्या जागी राजपदी आल्यावर तो सरळ इंद्रपत्नी शची हिच्याच मागे लागण्याइतका बहकला. सीता-द्रौपदी-पद्मिनी यांना पुरुषी नजरांची शिकार व्हावे लागले, परंतु त्यावरूनच आजचे कायदे हाताळणे अधिक घोटाळयाचे ठरू शकते. महिला कोणतेही काम पुरुषांच्या बरोबरीने करतात असे म्हटले तरी, महिला बस कंडक्टरचे ठेचाठेच गर्दीतील वावरणे मुळीच योग्य नव्हे. तितकी समानतेची समज समाजात आलेली नाही.

स्त्री व पुरुष यांच्या संघटना केवळ आपल्याच एका बाजूचा विचार करून संघर्षाची आंदोलने करू पाहात आहेत ही गोष्ट, प्रश्न कमी होण्याऐवजी वाढवणारीच ठरेल. काही जमातींवर पोलिस व कायदे संशयाने अन्याय करतात, पण काही जमातीच्या स्त्रियांना पुढे करून चोऱ्यामाऱ्यांपासून मोठे गुन्हेही करवून घेतले जातात. पोलिसी पाठलाग किंवा धरपकड झाली तर या स्त्रिया स्वत:ची पोलकी फाडून व साड्या उसकटून पुरुष वा पोलिसांविरोधात कांगावा करतात अशी उदाहरणे कानावर येतात. अशा बाबतीत स्त्रीवादी संघटना कोणती भूमिका घेऊन पुढे सरसावतात हे फार महत्त्वाचे आहे. त्यांनी या अरेरावी विरोधात समानता जोपासली तर पुरुष हक्कांचे आंदोलन आपोआपच बारगळेल. अन्यथा स्त्री आणि पुरुष यांच्या भांडणाऐवजी, तेच भांडण त्याच कारणांसाठी स्त्रीवादी संघटना व पुरुष हक्क समिती यांच्यात चालू राहील!


हे स्मारक पुन्हा सुरू व्हावे
द्रष्टे उद्योगपती कै.लक्ष्मणरावजी किर्लोस्कर व त्यांच्या सहचारिणी कै.राधाबाई यांनी एक कुटुंब भावना जोपासली. कै.सौ.राधाबाई किर्लोस्कर सगळया परिसरातील लोकांच्या प्रेमळ ममताशील आई. त्या स्वत: निष्णात परिचारिका (सुईण) होत्या. उद्योगपतीची पत्नी असूनही त्या जात-पात, वेळकाळ कशाचीही पर्वा न करता खोपटात जाऊन प्रसूती करत व संतुष्ट मनाने परतत. कै.राधाबाइंर्ना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले नाही पण त्यांची थोरवी व मोठेपणाचा सुगंध पंचक्रोशीत दरवळतो आहे. त्यांच्या नावाने १९३५ साली सुरू झालेले प्रसूतीगृह हे त्यांचे अलौकिक स्मारक आहे. स्वच्छता, हवेशीर वास्तू, सुसज्ज यंत्रणा, विनम्र सेवा यांमुळे हे अभिमानाचे केंद्र आहे.
कालमानाप्रमाणे अनेक छोटी मोठी हॉस्पिटल सुरू झाली पण वाडीच्या मॅटर्निटी होमच्या ती पासंगाला नाहीत. दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी सदर प्रसूतीगृह गेेले काही दिवस बंद आहे. लाखो रुपयांची यंत्रसामग्री, बेडस् वगैरे वापरात नसेल तर गंजून जाईल. म्हणून कळकळीची प्रातिनिधिक विनंती, हे प्रसूतीगृह लवकरात लवकर पुन्हा कार्यान्वित करावे. सोडीयम पंपाची अभिमानास्पद निर्मिती आणि प्रसूतीगृहातील बाळाचा जन्म या सारख्याच मूल्यवान गोष्टी आहेत.
- मोहन जी. आळतेकर,
(मोबा.९४२११८४९९६)
सुयोग कॉलनी, किर्लोस्करवाडी

मुख्याध्यापकांचे  स्थान
कोणत्याही शाळेचे मुख्याध्यापक हे जहाजाच्या क्रॅप्टनसारखे असतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे बहुविध असावे लागते. ही जागा पोटार्थी शिक्षकासाठी नसून सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या माणसाची आहे. त्यांना हाताखालील शिक्षकांना शिकवण्यात मार्गदर्शन तर करायचे असतेच पण त्यांच्या कामातील उत्साहाला प्रोत्साहन कसे मिळेल ते पाहायचे असते. शाळेच्या आर्थिक बाबींवर लक्ष ठेवायचे असते. सरकारी खात्याशी संबंध कुशलतेने हाताळायचे असतात. शाळेच्या विस्तारासाठी समाजातील विविध लोकांशी संबंध ठेवून शाळा समाजाभिमुख ठेवावी लागते. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे लागते. ज्या शाळेला असा मुख्याध्यापक मिळतो तीच शाळा चांगले विद्यार्थी घडवू शकते.
सध्या बहुतेक ठिकाणी निवृत्तीजवळ आलेले शिक्षक, मुख्याध्यापकपदी दिसतात. शाळा मोठी असल्यास ते, शाळेच्या कितीतरी भागात कित्येक दिवसात फिरकलेलेही नसतात. त्यांची मानसिकताच मुळी `लागले नेत्रही निवृत्तीकडे' अशी असते. `मला त्रास देऊ नका व तुम्ही जमेल तितके करा' असा सूज्ञ व व्यवहारी विचार करून उरलेली नोकरी पूर्ण करण्यात ते कृतार्थता मानतात.
अशी परिस्थिती होण्याचे कारण काय? तर सेवाज्येष्ठता हा निकष! राखीव कोट्यातील अधिकारावर आलेले लोक तरुण असतात, पण त्यांना अनुभव नसतो. जर ती व्यक्ती स्वत:च शिकलेल्या शाळेत लागलेली असेल तर आपल्या गुरुजनांच्याच डोक्यावर मुख्याध्यापक म्हणून येते, हा दुसरा प्रकार!
मुख्याध्यापकाचे पद मिळाल्यावर बहुधा बदली होते. ते आपले कुटुंब बदलीच्या ठिकाणी न आणता एकटेच रोज तीन तीन तास प्रवास करून नोकरीच्या गावी जातात. अशा वेळी या व्यक्तीकडून मुख्याध्यापक पदाच्या अपेक्षा कशा पूर्ण होणार?
सरकारी खात्यातून ज्याप्रमाणे परीक्षा घेऊन अधिकारी नेमण्यात येतात त्याप्रमाणे शिक्षण खात्यातर्फे अशा परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन त्यांची लहानमोठ्या शाळांवर उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक या जागांवर नेमणूक व्हावी. नेमणुकीचे अधिकार संस्थांकडून काढून खात्याकडे घेतले गेले तरी संस्थांकडे बदल्यांचे अधिकार द्यावेत. याचा फायदा म्हणजे संस्थांचे त्यांच्या कामावर नियंत्रण राहील.त्या व्यक्तीला त्या शाळेबद्दल किंवा संस्थेबद्दल आत्मीयता निर्माण होऊ शकेल. कंेद्रातून प्रत्येक राज्यात जसे सनदी नोकर पाठवले जातात तशी पद्धत करता येईल. या स्पर्धा परीक्षांना ज्याची नोकरी निदान दहा ते पंधरा वर्षे राहिली आहे अशा कोणाही शिक्षकाला बसता यावे. पर्यवेक्षकाची पदे मात्र सर्वांसाठी, संस्थेतील ज्येष्ठतेनुसार शिक्षकांसाठी उपलब्ध असावीत. राखीव कोट्याला धक्का लागणार नाही याची दक्षता घेता येईल. त्यामुळे शाळेचा कुटुंबप्रमुख हा कर्तबगार असेल हे पाहाणे गरजेचे आहे, तरच शिक्षणाचा दर्जा सुधारेल.
- प्रसाद भावे, (मोबा.९८२२२८४२८७)
दर्पण, ९०५, शनिवार पेठ, सातारा


कृष्णा पाटील हे जयसिंगपुरातल्या सामान्य लोकांमधले साधेसुधे व्यक्तिमत्त्व. साधे असणे हे खूप अवघड आहे. साधेपणामागे कलंदर हरहुन्नरी दडली आहे. त्यांच्या सहज भाषेत लिहिलेल्या अकृत्रिम कथा `विधिलिखित' या पुस्तिकेत आहेत. त्यापैकी एक अनुभव....
लळा
भर दुपारची वेळ होती. डोक्यावर विस्तू पडावा तसं ऊन लागत होतं. माळावरचा रस्ता पाणंद. दोन्ही बाजूला काटेरी झुडूपं. एखादी बैलगाडीच जाईल असा रस्ता. अशा रस्त्यानं मी बहिणीच्या गावाला चाललो होतो. अशा या रस्त्यानं जात असता समोर एक काळा ठिपका दिसला. तो काळा ठिपका जसजसा जवळ जवळ येत होता तसतसा मोठा मोठा होत होता. माझ्या नजरेच्या टप्प्यात तो ठिपका आला, तसं माझ्या लक्षात आलं की ती म्हैस आहे. ती म्हैस तर धावतच येत होती. म्हैस माझ्या जवळ आली आणि ब्रेक लावावा तशी गच्चकन थांबली. म्हैशीची शिंगं फताडाच्या फताडा होती. मला तिची शिंगं लागतील म्हणून मी अगदी बाजूच्या कुपात काटेरी झाडात शिरलो. अंगाला दहा ठिकाणी काटे वरबडले. अंगाची आग आग होऊ लागली.
मी कुपापासून बाहेर येऊन पुढे जाण्यासाठी पाऊल उचलले तर म्हैस माझ्यासमोर उभी. मी बाजूने जावे म्हणून तिच्या डाव्या बाजूस निघालो तर म्हैस परत माझ्यासमोर रस्ता अडवून उभी. डावीकडे आलो तर परत समोर आली, म्हणजे मुलं आट्यापाट्या खेळतात, तसा मी पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होतो. पण म्हैस काही मला तिला चुकवून पलीकडे जाण्याचा मार्ग देईना. कितीही प्रयत्न करून मला पलीकडे काही जाता येईना. ऊन रणरणत होते. तहानेने घसा कोरडा पडला होता. पण ही म्हैस मला सोडेना. बरं, मागं जावं म्हणून मागं फिरलो. माझ्यापुढे परत म्हैस येऊन उभी राहिली. धड मागे जाता येईना अशी विचित्र अवस्था माझी झाली. ह्या म्हशीच्या मनात काय आहे? तिचं कोडं मला सुटेना. तिचं हुमानच मला कळेना. मी आपला लागलो पलीकडे जायला पण ही बया माझा रस्ता अडवून उभी. अखेर कंटाळून मी खाली बसलो आणि म्हैसपण खाली बसली. मी तिचा डोळा चुकवून उठलो. मी उठताच म्हैसपण चटकन उठली व माझा रस्ता अडवून उभी राहिली.
थोडं लांबवर पाहिलं. म्हैस ज्या बाजूनं आली होती त्या बाजूनं कोणीतरी येत होतं.  ती व्यक्ती जवळ आल्यावर मला कळलं की त्या एक आजीबाई आहेत. त्यांनी माझ्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली, ``अरे मुडद्या, माझ्या म्हशीला चोरून नेतोस होय. थांब तुला चावडीत, पाटलाच्या ताब्यातच देते.'' असं म्हणून ती म्हशीचं तुटकं दावं धरून म्हशीला ओढू लागली. म्हैस जागा सोडायला तयार नाही. ती आटूनच बसली. त्या आजीबाईनं कुपातली एक ओली फोक मोडून काढली. त्या फोकीनं म्हशीला मारायला सुरुवात केली. पण म्हैस जागा सोडायला तयार नव्हती. अखेर आजीबाईनं नमतं घेतलं. माझ्या हातात म्हशीचं दावं देत म्हणाली, ``ये बाबा, तू म्हशीचं दावं धरून पुढं चल. मी म्हशीला हाकत मागनं येते.''म्हशीचं दावं हातात घेऊन पुढे येताच मुकाट्यानं माझ्या मागं येऊ लागली. घराजवळ आल्यावर आजीबाई म्हणाली, ``थांब मुला.'' म्हशीला गोठ्यात दावणीला बांधली. म्हस दोन बारड्या पाणी प्यायली. कवळाभर वैरण गव्हाणीत टाकली. मला थांबवून आजीबाई म्हणाली, ``लेका, मी तुला न्हाई न्हाई ते बोलले. हातपाय धू, घासभर खा आणि मग तुझ्या गावाला तू जा!'' मी बसलो अन् आजीबाईला विचारलं, ``आजीबाई, म्हशीचं हुमान काय आहे? मला ती पुढं सोडायला तयार नव्हती असं का?'' आतापर्यंत माझ्यावरचा आजीबाईचा राग शांत झाला होता. ती म्हणाली, ``काय सांगू लेका, ही म्हस माझ्या घरच्या म्हशीचीच रेडी. लहान असल्यापासनं माझ्या लेकानं तिचं लई लाड केल्यात. माझा लेक जेवायला बसल्यावर त्याच्याजवळ हे रेडकू येवून बसायचं. जवळ बसून भाकरी खायचं. जसजसं मोठं होऊ लागलं तसतसं माझ्या लेकाशिवाय कुठं जात नव्हतं. पोरगा रानात गेला, रानात जायचं. पोरगा गावात गेला, गावात जायचं. असा एकमेकांशी लळा लागलेला. आज महिना झाला...'' आजीबाईच्या डोळयातून पाणी वाहू लागले. ती हुंदके देऊन रडू लागली. मला काहीच कळेना. थोड्यावेळानं आजीबाईनं आपलं दु:ख आवरतं घेतलं. डोळे पदरानं पुसत पुढे म्हणाली, ``लेका काय सांगू, महिना झाला. माझा लेक हे जग सोडून गेला. त्या दिवसापासनं ह्या म्हशीनं वैरण सोडली, पाणी सोडलं. काहीही न खाता पिता ती गोठ्यात पडून राहायची. आज सकाळी मी पाणी आणायला म्हणून बाहेर पडले, तेवढ्यात म्हशीनं दावं तोडून गोठा सोडला. रस्त्यानं उधळत उधळत तुझ्याजवळ आली आणि ती तुझा रस्ता अडवून उभी राह्यली. तुला सोडायला तयार नव्हती.''
आता म्हैस वैरण खाऊन रवंथ करीत बसली होती. माझ्या मनात आलं, कसला हा जिव्हाळा आणि कसला हा लळा! हे तर आजीबाईच्या मुलाचं आणि त्या म्हशीच्या आत्म्याचं मनोमिलन.
- कृष्णा ज्ञानू पाटील, शाहूनगर, जयसिंगपूर (ता.शिरोळ)
(मोबा. ९८९०५५९७००)


निवडणुकांसंदर्भात मूलभूत बदल हवेतच!
राजकारणातून गुन्हेगारी वृत्तीची हकालपट्टी व मतदानास नकाराधिकार असे दोन अत्यंत मूलभूत आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. आमचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व त्यांच्या तैनाती कायदेपंडितांनी घटना व देशाच्या कायदेकानूमध्ये एवढी बिळे शोधून काढली आहेत की, आता नवीन घटना व नवीन कायदेकानू बनवणे सोपे आहे. ते होईपर्यंत काही अत्यावश्यक बदल हवेत. फाजील लोकशाही स्वातंत्र्याचा काही काळ संकोच झाला तरी चालेल; पण देशाच्या व सर्वसामान्यांच्या भविष्यासाठी बदल होणे गरजेचे आहे. काही महत्त्वाचे अत्यावश्यक बदल पुढीलप्रमाणे सुचतात -
तथाकथित सुशिक्षित मतदार `एकही उमेदवार लायक नाही' या सबबीवर मतदानाला जात नसत. आता ही सबब चालणार नाही. अशा स्थितीत मतदान न करणे हा दखलपात्र गुन्हा ठरवला जाऊन त्याकरिता किमान एक दिवस तरी सक्तमजुरीची शिक्षा असावी व अशा गुन्हेगाराला भविष्यात कोणत्याही सवलती/सुविधा मिळू नयेत. प्रत्येक मतदारसंघात किमान ५०% वैध मतदान न झाल्यास त्या मतदारसंघात संपूर्ण कार्यकाळ राष्ट्न्पती/राज्यपाल राजवट असावी. सार्वत्रिक निवडणुका ठराविक कालखंडानंतरच व्हाव्यात. सरकार बरखास्ती, राजीनामे, मृत्यू इ.कारणांमुळे पोटनिवडणुका होऊ नयेत. राजीनामा/मृत्यूमुळे जागा रिकामी झाल्यास मागील मतदानात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती उर्वरित कालखंडासाठी करावी. फक्त सत्ताधारी आणि विरोधक असे दोनच पक्ष असावेत. अन्य किरकोळ पक्षांनी यापैकी एक पर्याय निवडावा किंवा निवडणुकांच्या राजकारणात पडू नये, त्यासाठी बंदीच असावी. सरकार स्थापनेची तयारी असल्याशिवाय विरोधी पक्षाने अविश्वास ठराव मांडू नये. त्यांचे पर्यायी मंत्रिमंडळही तयार असले पाहिजे. समान नागरी कायद्याऐवजी, कायद्यापुढे सर्व समान हे तत्त्व अंमलात आणावे. कोणत्याही सबबीखाली एखादी व्यक्ती, संस्था अथवा समूहाला देशाच्या कायद्यातून सवलत मिळू नये.
लोकप्रतिनिधींना असणाऱ्या सर्व सवलती बंद व्हाव्यात. त्यांना त्यांच्या मतदारांच्या प्रमाणात ठराविक मानधन मिळावे व त्यात त्यांनी आपला खर्च भागवावा. अधिवेशनास गैरहजर राहिल्यास अथवा कामकाज होऊ दिले नाही तर शिक्षा व दंडाची तरतूद असावी.
आगामी निवडणुकांपूर्वी ``सर्व राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांनी `दुरुस्त्या करू आणि अंमलात आणू' असे प्रतिज्ञापत्र न्यायालयाकडे/निवडणूक आयोगाकडे सादर केले तर त्यांना मतदान करू'' असे जनतेने जाहीर करावे व त्यांनाच उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी असावी. आजचे विद्यमान राजकीय पक्ष हे आव्हान स्वीकारण्यास तयार होतील?
- विलास फडके
(भ्रमणध्वनी : ९४२११७०११५)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन