Skip to main content

11 June 2018

संस्कृती आणि आर्थिक विकास
`आर्थिक विकास' ही संकल्पना उत्क्रांतशील आहे. `विकासाचे अर्थशास्त्र' ही अर्थशास्त्राची उपशाखा १९६०च्या दशकात उगम पावली. सुरुवातीच्या पर्वात `आर्थिक वाढ' आणि `आर्थिक विकास' या दोन्ही संकल्पना समनार्थीच असत. पुढे आर्थिक विकास ही संकल्पना व प्रक्रिया बहुआयामी असल्याचे प्रस्थापित झाल्यानंतर तिची फारकत झाली. दरडोई उत्पन्नाच्या जोडीनेच मग शिक्षण, आरोग्य यांसारख्या जीवनांगांचा आर्थिक विकासात प्रवेश झाला. १९९०च्या प्रारंभी महबूब उल् हक आणि अमर्त्य सेन या अर्थतज्ज्ञांनी मानवी विकास निर्देशांकाची संकल्पना प्रस्थापित करून नवीनच वळण दिले. अमर्त्य सेन यांनी `व्यक्तीच्या निवड स्वातंत्र्याचा विस्तार म्हणजे आर्थिक विकास गतिमान असल्याचे सिद्ध होणे' अशी व्याख्या मांडत `क्रॅपेबिलिटी'चा एक नवीनच आयाम जोडून दिला.
जागतिक तापमानवाढीचा निर्देश याच संदर्भात केला जातो. येत्या काळात शुद्ध व पिण्यायोग्य पाण्याला असलेला `अॅक्सेस' उत्तरोत्तर दुर्लभ होत जाईल, अशी भीती आहे. तिचा धागाही जोडला जातो तो विकासाच्या प्रश्नाशीच. स्थलांतराला अडथळे हा आर्थिक विकासाचा पैलू बनतो आहे. आजवर न डोकावलेला आणखी एक मुद्दा म्हणजे सांस्कृतिक स्वातंत्र्याचा. `संस्कृती'नामक अतिशय व्यामिश्र आणि बहुमिती संकल्पनेचे आर्थिक विकासातील योगदान विकासविषयक विचारविमर्शात निर्देशित केले जाते. आर्थिक विकासाप्रमाणेच `संस्कृती' हीदेखील सतत उत्क्रांत होत राहाणारी संकल्पना. सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेला संदर्भाची चौकट प्राप्त करून देणारी चीज म्हणून संस्कृतीकडे बघितले जाते. मानवसमूहांच्या संस्कृतीचा अविभाज्य अंग असलेली मूल्यसंपदा, संचित ज्ञान, कौशल्ये, परंपरा, संकेत, श्रद्धा, संस्थात्मक रचना, धारणा व दृष्टिकोण, नातेसंबंधाच्या जाळयाचे ताणेबाणे, समज व रूढी... अशांसारख्या अनंत बाबींचा संबंध आर्थिक विकासाच्या प्रक्रियेशी असतो त्यातील बदलांचे भलेबुरे परिणामही विकासाच्या रंगरूपावर होत  असतात.
आर्थिक विकासाचे रंगरूप, व विकासाच्या प्रक्रियेची आगेकूच, सामाजिक स्थैर्य आणि पर्यावरणीय संरक्षण या तीनही बाबींवर संस्कृतीचा थेट परिणाम घडून येत असतो. संस्कार आणि संस्कृती हे दोन्ही शब्द एकाच धातूपासून बनलेले आहेत. व्याकरणाच्या अंगाने दोन्ही शब्दांचा अर्थही एकच आहे. एखाद्या वस्तूमधील वैगुण्य दूर करून तिला नवीन, आकर्षक स्वरूप देणे हा `संस्कार' या शब्दाचा अर्थ. जे निसर्गसिद्ध आहे त्याला `प्रकृती' म्हणतात. प्रकृतीमध्ये जे विकार निर्माण होतात त्यांना `विकृती'. विकार उत्पन्नच होऊ नये म्हणून प्रकृतीवर जे संस्कार केले जातात त्यातूनच संस्कृतीचा उगम आणि विकास होत असतो. म्हणजेच, निसर्गसिद्ध असणारी प्रकृती, तिच्यावर काही एक संस्करण करून गुणवान बनवणे हा `संस्कृती' या शब्दाचा आशयगाभा होय. `विकास' अथवा `आर्थिक विकास' या संकल्पनेचा गाभाही तोच. मानवी जीवनाच्या कल्याणाची पातळी उंचावणे हा विकासोपक्रमाचा हेतू असतो.
मानवी समाज आणि विश्व या दोन्हींमध्ये सतत देवाण-घेवाण चालू असते. जग आपल्याला सुखकर बनवणे हेच मनुष्याच्या धडपडीचे ध्येय असते. त्यासाठीच जग बदलण्याचे प्रयत्न आपण करत असतो. पर्यावरणावर संस्कार घडवत जीवन सुसह्य बनवण्याचा उपक्रम मानवी जीवनाच्या सुरुवातीपासून चालूच आहे. पर्यावरण पालटले की त्याचा प्रभाव माणसाच्या जगण्यावर पडतो. त्या बदलांना तोंड देण्यासाठी आपले आचार-विचार, रहन-सहन, राहणीमान, सवयी, परंपरा, व्यवस्था, संस्थात्मक जीवन यांत मानव समाजाला अनुरूप असे परिवर्तन घडवून आणावे लागते. आर्थिक व्यवहार हा मानवी समाजाचा आणि पर्यावरणाचा अविभाज्य घटक असल्याने त्यांच्या व्यवहारांतून आर्थिक विश्वाची जडण-घडण होत राहते. सभोवतालचे पर्यावरण बदलले की मनुष्याला अंतरंगातही बदल घडवून आणणे क्रमप्राप्त होते. म्हणजेच बाह्य बदलांना प्रतिसाद देत अंतरंगही बदलावे लागते. शरीराच्या सवयी पालटणे भाग पडते. इतकेच नाही तर मनबुद्धीवरही संस्कार घडवावे लागतात. प्रत्येक संस्कृतीमध्ये अनेकविध सामाजिक संस्थांचा आणि व्यवस्थांचा समावेश असतो. त्या व्यवस्थांचा समुच्चय म्हणजेच संस्कृतीची रचना. संस्कृतीमधील विविध सामाजिक संस्था एकमेकींत गुंतलेल्या वा गुंफलेल्या असतात. कोणत्याही एखाद्या व्यवस्थेमध्ये बदल घडून आला की त्या बदलांचे पडसाद अन्य व्यवस्थांमध्ये उमटतात. बदलांचे परिणाम समूहांच्या जीवनपद्धतीवर होणे स्वाभाविकच ठरते.
`नवशोधन' अथवा `नवसर्जन' ही आर्थिक विकासाची प्रेरक शक्ती. संस्कृती ही केवळ त्या समाजाची आत्मखूण असते त्या समाजातील नवसर्जनशीलतेचा उगम, जोपासना आणि विकास संस्कृतीची कूस करत असते. समाजातील संचित, अर्जित ज्ञानाच्या, कौशल्याच्या मुशींतून नवशोधन निपजत राहते. समाजाच्या बौद्धिक, आध्यात्मिक, भावनिक व भौतिक धारणांची जडण-घडण त्या त्या समाजाची संस्कृतीच करत असते. एकमेकांशी असणारे नाते, व्यवहार यांचा पोत त्या धारणाच निश्चित करत असतात. त्या धारणांचे पडसाद आर्थिक विश्वात उमटतात.
मानवी समूहाची मूल्यसंपदा हा समाजाच्या आर्थिक निर्णयांवर प्रभाव टाकणारा महत्वाचा घटक असतो. परस्पर विश्वासाची भावना, नैतिकता, पारदर्शकता, शिस्त, काटेकोरपणा, व्यवहार, दक्षता, बचतीची प्रेरणा, शिक्षणाचे मोल... अशांसारख्या गुणांचे सकारात्मक परिणाम समाजातील अर्थकारणावर घडत असतात. त्या त्या समाजातील मूल्यसंचयाच्या गुणवत्तेवर अर्थकारणाचा पोत अवलंबून राहतो. संस्कृतीचे आविष्करण घडवणारे सांस्कृतिक उपक्रम, कार्यक्रम, जत्रा, उरूस, मेळे, यात्रा, देवदेवतार्चन, मेळावे, प्रदर्शने, उत्सव, लोकधर्म, चर्चा, परिसंवाद, जागरण, लोककला... अशांसारख्या माध्यमांद्वारे निर्माण होणारा रोजगार व त्यांद्वारे उत्पन्नाचे मार्ग यांतून संपत्तीमध्ये भर पडत जाते. समाजाला लोककलांचा समृद्ध वारसा असतो. लोकोत्सवांच्या आयोजनाद्वारे सादरकर्त्यांना व्यासपीठे मिळत राहतात. पारंपरिक कलाकौशल्यांच्या कारागिरांना बाजारपेठा खुल्या होतात. कलाकौशल्यांचे जतन-संवर्धन त्यांतून घडत राहते. पारंपरिक कला, कौशल्ये यांतून सर्जनशीलतेला संधी आणि अवकाश प्राप्त होत राहतो. सांस्कृतिक विश्वात असलेल्या उद्योगांचे उत्पादनांमधील योगदान सात टक्क्यांच्या घरात जाते. `सांस्कृतिक पर्यटन'ही एक नवीनच उपशाखा अलीकडे झालेली आहे. पर्यटनापासून मिळणाऱ्या उत्पन्नात सांस्कृतिक पर्यटनाचा वाटा २००७ साली ४० टक्के होता.
विकसनशील देशांच्या लेखी संस्कृतीचे आर्थिक विकासातील योगदान बहुमोल ठरते. त्या त्या देशांतील विद्यापीठे, वस्तुसंग्रहालये, सांस्कृतिक केंद्रे व उपक्रम, कलाकेंद्रे...अशासारख्या बाबी रोजगार आणि महसूलनिर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. सांस्कृतिक उद्योग-उपक्रमांद्वारे रोजगाराचे प्रमाण मालीसारख्या देशात सहा टक्के होते; तर देशी उत्पादनामध्ये (जीडीपी) उत्पन्नाचा वाटा २००६ साली २.४० टक्क्यांचा. संस्कृतीसंबद्ध उद्योगांद्वारे (क्रिएटिव्ह इंडस्ट्नीज्) उत्पादनाचा ब्राझीलच्या उत्पादनात १९९८ साली वाटा होता ६.७ टक्क्यांचा. देशी कलाकौशल्यांवर आधारित वस्तूंच्या उत्पादनाद्वारे तसेच निर्यातीवर मोरोक्कोच्या उत्पादनामध्ये संस्कृतीसंलग्न व्यवसायक्षेत्र १९ टक्क्यांचे २००९ साली होते. तर, सांस्कृतिक पर्यटनाचा वाटा २००९ साली साडे सहा टक्क्यांचा होता. थायलंडमधील २० लाख कारागिरांना २००९ साली रोजीरोटी दिलेली होती त्यांपैकी निम्मे तर पूर्ण वेळ त्याच व्यवसायात होते. ग्वाटेमालामध्ये ७.१४ टक्के श्रमिक सांस्कृतिक उद्योगांमध्ये सामावलेले आहेत. संस्कृती आणि विकास यांच्यातील संशोधन का व कसे गरजेचे आहे, हे यांवरून स्पष्ट होते.

 संपादकीय
ज्याचे काम त्याने(च) करावे
दूरदर्शनच्या वाहिनीवर अेकेका मंत्र्याची मुलाखत प्रसिद्ध होत असते. त्याचप्रमाणे रेेडिओवरही अेकेका प्रशासकीय अधिकाऱ्याची किंवा मंत्र्याची मुलाखत लावतात. सामाजिक स्वयंसेवी काम करणाऱ्या लहानथोर कार्यकर्त्यांच्या मुलाखतीही अधूनमधून अैका-वाचायला मिळतात. त्यांत सर्वत्र अेक विचित्र साम्य आढळून येतेे, ते असे की शासकीय बाजूची मंडळी सामाजिकतेवर भर देतात,आणि सामाजिक कामांतील लोक शासनाच्या जबाबदाऱ्या सांगत असतात. जी आहे ती स्थिती सुधारायलाच हवी, याबद्दल दोन्ही बाजूंचे अेकमत आहे; परंतु आपल्या बाजूचे काय अपयश आहे, त्याची कारणे कोणती, चुका काय झाल्या, आणि आता त्याविषयी काळजी कोणती घेणार आहोत हे खरे तर त्यांनी सांगायला हवे. त्याअैवजी दुसरी बाजू कशी चूक वागते, कशी निष्ठूर वागते हे जास्त करून सांगतात; आणि आपण किती तळमळीने प्रयत्न करतो आहेात याचा निरर्थक पाढा वाचतात. मुलाखत घेणारेही त्यांच्या पगाराला जागून गोड हसऱ्या गप्पा करत असतात. अेक गोष्ट विचारण्याजोगी असते की, आितके प्रयत्न तुम्ही करता आहात तर ते सारे फुकट का चाललेत? तुमच्या प्रयत्नांहून दुसरी अडथळयांची बाजू जास्त समर्थ आहे काय?

अेखाद्या बशा नवऱ्याने मावा-गुटखा खात गावभर भटकून घरी यावे, आणि घर किती घाण ठेवलेय म्हणून बायकोवर करवादावे! -यामुळे घरातली स्थिती सुधारणार नाही. स्वत:ची जबाबदारी आणि भूमिका कोणती हे समजून घेअून समन्वयाने काम केले तर सारीच परिस्थिती पार बदलून जाआील; परंतु आपापल्या बाजूचे काम रेटत नसेल तर दुसऱ्यासाठी सूचना देत राहून त्या प्रश्नांसंबंधी आपण फार विचार-चिंतन केलेले आहे असा आवही किमान आणू नये.

अेक अुदाहरण म्हणून वाहतूक विभागाचे घेता येआील. परिवहनमंत्री म्हणतात की, `रस्त्यावरचे सिग्नल तोडून जाणे, भन्नाट वेगाने गाडी पळविणे, रस्ता ओलांडताना झेब्राक्रॉसला न थांबणे, सीटबेल्ट-हेल्मेट न वापरणे... अशांमुळे अपघात जास्त होतात. त्यासाठी पालकांनी,  ज्येष्ठ नागरिकांनी  काळजी घ्यायला हवी. कायदा मोडण्याची  मानसिकता बदलायला हवी...' हे त्यांचे म्हणणे चुकीचे तर नाही, पण ते त्यांनी मांडण्यात चूक आहे. मानसिकता बदलण्याचे काम करण्यासाठी सामाजिक स्वयंसेवी संस्था असतात, सामाजिक मानसिकता बदलणे हेच त्यांचे काम असले पाहिजे. त्यासाठी सातत्याने प्रबोधन प्र्रशिक्षण करावे लागते. ते करत राहून लोकांना शिस्त लावणे अशी त्यांची भूमिका असली पाहिजे. परंतु समाजाला शहाणपण शिकविण्यात प्रशासकांनी अडकायचे नसते. त्यांनी आपल्या हातीचे प्रशासन कठोरपणी राबविले पाहिजे. आहेत ते कायदे सहजावारी मोडले जात असतील तर ते अधिक कठोर केले पाहिजेत. रस्त्यातल्या सिग्नलला न जुमानता गाड्या पुढे जाताना पाहात वाहतूक पोलीस तंबाखू मळत अुभे राहात असतील तर कोण दाद घेणार? सामान्य नागरिकांना असले प्रशासन दिसत असेल तर ते मंत्र्याना दिसत नसेल काय? मंत्र्यांकडून त्यावर बडगा अुगारला जाणे अपेक्षित आहे. त्याअैवजी त्यांनी लोकांची मानसिकता बदलण्याची गांधी-विनोबांची भूमिका घेतली तर काय अुपयोग? तिथे काही सविनय कायदेभंगाचे प्रयोग चाललेले नाहीत. आणि मानसिकता बदलणे हाच जर अुपाय त्यांना वाटत असेल तर गणवेशातील बुजगावणी अुभी करून त्यांना पगार देत राहण्याचे कारणच काय? त्यांना मग मानसिकता बदलण्याचेच काम द्यावे. शेतातल्या पिकावर पाखरांनी बसू नये म्हणून तशी बुजगावणी अुभी करतात; ती आपले काही वाकडे करू शकत नाहीत हेे लक्षात आल्यावर पाखरेही त्यांच्या काठीवर झोके घेअू  लागतात. तसे काही गुंडपुंड पोलीसांशी गंमतगोष्टी करताना दिसतात, ती रीत मंत्र्याना कळत नसेल का?

त्याअुलट मानसिकता बदलण्याचे ज्यांचे काम आहे ती कार्यकर्ते म्हणविणारी मंडळी प्रशासनावर फार भरोसा ठेवतात. अंधश्रद्धेच्या सामाजिक आजारासाठी कायदा करून पोलीसी खेकट्यात अडकतात. ग्राहक चळवळ ही व्यवस्था सुधारण्यासाठी आहे, असे सांगितले जाते. परंतु ग्राहक -कोर्टांपलीकडे त्यांचे समाजकार्य सरकत नाही. ग्राहक प्रबोधनासाठी कुठे काही योजिले तर तिथे कुणी कार्यकर्तेही फिरकत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या पदांच्या, जिल्हा कक्षातील चहापानाच्या, आणि कायद्यात कोणत्या सुधारणा हव्यात या चर्चेच्या काळजीत अडकायला होते. बस किंवा रेल्वे तिकिटासाठी रांग लावण्यासाठी लोकांना सामूहिक रीत्या मार्गदर्शन करण्याचे त्यांना सुचत नाही. ते काम पोलीसांचे आहे असा त्यांनी सोयीस्कर समज करून घेतलेला असतो. कुणा सासुरवासिनीवर अन्याय होत असेल तर, तिच्या लग्नात जे देव-ब्राह्मण म्हणून सभ्यप्रतिष्ठित लोक जेवण झोडून गेलेले असतात, त्यातले कोणी पुढे येत नाहीत. त्यावेळी त्यांना पोलीसांचे कर्तव्य आठवते. त्या लेकीच्या सोबत पोलीस ठाण्यावर जाण्यातही त्याना लोकशाही प्रशासन व्यवस्थेचा  भंग वाटत असावा. सासरच्या लोकांची मानसिकता बदलण्याचे खरे सामाजिक काम शेजाऱ्यापाजाऱ्यांचे आहे, तिथे कायद्याचा फारसा अुपयोग होत नाही. पण कायद्याचा हात पाठीशी आहे म्हणून पोलीसांत गेले, तर तिथे मात्र दोन्हीकडच्या लोकांना समजुतीने घेण्याचे थोर सल्ले पोलिसांकडून दिले जातात.

समाज सुधारण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासन या दोन्हींची गरज असते. त्यांत कायदा आणि प्रबोधन दोहोंना स्थान असायला हवे; परंतु त्यांची विभागणी नेमकी असायला हवी. प्रशासनाने कायदेशीर कठोर असावे, आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाच्या स्वयंनियुक्त पालकाच्या भूमिकेत असायला हवेे. लोकांची मानसिकता बदलायला हवी हे  रडगाणे प्रशासनाने लावू नये, आणि अुगीच कायद्यांची आणि प्रशासकांची फोलपटे काढण्यात कार्यकर्त्यांनी वेळ दवडू नये. हे काम सातत्याचे चिरंतन चालणारे असते, ते कधीतरी करून भागत नाही. संस्था चिवटपणी काम करीत राहिल्या पाहिजेत आणि पोलीस चौक्याही  कठोर तत्पर असल्या पाहिजेत. त्यांत समन्वय असेल तर छानच, पण निदान आपापल्या भूमिकांची कर्तव्यांची अदलाबदल तरी करू नये. सभ्य  स्त्रियांनी व्यायामशाळेतल्या तरुणांऐवजी तुरुंगातल्या कैद्यांना राख्या बांधणे, किंवा पोलीसांनी सौजन्य सप्ताह पाळणे असल्या अुपक्रमांत समाधान मानायचेच असेल तर त्यास कोण हरकत घेणार? पण त्यांतून काही साधत नाही, त्याची स्पष्ट कारणेही कधीतरी तपासावीच लागतील.

मत-मततर
अभिरूची सांभाळावी.
मे अंक पोचला.संपादकीय आणि `एक संप्रेरक व्यक्तीमत्व' हे दोन्ही लेख आवडले. त्यासंदर्भात लिहिणार होतो, पण अशी पत्रे आपण प्रसिद्ध करीत नाहीत, फक्त नाव लिहिता असा अनुभव आल्यामुळे त्याबद्दल काही लिहीत नाही.
`खसखशीचा मळा' या सदरातील `कारण माहीत आहे' हा विनोद आवडला नाही. तो हीन अधिरुची दाखवणारा वाटतो. `आपले जग'सारख्या उच्च दर्जाच्या अंकात तो मला तरी विसंगत वाटला.
-भा.वा.आठवले, देवगड  फोन-९४२२४३५३३८

पुष्कळशी पत्रे मजकूराच्या किंवा संपादकीय लेखाच्या संबंधी स्तुतीपर असतात; ती शक्यतो न देता नामोल्लेख केला जातो. मजकुरासंबंधी काही वेगळी माहिती, मत, किंवा तर्कशुद्ध मतभेद असेल तरीही ते पत्र प्रकाशित केले जाते.
-आपले जग
-------
इंधनाच्या भाववाढीमुळे जनता त्रस्त आहे. पण कोणालाही पूर्णपणे दोष देता येणार नाही. पेट्नेल स्वस्त करायचे तर महसुलाची तूट कशी भरून काढायची हा प्रश्न सरकारसमोर आहे. अमेरिका आणि क्रूड उत्पादक देशांमधील भांडणात भारताची कुतरओढ चालली आहे. सरकारची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.
एक उपाय म्हणून दारू, सिगारेट, पान गुटखा, मोठे क्लब बार, सिनेमा, क्रॅसिनो, रेस, क्रिकेटचे आईपीएल मॅचेस यांवर निरनिराळया स्वरूपात कर वाढ करावी यातून येणाऱ्या महसुलातून तेवढ्याच प्रमाणात पेट्नेलचे दर कमी करून पाहावे; या दरवाढीला कोणीही विरोध करणार नाही.
-सुरेश आपटे, इंदौर  फोन-९८९३९९६७५६

सर्वत्र अनास्था
`आपले जग'चे अंकामधील `पुतळा उभारणीचा पराक्रम' वाचून नवीन माहिती समजली व पुतळा बघण्याची उत्सुकता लागली. तसेच `संमेलनातून काय साधते' या लेखातून सर्वसाधारण सभांमधून आढळणाऱ्या वक्तशीरपणाच्या अभावाबद्दल लिहिले, तसे निदान सावरकर यांच्या नावाने भरवलेल्या संमेलनातून होऊ नये ही अपेक्षा योग्यच आहे. आपल्याकडे ज्येष्ठांच्या सभा वेळ, स्थळ, विषय हे सर्व माहीत असूनही काही ज्येष्ठ वेळेवर येत नाहीत. बरं उशीर झाल्यावर खुर्च्यांचा आवाज करू नये, तेही पाळले जात नाही व कार्यक्रमांत व्यत्यय येतो. प्रत्येक वेळी सांगून उपयोग होत नाही.
-वि.म.मराठे, सांगली   फोन-९४२०६७८९६५

जाती बदलल्या
मे अंकातील `जातीचा अंत होईल?' हे संपादकीय मनापासून भावले. त्यातील नव्या जातीचा उल्लेख वास्तव आहे. लोकप्रतिनिधी, पुढारी, कंत्राटदार(ठेकेदार)या यादीत व्यवसायिक वाहन-चालक, मध्यस्थ, एजंट याही वर्गाचा जात म्हणून समावेश केला पाहिजे. आर्थिक सबल व दुर्बल वर्ग जातीप्रमाणे दिसतो. अशा जातीवर्गांची मूलभूत गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर न शोधता, न सोडविता  त्यावर टीका-टिप्पण्णी केली जात आहे. जातीयता समाजात समानता निर्माण करू शकत नाही. खरी मानवता जाती-जातीत समानता, समरसता, सहजीवन यात आहे हा सारांश प्रबोधनपर आहे. तथापि जातीत विखार निर्माण करण्याचे काम सर्व स्तरावर चालू आहे, म्हणून समाजात समन्वय व उत्कर्ष होत नाही. प्रदेश, भाषा, आहार, रीती, वागणूक, पूजा-श्रद्धा इ.मार्गाने जातीयताच जोपासत आहोत याकडे कानाडोळा करून चालणार नाही.
     -नारायण खरे, पुणे५१     फोन-९९७५३४४३०१

सुसेरीचे साठे
मे अंकात `जम्मूचे साठे' वाचले. मी त्या सुसेरी गावचा आहे. तेथील इनामदार बाळासाहेब साठे यांची मोठी इस्टेट (निम्मा गाव खारी व निम्मा गाव सुसेरी) माझे वडील पहात असत; म्हणजे त्यांच्याकडे नोकरीला होते. सुसेरीची नदी बारा महिने वाहाणारी आहे. तिथे काठावर अजूनही सुसरी (मगरी) दिसतात.
-वा.मा.बर्वे, दापोली   फोन-९९७५०९६४१६

गो स सरदेसाईयांची रियासत
रत्नागिरीजवळ गोविल या गावी गोंविंद सखाराम सरदेसाआी यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरीत झाले. काही काळ पुण्यात राहिल्या नंतर मुंबआीतून ते १९८८ साली बी अे झाले. त्यापुढच्याच वर्षी ते बडोदे सरकारकडे रुजू झाले. श्रीमंत सयाजीराव महाराजांकडे ते रीडर म्हणून नोकरीत होते. महाराजांना वृत्तपत्रे पुस्तके वाचून दाखविणे, आणि राजवाड्यातील मुलांमुलींना शिकविणे ही त्यांची कामे होती. मुलांना आितिहास शिकविण्यासाठी काढलेल्या टिपणांतून पुढे `मुसलमानी मराठी आणि ब्रिटिश रियासतीं'चा जन्म झाला आणि त्यांचा मिळून `हिंदुस्थानचा अर्वाचीन आितिहास' तयार झाला.
प्रारंभी १२ वर्षांच्या नोकरीपासून त्यांच्या मृत्यूपर्यंत रियासतींचे लेखन चालू हेाते. गो स सरदेसाआी यांनी सन १००० ते १८५८  या ८५० वर्षांचा हिंदुुस्थानचा आितिहास सिद्ध केला. त्यासाठी त्यांनी काय कष्ट घेतले असतील याची जाणकारांना कल्पना येअू शकेल. अैतिहासिक साधने तपासली, संशेाधन केले, साधनांची शहानिशा केली, गुंतागुंतीच्या घटनांचे विश्लेषण केले, आणि मतभेदांच्या मुद्द्यांवर स्वतंत्र भाष्य केले. मुसलमानी, मराठी आणि ब्रिटिश कालखंडांचे आितिहास - त्यांस त्यांनी रियासत असे वेगळया वळणाचे नाव दिले; आणि ते रियासतकार म्हणून प्रसिद्ध झाले. सनावळींच्या जंजाळात अडकण्यापेक्षा त्यांनी प्रांजळ लेखनासही ओघवत्या शैलीची जोड दिली आणि आितिहासही वाचनीय केेला.
मुसलमानी रियासतींचे  `सुलतान घराणी' आणि `मोगल बादशाही' असे दोन भाग असून त्यात सन १००० ते १७०७ हा सातशे वर्षांचा आितिहास आहे. मराठी रियासतीचे १३खंड आधी प्रसिद्ध झाले, त्यात शहाजीरराजे ते दुसरा बाजीराव ही कारकिर्द सलग आहे. मराठी सत्तेचा अुदय, अुत्कर्ष आणि अस्त यांचा आधार म्हणून रियासतींचा संदर्भ घेतला जातो. ब्रिटिश रियासतीचे दोन खंड आहेत, त्यात १४९८ला पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा भारताच्या किनाऱ्यावर आल्यापासून ते १८५७च्या लष्करी घडामोडीपर्यंतचा काळ मांडला आहे.
अेवढ्या प्रदीर्घ कालखंडाचा आितिहास परिश्रमाने, चिकाटीने आणि पूर्वग्रहविरहित लिहिणे हे सरदेसाआींचे जीवितकार्य ठरले. मूळच्या ६हजार पृष्ठांत नवी भर घालून या तीनही रियासतींचे  मिळून बारा खंड पॉप्युलर प्रकाशनने स मा गर्गे यांच्या संपादकत्वाखाली १९८८साली  प्रकाशित केले.
गो स सरदेसाआी यांनी सयाजीराव महाराजांसोबत पूर्ण भारत, आिंग्लंड आणि युरोपचा पाच वेळा प्रवास केला. त्यामुळे त्यांच्या तपश्चर्येला विविध पैलू लाभले. सर जदुनाथ सरकार या समकालीन आितिहासकाराने त्यांच्याविषयी म्हटले की, `मराठ्यांचा तो अेक महान आितिहासकार आहे.(ग्रेटेस्ट लिव्हिंग हिस्टोरियन ऑफ द मराठाज्). आयुष्याच्या अखेरच्या पर्वात(१९२५नंतर) सरदेसाआी हे मुंबआी-पुणे मार्गावरील आिंद्रायणी नदीकाठच्या कामशेत येथे राहिले. वयाच्या ९४व्या वर्षी ते गेले, तोपर्यंत कार्यरत होते. रियासतींशिवाय त्यांनी `न्यू हिस्ट्नी ऑफ द मराठाज्', `मेन करंट्स ऑफ मराठा हिस्ट्नी' असे ग्रंथ लिहिले; तसेच पेशवे दप्तर (४५ खंड), पूना रेसिडेन्सी कॉरस्पॉडन्स(५खंड) यांचे संपादन केले. १०५ग्रंथ, आणि २७५ लेख त्यांच्या नावावर आहेत. रावसाहेब, रावबहादूर, पद्मभूषण, डी लिट् असे मानसन्मान त्यांना मिळाले.

`सरकारी काम अन् सालभर थांब!' 
सरकारी काम अन् सालभर थांब ही म्हण फार जुनी झाली. त्या कोण्या काळी दळणवळणाची साधने कमी होती, आणि लिखापढी करणारी माणसंही कमी होती. त्याशिवाय सरकारी कामांत दिरंगाआी असतेच असते, म्हणून त्या काळात सालभराची मुदत सांगून ठेवली असावी. आजच्या काळात स्थिती काय आहे? आजच्या काळात संगणक वगैरे आले, `गुड् गव्हर्नन्स' या नावाखाली कारभार चालता म्हणतात; तर कोणत्याही खात्याला कोणताही अर्ज पाठवावा, आणि त्याची दखल किती दिवसांत घेतली जाआील हे कुणीही सांगावे! अगदी त्या खात्याच्या मंत्र्यानेही सांगावे! कुठून तरी वशिला फेशला लावला, ओळख काढली तर लवकर हालचाल होण्याची अंधूक शक्यता, अेखादा अधिकारी फारच लोकाभिमुख तत्पर भेटला तर काम होण्याचे राहूद्यात, निदान त्या अर्जात त्रुटी काय राहिल्यात ते तरी कळवेल. परंतु तसे काहीच नसेल तर मग....? -`सरकारी काम आणि नुसतेच थांब!!!' बसा वाट बघत!!
आपल्या मनात कधी तिरीमिरी आली आणि त्या कार्यालयात धडक मारायची ठरविले तर? सरकारी कचेरीत सगळयांत दुर्लक्षित प्राणी म्हणजे आपण नागरिक. त्यांच्याही रांगा लागलेल्या असतात, काम तर कुणाचेच होत नाही. फार तर कुणीतरी दलाल मध्यस्थ गाठू शकतो. अेरवी जळमटांच्या आणि धुळींच्या फायलींकडं पाहात जंतेनं तिष्ठत बसायचं.
निदान महाराष्ट्न् शासनाच्या नव्या कायद्याने या बाबतीत बदल घडवून आणण्याचे ठरविले आहे असे दिसते. महाराष्ट्न् लोकसेवा हक्क अधिनियम२०१५ आणि नियम २०१६ यांमुळे सरकारी कामाच्या बाबतीत निश्चित कालावधी घालून देण्यात आला आहे. नगरपालिका, महापालिका, प्राधिकरण किंवा अेकूणच कोणत्याही शासकीय यंत्रणेेच्या बाबतीत कामासाठी नियत वेळ दिला आहे. त्या वेळेत जबाबदार अुत्तरे मिळू शकतील. पारदर्शक सेवा मिळण्याचा हक्कही त्यात स्पष्ट करण्यात आलेला आहे. या कायद्याने सामान्य नागरिकाला बरीच महत्वाची माहिती, व प्रमाणपत्रे दाखलेही मिळू शकतील.
महसूल, कामगार, अुद्योग अूर्जा, सहकार, वित्त, विधी व न्याय, प्रदूषण नियंत्रण, अन्न औषध, विमा असे विभाग या कायद्याच्या कक्षेत आणलेले आहेत. हे बहुतेक सर्व विभाग अुद्योग व्यवसायांशी संबंधित आहेत. शासकीय सेवा किती दिवसांत मिळतील यांची विहित मर्यादा कायद्याने देण्यात आली आहे. त्यानुसार ठरवून दिलेले दिवस असे -
वय, राष्ट्नीयत्व, निवास यांचे प्रमाणपत्र १५.  जात प्रमाणपत्र २१.   अस्थायी निवास ७.   ज्येेठ नागरिक ७.    मिळकत १५.   सक्षमता २१.   शपथपत्राचे साक्षांकन १.    दुकाने व आस्थापना नोदणी व नूतनीकरण ७.   सहकारी संस्थांची नोंदणी व अुपविधेयक दुरुस्ती  ६०.   मुद्रांक वितरण २. भागीदारी संस्थांची नाोंदणी ६०.   विश्वस्त व्यवस्था नोंदणी   २८.    वाहन हस्तांतरण नोंद  १५.   याप्रमाणे अन्य...
या कायद्यातील महत्वाची तरतूद म्हणजे, सरकारी सेवेसाठी त्यापेक्षा ज्यास्त वेळ लागला तर किंवा सयुक्तिक कारण नसताना नामंजुरी दिल्यास दाद मागता येते, अपील करता येते. तिसऱ्या अपीलात आयोगाकडे दाद मागून सेवेत विलंब झाल्याचे दिसले तर रु.५०० ते ५००० संबंधित अधिकाऱ्याला दंड होअू शकतेा. पहिल्या अपीलीय अधिकाऱ्याने कुणा सेवकाला वाचविण्यासाठी अवाजवी प्रयत्न केल्याचे आढळले तर त्या प्रथम अपीलीय अधिकाऱ्याला दंड होअू शकतो.
अर्थात आितर कोणत्याही कायद्याची जशी वासलात लावण्याच्या क्लृप्त्या सरकारी मंडळींना आणि आपल्यालाही माहीत असतात. त्या वापरल्या तर कायद्याचा दुरुपयोग होआील.  तरीही जागरूकपणे नागरिकांनी या कायद्याचा अुपयोग करायचे ठरविले तर हाताशी अेक कायदा दिलेला आहे हे तरी काय कमी आहे?

बुद्धीबळ
भारताने ज्या अनेक गोष्टी जगाला दिलेल्या आहेत, त्यात बुद्धीबळाचा खेळ ही अेक आहे. आज जगभर तो खेळ खेळला जातो. त्याचे सामने होतात, महोत्सव होतात, अजिंक्यपदाच्या स्पर्धा होतात. आर्य चाणक्याने चंद्रगुप्ताला शत्रूचा सर्वनाश  न  करता त्याचे  पारिपत्य करून त्याच्यावर सतत नजर ठेवण्यास शिकविणारा हा खेळ त्याच्यासाठी सिद्ध केला असे म्हणतात..
चाणक्याने राजकुमाराला सांगितले की,  शरीर आणि बुद्धी तंदुरुस्त राहण्यासाठी त्या दोन्हीस व्यायामाची गरज असते. बुद्धीच्या खेळातून आरोग्यवर्धन झालं पाहिजे आणि काही प्रशिक्षण मिळालं पाहिजे. अेरवी या गोष्टी करण्यास व्यस्त माणसाला त्याच्या कामांतून वेगळी सवड मिळत नसते. चाणक्याने शोधलेल्या या खेळास चतुरंग हे नाव दिले होते. शतरंज, चेस अशी अन्यभाषी नावे आहेत.
हा युद्धाचाच अेक खेळ आहे. त्यात समान ताकत असलेले दोन खेळाडू आहेत. घोडे, हत्ती, अुंट, शिपाआी, वजीर आणि राजा असे दल आहे, ते प्रारंभी दोन्हीकडे समसमान आहे. प्रत्येकाच्या हालचालींसाठी नियम आहे तो मोडायचा नाही, पण त्या सर्व दलांत परस्पर समन्वय असला पाहिजे, अेकमेकाच्या मदतीसाठी जोर दिला पाहिजे. कदाचित आपले काही मोहरे कामी येतील पण शेवटी युद्ध जिंकायचे आहे. शेवटची चाल आपल्या राजाच्या किंवा वजीराच्याच हातून होआील असे नाही; घोडे किंवा प्यादेही अंतिम खेळी करू शकते व शत्रूचा राजा कोंडतो. खेळणाऱ्याच्या चतुराआीवर आाणि बुद्धिकौशल्यावर जयापजय अवलंबून आहे.
देवाची कृपा साऱ्यांवर जन्मत: सारखीच आहे. जगाचे मैदान बहुतांशी सारखेच असते. हातपाय मेंदू साऱ्यांना दिले आहे. मन आणि बुद्धीही दिली आहे. काहीजण आपल्या कामातून पुढे जातात, आितरांना ते जमत नाही. देवानं दिलेल्या पटावर आपल्या कौशल्यानं पुढं गेलो तर देवाला दिलेली ती भेट मानावी. युद्ध हा अेक खेळ आहे, तसेच ते अेक शास्त्र आहे. खेळ म्हटला की नियम  आले. त्यानुसार प्रत्येकाने अेकदाच चाल करायची आहे. अेकाच वेळी चार सहा चाली केल्या तर? -तसे चालत नसते. अेकदम सगळया चाली करून युद्ध जिंकणे आणि खेळ संपविणे हा खेळाचा अुद्देशच नसतो. आपल्या शत्रूवर सतत नजर ठेवून, त्याच्याकडील पुढच्या चाली ओळखणं, याचा विचार करावा लागतो. पुढे येणाऱ्या साऱ्या शक्यता ओळखून हा खेळ खेळायचा. आपल्यावर कुठून कशी चाल होअू शकेल याचीही जाण ठेवायची. केवळ आपल्याच नव्हे तर दुसऱ्याच्या मनांतील विचारांचा तर्क करणे हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे.
चाली कशा करायच्या आणि अखेरीस जिंकलं कोण हे कसे ठरवायचे? आपल्या चालीने शत्रूचा राजा ठार मारून युद्ध संपविणे? त्याचे राज्य बळकावणे? तसे नाही! शत्रूचे सारे दल मारता येते, हरविता येते, राजाला कोंडता येते पण त्याला मारता येत नाही. राजा कोंडला की युद्ध संपते. खऱ्या युद्धात मात्र खरी चाल करावी लागते.
                        (धनश्री हळबे यांच्या, मुलांच्या मासिकातील लेखावर आधारित)

कऱ्हाड चित्पावन संघाची दशकपूर्ती
माणसाला सर्वसाधारण आजार पचनसंस्थेतील बिघाडामुळे होतात. आपल्या प्रकृतीला मानवेल असा आहार, योग्य व्यायाम केल्यास पचनसंस्थेचे कार्य व्यवस्थित चालते. ज्या ऋतूमध्ये आपला `जन्म' आहे, त्याचा स्वाभाविक परिणाम प्रकृतीवर होतो. त्या अनुषंगाने आहार-विहार-आचाराची त्रिसूत्री अवलंबिल्यास तब्येत सुदृढ राहाते. ही रोगनिदान पद्धती आयुर्वेदाचा गाभा असल्याचे प्रतिपादन सातारा येथील सुप्रसिद्ध वैद्य सुयोग दांडेकर यांनी केले.
चित्पावन ब्राह्मण संघ कराडच्या दशकपूर्ती निमित्ताने आयोजित योगेश्वरी स्मरणिकेच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रमेश गोखले होते. यावेळी वैद्य दांडेकर यांनी प्रचलित रोगांविषयी माहिती दिली. शशिकांत गाडगीळ यांनी सदस्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रास्ताविकात अशोक बोडस यांनी संघाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली, तसेच संघाच्या कार्याचा आढावा घेतला. संघाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने रिमांड होममधील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन