Skip to main content

2Feb.2015

श्रीपाद जोशी, जत यांचे सावंतपूर वसाहत (किर्लोस्करवाडी) येथे श्री गणेश मंदिरात `गदिमा' या विषयावर अलीकडेच व्याख्यान झाले, त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत. गदिमांना उत्तरायुष्यात मान-प्रतिष्ठा मिळाले तरी त्यामागे पूर्वायुष्यातील खडतर परिश्रम उभे होते याची; तसेच त्यांच्या आयुष्यातील हृद्यतेची जाणीव करून देणारे भाष्य -
....गदिमांचा काळ....
ग.दि.माडगूळकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ला झाला. त्यांच्या मातोश्री बनूताई, आटपाडी तालुक्यातील शेटफळे या त्यांच्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या होत्या. चव्हाणांच्या वाड्यात त्यांचे कुटुंब होते. बनुताइंर्ना प्रसूती वेदना सुरू झाल्या. बनूताइंर्ची प्रसूती झाली, पण जन्मत: बाळाने टॅं%ह करायला हवे, तसे झाले नाही. बाळ मृत जन्मले की काय, या शंकेने तगमग उडाली. परसात खड्डाही खणण्यात आला. रडारड सुरू झाली. तेवढ्यात गावातील एक चलाख सुईण धावत आली. तिने सर्व प्रकार पाहिला, आणि बनूताइंर्ना सांगितले, `तुझी बांगडी फोड.' बांगडी फोडणे सवाष्ण स्त्रीला अशुभ असते. सुईण म्हणाली, `मी सांगते तसं कर!' बांगडी फोडली. फुटक्या बांगडीचे एक टोक पोटात वारेमध्ये खुपसले. वार बाजूला झाली आणि बाळाने टँ केले. सगळयांना आनंद झाला. त्या हुशार सुईणीच्या चलाखपणामुळे बाळ वाचले. पुढच्या काळात महाराष्ट्नला हा आधुनिक वाल्मीकि मिळाला.
आैंध संस्थानच्या ७२ खेड्यांंपैकी माडगुळे हे एक सामान्य खेडे. दुष्काळी भाग. वडिलांची आैंध संस्थानची अत्यल्प पगाराची नोकरी. गजानन सर्वात मोठा. त्यांना नंतर सहा भावंडे झाली. मोठ्या कुटुंबाचा खटाला चालविताना दिगंबरपंतांची ओढाताण होत असे.
गदिमांना घरगुती आण्णा नाव पडले. आण्णांचे बालपण माडगुळातच गेले. प्राथमिक शिक्षणानंतर पुढे गावात सोय नव्हती. म्हणून आण्णांनी आैंधच्या भवानी श्रीनिवास विद्यालयात प्रवेश घेतला. जेवणाची सोय संस्थानकडून होती, तरी चार घरी फिरून माधुकरी मागण्याची तिथे शिस्त होती. गदिमा लहानपणापासून उत्तम नकला करीत. नाटकात भाग घेत. आचार्य अत्र्यांच्या `राजसंन्यास' या नाटकात गदिमांनी वक्रतुंडाची बहारदार भूमिका केली होती. स्वत: आैंधच्या राजेसाहेबांनी हे नाटक पहिल्या रांगेत बसून पाहिले आणि पाठीवर शाबासकीची थाप टाकली.
आण्णा अभ्यासात बऱ्यापैकी हुशार असले तरी गणित विषयात त्यांना गती नव्हती. त्यामुळे घरी खूप बोलणी खावी लागत. एकदा आईनं जाणीव दिली आणि `चार पैसे मिळवून आणायचं बघा' असं स्पष्ट सुनावलं. मानी गदिमा रुसून घराबाहेर पडले आणि कुंडलला आपल्या मित्रांकडे जाऊन राहिले. इकडे आईने आण्णांचा शोध घेतला. आण्णांना घरी बोलावून आणले. आण्णा दुसऱ्यांदा मॅट्नीक परीक्षेला उत्तम मार्कांनी नापास झाले! त्या काळी विषय सोडून परीक्षेला बसण्याची सोय नव्हती. त्यामुळे आण्णा आयुष्यभर नॉन मॅट्नीक राहिले. ज्यांच्या साहित्यावर अनेकांनी प्रबंध लिहिले, त्यांचे साहित्य माध्यमिक आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अंतर्भूत झाले, तो साहित्यिक मात्र अखेरपर्यंत नॉन मॅट्नीकच राहिला.
घरात अठराविश्वे दारिद्र्य. सहा-सात लहान भावंडे. तुटपुंजे उत्पन्न. व्यथित होऊन गदिमांनी निश्चय केला की आपण काही जबाबदारी खांद्यावर घेतली पाहिजे. घरातून ते बाहेर पडले. तिकीटापुरत्या पैशाची कशीबशी व्यवस्था झाली. ते थेट मुंबईत गेले. आचार्य अत्रेंचा त्यांच्यावर फार प्रभाव होता. प्रयत्न करून ते अत्र्यांना भेटले. आपली सगळी कहाणी सांगितली. अत्र्यांना पहिल्याच भेटीत या मुलामध्ये काही चमक दिसली.अभिनयाची आवड असल्याने आपल्याला चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळावा अशी आण्णांच्या मनात महत्त्वाकांक्षा होती. आचार्य अत्रेंनी त्यावेळचे प्रख्यात सिने निर्माते व दिग्दर्शक मास्टर विनायक यांना एक पत्र दिले व कोल्हापूरला जाऊन भेटण्यास सांगितले. मास्टर विनायकनी, प्रारंभी आपल्याकडे तूर्तास काही काम नाही, पण अगदीच नाकारण्यापेक्षा हरकाम्या म्हणून आण्णांना आधार दिला. या आनंदात आण्णांनी तो आश्रय घेतला. अगदी सतरंज्या घालणे, झाडलोट करणे अशी कामे केली. त्याबद्दल महिन्याला ५ रु.पगार मिळाला. आज ना उद्या आपल्याला योग्य संधी मिळेल असा त्यांना आत्मविश्वास होता. कोल्हापुरात शाहूपुरीमध्ये मिरजेंची वखार होती. थोड्याशा ओळखीने वखारीत पथारी पसरायला परवानगी मिळाली. जेवणाखाण्याची भ्रांत होती. वखारीतील शेंगा व गूळ खाऊन त्यांनी भूक भागवली.
आण्णांचे हस्ताक्षर उत्तम होते. विख्यात साहित्यिक वि.स.खांडेकर हे मास्टर विनायक यांच्यासाठी पटकथा लिहीत असत. खांडेकरांना आण्णा जाऊन भेटले, त्यांच्याकडे लेखनिक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याच कष्टाच्या कालखंडात कवी रामजोशी यांच्या जीवनावर त्यांनी एक नाटक लिहिले. विनायकांचे सहकारी बाबूराव पेंटर यांना त्यांनी ते हस्तलिखित भीत भीत दाखविले. आपल्याकडे हरकाम्या म्हणून काम करणारा हा मुलगा एवढे प्रतिभासंपन्न लेखन करू शकतो हे पाहून बाबूराव पेंटर चकित झाले. पुढे एका भेटीतून व्ही.शांताराम यांनी `शाहीर रामजोशी' हा चित्रपट हाती घेतला. तेथून पुढे मात्र गदिमांचे जीवन उजळले. तोपर्यंत हंस स्टुडिओकडून मिळणारा पाच रुपये पगार घरी आईला मनिऑर्डर करून पाठवत आणि अन्य कामातून मिळणाऱ्या पैशात आपली गुजराण करीत. हा काळ त्यांच्या जीवनातील अत्यंत संघर्षमय होता. अवघ्या आठ दिवसात त्यांनी रामजोशीची पटकथा लिहून दिली. हा चित्रपट जोरात चालला. पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात हा चित्रपट तब्बल ५० आठवडे चालला. स्वाभाविकच गदिमांची सर्वत्र दिगंत कीर्ती झाली.
या काळात त्यांची राम फडके म्हणजेच प्रख्यात गायक आणि संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्याशी मैत्री झाली. गदिमांनी गाणी लिहायची, सुधीर फडकेंनी त्याला चाली लावायच्या आणि पद्मा पाटणकर या गायिकेने ती गायची. त्या काळी कोल्हापूरात खूप मेेळे होत. या मेळयांमधून या त्रयीची गाणी दुमदुमू लागली आणि मग त्यातून एका नामवंत कवीच्या उज्वल जीवनाचा उदय झाला. त्यानंतर मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. चित्रपट निर्मात्यांच्या त्यांच्या दारी रांगा लागू  लागल्या. पद्मा पाटणकर या विद्या माडगूळकर म्हणून त्यांच्या सहचरी झाल्या.
आैंधचे सुपुत्र अप्पा पंत यांनी त्यांना शिवाजीनगर रेल्वे स्टेशनमागची जागा दिली. तेथे त्यांनी `पंचवटी' या नावाची टुमदार बंगली बांधली. तेथून मग सिनेगीते, पटकथा याचा धबधबा सुरू झाला. ८०-८५ मराठी, व कितीतरी हिंदी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या, असंख्य गाणी लिहिली. बँक ऑफ महाराष्ट्न्चे तत्कालीन चेअरमन श्री.वसंतराव पटवर्धन त्यांना भेटायला आले. महाराष्ट्न् बँकेची भव्य इमारत पुण्याच्या बुधवार पेठेत उभी राहिली होती. तेथील दर्शनी प्रवेशद्वाराशी काही काव्यपंक्ती हव्या होत्या. चहा आला. चहा झाल्यावर आण्णांनी एक कागद पटवर्धनांकडे सरकवला. पटवर्धनांची अपेक्षा की, आठ-पंधरा दिवस तरी लागतील. गदिमांनी चहा पिऊन होईपर्यंत काव्यपंक्ती लिहून दिल्या. महाराष्ट्न् बँकेच्या वास्तूवर त्या कोरलेल्या दिसतील. गदिमांना उदंड कीर्ती आणि संपत्ती मिळाली. लहानमोठे ३८ पुरस्कार मिळाले. साहित्य संमेलनाध्यक्षपद चालून आले. पद्मश्री पदवी लाभली.
गीतरामायण लिहिताना एकदाच आण्णा अवघडले. रामजन्माचे गीत काही केल्या मनासारखे उतरेना. बंगल्याच्या व्हरांड्यात उत्तररात्रीपर्यंत ते अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. विद्याताई जाग्या झाल्या. त्या म्हणाल्या, `एवढे अस्वस्थ का आहात?' गदिमा म्हणाले, `अगं, रामजन्माचे गीत लिहिणे एवढे सोपे का आहे? साक्षात राम जन्म घेणार आहे.' उत्तररात्रीनंतर पहाटे पहाटे त्यांना गीत सुचले आणि `राम जन्मला गं सखी, राम जन्मला' हे अजरामर गीत लिहून झाले. या प्रतिभासंपन्न कवीची दखल पुणे विद्यापीठाने घेतली. गदिमांना सन्माननीय डी.लिट्. प्रदान करण्याचा निर्णय झाला. त्यांना विद्वत्सभेसाठी आदरपूर्वक पाचारण करण्यात आले. आण्णा विद्यापीठात आले. पुणे विद्यापीठाची ती भव्य वास्तू अती विद्वान मंडळींनी सभागृह भरलेले. आण्णांना बालपण आठवले. कष्ट आठवले. आपण साधे मॅट्नीकसुद्धा नाही याची जाणीव झाली. या सन्मानाने ते हेलावून गेले. गळा भरून आला. सभागृहातील त्या वातावरणात आण्णांना रडू फुटेल असे झाले. कुलगुरुंनी आण्णांना विचारले, `आण्णा, काय होतेय? तब्येत बरी नाही का?' आण्णांना शब्द उमटेना. ते आणखीनच भावविवश झाले, म्हणाले, `मी आपली पदवी आदरपूर्वक स्वीकारतो. पण आता या क्षणी मला काही बोलायचा आग्रह करू नका. पुढच्या वेळी बोलेन.' लहानपणाची उपासमार-फाटके कपडे-भाऊ व्यंकटेशची ठिगळाची चड्डी-आपले काळे मास्तर-आपली कष्टाळू माऊली-सरळमार्गी वडील-त्या आठवणीतून त्यांना बाहेरचा येता येईना.
गदिमांची ही शून्यातून शिखरापर्यंतची वाटचाल त्यांच्या मातोश्रींनी पाहिली. अशी मुले पोटी जन्मली म्हणून त्या माऊलीला कृतकृत्य झाले. सगळे वैभव, प्रतिष्ठा पायाशी लोळण घेत होते. पण आयुष्यभर केलेली दगदग, धावपळ आणि अपार कष्ट यामुळे आण्णा आतून पोखरले गेले. त्यात त्यांना फुफ्फुसाचा क्रॅन्सर झाला. कणाकणाने आण्णा खंगू लागले. त्यांना आपला पैलतीर दिसू लागला.
पुण्यातील प्रख्यात उद्योगपती बाबुराव पारखे हे आण्णांचे व्याही, आपल्या मातोश्री माईसाहेब पारखे यांच्या स्मृत्यर्थ `आदर्श माता पुरस्कार' देत असत. आण्णांच्या मातोश्रींची `आदर्श माता' म्हणून निवड झाली. गदिमांची इच्छा होती, आपण या कार्यक्रमाला जावे; आपल्या परमपूज्य मातोश्रींचा सन्मान याचि देही याचि डोळा पहावा. पण तब्येत खूपच ढासळली होती. आण्णा आईला म्हणाले, `शरीराने मी समारंभात येऊ शकत नाही पण मनाने मी तेथेच असेन.' आईच्या डोळयात अश्रू तरळले. बालगंधर्व रंगमंदिरात सत्कार सोहळा ऐन बहरात असताना वृत्त येऊन धडकले की, आण्णांची तब्येत खूपच खालावली आहे. घाईघाईने आई घरी आल्या. आण्णांना धाप लागली होती. ग्लानी होती. डोळयात प्राण आणून आण्णा आईची वाट पाहात होते. आई आण्णांच्या जवळ बसल्या. अत्यंत अशक्त झालेल्या आण्णांनी आईला जवळ बोलावले. आईने विचारले, `गजानना, काय होतेय?' आणि मांडीवर डोके टेकले. आण्णा म्हणाले, `आई मी चाललो.' दि.१४ डिसेंबर १९७७ला हा आधुनिक वाल्मीकी पंचतत्त्वात विलीन झाला.
शब्दांकन - मोहन जी. आळतेकर,
कि.वाडी (मोबा.९४२११८४९९६)

पुनर्दर्शन
भास्कराचार्य यांच्या नवव्या जन्मशताब्दीनिमित्त मोहन आपटे, दा.कृ.सोमण यांनी विविध उपक्रम वर्षभर करण्याचे योजले आहे. मोहन आपटेकृत भास्कराचार्यांचं चरित्र `गणकचक्रचूडामणी भास्कर' आहे. ते राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. ज्या गोष्टीसाठी भास्कराचार्यांचे नाव साऱ्या जगात आजही सन्मानाने घेतले जाते, तो त्यांचा ग्रंथ `लीलावती'चे पुनर्दर्शन, मूळ संस्कृत श्लोक आणि त्याचे सोपपत्तिक मराठी भाषांतर नव्याने होत आहे. भाषांतर केलं आहे ना.ह.फडके यांनी. मूळ लीलावती ग्रंथ बाराव्या शतकात लिहिलेला आहे. परंतु आजही ह्या ग्रंथापुढे आणि ग्रंथकार्यापुढे गणिती पंडित नम्र होतात. अंकगणितावर लिहिलेले पहिले पद्धतशीर आणि सुगम रोचक पुस्तक याबाबत मात्र कुणाच्याही मनात संदेह नाही. अकबराच्या सांगण्यावरून फैजी या फारसी कवीने लीलावतीचे भाषांतर इ.स.१५८३ मध्ये फारसीत केलेले आढळते. जेम्स टेलर, हेन्री कोलब्रुकसारख्यांनी १८१६-१७ मध्ये इंग्रजीत भाषांतर केलं. ज्याची पुनर्मुद्रणं आजही उपलब्ध आहेत. लीलावतीची लोकप्रियता मराठीपर्यंत केव्हाच पोचलेली दिसते. तेव्हाच्या अनेक मुलींचं नाव लीलावती दिसतं.
पहिले भाषांतर देवराव उखाशेठ साठी (एरंडोलकर) यांनी १८८९ मध्ये केलं. दुसरं भाषांतर विनायक पांडुरंग शास्त्री (खानापूरकर) यांनी आैंधच्या अधिपतींच्या आश्रयाने १८९७ मध्ये केलं. भास्कराचार्यांनी आपल्या ग्रंथात सूत्रांच्या उपपत्ती कुठेही दिलेल्या नाहीत. आर्यभट्ट ते भास्कराचार्यांपर्यंत शास्त्रीय ग्रंथ कवितारूपात दिसतात. सिद्धांताचे स्पष्टीकरण-सिद्धता ते देत नाहीत. ही उणीव अनेकांच्या लक्षात येत असेल. पण त्याचं उत्तर कुणाला देता आलं नाही.
ह्या उणिवा प्रा.ना.ह.फडके यांना जाणवल्या आणि त्याची उत्तरं पण सापडली. संस्कृत श्लोकाचं मराठी भाषांतर देतानाच त्यांनी उपपत्ती-फोड केली. उपपत्ती देताना त्यांनी क्रॅलक्युलस (फडके प्रतिशब्द-चलनकलन शास्त्र) मॅथेमॅटिकल इन्डक्शन (गणितीय उद्गमन) एवढंच नव्हे तर आधुनिक परिभाषा समितीचे प्रतिशब्द वापरात घेतले. ही गोष्ट १९७१ वर्षातील. ना.ह.फडके यांनी भास्कराचार्यांच्या परिचयात म्हटलं होतं, ``आमच्याकडे असा गणकचक्रचूडामणी जन्माला यावा हे आमचे भाग्य! पण आम्ही असे कर्मदरिद्री की, इ.स.१९५० मध्ये त्यांच्या सिद्धांतशिरोमणीची आठवी शताब्दी साजरी करण्यास आम्ही पूर्णपणे विसरलो.'' ह.अ.भावे यांना हे पुस्तक मिळाले. त्यांनी फडके यांना म्हटलं, ``लीलावती हा भाग तुम्ही लिहिलात, पण बाकीचे तीन भाग म्हणजे बीजगणित, गणिताध्याय व गोलाध्याय का अनुवादित करत नाहीत?'' फडके उत्तर देत, ``आयुष्य मिळाले तर मी नक्की करेन.''
१ मार्च १९७३ रोजी ना.ह.फडके यांचे निधन झाले. १९९२ मध्ये भाव्यांना परत ह्या पुस्तकाची आठवण झाली. फडक्यांच्या वारसाकडून होकार आला! भावे यांनी वितरकाकडून प्रती घेताना विक्रीचे तपशील घेतले. १९७८ ते १९९२ दरम्यान म्हणजे १४ वर्षात १२ प्रती खपवल्या होत्या. ह्या हिशोबाने आवृत्ती संपवायला अंदाजे ७५० वर्षे लागणार पण ह.अ.भावे यांनी त्यांच्या विक्रीपद्धतीने ही आवृत्ती संपवलीच पण लगेच १९९३ च्या दिवाळीत नवी आवृत्ती काढली! ती संपताच जानेवारी २००३ला तिसरी आवृत्ती काढलीी. ह.अ.भावे यांचं २००३ मध्ये निधन झालं पण अभिजात पुस्तकं सतत उपलब्ध असली पाहिजेत या धोरणाने `लीलावती पुनर्दर्शन' सरिता प्रकाशनतर्फे उपलब्ध करून दिलं आहे. भास्कराचार्यकृत गणिताध्ययन आणि बीजगणित यांचं भाषांतर विनायक पांडुरंगशास्त्री खानापूरकर यांनी केलं आहे. ती पुस्तकेही पुनर्प्रकाशित होत आहेत.
- रविप्रकाश कुलकर्णी (`साहित्यसूची'वरून)

तासगाव येथे जोगळेकर व्यायामशाळा
तासगाव येथे श्री स्वयंभू मारुती मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना, कलशरोपण समारंभ आणि `गुरुवर्य रा.म.जोगळेकर व्यायामशाळा' उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. त्यानिमित्ताने प्रायश्चित विधी, कुश्मांड होम, प्रा.सचिन कानिटकर सांगली यांचे `बजरंगबली' या विषयावर प्रवचन, पूज्य गुरुनाथ महाराज कोटणीस सांगली यांचे `ज्ञानेश्वरीमधील मारुती उपासना' या विषयावरील प्रवचन, शोभायात्रा असे विविध कार्यक्रम झाले.
`गुरुवर्य रा.म.जोगळेकर व्यायामशाळे'चे उद्घाटन डॉ.सौ.संध्या संजीव कुलकर्णी, कराड (पूर्वाश्रमीच्या संध्या साखरे, तासगाव) यांच्या हस्ते झाले. मारुती मंदिराचे कलशरोपण करवीर पीठाचे श्री.शंकराचार्य यांच्या हस्ते झाले. भारतीय परंपरेतील योगविद्या, मल्लविद्या, प्राणायाम यांचे महत्त्व आणि प्रसार जगभर होत असताना आपल्याकडील परंपरागत व्यायामशाला लोप पावत आहेत. या कला टिकण्यासाठी व आपली शारीरिक क्षमता सुदृढ करण्यासाठी अशा व्यायामशाळा बळकट होणे गरजेचे आहे. तासगाव शहरात योगविद्या, मल्लविद्या, प्राणायाम इत्यादीचा प्रसार होण्याच्या हेतूने श्री गणेश चॅरिटेबल ट्न्स्टच्या वतीने व्यायाममहर्षि गुरुवर्य रा.म.जोगळेकर व्यायामशाळा सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असून उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाणार आहे. महिला, पुरुष, मुले, मुली अशा वेगवेगळया वर्गामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ट्न्स्टचा पत्ता - गणेश चॅरिटेबल ट्न्स्ट, राम-सीता, ८१० जोगळेकर वाडा,
तासगाव (जि.सांगली) मोबा. ९४२१२५२२२२

Comments

  1. Gadiman Baddan Barich Chukichi Mahiti aahe,Panchawati gadimanni wikat ghetli.aaundh chya rajane deleli jaga tilak road la hoti.ardhawat chukichi mahiti deu naye.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन