Skip to main content

aug.2014

धर्म कालानुरूप हवा
- प्रसाद भावे
मी हिंदू आहे. मला त्याचा अभिमान आहे. कोणतीची गोष्ट चांगली-वाईट ठरवताना माझ्या मनाला विचार करण्याची सवय लागली आहे. माझ्याप्रमाणेच खूप लोकांस खूप गोष्टी खटकतात. पण त्यात बदल करावा अशी धारणा होत नाही. कसे बदल करता येतील, याबाबत पंडीत व विचारवंतांनी जरूर विचार करावा. मार्गदर्शन करावे, स्वत: आदर्श घालून द्यावेत. म्हणजे इतरेजनांस त्या बदलांचे अनुकरण करण्यात संकोच वाटणार नाही.
हिंदू हा धर्म नसून ती संस्कृती आहे असे म्हटले जाते. पण सरकार दरबारी किंवा व्यवहारातही तो धर्म म्हणूनच आचरण्यात येतो. याबद्दल असणारा संभ्रम दूर कसा होणार? कारण मुळातच आपण कोणा एका धर्मगुरूचे मानत नाही. धार्मिक नेता म्हणून हिंदू धर्मात कोणास संबोधता येईल? त्याचा निर्णय अंतीम मानला जाईल? भारतात आद्य शंकराचार्यांना धर्मगुरू म्हणून बरेच लोक मानतात. त्यांची सर्वत्र पीठे आहेत. पण प्रत्येक पीठाचे प्रमुख फक्त स्वत:लाच श्रेष्ठ मानतात. प्रत्येकाची तोंडे वेगवेगळया दिशेला. कोणाचा शब्द अंतीम मानायचा? साहजिकच प्रत्येकाला सोयीस्कर असेल ते त्यांचा आदेश मानतात. मग धर्माची एकसंधता नाहीशी होते. यासाठी सर्व पीठाच्या शंकराचार्यांनी एकत्र येऊन निदान बहुमताने वेळोवेळी निर्णय घेऊन ते धर्मादेश म्हणून प्रसृत करावेत, व हिंदू धर्मात एकवाक्यता आणावी, असे शक्य आहे का?
***
आपल्याकडे मंगलाष्टके चालू असताना इतका गोंधळ व बेशिस्त असते की, मंगलाष्टके केव्हा सुरू झाली किंवा संपली हे समजत नाही. लग्न लागले हे कळण्यासाठी `वाजवा हो वाजवा' असे बँडवाल्यांना सांगण्यासाठी एका माणसाची नियुक्ती करावी लागते. जेवणाच्या जागा पकडण्याकडेच निमंत्रितांचे लक्ष अधिक असते. कुठे व कोणीकोणी पार्टी करायची याचे बेत आखले जात असतात. नवरा-बायको व जवळचे दहाबारा नातेवाईक सोडले तर कोणालाही लग्नविधीत रस नसतो. संपूर्ण जीवनावर परिणाम करणाऱ्या लग्नासारख्या मंगल प्रसंगाचे गांभीर्य नाहीसे होते. त्याचा परिणाम म्हणजे, इतर खर्च भरपूर करूया, पण धार्मिक विधी टाळून रजिस्टर पद्धतीने लग्न करूया असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
काही ठिकाणी कार्यालयात मंगलाष्टकांचे वेळी मांगल्य राखण्यासाठी गुरुजी शांतता राखण्याचे आवर्जून आवाहन करतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, लोक हवे तसे मित्र-मैत्रिणींची कोंडाळी करून गप्पा करीत उभे दिसतात. त्यांना कोणी समजावून सांगू पाहिले तर त्यांच्या विनंतीला मान मिळतो का ते पाहावयास हरकत नाही. लग्न समारंभ घरगुती पातळीवरच ठेवून स्वागत समारंभाला फक्त इतरांना बोलवावे; तर तोही प्रकार वेगळाच नाटकी होतो. अजूनही बऱ्याच ठिकाणी तांदळाच्या अक्षता प्रत्येकास मूठमूठ देऊन त्या मंडपात उधळल्या जातात, पायदळी तुडवल्या जातात. ही नासधूस म्हणजे प्रत्येक धर्मात पाप समजण्यात येते. सुपारीची पुडी व एक बिनवासाचा पुष्पगुच्छ(गोटे) देण्याची पद्धत बंद केली, त्याप्रमाणे अक्षता वाटण्याची पद्धत बंद करून लग्न झाल्यावर टाळया वाजवून वधुवरास आशीर्वाद दिले जावेत.
***
देवळातील आरतीच्या वेळी घंटा वाजवताना ती सौम्यपणे एक तालात वाजवावी. सध्या घंटेबरोबरच झांजा, ढोल व टाळया यांद्वारे इतके ध्वनीप्रदूषण होते की देवळाच्या नजीक राहणाऱ्या लोकांना ते असह्य होते. तसेच अनेक प्रकारच्या चालीत प्रत्येकजण बेंबीच्या देठापासून आरती म्हणतो. देवाच्या स्तुतीचे मांगल्य नष्ट होऊन त्याचे रूपांतर बेसूर गोंधळात होते. यासाठी गुरूजींनी किंवा एका व्यक्तीने आरती म्हणून इतरांनी हात जोडून उभे राहावे. तसेच एका व्यक्तीने तालात घंटा वाजवून आरतीचे मांगल्य राखावे. पूजा किंवा आरतीसाठी भसाडा लाऊडस्पीकर हा तर अतिरेक आहे.
***
देवदर्शनासाठी देवळात जाणारे भाविक गाभाऱ्यात शिरून पाणी, तेल, दूध व फुले यांमुळे मूर्ती इतकी अशोभित करतात की मूर्तीचे पावित्र्य नष्ट होते व भाविकांच्या श्रद्धामय भावनांना ठेच पोचते. यासाठी गाभाऱ्यात कोणासही प्रवेश न देण्याची प्रथ पूर्वी होती व काही ठिकाणी आजही राखली जाते, ती अनुकरणीय आहे.
पंढरपूरच्या विठोबाच्या पायावर भक्तांनी वर्षानुवर्ष आपले डोके टेकवून मूर्तीचे पाय झिजले. यातूनच कळसाला नमस्कार करून आपला वेळ वाचवून श्रद्धा जपण्याची पद्धती खूप लोक वापरतात. तासन् तास रांगेत दर्शनासाठी उभे राहून भक्त काय साध्य करतात असा प्रश्न पडतो. यापेक्षा कोल्हापूरसारखे महाद्वारातून दर्शन घेण्याचीसुद्धा व्यवस्था किंवा आजच्या आधुनिक इलेक्ट्नॅनिक साधनांमुळे देवळाबाहेरून दर्शन घेता येऊन लोकांचा वेळ वाचवता येईल.
देवळात येताना पाय धुवून येण्याची पद्धत अवलंबणे योग्य होईल. त्यासाठी पाण्याची सोयही केली जावी. जिथे ते शक्य नाही तिथे देवळात जाताना पाय धुण्यासाठी पाण्याची बाटली सोबत आणून आपला भक्तिभाव जरूर दाखवावा. पूर्वी घरात शिरताना पाय धुण्यासाठी अंगणात पाण्याचे घंगाळे व तांब्या ठेवण्याची पद्धत होतीच. पण अंधानुकरण करण्यात धन्यता मानणारे लोक; घरात बाहेरचे बूट घालून वावर करतात. ते आरोग्यविरोधी आहे याचा विचार होत नाही.
देवाला ज्या वस्तू भक्तांकडून अर्पण होत असतात त्यांचा लिलाव केला जातो. तो भावना दुखावणारा वाटतो. त्यापेक्षा देवाचा प्रसाद म्हणून गरजू लोकांना त्या वस्तू मोफत दिल्या तर ते योग्य होईल. लिलावाच्या ठिकाणी संबंधित भक्त उपस्थित असेल तर त्याला आपल्या भक्तीभावनेचाच लिलाव होतो आहे, अशी भावना झाली तर?
***
कोणताही धर्म चांगले वागण्याची शिकवण देत असतो. ती लोकांपर्यंत पोचणार कशी? त्यासाठी प्रार्थना असो किंवा स्तोत्र, ते स्थानिक भाषेत केलेले असावे. ज्ञानेश्वर माऊलींनी स्थानिक भाषेत ज्ञानेश्वरी लिहून ती सामान्यांपर्यंत पोचवली.(आज ज्ञानेश्वरीसुद्धा आपल्याला समजणे अवघड जाते ही गोष्ट म्हणजे काळाचा महिमा.) मी रामरक्षा पूर्ण पाठ म्हणू शकतो, पण ती फक्त पोपटपंचीच!
***
गणपती व शिवाजीचे उत्सव सुरू करण्याचे श्रेय जाते लोकमान्य टिळक यांना. त्यांच्या मनातला उत्सव व आजचा उत्सव यात जमीनअस्मानाचे अंतर आहे. सध्याच्या उत्सवात त्यांना अपेक्षित असलेली एकी, मांगल्य व शिस्त सुतराम दिसत नाही. गणपती मिरवणुका प्रत्येक मंडळ मनाला येईल तेव्हा काढतात. तसेच स्थापना साधारणत: सकाळी केली जाते, पण न रंगवलेल्या मूर्तीसद्धा संध्याकाळनंतर स्थापित केल्या जातात. दांडिया उत्सवात नको त्या गोष्टी दिसतात. विशेष म्हणजे आता गणपती उत्सवापेक्षा नवरात्र उत्सव करण्यात सार्वजनिक मंडळांना जास्त उत्साह असल्याचे दिसून येते याचे कारण? - सुज्ञास सांगणे न लगे!
***
आपल्या घरी येणारे गुरुजी प्रसन्न दिसले पाहिजेत. बहुतेक वेळेला दाढीचे वाढलेले खुंट, मळकट धोतर व उपरणे, पूजेत जमा झालेले साहित्य झोळीतून नेण्याची पद्धत हे आदरभाव निर्माण करू शकत नाही. सोवळे-ओवळे तर आता इतिहासजमा झाले आहे.घाणेरडी राहणी म्हणजे साधी राहणी नव्हे. ठिकठिकाणच्या शंकराचार्यांचा पेहेराव जरी आदरणीय वाटत असला तरी दाढी न करणे किंवा अर्धवट वाढलेल्या केसांना कोणतेही वळण न ठेवणे हे बेशिस्त वाटते. शाळेतील शिक्षकांप्रमाणे धार्मिक लोकांचा पेहेराव व राहणी आदरयुक्त असावी. सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणजे कुंभमेळा. तेथील साधुसंतांची राहाणी पाहिली तर शिसारी निर्माण होते. काही धर्मसाधू त्यांच्या विरक्त, विदेही, संन्यस्त अवस्थेत साधारण गृहस्थी समाजात उघड वावरतात. त्यांना तितकी विरक्ती असेल, पण सामान्यजनांस तितकी निरिच्छ दृष्टी नसते. अशाने धर्माचा मोठेपणा वाढेल का?
बाहेरचे लोक आपल्या धर्मात, शुद्ध विचारांतून यायला हवेत. हिंदू धर्माने नेहमीच वजाबाकीचे धोरण स्वीकारले. सक्तीने किंवा गैरसमजाने कित्येकजण इतर धर्मात गेले. अशा आपल्याच लोकांना आपण आपलेसे करू शकलो नाही. यांच्या घरात असलेले पूर्वीचेच देव व त्यांची पूजा होत असलेली मी स्वत: पाहिली आहे. सार्वजनिक गणेश उत्सवातही ते हिरीरीने भाग घेत असत. पण आपल्याच बांधवात असुरक्षिततेची भावना निर्माण करून भारतीय समाजाच्या एकजिनसीपणाला धोका निर्माण होऊन देशाचे मोठे नुकसान होते.

आपल्याकडे मृत्यूनंतर अग्निदहन ही व्यवस्था अतिशय चांगली आहे. तसेच अस्थी विसर्जनाच्या धार्मिक प्रथेमुळे त्या जागी कोणाच्याही भावना दुखावल्या जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. दफनभूमीचा वारंवार विस्तार करावा लागतो. अन्यथा त्याच त्याच जागा वापरून इतरांच्या भावनांना धक्का पोचण्याची शक्यता निर्माण होते. सातारला पॅलेस स्ट्नीटवर आनंदवाडी दत्तमंदिर व नगरपरिषदेसमोर इंग्रजांच्या काळापासून इसाई कबरस्तान आहे, किती वर्षे झाली समजायला मार्ग नाही. तसेच ते कधीही वापरले जात नाही. पण त्याबद्दल कोणी निर्णयही घेऊ शकत नाही. तीच गोष्ट एमआयडीसीने घेरलेल्या दफनभूमीची. त्याचा वापर `त्या'साठी चालू आहे. पण त्याही जागेचा इतर उत्पादक कारणासाठी वापर होऊ शकणार नाही.
आपल्या प्रियजनाची अंत्ययात्रा ताटीवरून काढतात ती विद्रूपतेने काढली जाते. मन कासावीस होते. त्यात आधुनिकता आणण्यास हरकत नाही. तसे शेवटच्या निरोपयात्रेला व्यवस्थित कपडे घालून न येता शक्य तेवढे घाणेरड्या वेशात येतात, त्यामुळे अंत्ययात्रा ही अशोभनीय दिसते.मृत्यूनंतर काय? काही लोक म्हणतात `पुनरागमनायच', तर काही लोक म्हणतात, `मुक्ती किंवा मोक्ष मिळावा.' पुनर्जन्म ही कल्पना आपल्या धर्मात कितपत मान्य आहे? तसेच भूत-पिशाच्च-योनी बाबत आजही धर्माचे काय म्हणणे आहे? ते सामान्य माणूस ठरवू शकत नाही. जगात प्रत्येक धर्माला स्वत:चा एक तरी देश आहे. पण हिंदू धर्म हा जगात असा एकमेव धर्म असावा, ज्याला स्वत:चा देश नाही. हिंदी किंवा ऊर्दू भाषेत आपल्या देशाला हिंदोस्ताँ म्हटले जाते. पण कागदोपत्री हिंदीत भारत व इंग्रजीत इंडिया संबोधले जाते. आपण म्हणतो `हे विश्वची माझे घर'
हे सगळे विवेचन हिंदू धर्माबद्दल असले तरी, माझ्या समजुतीप्रमाणे सगळया धर्मांत तसेच घडत असते. त्या त्या धर्मात आधुनिकता येत राहिली तर तो लोकांत जास्त प्रिय होईल. सर्वच धार्मिक पद्धतीत योग्य बदल केले तर ते निश्चितच चांगले होईल.
-प्रसाद भावे,मोबा. ९८२२२८४२८७ 
`दर्पण', ९०५, शनिवार पेठ,, सातारा


आरक्षणांचे संभाव्य परिणाम
आरक्षणाच्या मागणीसाठी आता कुणी मागे राहायचे कारण नाही. मराठा, मुस्लिम यांना आरक्षण जाहीर झाले, पण तेही काहींना समाधानकारक वाटत नाही. कारण राज्यात मराठ्यांची संख्या जेवढी आहे, तितके टक्के आरक्षण त्यांना हवे होते. हाच न्याय मुस्लिमांना लागू केला तर त्यांना गेला बाजार पंचवीस टक्के तरी आरक्षण द्यायला हवे. धनगर, लिंगायत या मंडळींनी आंदोलन वाढवले आहे. सध्या ज्यांना कागदोपत्री आरक्षण आहे त्या समाजांतील सामान्यजनांस आपण नेमके कोण आहोत हे कळते कसे, असा प्रश्न आहे. इतर मागास वर्ग, मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रजाती, संवर्ग, भटके, विमुक्त, भटकेविमुक्त! आदिवासी वेगळे, वनवासी वेगळे, अरण्यवासी वेगळे.... सगळा कल्लोळ. त्यातही ज्यांना आजवरच्या समाजस्थितीने काही स्थानच दिले नव्हते असे मानले जाते त्यांनी त्यांच्या पूर्वजांचे, स्थानांतरांचे, व्यवसायांचे पुरावे दाखले खोदायचे आणि त्यांची पडताळणी करण्यासाठी पुन्हा सरकारी हापीसात सव्यापसव्य करायचे. यांतून कोणीतरी `प्रवर्ग' ऐवजी `संवर्ग' ठरला की, त्याने खोटी जात लावली म्हणायचे! त्यातही आदिवासी नावाच्या मुलीने वनवासी मुलाशी लग्न केले तर नवा घोळ. पूर्वी ब्राह्मण जमदग्नी आणि क्षत्रिय रेणुका यांचा पुत्र परशुराम याला पितृसावर्ण्याने ब्राह्मण मानले; तर क्षत्रिय भीम आणि राक्षस हिडिंबा यांच्या घटोत्कचाला राक्षसच ठरवले. त्यांची जातपडताळणी करून कोण्या विद्रोहींनी हल्लाबोल केल्याचे अजून तरी ऐकिवात नाही.
जात-धर्म निरपेक्ष म्हणवणाऱ्या या राज्यात जातींवरूनच फुटीरता वाढविण्याचा, आरक्षण-अल्पसंख्य हा एक सोपा मार्ग राजकारण्यांना गवसला आहे. दुर्बळाला सवलती मिळायला हव्यातच. पण या धूर्त लोकांचा इतका उच्च उद्देश असेल यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. याचे कारण असे की, दुर्बल असल्याचा डांगोरा पिटून त्या नावावर जे लुटायचे, ते स्वत:च्या ओट्यात पडावे याची क्लृप्ती त्यांच्याकडे परंपरेने आहे. शालेय मुलांना माध्यान्ह भोजन, दुष्काळी टँकर, रोजगार हमी, कर्जमाफी.... अशी कोणतीही योजना आपल्याच पोटात कशी रिचवायची हे त्यांनी दाखवून दिले आहे. परंतु त्या योजना सकल जनतेच्या म्हणून भासविता येत होत्या, आणि मुख्य म्हणजे त्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित होत्या. आरक्षणाचा मुद्दा सामाजिक आहे. जातीधर्मांच्या आधारावर दुफळी माजविणारा आहे. त्याचे परिणाम फार विचित्र व गंभीर होणार आहेत.

पिढीजात परंपरागत विकलांगतेमुळे दुर्बल राहिलेल्या, आणि मुख्यत: त्याच जाती-जमातीकडे साऱ्या समाजाने सोपविलेल्या व्यवसाय-व्यवहारांमुळे मानहानी वाट्याला येणाऱ्या एखाद्या समाजघटकास, त्याच्या जन्मजात जातीच्या आधारे राखीव स्थान द्यायला हवे. आपल्याकडे भंगी समाज, तृतीयपंथी, स्मशानकर्मी, असे लोक आहेत; पण ते अपवादात्मक आहेत. त्यांना सन्मानाचे जिणे व शैक्षणिक-आर्थिक सवलती मिळायलाच हव्यात. पण धडधाकट माणसाने कष्ट करून कमवावे असाच संकेत रूढ आहे. कष्ट चुकविण्यासाठी अंध-अपंगाचे सोंग-ढोंग करणारे संभावित असतात. आजच्या स्थितीत अशा बिलंदर लोकांना मलिदा मिळावा असा कायदाच व्हावा हे फार धोक्याचे आहे.

मराठा किंवा मुस्लिम यांना त्यांच्या खानदानाचा खूप अभिमान असतो व तो रास्तही आहे. त्यांच्या व लिंगायत-धनगर-अथवा अन्य कोणी, यांच्याबरोबर ब्राह्मण समाजालाही आरक्षण मिळायला हवे असा कोणी सूर काढतात. आर्थिक लाभांचा स्वार्थच साधायचा असेल तर जैन-पारशी-मारवाडी यांनी तरी मागे का राहावे? आर्थिक लाभाचे जाऊद्या, पण एकदा सगळयाच समाजाची जात पडताळणी होऊन तसे सरकारी दाखले तरी गाठीशी राहावेत. हल्ली काही महिला आपली ओळख स्पष्ट होण्यासाठी माहेर-सासरची जोडनावे लावतात, तशी दोन जातींतील आईबापांच्या पोटी आलेल्या बालकाने दोन जाती दाखल्यावर द्याव्यात. पुढे मागे अशांच्याकरिता काही योजना निघू शकेल; कुणी सांगावे?

नव्या जगाच्या, नव्या युगाच्या अपेक्षा फार वेगळया आहेत. नवी पिढी वेगळया वाटा शोधते आहे. त्या शोधांसाठी प्रोत्साहन हवे. अजूनी जाती-धर्मांच्या घोळात आपले सारे समाजजीवन आणि व्यवहार आपण गुंतवत चाललो आहोत. भविष्यातील आव्हानांस तोंड देणारे सामर्थ्य फुटीरतेतून येईल?- की एकत्त्वातून?- एकत्त्वातून ते येणार असेल तर सध्याच्या आरक्षणी आंदोलनांतून व कायद्यांतून एकत्त्व बाणवले जाते की भेद वाढतो? याचे स्पष्ट उत्तर प्रत्येकाने आपल्या मनाशी दिले तर आरक्षणांच्या सरकारी लाटांतही समाजवृक्ष अढळ राहील. अन्यथा सगळया समाजांच्या डहाळया इतस्तत: विखरून या विद्वेशी महापुरात वाहून जातील.



११ मार्च २०११ रोजी आलेल्या त्सुनामीने आशियाई देशात हाहाकार उडवला. या त्सुनामीचा मोठा फटका जपानला बसला. मात्र जपानी जनतेने अशी परिस्थिती कशी हाताळली? त्या दुर्घटनेच्या काळात डॉ.स्वाती सोमण जपानमध्ये होत्या.
भारताच्या तुलनेत अनेक दृष्टींनी, म्हणजे क्षेत्रफळ, नैसर्गिक साधनसामग्री, मनुष्यबळ इ. अतिशय कमी असणाऱ्या जपान आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील लोकसुद्धा बऱ्याचदा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींना सामोरे जात असतात. भूकंप, त्सुनामी, टायफून, वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्ती जपानच्या जणू पाचवीलाच पुजलेल्या. संकटांचा सामना करण्याची तिथल्या नागरिकांची चोख तयारी पाहून, तेथे राहताना मनात एक प्रकारची सुरक्षिततेची भावना होते.
जपानने जनजागृतीबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरलेली आहे. कसे वागावे हे सगळया जपान्यांना प्राथमिक शाळेपासून नियमितपणे शिकवले जाते व त्याचा सरावही करून घेतला जातो. ११ मार्च २०११ या दिवशी झाला तसा मोठा भूकंप होऊनसुद्धा तिथले लोक खूप शिस्तीत वागतात, स्वत: होऊन कसलेही नुकसान करत नाहीत.शाळेत करून घेतलेल्या सरावाबरोबरच जपानी लोकांना सरकारतर्फे खबरदारीच्या काही सूचना वेळोवेळी देण्यात येतात. यातली एक सूचना म्हणजे पाठीवर अडकवता येईल अशी एक पिशवी (ज्याला `बॅक पॅक' असा इंग्रजी शब्द आहे.) कायमच घरात तयार ठेवण्याची सूचना. प्रत्येकाने आपली स्वत:ची एक पिशवी आपल्यापुरती/आपल्या कुटुंबापुरती कायमच तयार ठेवायची. मोठा भूकंप झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच्या वेळी इमारतीत न राहता जवळपासच्या स्थलांतरित छावणीमध्ये झोपायची वेळ झाली, तर रात्री व पहाटे लागणाऱ्या सर्व गोष्टी या पिशवीत भरून ठेवायच्या, अशी ही तयारी असते. म्हणजे ही एक पिशवी पाठीवर अडकवून पटकन घर/इमारतीतून बाहेर पडण्यास आपण कायमच तयार! या पिशवीत काय काय असते? पिण्याचे पाणी भरलेली एक बाटली, विजेरी, मेणबत्ती, काडेपेटी, एक छोटा दुमडता येण्याजोगा चाकू, नायलॉनची दोरी, चादर, हवा भरून फुगवता येईल अशी गादी, उशी, घडी करून ठेवता येण्याजोगी प्लॅस्टिकची टॉयलेटस्, वेगवेगळया कारणांसाठी वापरता येण्याजोग्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, टोपी, छत्री, जॅकेट (ऋतूनुसार ऊन, थंडी, पाऊस यांपासून संरक्षण म्हणून) सुक्या व लगेच खाता येतील अशा पदार्थांची एखाददोन पाकिटे (अशा खाद्यपदार्थांची एक वेगळी यादीच वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येते. त्यात सुका मेवा, साखरयुक्त गोळया-चॉकलेटस् इत्यादी असतात. जेणेकरून उपाशी राहायची वेळ आली तर लगेच चक्कर येऊ नये ही खबरदारी.) याशिवाय कुणाची काही नियमित औषधे सुरू असल्यास आठवडाभर पुरतील एवढी औषधे, थोडे पैसे व प्रत्येकाचे ओळखपत्र (प्रगत देशांमध्ये सगळया नागरिकांचे पासपोर्टव्यतिरिक्त एक `बायोमेटि्न्क' ओळखपत्र असते.)
वीजपुरवठा नसलेल्या घरांमध्ये, इमारतींमध्ये आपत्तीकाळात रात्री कोणी थांबत नाहीत. सगळे आपापल्या घरांमधून पाठीवर अडकवायच्या तयार ठेवलेल्या पिशव्या घेऊन जवळच्या तात्पुरत्या छावण्यांकडे म्हणजे रेफ्यूजी कँपकडे जातात. हे कँप राहत्या जागेपासून चालत जाण्याच्या अंतरावर असणाऱ्या शाळा, हॉल, पटांगणे (ऋतुनुसार)अशा जागी बनतात. रात्रभर झोपण्यापुरते सगळयांनी तिथे जायचे.
वेळप्रसंगी पटकन जपानी लोक त्यानुसार वागतात. जनसामान्य आपापली काळजी घ्यायला व जबाबदारी उचलायला समर्थ असतात. मदतकार्यास येणाऱ्या व्यवस्थेवर सर्वस्वी अवलंबून राहात नाहीत. त्यामुळे अशा नागरिकांना मदत  करणेही व्यवस्थेला सोपे जाते. सक्षम, धडधाकट लोकांमागे फार वेळ वाया न घालवता मदत यंत्रणा आपले मदतीचे प्रयत्न व वेळ वृद्ध, रुग्ण, लहान बालके अशा नागरिकांसाठी देऊ शकते.
जपानमध्ये भूकंपाच्या धक्क्याने आता घरे, इमारती, पूल वगैरे पडत नाहीत. कारण जपानमधील सगळे बांधकाम विशिष्ट पद्धतीने करण्यात येते. १९९५ साली `कोबे' इथे झालेल्या भूकंपात घरे व इमारती कोसळून त्याखाली सहा हजारांहून जास्त माणसे गाडली गेली. त्यानंतर वर्षभरात कायदा करण्यात आला. तेव्हापासून सगळे बांधकाम हे दहा रिश्टर तीव्रतेपर्यंतच्या धक्क्याला टिकून राहू शकेल अशाच पद्धतीने करण्यात येते. `जपानमध्ये पुठ्ठ्याची घरी असतात' असे आपल्याकडे पूर्वी म्हटले जायचे. आधुनिक जपानमधील घरे भक्कम असतात. घरे इमारती, पूल, रेल्वेलाईन, दळणवळणाचे मोठे रस्ते (हायवे, एक्सप्रेस वे) सर्व काही बांधताना प्रामुख्याने भूकंपाचा विचार केला जातो. जपानमधील इमारती सिमेंट-काँक्रीटच्या नसतात. त्यांचा पाया पोलादी, रबरी स्प्रिंग व रोलरवर आधारलेला असतो. पायाकडील जोत्याच्या भागात रेती, सिमेंट, विटा, दगड इत्यादींचा वापर होतो; पण वरची इमारत मुख्यत: प्रक्रिया केलेले लाकूड, विशिष्ट ्रकारचे प्लॅस्टिक (पॉलिमर), विशिष्ट प्रकारच्या काचा इत्यादींचा वापर करून बांधतात. इमारतींच्या कॉलममध्ये पोलादी केबल्स वापरतात. आपल्याकडील इमारतींपेक्षा वजनाने हलक्या असलेल्या या इमारती जास्त स्थितीस्थापक म्हणजे इलॅस्टिक असतात. त्या भूकंपाच्या धक्क्याने खूप हालतात पण कोसळत नाहीत.
इमारतींमध्ये धोक्याचा इशारा देणारी स्वयंचलित यंत्रणा बसवलेली असते. इमारतीला कुठलाही धोका उत्पन्न झाला (भूकंप, आग वगैरे) की धोक्याचे भोंगे वाजू लागतात. इमारतींमधील मूलभूत सुविधा म्हणजे वीज, पाणी व गॅस पुरवठा स्वयंचलित यंत्रणेने आपोआप बंद केले जातात. आधीच उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर विजेच्या तारा, पाण्याचे, गॅसचे पाईप तुटले असतील तर त्या गळतीतून पुढे शॉर्ट सर्किट, त्यामुळे लागणाऱ्या आगी, माणसांना होणारी इजा इत्यादी संभाव्य धोके टाळण्यासाठी ही खबरदारीची योजना केलेली असते. याची सर्वांना आधीच कल्पना असल्याने लोक कुठल्याही प्रकारचा गोंधळ माजवत नाहीत. हल्ली जपानमध्ये भूकंपाने आपले घर, इमारत पडेल याची फारशी भीती वाटत नाही. म्हणूनच `भूकंप झाला' असा आरडाओरडा होऊन कुठेही पळापळ होत नाही. जपानमध्ये प्रवास करताना रस्त्यांच्या लगतच असलेल्या टेकड्या व डोंगरांच्या बाजूने संरक्षक पोलादी जाळया उभारलेल्या आढळून येतात. काही नैसर्गिक कारणाने या डोंगराळ भागातले दगड, माती घसरू लागली तर ती थेट रस्त्यांवर पडून त्यातून होणारे अपघात काही अंशी तरी टाळता यावेत हा त्यामागचा उद्देश आहे.
आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाला अनुसरून व्यवस्था असल्याने सर्वसामान्य जपानी माणसाचा एकंदरीत जपानमधील व्यवस्थेवर प्रचंड विश्वास असतो आणि त्यांची व्यवस्था या विश्वासाला पुरेपूर उतरते.
- स्वाती सोमण
(`मराठी विज्ञान परिषद पत्रिका' मधून)

ओठापोटाचं जागतिकीकरण
प्राचीन संस्कृतींच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा आधार मानला जातो, तो म्हणजे स्वयंपाकाची साधने. त्या संस्कृतीच्या चालीरिती, प्रगती, भौगोलिक आणि सांपत्तिक परिस्थिती याविषयीचे अंदाज स्वयंपाकाच्या साधनांवरून बांधले जातात. कारण माणसाच्या खाण्याच्या सवयी आणि स्वयंपाकाची साधने ही शक्यतो बदलत नाहीत; आणि बदललीच तर त्यासाठी शेकडो वर्षे जावी लागतात असा पुरातत्त्व विद्वानांचा सिद्धांत आहे. विळीचं पातं स्थिर ठेवायचं आणि भाजी चिरणारा हात हालता ठेवायचा ही द्रविडी परंपरा आहे; तर भाजी हाताच्या मुठीत स्थिर धरून सुरीचे पाते हालते ठेवायचे ही म्हणे आर्यांची पद्धत आहे. सध्याच्या महाराष्ट्नचा विचार केला तर, कधी काळी हा महाराष्ट्न् भुईत गाडला गेल्यावर शेकडो वर्षांनी उत्खननात गावं, घरं सापडतील आणि त्यावेळी घरोघरी विळया पाहून `महाराष्ट्नत या काळात द्रविड संस्कृती होती' असा निष्कर्ष तेव्हाचे संशोधक काढतील. हे सारं एका भाषणात मी कधीतरी ऐकल्याचं आठवतं.
त्या त्या ठिकाणचं हवापाणी, त्यानुसार निघणारी पिकं, फळं-भाजी हेच त्या गावचं प्रमुख अन्न असणार हे एकेकाळी ठीक होतं. निसर्गनियमाने तेच अन्न पचन आणि पुष्टीसाठी योग्य असतं हेही बरोबर. कोकणात तांदूळ, देशावर ज्वारी, पंजाबात गहू, गुजरातेत डाळ आणि बाजरी हे भूगोलात वाचलं आहे. माझ्या लहानपणी ज्वारीची भाकरी हे घरचं मुख्य जेवण होतं. शाळा-ऑफीसं सुरू झाल्यावर मधल्या वेळच्या डब्यात पोळी-भाजी सुरू झाली. पावसाळयात पालेभाजी, हिवाळयात इतर भाज्या आणि उन्हाळयात उसळी. कर्नाटक जवळ असल्यामुळं इडली-डोसा-अप्पे यांची कधीतरी नावं ऐकलेली, ती पुढच्या काळात घरोघरी घुसली. कधीतरी एखादा पदार्थ घरी होऊ लागला. ती अपूर्वाई नंतर संपली आणि ते पदार्थ वारंवार होऊ लागले. घरी लागोपाठ इडली झाली तर `या इडलीनं पिडली बाई' अशी तक्रार माझी आजी करत असे. त्यामागे भाजी-भाकरीचं जेवण चांगलं हा संस्कार होता, की खरंच त्या लोकांना पुरातत्त्वाच्या सिद्धांतानुसार, वैविध्य रुचत नव्हतं कोणास ठाऊक? आमच्या गावातच काय पण जवळच्या शहरातसुद्धा हॉटेलवजा टपरीत च्या-पोहे-उपीट-मिसळ-भजी एवढीच काय ती व्हरायटी. शिवाय हॉटेलात जाणे फारसे प्रतिष्ठित मानले जात नसल्यामुळे आम्ही आत कधी डोकावलोच नव्हतो. पंजाबी डिश म्हणजे पोहे-उपमा असलीच काहीतरी वस्तू असावी अशी कॉलेजला जाईपर्यंत माझी समजूत होती. पिझ्झा-पास्ता ही नावं कोणाच्या गावीही नव्हती. शेजारणीबद्दल चहाड्या करताना `अगं ती म्हणे पोरांना दर बाजारी चाकलेटं आणून देते' असा सूर होता. कॉलेजसाठी शहरात गेल्यावर आम्हा मित्रकंपूची साधारण परिस्थिती तशीच होती. एकदा खानावळीला सुटी मिळाली आणि माझ्याबरोबर कोणीच मित्र नव्हता, त्यामुळं `एकट्यानंच हॉटेलात कसं जायचं' या संकोचातून मी जेवणाची गोळी घेतली होती. पुढं या मागासलेपणावर मात करण्यासाठी पंजाबी जेवणाची व्यवस्थित ऑर्डर देता यावी म्हणून आमच्या कंपूने अधूनमधून पंजाबी जेवण घ्यायला सुरुवात केली.
एव्हाना ग्लोबलायझेशनचे वारे वाहू लागले होते. चीज, बटर, पिझ्झा, बर्गर ही नावे नांदू लागली होती. एक चायनीज रेस्टॉरंट जवळपास सुरू झालं. पहिल्यांदा तिथं गेलो तेव्हा आजूबाजूला बोटे करून `ते तसलं आण' अशी ऑर्डर दिली. पदार्थ आवडला तर ते नाव घोकत बाहेर पडायचं. हळूहळू पंजाबीइतकंच चायनीज ओळखीचं झालं.
हॉलंडला पहिल्यांदा गेलो तेव्हा रात्रीची पोटपूजा करण्यासाठी एका रेस्तोराँमध्ये गेलो होतो. तिथलं मेनूकार्ड पाहिलं. `मला डच भाषा समजत नाही, इंग्लिश कार्ड दे' असं वेटरला म्हणालो. माझ्याकडे `हा कोण परग्रहावरून आलाय' असा कटाक्ष टाकून `हे इंग्लिशच कार्ड आहे' असं सांगून वेटर हात उडवत निघून गेला. पोटात कावळे ओरडत होते आणि त्या कार्डावरचा एकही पदार्थ किंवा त्याखाली दिलेला तपशील मला अगम्य होते. युरोपमध्ये बरेचदा खाद्यपदार्थांना फ्रेंच नावाने संबोधण्याची एक फॅशन आहे. आपल्याकडे हजामतीच्या दुकानाला केशकर्तनालय म्हणतात तसे!
अतिपूर्वेकडे वेगळीच पंचाईत होते. तिथे शाकाहारी जेवणातसुद्धा मासे असतातच. ज्यांना मासे आवडत नाहीत त्यांना शाकाहारीसुद्धा जेवता येत नाही. तिथल्या मॅकडोनाल्डवाल्या पोरानं `व्हेज म्हणजे काय' असं विचारलं होता. मग चिकन बर्गर मागवला आणि थाळी पुढे आल्यावर चिकनचा पिस बाजूला काढून ती शाकाहारी केली. `चिकन बर्गर विदाऊट चिकन' असे मागवावे लागले. आमच्या घरी मधल्या वेळी खाण्यास तिखटामिठाची पुरी करतात, ती इतकी हिमूळ असते की तिला `बिन तिखटामिठाची तिखटामिठाची पुरी' असे म्हणावे लागते.
हळूहळू जगाची `तोंड'ओळख झाली. पंजाबी आणि उडप्यांच्या बरोबर चायनीज आणि पिझ्झा टपऱ्याही गल्लीबोळात दिसू लागल्या आहेत. मेक्सिकन, थाई हीसुद्धा आता अपूर्वाई राहिली नाही. भारतातच नव्हे तर जगाची परिस्थिती थोड्या फार फरकाने अशीच झाली आहे. आपल्याकडे पिझ्झा जेवढ्या सहज मिळतो तेवढ्या सहज लंडन, अॅमस्टरडॅम, न्यूयॉर्क, टोरँटो येथे पंजाबी किंवा दक्षिणी पदार्थ मिळतात. टोरँटोत तर ही मंडळी इतकी आहेत की हे अमृतसर किंवा चेन्नई असेल असा भास व्हावा. या युगात वाट्टेल ते पदार्थ वाट्टेल त्या नावाने वाट्टेल तिथे मिळू लागले. बॉम्बे भेळ हा पदार्थ मुंबई सोडून साऱ्या भारतात आणि भारताबाहेरही मिळतो. बॉम्बे मील्स अशी ऑर्डर दिली तर मुंबईचा वेटर तोंडाकडे पाहात राहतो पण हैद्राबाद किंवा चेन्नईचा वेटर थाळी मांडू लागतो. इंडियन करी ही डिश भारताबाहेरच सगळीकडे मिळते. लंडनमध्ये तर ती सर्वात लाडकी परदेशी डिश म्हणून मिरवते. ऑथेंटिक इटालियन अल्फेडो सॉस हे प्रकरण इटलीत कुठेही मिळत नाही, त्यासाठी अमेरिकेत जावं लागतं. चायनीज डोसा, शेजवान राईस, सिंगापूर नूडल्स, फ्रेंच फ्राईज हे सगळे पदार्थ त्या त्या नावाच्या देशाबाहेर मिळतात.
एकदा दिल्लीत होतो. अस्सल पंजाबी जेवायचं असं ठरवून शोध सुरू केला. गरम पराठा, त्यावर लोणी आणि शेजारी थंड ताकाचा ग्लास  डोळयापुढं तरळू लागला. तिथल्या पोऱ्यानं विचारलं, `काय आणू साहेब, सॅन्डविच, पिझ्झा की चायनीज?' मी तिथून बाहेर पडलो. सब-वे सॅन्डविच आणि लोकर पिझ्झा शॉप दिसत होते. एक चायनीज रेस्टॉरंट, बरिस्ताँ कॉफी शॉप आणि तत्सम दोन तीन दुकानं... फारसं फिरायला पोट तयार नव्हतं. पंजाबी लस्सीची तहान सॉफ्ट डिं्न्कवर भागवून मी परतलो. पिझ्झा हट्, कोस्टा कॉफी, इटालियन रेस्टॉरंट, बर्गर किंग अशी मंडळी दिल्लीत जागोजागी आहेत. दिल्लीऐवजी न्यूयॉर्कला फिरतो की काय असं वाटावं! पुष्कळांना विचारून एक चांगलंसं पंजाबी रेस्टॉरंट शोधलं. राजम्याची चव आठवत पायऱ्या चढलो पण मेनूकार्डवरचे दर वाचून दिल्लीऐवजी आपण न्यूयॉर्कमध्ये असल्याची खात्रीच वाटू लागली. काही जरी मागवलं तरी एकट्यासाठी ८००-१००० ची चटणी होणार!
स्वस्त आणि अस्सल पंजाबी जेवायचं असेल तर दिल्लीऐवजी टोरँटोला जावं. पुरातत्त्व विद्वानांच्या सिद्धांतांना उभा छेद देणारा हा बदल गेल्या २०-२५ वर्षांतला आहे. कोणत्याही पदार्थाची कृती पेपरला किंवा टीव्हीवर पाहिली तर उपपदार्थांच्या यादीत कोथिंबीर, आले, जिरे यांची जागा पार्सेली, बासील, ब्लॅक पेपर यांनी घेतली आहे. फ्लॉवरचा रस्सा करताना फोडणीवर परतण्याऐवजी सॉस पॅनमध्ये शॅलोफ्राय करावे लागते.
खरंच सगळी पृथ्वी काळाच्या उदरात गडप झाल्यावर काही शतकांनी उत्खनन झालं तर तेव्हाचे संशोधक निष्कर्ष काढतील, `हा संपूर्ण ग्रह म्हणजे एक छोटं गाव असावं, कारण तिथे पळया आणि उलथणी एकसारखी दिसतात.'
- चारुदत्त आपटे, टोरँटो


बंध नसेल तर व्रत कसले...
मुळातच सगळा समाज सदासर्वकाळ चार वर्णात विभागलेला असतो. ही विभागणी स्थल-काल निरपेक्ष होत असते. वर्ण हे गुणकर्माने ठरावेत असा संकेत असतो, प्रत्यक्षात ते तसेच घडले व घडते असे नाही. ज्ञान-सत्ता-संपत्ती आणि कला संस्कृती अशा, जीवनाच्या चार अंगांची जबाबदारी त्या त्या वर्णावर दिली आहे. मुख्य म्हणजे हे चार घटक एकमेकांच्या विरोधी नव्हे, तर परस्पर पूरक असले तरच समाजजीवन फुलते, उंचावते. त्यातला एक घटक जरी उणावला किंवा मातला तर समाज कोसळतो ज्यांच्याकडे ज्ञानविषयक जबाबदारी आहे त्यांना सामान्यत: ब्राह्मण म्हटले. याउलट ब्राह्मण म्हटला की तो ज्ञानसंपन्नच असणार हा समज विपर्यस्त आहे. जन्माने ब्राह्मण कुळ लाभले तर पूर्वसंस्कारांमुळे त्यास अध्ययन-अध्यापन तुलनेने सोपे होईल. या रचनेमध्ये अगदी हवाबंद कप्पे असण्याचे कारण नाही. सुतार-कुंभार-लोहार असे कौशल्य ज्या मुलाने आपल्या घरी जन्मापासून अनुभवले आहे त्याने शाळेत टेक्नीकल विषय घेतला तर तो ब्राह्मण पोराला सहज मागे टाकतो, आणि संस्कृतची शिष्यवृत्ती साधारणत: ब्राह्मण पोराला मिळते यात श्रेष्ठ-कनिष्ठत्व कसले?

या प्रकारची वर्णव्यवस्था जगाच्या पाठीवर सर्वत्र असते. माशेलकर, भटकर, नारळीकर, कलाम हे संशोधक ज्ञानमार्गी ऋषी आहेत. त्यांची जन्म-जात कोणती याचा कोणी कधी उल्लेख तरी करते काय? अशांचे कार्य हेच ब्रह्मकर्म होय. आयुष्यभर त्यांनी ज्ञानयज्ञ चालविला आहे. विविध संस्थांमधून ते इतरांच्या ज्ञानयज्ञास मदत करीत आहेत. ब्राह्मण वर्णासाठी जी षट्कर्मे सांगून ठेवली आहेत त्यांपैकी यजन (यज्ञ करणे) - याजन (दुसऱ्याच्या यज्ञात पौरोहित्य करणे) याचा आजच्या काळातील हा अर्थ घ्यावा. अध्ययन-अध्यापन तसेच दान-परिग्रह ही अन्य चार कर्मे जे निष्ठेने करत असतील ते ज्ञानमार्गी आहेत. आजच्या परिभाषेत त्यांना हवे तर बुद्धिवादी म्हणावे. ही कर्मे जो वर्ग निष्ठेने करतो त्या वर्णास ब्राह्मण म्हणावे किंवा दुसरे काहीही म्हणावे.... त्याच्या कर्माची, वृत्तीची, जबाबदारीची समाजधारणेसाठी गरज असतेच असते. याच प्रकारे इतर कोणत्याही वर्णाची कर्मे समाजधारणेसाठी अत्यावश्यक असतात आणि ती परस्पर पूरकच असली पाहिजेत.

या सर्व जीवनक्रमाची सुरुवात कोणत्या कृतीने किंवा संस्काराने करायची हा प्रश्न मुंज या विधीशी निगडित असतो. ज्या काळामध्ये शेंडी राखणे, लंगोटी लावणे, मातृघास भरविणे अशा रुढींची चलती होती आणि त्या काळात ते अनुरूपही होते, त्या काळातील हे सर्व आचार आजच्या काळात जसेच्या तसे लागू होतात असे नाही. त्या काळी गुरूगृही जाऊन विद्या शिकायची असा प्रघात असल्यामुळे गुरुगृही जाण्याचा आणि जबाबदारीची जाणीव करून देण्याचा मुंज हा एक विधी होता. आज गुरुकुल पद्धती जवळजवळ नामशेष झाली आहे. अलीकडे पिचत कुठे त्याचे पुनरुज्जीवन होताना ऐकतो. परंतु साधारणत: सहा वर्षाचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जाताना त्याला नवे कपडे घालून शाळेच्या ताब्यात देणे म्हणजेच त्याचे नाव शाळेत घालणे हा आधुनिक मुंजीचाच एक प्रकार आहे. मुंज म्हटले की त्याची टवाळी करावी किंवा त्याचे अवडंबर करावे असे काही नाही. पण कोणे एके काळी ब्राह्मण समाजाने आपले श्रेष्ठत्व मिरविले असेल तर आज त्याला या एवढ्याशा कारणावरून दूषणेही दिली जातात, हा परिस्थितीने केलेला संस्कारांचा विपर्यास आहे.

मौंजीबंधन या शब्दात वेगळा अर्थ सामावला आहे. दर्भासारखे वाळलेले गवत थोडेसे वळून त्याचा करदोटा कमरेभोवती बांधायचा असा तो विधी आहे. त्याला मौंजीबंधन असे म्हटले. विद्याभ्यास करताना व्रतस्थ राहणे यात गैर काहीच नाही. उलट ते निकडीचे आहे. असे एखादे व्रत स्वीकारण्यासाठी व्रतबंध करणे यासाठी मुंजीचा विधी केला जातो. तो केवळ ब्राह्मण समाजाने किंवा पुरुषांनीच करावा असे मुळीच नाही. प्राचीन काळी स्त्रीची मुंज होत असे आणि स्त्री यज्ञोपवीत धारण करीत असे असेही कित्येक संशोधक म्हणतात. कौशल्यावर आधारित ज्यांचे व्यवसाय आहेत असे सोनार-सुतार या समाजातही मुंज असते आणि क्षत्रिय मराठ्यांत तर ती असतेच असते. इतकेच नव्हे तर मुस्लिम समाजात मुलाचा सुंता करण्याची जी पद्धत असते तिलासुद्धा त्यांच्या समाजात आपल्याकडे मुंज असेच म्हणतात. थोडक्यात असे की उगवत्या वयाच्या मुलाला त्याच्या आयुष्यक्रमाला उपयोगी पडतील अशी काही व्रते शिकवणे याला व्रतबंध किंवा मुंज असे म्हणावे आणि आजच्या काळात शोभेल अशा रितीने तो विधी प्रत्येकाने अवश्य करावा.

यातील दागदागिने, देणीघेणी, मेजवान्या, कपडेलत्ते, बॅन्ड-वरात हा सर्व अकारण हौसेचा भाग आहे. ज्यांना हौस सकारण वाटते त्यांनी ती कोणत्याही प्रसंगाने करावी. जन्माचा किंवा नामकरणाचा तितकाच मोठेपणा मिरवायला तरी कोणाची हरकत असणार? अलीकडे पुढाऱ्यांचे वाढदिवससुद्धा तशा प्रकारच्या हौसेने साजरे होत असतात. याचा अर्थ ते सर्व योग्यच आहे आणि धर्मात कुठेतरी सांगितले आहे असा काही भाग नाही. काळानुसार येणारा तो हौसेचा भाग आहे. त्याचा व्रतबंधाशी काही संबंध नाही.

काही मोठ्या कार्यालयात पदाधिकारी होण्यासाठी शपथवजा निवेदन करावे लागते. विधिमंडळात निवड झाल्यानंतर किंवा मंत्रीपद स्वीकारताना लोकप्रतिनिधीने शपथपूर्वक आपल्या कर्तव्यांचा उच्चार करायचा असतो. त्याच प्रकारे विद्याभ्यासाला प्रारंभ करताना किंवा कोणत्याही कौशल्याचे प्रशिक्षण सुरू करताना `मी हे कशासाठी करीत आहे' याची स्पष्ट जाणीव घेऊन ती शपथपूर्वक आचरणे हा विधी मनुष्य जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला मुंज असे नाव दिले की कोणाचा पोटशूळ उठण्याचे अजिबात कारण नाही.

स्वत:ची जात किंवा वर्ण विसरून या साऱ्या विधीकडे पाहिले तर त्यामागचे अर्थ, विज्ञान आणि कालानुरूपता सहज समजण्यासारखी असते. खेडोपाड्यांमध्ये अशा तऱ्हेचा समाज एकरसतेने राहात होता. आजकाल राजकारणाचा प्रसार सर्वत्र झाल्यामुळे जातींच्या फाटाफुटीवर आर्थिक कमाई आणि राजकीय प्रतिष्ठा येऊ लागली आहे. त्यासाठी समाजाशी नाते तोडून उच्च-नीचतेची, जातीय भेदभावाची, विषमतेची दरी रुंदावणे कित्येकांना आवश्यक असते. त्यासाठी कधी काही संशोधन निमित्त होते, कधी इतिहासाचा एखादा दाखला पुरेसा होतो, कधी एखादी क्षुल्लक घटना कारणीभूत होते, तर कधी आंतरजातीय विवाह, पाणवठा अशाही गोष्टी पुरेशा होतात. पण ही दरी वाढत जाणे समाजाला घातकच असते. तसा प्रयत्न सध्याच्या काळात योजून केला जात आहे. त्यामुळे उच्चवर्णीयांना, विशेषत: ब्राह्मण समाजाला किंवा हिंदू तत्त्वज्ञानाला शिव्याशाप देण्यात पुरोगामित्व मानावे असला काहीतरी समज करून दिला गेला आहे. मग कधी गणपतीवर संक्रांत येते, कधी पुजाऱ्यांवर येते तर कधी शंकराचार्यांवर येते. त्यातला अर्थ ज्यांना माहीत नाही त्यांचा उद्रेक जास्त होतो आणि खरे काय याबद्दल फार जोराने बोलता येत नाही अशी आजची स्थिती आहे. पण त्यामुळे काही बिघडत नाही. ज्या गोष्टी सत्य आणि दृढ आहेत त्या उच्चारत राहायलाच हव्यात असेही नाही. समाज त्यावर विचार करण्यास समर्थ असतो. ज्यांचे संस्कार झाले असे म्हणतात ते योगायोगाने ब्राह्मणही असतील, परंतु त्यांच्या जन्मजातीपेक्षा त्यांच्या संस्कारालाच अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे याचेही, मुंजीचे समर्थन करणाऱ्या ब्राह्मण समाजाने भान ठेवले पाहिजे.


आठवांचे साठव...!
आमचे `दिग्दर्शक'
तबला वाजवायला मी लहानपणी शिकलो. शाळकरी वयात बऱ्यापैकी सराव झाला होता. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी कऱ्हाडच्या सायन्स कॉलेजात असताना दिवाळीनंतरच्या सत्रात स्नेहसंमेलन होते. माझा तसल्या घडामोडींशी दूरान्वयानं सुतराम संबंध नव्हता. एकतर अशा कार्यक्रमांत भाग घेण्याचा माझा पिंड नव्हता, व नाही. मला सभाधीटपणा किंचितमात्र नव्हता. आणि स्नेहसंमेलन-सहल-क्रीडास्पर्धा वगैरे रंग खेळण्याजोगी परिस्थिती नव्हती.
दुपारनंतर प्रॅक्टिकल चालू असताना कॉलेजच्या शिपाई आला आणि मला बोलावून नेले. प्रा.उमर्जीकर हे भूगर्भशास्त्राला होते, त्या विषयाशी माझा संबंध नव्हता. मी त्यांना भेटलो. ते संमेलनाच्या मनोरंजन विभागाचे प्रमुख होते, हे तिथं मला कळलं. त्याच्याशी तर माझा त्याहून संबंध नव्हता. त्यांच्या सांगण्यानुसार, बरेच कार्यक्रम संगीत-गाणी वगैरे होत आहेत, आणि साथीला तबल्यासाठी कॉलेजात कोणीच नाही. पेंढरकर हा एक तबल्याचा विद्यार्थी होता, त्याला स्वतंत्र-सोलो-तबलावादनास वेगळा काही वेळ दिला होता. मी `साथ'सांभाळावी असे त्यांचे म्हणणे. मला हो म्हणण्याचा धीर झाला नाही. बऱ्याच सबबी सांगितल्या. पण काही प्राध्यापक, वर्गबंधू यांच्याकरवी दबाव आला. सोबती-मित्रांनी, `लेका, एवढा भाव का खातोस?' हेही म्हणून झालं. शेवटी बरं म्हणावं लागलं. मनात खूप भीती-दडपण होतं.
सायन्स कॉलेजच्या मनोऱ्यावर एक प्रशस्त खोली होती. तिथं दररोज दुपारनंतर तालमी सुरू झाल्या. तबलेवाला मिळाल्यावर एक वाद्यवृंद (ऑर्केस्ट्न) बसवायचं ठरलं. हार्मोनियमला एक मुलगी होती, ती आमच्यापुढं दोन वर्षं-पदवीच्या वर्गात. बहुधा तिचं आडनाव उमराणी. तिचा हात हार्मोनियमवर फार सफाईनं फिरायचा. ती प्रमुख वादक. बाकी काही वाद्यांची जुळणी झाली. हिंदी-मराठी लोकप्रिय गाण्यांचे मुखडे किंवा एखादं कडवं घेत, समान सुरावटीतून पुढचं गाणं `पकडायचं' असा तो कार्यक्रम. प्रा.उमर्जीकर यांनी खूप मेहनत घेतली आणि आम्हाला घ्यायला लावली. साथीला घुंगरू किंवा चाळ पाहिजेत, ते तबल्याशी नीट जमेनात. म्हणून माझ्या उजव्या मनगटाशी ते गुडाळावेत असं ठरलं. शिरसाच्या झाडाला रुंदमोठ्या शेंगा असतात, त्या पूर्ण वाळल्या की आतील बिया खळळ खळळ वाजतात. अशा चारपाच शेंगा एकत्र बांधून मस्त खुळखुळा बनवला.
प्रत्यक्ष कार्यक्रमाची वेळ जवळ आली. तयारी चांगली होती. त्या शेंगांच्या खुळखुळयावर क्रेप कागद मढवल्यावर ते `वाद्य' ओळखेना. स्टेजवर बरा दिसेल असा शर्ट माझ्याकडं नव्हता. इस्लामपूरचा शशिकांत जोशी हा `खोलीमित्र'; त्याचाही एकमेव फुलशर्ट, तो घेतला, कारण हाताशी बांधलेले घुंगरू दिसू नयेत! रामटेके नावाच्या विद्यार्थ्याचे `शूर आम्ही सरदार..', प्रा.डांगे यांचे `ओ मेरे शाहे..तुम मेरे पास होते हो..' इ.गीतांना केवळ ठेका धरायचा होता, विशेष कसरत नव्हती. पण त्यांमुळे माझी भीड चेपली. शेवटी शेवटी वाद्यमेळ हा आमचा मास्टरपीस होता.
त्या मुलीच्या (उमराणी?) पेटीतून एकेक गाणं उलगडत चाललं, तशी समोरच्या गर्दीतून टाळया-ठेका सुरू झालं. माझा तबलाही छान `लागला' होता. एकातून दुसरे असे गाणे होत शेवटी `लेके पहला पहला प्यार..'ची पहिली सुरावट आली तसं गर्दीनं आख्खं आवार डोक्यावर घेतलं. हा मेळ संपताच, शिट्या टाळया आणि `वन्स मो%%र' च्या आरोळया सुरू झाल्या. ती मागणी मान्य करावी लागली.
पंचेचाळीस वर्षांनंतर इथं जवळच्या एका दासबोध पारायणात प्रा.उमर्जीकर हे प्रवचनासाठी आले होते. मी ओळख दिल्यावर त्या घाईतच तीनचार मिनिटं माझ्या घरी येऊन गेले. माझ्या पत्नीची ओळख करून दिली. त्यांनी ती वाद्यमेळाची आठवण तिला सांगितल्यावर मलाच फार आश्चर्य आणि आनंद वाटला. लांब बाह्यांचा शर्ट मी दुसऱ्याचा मागून घेतल्याचा उल्लेख त्यांनी केल्यावर माझं मन भरून आलं.  
- वसंत आपटेे, `वाल्मिकी' किर्लोस्करवाडी ४१६३०८



Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन