व्यक्तीची सामाजिक जाणीव
या समाजाचे आपण काही देणे लागतो ही गोष्ट प्रत्येकाला मान्य असते, परंतु आपले देणे आपल्या घेण्यावरती अवलंबून राहू नये तसेच आपल्यावरचे समाजऋण जशाच्या तशा पद्धतीनेच शंभर टक्के फेडणे शक्य नसते. व्यवहारात जशास तसे हा न्याय आपण उपयोगात आणू पाहतो तसे समाजऋणाच्या बाबतीत होत नाही. एका माणसाला एका स्कुटरवाल्याने धक्का दिला आणि त्याचा पाय मोडला. दुसऱ्या एकाने त्याला दवाखान्यात नेलं, औषधपाणी केलं, घरी कळवलं, खूप मदत केली. या ऋणाची परतफेड करायला हवी म्हणून या पेशंटने बरे झाल्यानंतर स्कुटर बाहेर काढली आणि त्या उपकारकर्त्याचा शोध घेऊन त्याला धडक दिली. नंतर दवाखान्यात वगैरे नेलं. अशा पद्धतीने ऋण फिटत नाही. त्यासाठी अपघाताने अडचणीत सापडलेल्या दुसऱ्या कोणालाही मदत केली पाहिजे.
धर्म तरी वेगळे काय सांगतो? स्वत:शिवाय दुसऱ्याच्या हितासाठी आपण जे करतो ते म्हणजे धर्म. आपण स्वत:साठी घर बांधतो पण इतर गावातला कुणी पांतस्थ येईल त्याला राहण्यासाठी काही व्यवस्था आपण केली की ती धर्मशाळा होते. स्वत:च्या भविष्यासाठी आपण पैसे बाजूला ठेवतो, पण दुसऱ्यासाठी काही पैसे बाजूला ठेवले तर ते धर्मादाय होतात. स्वत:सह इतरांच्या कामासाठी श्रम करणे, पैसा देणे म्हणजे सामाजिक कार्य - म्हणजे धर्म. त्यासाठी संस्कारांची गरज असते. हे संस्कार होण्याच्या तीन जागा आहेत - घर, समाज आणि शाळा. दोष इतरांच्यात आहेत असे आपण धरून चालतो. व्यक्तिगत स्वत:ला वगळून समाज होत नाही. व्यक्तीची उन्नती तेव्हाच होते जेव्हा ती स्वत:ला `माझे समाजासाठी काही योगदान दिलेच पाहिजे' असे मानते. व्यक्ती आणि समष्टी यांचे नाते असे असते. समुद्र असेल तरच लाटा तयार होतात. या लाटांमुळे आपल्याला समुद्राची जाणीव होते. आपण व्यवहाराशी जास्त निगडित राहतो. वस्तूची किंवा श्रमाची किंमत ठरवून ती देऊ पाहतो. पण त्याचे मूल्य जाणून घेतले पाहिजे. चोरीचा माल विकत घेतला तर त्याची किंमत दिल्याचे समर्थन करता येईल पण त्याचे मोल भलतेच महाग पडेल. इथे व्यक्तिगत व्यवहाराचा समाजाशी संबंध येतो.
Comments
Post a Comment